Saturday, March 23, 2024

जलपर्णी

तळं मरतंय म्हणून तू रडू नकोस नलिनी
पाहा कशी आनंदाने लहरतेय ही जलपर्णी
याच तळ्याच्या प्राणवायूवर ही फोफावली
अन् तळ्याच्या मढ्यावरही असेल ताजीतवानी

तुझा मात्र होणारच होता वंशविच्छेद
पण असू नये तुला त्याचा काही खेद
There will be too much filth
To give someone a new birth
And deep down we both know
The नीच will inherit the earth.

Saturday, February 10, 2024

लग्न

अंजू रंगारगल्लीच्या कोपर्‍यावरून कार्यालयाकडे जायला वळली, तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. मे महिना असल्यामुळे अजून अंधार पडला नव्हता. त्याच कोपर्‍यावर बाबुरावचे हॉटेल होते. हॉटेलातल्या रेडिओवर नवीनच लोकप्रिय झालेले 'देखा ना हाय रे, सोचा ना हाय रे' हे गाणे वाजत होते. दारातच बसलेला आचारी मोठ्या कढईत बटाटवडे तळत होता. नुकत्याच तळून काढलेल्या वड्यांचा खमंग वास अंजूच्या नाकात शिरला आणि पोटातल्या भुकेची तिला जाणीव झाली. दुपारपासून कार्यालय ते घर आणि घर ते कार्यालय, अशा तिच्या आणि मंजूच्या सतराशेसाठ फेर्‍या झाल्या असतील. दुपारी घरून कार्यालयात येताना सगळ्यांनीच भरपूर सामान पिशव्यांमध्ये भरभरून आणले होते, तरीही सारखे काही ना काही राहिल्याचे लक्षात यायचे, आणि मग अंजूला किंवा मंजूला किंवा दोघींनाही घराकडे पिटाळून ते मागवले जायचे. आताही हळदीची वेळ होत आली, तेव्हा आईच्या लक्षात आले की चोळखणांच्या गठ्ठ्यांपैकी एक गठ्ठा घरीच राहिला आणि अंजूला जावे लागले. पायीच हेलपाटे मारून तिची पाऊले आणि चप्पल धुळीने माखली होती. बहिणीचे लग्न आहे म्हणून नवे कपडे घालावे, मेंदी-बिंदी लावावी, छान नटावे-सजावे या जाणिवेचा टिपूसही तिच्या किंवा तिच्या भावंडांच्या मेंदूत सापडला नसता. आई-बापांनी सांगितलेल्या कामाला नाही म्हणण्याची तेव्हा पद्धत नव्हती आणि तसे म्हटल्यास भयंकर परिणामांना सामोरे जायची वेळ येत असे. शिवाय झटकन मोपेडवर बसून भुर्रकन इकडून तिकडे जाण्याचीही सोय नव्हती. अर्थात घरातल्या कडक शिस्तीखाली चेमटलेल्या अंजू-मंजूच्या साध्या-सरळ मनांना, नाही म्हणण्याचा किंवा वाहनाची सोय करवून घ्यायचा विचार शिवलाही नव्हता. अंजू तर अकरावीत असूनही इतकी बाळबोध होती की दोन-तीन वर्षात तिचीही बोहल्यावर चढायची वेळ येणार आहे हासुद्धा विचार तिच्या डोक्यात आला नाही. गाण्याच्या तालावर चालण्याचा वेग वाढवत अंजू कार्यालयात पोचली. 
ट्रक भरून आलेल्या वर्‍हाडातल्या लोकांचा चहा वगैरे घेऊन झाला होता. कार्यालयात टाकलेल्या मळकट गाद्यांवर बसून, किंवा कार्यालयाबाहेर तीन-तीन चार-चारच्या गटांनी उभे राहून, तंबाखू मळत माणसे निवांत गप्पा छाटत होती. कार्यालयाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मोठमोठ्या चुलाण्यांवर, मोठमोठ्या कढयांमध्ये दुर्गाबाई आचारिणीची माणसे निर्विकारपणे अन्न शिजवत होती. नवरीमुलीच्या व नवरामुलाच्या घरचे मात्र तणावाखाली लगबग करत होते. लवकरात लवकर हळद लावणे वगैरे प्रकार आटोपणे गरजेचे होते. आत्ता निवांतपणे गप्पा छाटणारी वर्‍हाडी मंडळी, जेवणाला थोडा जरी उशीर झाला, तरी आयुष्यभर त्याबद्दल काव-काव करणार हे सगळ्यांनाच माहित होते. मुलीच्या आई-वडिलांच्या, म्हणजे जयंतराव-मीराबाईंच्या चेहर्‍यांवर तर खूपच ताण दिसत होता. हातघाईच्या लढाईत शत्रूपक्षाच्या शे-दोनशे भालाईतांनी खिडीत गाठलेल्या मावळ्यांसारखे दोघेही चौफेर लढत होते. आल्याबरोबर अंजूने ते खणांचे पुडके मीराबाईंच्या हातात दिले. त्यांनीही ते कोणतीही प्रतिक्रिया न देता झटकन घेतले व लगबगीने पुढच्या कामाला लागल्या. अंजू मग एका बाजूला तिचे चुलत काका-काकू वगैरे मंडळी ज्या खोलीत होती, तिथे जाऊन उभी राहिली. जयंतराव म्हणजे जमदग्नीचा अवतार हे माहित असल्याने, हास्य-विनोद किंवा चेष्टा-मस्करी अगदीच वर्ज्य होती. बाहेर मुलाकडच्या मंडळींमध्ये थोडा-फार हास्यविनोद चालू होता आणि मुलाच्या आईचे मोठ्याने बोलणे ऐकू येत होते. इकडे मात्र तणावपूर्ण शांतता होती. जयंतराव म्हणतील तसेच करायचे असा नियम असल्याने स्वतःहून काही करणे, प्रसंगाचा ताबा घेणे वगैरे त्यांच्या मुलींनाच काय, मीराबाईंनाही शक्य नव्हते. अशी सगळी लगबग चालू असताना मध्येच मीराबाई काहीतरी घ्यायला खोलीत आल्या. त्यांच्या मागोमाग जयंतराव खोलीत आले. त्यांची काही तरी बोलाचाली झाली आणि अचानक जयंतरावांनी सगळ्यांदेखत फाडकन् मीराबाईंच्या श्रीमुखात भडकावली. खोलीत क्षणभरात सुन्न शांतता पसरली. प्रचंड अपमानित झालेल्या मीराबाई अत्यंत दुखावलेल्या, उद्विग्न चेहर्‍याने दोन क्षण जयंतरावांकडे बघत नुसत्या उभ्या राहिल्या आणि मग महत्प्रयासाने आवंढ्याबरोबर अपमान गिळताना त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. हे पाहणार्‍या अंजूच्या आत खोलवर काही तरी तुटले. आपल्या आई-वडिलांची नेहमीची भांडणे पाहताना तिला आतून ठिसूळ आणि भुसभुशीत झाल्याची भावना व्हायची. सगळ्यांसमोर आईचा झालेला अपमान पाहून त्याच तीव्र भावनेने तिच्या पोटात खड्डा पडला. डबडबलेल्या डोळ्यांनीच तिने मीराबाई व जयंतरावांना खोलीबाहेर जाताना पाहिले.  "मानलं बुवा दादाला! असा वचक पाहिजे!", असं तिच्या चुलत काकांपैकी कोणीतरी म्हणाले आणि तिला जोरात ओरडावेसे वाटले; पण आवाज उमटण्यासाठी आवश्यक ती हालचालच तिच्या घशाच्या स्नायूंनी केली नाही. 
        
   * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *                                                                    

        जयंतराव एका सरकारी कचेरीत उच्च दर्जाचे कारकून होते. त्यांचे वडील फार श्रीमंत होते म्हणे; पण जयंतरावांच्या बालपणीच त्यांचे वडील वारले, आणि भावकीने सगळ्या ऐश्वर्याचे लचके तोडले. न कळत्या वयातच झालेल्या भयाण दारिद्र्याच्या हल्ल्यात जयंतरावांच्या मेंदूतील विलास, विनोद, वात्सल्य, आणि स्वधारणा ही ठाणी उध्वस्त झाली होती. वडिलोपार्जित संपत्तीचा कवडीचाही फायदा न होता केवळ उरल्या-सुरल्या अवशेषांसाठीचे कोर्टकज्जेच वाट्याला आल्याने, "काय साली कटकट आहे!" हे त्यांचे जीवनासंबंधीचे बोधवाक्य झाले होते. भयंकर कडवटपणा, भयंकर कंजूषपणा, भयंकर रागीटपणा, आणि "लोक काय म्हणतील" याची भयंकर भीती, अशा भयंकर गोष्टींनी ते भयंकर ग्रस्त असायचे. काबाडकष्ट करून जीवन जगावे लागल्याने त्यांना सतत सन्यास घेऊन हिमालयात जावेसे वाटे. तरीही, स्वतःला हवे ते करण्याचे मानसिक सामर्थ्य नसल्याने, "खास लोकाग्रहास्तव" ते लग्न वगैरेही करून मोकळे झाले. मीराबाईंना ते सतत "मी हिमालयात निघून जाईन" अशा धमक्या देत असायचे. एकवीस वर्षे धमक्या देता देता रंजू-अंजू-मंजू अशा तीन मुली आणि संजू नावाचा एक मुलगा झाला तरी त्यांच्या धमक्या थांबल्या नव्हत्या. मुलगा झाल्यावर आणखी अपत्ये जन्माला येणे मात्र चमत्कारिकरित्या थांबले. 
जयंतरावांच्या कडवटपणाचा, कंजूषपणाचा, आणि रागीटपणाचा त्रास फक्त त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या लोकांनाच सहन करावा लागे. दर महिन्याला जयंतराव देत असलेल्या तीनशे रुपयांत घर चालवताना बिचार्‍या मीराबाईंचा जीव मेटाकुटीला येई. स्वतः शिकवण्या करून त्यांना जास्तीचा पैसा उभा करावा लागे. सहा माणसांचे दोन वेळचे स्वयंपाक-पाणी, धुणी-भांडी, घराची साफसफाई व त्यानंतर शिकवण्या घेणे, यामुळे मीराबाई अत्यंतिक व्यग्र असत. अगदीच असह्य झाले की त्यांचे व जयंतरावांचे कडाक्याचे भांडण होई आणि "मी हिमालयात निघून जाईन" या धमकीनंतर मीराबाईंच्या असहाय्य अश्रुपातात सहसा ते संपे. मीराबाईंच्या परिस्थितीत गेली एकवीस वर्षे फरक पडला नव्हता आणि पुढची अठ्ठावीस युगे काही फरक पडण्याची शक्यताही नव्हती. 
जयंतरावांचे बालपण ब्राह्मणी प्रभावाखाली गेल्याने त्यांचे धार्मिक आचरण ब्राह्मणांच्या वरताण होते. गळ्यात जानवे घालणे आणि रोज सोवळ्यात पूजाअर्चा करणे हा त्यांचा नित्यनेम होता. जयंतरावांची बुद्धिमत्ता आणि वाचनही अफाट होते. रोज इंग्रजी पेपर इत्यंभूत वाचल्याने त्यांना जागतिक प्रवाहांची बरीच माहिती होती. इंग्रजीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्याशिवाय इतर अवांतर वाचनही भरपूर असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर विद्वत्तेचे तेज दिसायचे. विद्वान ब्राह्मण म्हणून ते कोणत्याही रमण्यात खपून गेले असते. व्यावहारिक आयुष्यात मात्र स्वतःच्या मुलींना डॉक्टरकीचं शिक्षण देणार्‍या ब्राह्मण परिचितांपेक्षा, "मुलींना शिकवून काय कलेक्टर करायचंय का?" असे म्हणणार्‍या बहुजन मित्राचा प्रभाव त्यांच्यावर जास्त होता. "मुलगी हे परक्याचे धन असते, मुलींची लग्ने लवकरात लवकर लावून त्यांना वाटेला लावले पाहिजे" अशी सामूहिक धारणा त्यांच्या डोक्यातून पुसून टाकू शकेल, असे पुस्तक या जगात निर्माण होऊ शकले नव्हते. उलट, एका मागोमाग एक अशा तीन मुली झाल्यावर त्यांच्या लग्नाच्या खर्चाची सोय करावी लागणार म्हणून जयंतरावांचा कंजूषपणा भौमितिक भाजणीने वाढत गेला होता. पुस्तकांत वाचलेले पुरोगामी विचार आपण व्यावहारिक आयुष्यात आचरणात आणायला हवे असा पापी विचार जयंतरावांच्या शुद्ध कर्मठ मनाला कधीही शिवला नाही. अर्थातच, मुली खपवण्याचा विचार हा तसा सार्वत्रिकच होता. तीन-चार-पाच मुली आणि मग धाकटा मुलगा हे चित्र घरोघरी होते. खुद्द मीराबाईंचे वडील शाळामास्तर होते. त्यांची तीन मुलग्यांबरोबरची ही एकुलती एक मुलगी होती. तरीही त्यांनी मुलीच्या भविष्यापेक्षा "आज कोरड्या भेळीसोबत गोडीशेव खावी की बालुशाही?" या समस्येचा विचार आयुष्यात सगळ्यात जास्त केला असेल. "जयतंरावांना सरकारी नोकरी आहे" हे एकमेव कारण मीराबाईंची धोंड जयंतरावांच्या गळ्यात बांधण्यासाठी पुरेसे होते. घरोघरी मातीच्याच चुली. ठराविक वयाच्या वर मुलगी अविवाहित आणि बापाच्या घरीच राहिली, तर नक्कीच पोटुशी राहणार आणि मग सगळा समाज मोर्चा काढून आपल्या तोंडात शेण घालायला घरी येणार या भीतीने मुलींचे बाप चळाचळा कापत. दिसेल त्या कसायाकडे गाय सोपवणे समाजमान्य होते; पण त्यामुळे कमीतकमी इतर घरांमध्ये मुलींना शिकण्याचा ताण तरी नव्हता. बर्‍याच घरांमध्ये नापासगड्ड्या मुली लग्न व्हायची वाट पाहात सुखेनैव नट्टापट्टा करून, कोणत्यातरी फिल्मी नायिकेची नक्कल करून मुलांना आकर्षित करण्याच्या उद्योगात मग्न होत्या. जयंतरावांच्या घरात मात्र, "साधे राहायचे, नट्टापट्टा करायचा नाही, अभ्यास करून पहिला नंबर आणायचा" वगैरे बराच ताप मुलींना होता. 
थोरली रंजू अंगापिंडाने थोराड होती. पहिले मूल म्हणून झालेले थोडेफार लाड तिच्या अंगोपांगी दिसत असत. रंजूचे स्वतःवर अपरंपार प्रेम होते. स्वतःला तोशीस पडू नये म्हणून ती सदासर्वकाळ जागरुक असायची. त्यामुळे अगदी आपल्या भावंडांसाठीही राबणे तिला मंजूर नसे. धाकट्या अंजू-मंजूंपैकी एकीला हाताशी धरून दुसरीशी कामावरून भांडणे करणे, यात तिचा फावला वेळ चांगला जात असे. चौदा-पंधरा वर्षांची झाली नाही तोच ती उफाड्याची दिसू लागली होती. "तिला जरा कमी खायला घालत जा" अशा सूचना जयंतरावांनी मीराबाईंना केल्या; पण एकदा वाढलेले अंग कमी कसे करणार? ती सतरा-अठराची होते न होते तोच, "मुलगी बघायला येऊ का?" असे लोक विचारू लागले.
रंजू दिसायला देखणी होती, रंगाने उजळ होती; त्यामुळे सर्वांनाच ती आवडत असे. ही एरवी जमेची बाजू असली, तरी रंजूच्या बाबतीत तो एक मोठा प्रॉब्लेमच होता. "आपल्या जातीबाहेरचा मुलगा करायचा नाही" हा नियम तोडण्याची बिशाद जयंतरावांची होणे शक्य नव्हते आणि जातीतल्या जातीत रंजूला साजेसा मुलगा मिळणे अजिबातच सोपे नव्हते. तिला पाहायला यायच्या आधीच ही मुलगी आपल्या आवाक्याबाहेरची आहे हे काही समजदार मुलांना कळत असे. ज्यांना ते कळत नसे ते तिला पाहायला येत; आणि त्यांचे काळे-सावळे, रापलेले चेहरे रंजूच्या पसंतीस येत नाहीत हे तिच्या चेहर्‍यावर उमटलेले पाहून परत जात. एकदा तर पाहायला आलेला एक टक्कल पडलेला दुर्दैवी मुलगा घराबाहेर पडताच रंजूने, "ह्याच्याशी लग्न करण्याऐवजी जीव देईन" अशी बाणेदार धमकीही जयंतराव आणि मीराबाईंना दिली. त्याच दरम्यान, "रंजूला तारुण्यसुलभ भावना आहेत, तिच्या कॉलेजमधला एक परजातीतला तरूण शिक्षक तिला कॉलेजमधून गल्लीच्या कोपर्‍यापर्यंत सोडायला येतो, आणि दोघे चोरून एकदा चित्रपट पाहायलाही गेले होते" या महाभयंकर कुवार्ता मीराबाईंच्या मनावर आदळल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर धोकादर्शक लाल काजवे चमकू लागले आणि डोक्यात धोकासूचक भोंगे ठणाणा वाजू लागले. ताबडतोब त्या दिवसापासून रंजूचे कॉलेज बंद करण्यात आले, तिच्याभोवती चौक्या बसल्या, व योग्य त्याच माणसाशी विवाह व्हावा म्हणून तिला रोज "रुक्मिणी स्वयंवर" वाचण्याचा आदेश देण्यात आला. रंजूनेही फारशी खळखळ न करता रुक्मिणी स्वयंवराची पारायणे करायला सुरुवात केली. "रुक्मिणी आपल्या प्रियकराला, म्हणजे कृष्णाला, संदेश पाठवून तिचे स्वतःचे अपहरण करायला सांगते" हे त्यात मुख्य कथासूत्र आहे. ते समजून, त्यातून काही संदेश घेण्याइतके त्या वाचनात मन न लावण्याची खबरदारी तिने स्वतःहून घेतली. तिच्या शिक्षक प्रियकरालाही फार काही कृष्ण वगैरे होण्याइतपत रस नसावा, किंवा स्वतःच्या बापाच्या भीतीने त्याने तो रस गिळला असावा. कोणत्याच बाजूने काहीच प्रयत्न, तडफड, फडफड, रडरड न होता वातावरण शांत झाले. चार-पाच महिन्यांनी, "त्या शिक्षकाच्या आईबापांनी त्याचे लग्न लावून दिले" अशी खबर कानी आल्यावर रंजूचे कॉलेजला जाणे पुन्हा एकदा सुरु झाले.
या सगळ्या प्रकारात तीन-चार वर्षे उलटली. तिकडे रंजूने विशी ओलांडली व इकडे जयंतरावांचे प्राण कंठाची मर्यादा ओलांडायला आले. न पाहिलेल्या स्वजातीय उपवर मुलांची संख्याही कमी कमी व्हायला लागली होती. कुठूनच काही मार्ग निघत नव्हता. अशा परिस्थितीतच मीराबाईंचे वडील काही कामानिमित्त पुण्याजवळच्या एका गावात गेले असता त्यांना एक स्थळ सापडले. सखुबाई आणि बगूनाना यांच्या हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या मुलाच्या, मुकुंदाच्या, बोलण्याने (आणि पेशानेही) ते फारच प्रभावित झाले आणि आपली नात त्या घरात जावी अशी इच्छा त्यांना झाली. (ज्यांच्या नात्यात तरुण अविवाहित स्त्रिया आहेत अशा वयस्कर पुरुषांना त्या काळात सतत अशी इच्छा व्हायची.) सखुबाई आणि बगूनानांसमोर त्यांनी रंजूचे यथाशक्ति मार्केटिंग केले. त्याचा परिणाम आश्चर्यकारकरित्या लगेचच अनुकूल झाला. सखुबाई, बगूनाना, त्यांचे दोन्ही मुलगे, आणि त्यांच्या भावकीतले काही लोक अशी मंडळी मुलगी बघायला आली. आली, ते लग्न ठरवायच्या तयारीनेच! इतक्या लोकांना बसण्यासाठी जयंतरावांचे खुराड्यासारखे घर पुरेसे नव्हते; म्हणून मीराबाईंच्या मोठ्या भावाच्या घरी, म्हणजे नारायणरावांकडे बैठक घेण्याचे ठरले. स्वतःच्या दरिद्री स्वभावामुळे असे छोट्या-मोठ्या कामासाठी दुसर्‍याच्या दारात जाणे, व त्याबदल्यात त्यांना आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करु देणे यात जयंतरावांना काहीच वावगे वाटत नसे. पैसे वाचवण्यासाठी त्यांना सगळे मंजूर होते. नारायणराव हे जाड-जाड भुवया असलेले, अहंमन्य आणि सुमार बुद्धीचे भांडखोर व्यक्तिमत्त्व होते. सरकारी खात्यातल्या परीक्षेत बर्‍याचवेळा गटांगळ्या खाऊन अखेर एकदाची ती पास करून ते अधिकारी बनले होते. त्यांची अर्धशिक्षित बायको सुमन गोरीपान होती आणि तिचे डोळे काळेभोर व टपोरे होते. नारायणराव सुमनच्या आकंठ प्रेमात होते. त्यांना दिनकर व सागर नावाचे दोन भाऊ होते. सुमनच्या प्रेमापोटी नारायणराव दिनकर व त्याच्या पत्नीशी सारखे भांडत असत. सागरची पत्नी मात्र सुमनची बहिणच असल्याने ती नारायणरावांच्या रोषापासून मुक्त होती. नारायणराव व सुमनचे पुत्ररत्न म्हणजे रणधीर खरोखरच रत्न होते. अंजूपेक्षा एका वर्षाने मोठा असूनही दोनदा नापास झाल्याने रणधीर आता अंजूच्या मागच्या यत्तेत होता. रणधीर आणि त्याचा समवयीन आणि समानशील मावसभाऊ विजय या दोघांचे मेतकूट होते. दोघेही सारखेच उडाणटप्पू व नापासगड्डे होते. परीक्षेत कॉपी करणे, शाळा बुडवून हॉटेलात, थिएटरमध्ये, किंवा इतरत्र जाऊन वेळ व पैसे खर्च करणे, प्रसंगी जुगार खेळणे व त्यासाठी घरात किंवा इतरत्र चोर्‍यामार्‍या करणे, यासाठी ही दुक्कल नातेवाईकांमध्ये कुप्रसिद्ध झाली होती. नारायणराव कधीमधी लहर आली की किंवा रणधीरच्या शाळेतून आलेल्या "प्रगतीपुस्तकावर" सही करायची वेळ आली की रणधीरला पट्ट्याने फोडून काढत; पण त्याने रणधीर आणखी कोडगा होण्याशिवाय काही साध्य होत नसे. 
बैठकीला येताना मुलाचे आईवडील, म्हणजे सखूबाई आणि बगूनाना, नऊवारी साडी आणि धोतर-कोट-टोपी या प्रचलित वेशातच आले होते. ठसठशीत मोठे रुपयाएवढे गोल कुंकू लावलेली सखूबाई मोठ्या आवाजात, भरपूर, आणि ठाम आत्मविश्वासाने बोलत होती. बगूनाना तिच्यापुढे तसे शांत वाटत होते. मुकुंदाने चुरगळलेला सुती शर्ट आणि सुरकुतलेला पायजमा घातला होता. त्याने देवानंदसारखा केसांचा कोंबडा केलेला होता, आणि त्याच्या चेहर्‍यावरच्या दाढीच्या खुंटांमधून स्वतःबद्दलचा प्रचंड आदर ओसंडून वाहत होता. मुकुंदा नाकीडोळी नीटस होता, रंगाने गव्हाळ आणि अंगापिंडानेही सुदृढ होता; पण मुलगी पाहण्यासाठी जाताना सर्वसाधारण मुलगे जसे ठेवणीतले कपडे घालतात, तसे त्याने घातले नव्हते. दाढी करण्याचीही तसदी घेतली नव्हती. सखूबाईंप्रमाणेच मुकुंदा मोठ्या आवाजात ठामपणे बोलणारा होता. बोलण्यातूनही त्याचा स्वतःबद्दलचा प्रगाढ आदर दिसून येत असे. बैठक तशी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. वरपक्षाने रोख रक्कम हुंड्यात मागितली नाही; त्यामुळे वराला सोन्याची साखळी, अंगठी, मुलीला दागिने, घरात लागणारी भांडीकुंडी, गादी वगैरे सामान आणि लग्नाचा सगळा खर्च या अटींवर लग्न ठरले. त्याला कोणी हुंडा म्हणत नसत. मुहूर्त पाहून सात महिन्यांनी येणार्‍या मे महिन्यात लग्न करण्याचे ठरले. साखरपुडा मात्र लगेचच दुसर्‍यादिवशीच करायचे ठरले. घराजवळच एक मारवाडी लोकांच्या मालकीचे देवीचे मंदिर होते. मीराबाई आणि मुलींनी भराभरा कामे करून साखरपुड्याची तयारी केली आणि दुसर्‍याच दिवशी त्या मंदिरात चाळीस-पन्नास लोकांच्या साक्षीने साखरपुडा संपन्नही झाला. रंजूला मुलगा पसंत आहे की नाही हे विचारले गेले असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकले नसते इतकेच.
लग्न ठरल्यानंतर लग्नाची तयारी सुरु झाली. रुखवतात भांडी-कुंडी, लोखंडी कॉट-गादी वगैरेंच्या बरोबरीने ठेवण्यासाठी वाळवणं करण्याच्या कामाला मीराबाई लागल्या. त्यात पायली-पायलीचे डाळीचे वडे, कुर्डया, उडदाचे पापड, साबुदाण्याच्या पापड्या वगैरे प्रकार तर होतेच; पण नवविवाहित दांपत्याला शेवया देणे महत्त्वाचे असते असा समज असल्याने घरीच शेवयाही करणे आले. केटरर्स नसल्याने पोते-पोतेभर डाळ-तांदूळ व गहू आणून ते धान्य घरीच निवडून ठेवणे, गहू गिरणीतून दळून आणणे, मसाल्याचे पदार्थ व मिरच्या आणून भाजून, कांडून मसाला व तिखटाची पावडर करून आणणे, अशी पिट्टा पडतील अशी कामे होतीच. गल्लीतल्या शेजारणी व ओळखीपाळखीच्या बाया या कामात मदत करायला सवड मिळतील तशा येऊ लागल्या. घरातले रोजचे काम करून वर हे सगळे काम करण्यात मीराबाई व मुली अत्यंत व्यग्र झाल्या. जयंतरावही पैसे खर्च होताना पाहून रोजरोज चीडचीड करून उठसूट घरातल्यांवर करवादू लागले. रुखवतात इतर वस्तूंबरोबर शोभेच्या वस्तू ठेवायची पद्धत असे. अशा शोभेच्या वस्तू घरीच तयार करायच्या कामाला अंजू-मंजू लागल्या. एकीकडे रंजूला चिडवण्यासाठी "सांगा मुकुंद कोणी हा पाहिला" किंवा "ऊठ मुकुंदा, ऊठ श्रीधरा" वगैरे गाणी म्हणत काजूचे काप आणि उडदडाळ कापडावर चिकटवून केलेली सप्तपदी, लाईफबॉय साबणाचा छोटासा गॅस सिलिंडर व हमाम साबणाची शेगडी, भरतकाम केलेली बेडशीट, लिमलेटच्या गोळ्यांचा छोटासा बंगला, वगैरे सुबक वस्तू त्यांनी बनवल्या. रंजूला मुकुंदाचं नाव घेऊन चिडवले जात असले तरी प्रत्यक्षात मुकुंदाने तिच्याशी संपर्कही साधला नव्हता. एकमेकांना पत्र लिहिणे, भेटणे, फिरायला जाणे, रेस्टॉरंटमध्ये बसून गप्पा मारणे वगैरे लग्नाआधीचा सुंदर रोमँटिक काळ काही रंजूसाठी उजाडत नव्हता. अर्थात असे काही असते हेच तिला माहित नसल्याने त्याबद्दल वाईट वाटणे किंवा संशय येणे असे काही झाले नाही. जयंतराव आणि मीराबाईंसाठी मुलीचे लग्न होतेय हेच एकमेव महत्त्वाचे सत्य असल्याने मुलगा मुलीला पत्र का लिहीत नाही किंवा भेटायला का उत्सुक नाही, पुढे त्या दोघांचे नीट जमेल का, आपली मुलगी सुखी होईल का वगैरे प्रश्न पडायच्या मनस्थितीत ते नव्हते. कपडे खरेदी, बस्ता बांधणे वगैरे कार्यक्रमांमध्ये सामील असलेल्या मामा-मामी व इतर मंडळींना तर त्यात काही रस असण्याचे कारण नव्हते. "माझ्याकडे हा रंग आहे. मला ही साडी नको, ती हवी" वगैरे गोष्टींवरून भांडणे करून जयंतराव आणि मीराबाईंना आणखी त्रस्त करण्यात ते मग्न होते. सोयीस्करपणे घरची आणि सोयीस्करपणे बाहेरची अशी ती मंडळी होती. लग्न ठरलेल्या नात्यातल्या मुला-मुलींना गंडगनेर करणे, त्या निमित्ताने एकत्र येऊन मेजवान्या झोडणे आणि मुला-मुलीच्या सासरच्यांबद्दल कुचाळक्या करणे हाच त्यांच्यासाठी लग्नातला महत्त्वाचा भाग होता. रंजूची मनस्थिती काय होती आणि तिची भावी आयुष्याबद्दलची अपेक्षा किंवा स्वप्ने काय होती हे कोणी तिला विचारले नाही आणि तिनेही कोणाला सांगितली नाहीत.
लग्नाला दोन-तीन महिने राहिलेले असताना एक दिवस मुलाच्या दूरच्या नात्यातला एक भाऊबंद जयंतरावांना भेटायला आला. मुकुंदाच्या चुलत चुलत्यांचा तो मुलगा होता. घरी येऊन इकडच्या-तिकडच्या गप्पा करत चहा घेऊन झाल्यावर निघताना तो जयंतरावांना बाहेर घेऊन गेला. बाहेर आल्यावर "मुकुंदाबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी असे मला वाटते.", अशी प्रस्तावना करून त्याने बोलायला सुरुवात केली. गावातल्या एका ब्राह्मण मुलीशी मुकुंदाचे प्रेम-प्रकरण होते, तो दुसर्‍या एका गावी नोकरी करत असताना ती मुलगी तिकडे जाऊन त्याच्याबरोबर काही दिवस राहात होती, त्यांना लग्न करायचे होते, आणि तिच्या घरून विरोध होईल म्हणून पळून जाऊन लग्न करणार होते; पण ऐनवेळी ती मुलगी आलीच नाही. नंतर तिचे लग्न दुसर्‍याच एका मुलाशी झाले. मुकुंदाचा प्रेमभंग झाला, तरी तो अजूनही त्या मुलीच्या प्रेमात आहे. हे लग्न केवळ त्याच्या आई-वडिलांनी दबाव आणला म्हणून तो करतोय इत्यादि स्फोटक गोष्टी तो बोलत होता. जयंतरावांनी एकही शब्द न बोलता ते ऐकून घेतले. "हे नक्की काय प्रकरण आहे? आता या मुलाबद्दल चौकशी करावी का? आणि हे खरं निघाले तर लग्न मोडायचे का? मग लोक काय म्हणतील? मग रंजूचे आणि इतर मुलींचे लग्न कसे होणार? काय साली कटकट आहे!" हे व तत्सम विचार त्यांच्या डोक्यात चालू असावेत बहुतेक. सगळं सांगून पाहुणा कर्तव्यपूर्तीच्या समाधानात निघून गेला. जयंतरावांनी मीराबाईंना लवकरच ते सगळे एकांतात सांगितले. दोघांनी गंभीर चेहर्‍याने बर्‍याच वेळ चर्चा केली. शेवटी, "अशा उपटसुंभावर कसा विश्वास ठेवायचा? दुसर्‍याचे चांगले झालेले पाहवत नसलेले अनेक भाऊबंद असतात ते अशा खोट्या-नाट्या गोष्टी सांगून मोडता घालायचा प्रयत्न करतात. अशी काही भानगड असती तर किती गवगवा झाला असता. शिवाय झाले असेल तसे तरी तो भूतकाळ झाला. आता आपण भविष्याकडे पाहून रंजूच्या भल्यासाठी हे लग्न मोडता कामा नये" अशा निष्कर्षाला ते पोचले.

   * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *                                                                    

       सकाळी वर्‍हाडी मंडळी उठायच्या आधीच जयंतराव-मीराबाई व कुटुंबीय जागे झाले. मुलीकडच्यांनी पटापट आवरून घेतले आणि सगळे कामाला लागले. वर्‍हाडी मंडळींच्या आंघोळी-पांघोळींची, चहा-नाष्ट्याची तयारी, मग लग्न समारंभाची तयारी, येणार्‍या लोकांचे आगत-स्वागत, लग्नापूर्वीचे आणि लागल्यानंतरचे धार्मिक विधी, लोकांचे मानपान, आणि मग जेवणावळी असा कामांचा डोंगर होता. वर्‍हाडी मंडळी जागी झाली तशी जयंतराव, त्यांच्या भावंडांची कुटुंबे, मीराबाई, त्यांच्या भावडांची कुटुंबे आणि अंजू-मंजू-संजू या सगळ्यांची पळापळ सुरु झाली. मुलाकडच्यांच्या आवराआवरीत येणार्‍या अडचणी, त्यांच्या मागण्या, भटजींच्या धार्मिक कर्मकांडासाठीच्या मागण्या, आचारी मंडळींच्या मागण्या हे सगळे पुरवता पुरवता मुलीकडच्यांची फे-फे उडायला लागली. व्यावसायिक कंत्राटाची पद्धत नसल्याने सगळी कामे स्वतः करायची आहेत हे माहित असूनही, त्याचे व्यवस्थित नियोजन करून कोणत्या वेळी कोणता कार्यक्रम होणार, त्यासाठी कोणत्या वस्तू लागतील, त्या आणण्याची जबाबदारी कोणा-कोणाची वगैरे विचार करण्याइतकी उसंत आणि कुवत मुलीकडच्या सगळ्या लोकांना मिळून जमा करता आली नव्हती. त्यातल्या त्यात मीराबाई व मुलींनीच बर्‍याच गोष्टींचा विचार करून त्यासाठीची तयारी करून ठेवली असल्याने सगळ्या वस्तू हजर करण्याची जबाबदारी आपोआप त्यांच्यावरच येऊन पडत होती. सारखं कोणी ना कोणी येऊन मीराबाईंकडे काहीतरी मागत होते आणि कधी मागितलेली वस्तू कार्यालयात आणलेली असे, कधी घरीच राहिलेली असे, तर कधी दुकानात जाऊन विकत आणावी लागे. स्टेजवर भटजींच्या दुकलीचे पूजा-होम वगैरे मांडायचे काम सुरु होते आणि मीराबाई त्यांच्या धार्मिक स्वभावानुसार जातीने त्यांना हवे-नको ते पाहात होत्या. अंजू-मंजू लग्नाच्या हातघाईत दिसेनाशा झाल्या होत्या. पूजेसाठी लागणरे धान्य-सुपार्‍या-फळे- वगैरेंपैकी काहीतरी भटजींना सापडले नाही म्हणून घरून आणायला मीराबाईंनी अंजू-मंजूला गर्दीत शोधायचा प्रयत्न केला; पण त्या त्यांना दिसल्या नाहीत. समोरून चाललेल्या रणधीरला त्यांनी हाक मारून अंजूला शोधून तिला घरी जाऊन ते आणायला सांग असे सांगितले. रणधीर अंजूला शोधत गेला तेव्हा ती रंजूला तयार होण्यात मदत करण्यात व्यग्र होती. रणधीरने तिच्या आईचा निरोप तिला सांगितला तेव्हा तिला कळेना की रंजूला असे मध्येच सोडून कसे जायचे, म्हणून तिने घराची किल्ली काढून रणधीरला दिली आणि त्यालाच घरी जाऊन काय हवे ते आणायला सांगितले. 
यथावकाश एकीकडे वर्‍हाडी मंडळींच्या आंघोळी-पांघोळी व चहा-न्याहारी उरकले, रंजूचे आवरून झाले, भटजींची तयारी पूर्ण झाली, नवरा-नवरी, त्यांचे आईवडील व बाकीची आवश्यक ती मंडळी पूजाविधी करायला लागली, हळू-हळू इतर पाहुणेमंडळी जमा होऊ लागली. म्हणता म्हणता पाचशे-हजार लोकांनी कार्यालय भरून गेले. स्टेजवर कोणा-कोणाचे पाय धुणे, कोणी कोणाला काहीबाही देणे वगैरे प्रकार झाले, आलेल्या लोकांना अक्षता वगैरे वाटल्या गेल्या, आणि अखेर आंतरपाट धरून भटांची दुक्कल उभी राहिली. एका बाजूला मान खाली घालून रंजू आणि तिचे कुटुंबीय उभे होते आणि दुसरीकडे स्थितप्रज्ञ चेहर्‍याचा मुकुंदा आणि त्याचे कुटुंबीय उभे होते. भटजींनी भरपूर आळवून आळवून मंगलाष्टके म्हटली आणि लोकांनी बरोबर समेवर हातातले तांदूळ वधू-वराच्या दिशेने फेकण्याचे कर्तव्य पार पाडले. शेवटी एकदाचे "वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम्।" झाले, बाहेर सनई-नगारावाले दोनजण बोलवले होते, त्यांनी वाजवायला सुरुवात केली, लोकांनी टाळ्या वाजवल्या. वधू-वराला आहेर द्यायला स्टेजच्या बाजूने रांग लागली. तेवढ्या वेळात मुलीकडच्या तरूण मंडळींनी जमिनीवर सतरंजीच्या पट्ट्या टाकून जेवणाच्या पंगती बसवण्याची तयारी सुरु केली. काका-मामा व इतर मंडळींनी वाढपी म्हणून काम करायला बाह्या सरसावल्या. आहेर देऊन लोक स्टेजवर उतरून जेवायला येऊन बसू लागली. बसलेल्या लोकांसमोर क्रमाक्रमाने पत्रावळी, द्रोण, मीठ, भात, वरण, पुरी, बटाट्याची भाजी, आणि बुंदी येऊ लागली. बरेचसे लोक जेऊन निघून गेल्यावर मग कार्यालयात किंचितसा निवांतपणा आला. मीराबाई-जयंतरावांचे ताणलेले चेहरे किंचितसे सैलावले. मीराबाई चक्क अधूनमधून हसू लागल्या. शेवटची पंगत बसली. मुकुंदा-रंजू शेजारी-शेजारी जेवायला बसले; परंतु एकमेकांशी एकही शब्द अजूनही बोलले नव्हते. लोकाग्रहास्तव नाव घेणे वगैरे, घास भरवणे वगैरे प्र्कार झाले. रंजू स्त्रीसुलभ लज्जेमुळे अवघडून जेवत होती. मुकुंदाला बहुतेक भूक लागली असावी, तो रंजूकडे किंवा इतरत्र लक्ष न देता शांतपणे जेवत होता. पोटात अन्न गेल्याने आता सखूबाई पुन्हा एकदा खुलल्या. उखाण्यांचा त्यांच्याकडे भरपूर साठा होता. जेवणं होऊन मुलीकडची मंडळी आवरा-आवरीला लागल्यावरही त्यांनी अनेकानेक उखाणे घेऊन वर्‍हाडी मंडळींमध्ये चांगलीच खसखस पिकवली. सगळी आवरा-आवर झाल्यावर आणि रुखवतातले सगळे डाग वर्‍हाडी मंडळींच्या ट्रकमध्ये नेऊन ठेवल्यावर समारोपाची वेळ आली. मीराबाई-रंजू-अंजू-मंजूंच्या डोळ्यांमधून लगेचच धारा वाहायला लागल्या. नाही नाही म्हणाले तरी जयंतरावांचेही डोळे पाणावलेच. आज्या-माम्या-मावशा-काकवासुद्धा डोळ्याला पदर लावायला लागल्या. रंजूने एकेकीला मिठी मारून, हमसून हमसून रडत निरोप घेतला. जड पावलांनी रंजू ट्रकच्या कॅबिनमध्ये मुकुंदाशेजारी बसली. बाकी वर्‍हाडी मंडळी ट्रकच्या मागे चढली. ट्रक धुरळा उडवत निघून गेला. आत्यंतिक श्रमाने आणि रडून चेहरे मलूल झालेल्या मीराबाई व मुलींनी घरी जाण्याची तयारी सुरु केली. आजी-आजोबा व मामा मंडळी जवळच असलेल्या नारायण मामाच्या घरी गेले आणि जयंतराव-मीराबाई त्यांच्या मुलांसह घरी परतले. लग्न कसे झाले, काय घडले वगैरेबद्दल बोलण्याचेही त्राण न उरलेली सगळी मुक्याने  घरी आली. आल्यावर लगेचच अंथरुणे घातली गेली आणि सगळ्यांनी शीणलेली अंगे त्यावर टाकून दिली. मध्यरात्री कधीतरी रंजूचा ट्रक सासरी पोचला. प्रवासात मुकुंदा तिच्याशी एकही शब्द बोलला नाही. जयंतरावांची आई पाठराखीण म्हणून तिच्याबरोबर गेली होती. घर 
दीडखणाचे अगदीच छोटे होते. अनोळखी ठिकाणी अनोळखी लोकांच्या गराड्यामध्ये आजीच्या कुशीत सुरक्षितता शोधत रंजूही झोपून गेली. 
सासरच्या पहिल्याच सकाळी रंजू थोडी हालचालीची चाहूल लागताच धडपडून उठली. त्याच दिवशी सत्यनारायण ठेवला होता त्याची तयारी करावी लागणार होती. उठल्यावर तोंड धुवून आल्याआल्या सासूने तिला चहा करायला सांगितले. तिने पटकन सासूला चहा करून दिला. भिंतीला टेकून, अंथरुणावर बसून चहा पिणार्‍या सासूची प्रतिक्रिया निरखत ती शिवणमशीनीला टेकून उभी राहिली. सखुबाई काहीही प्रतिक्रिया न देता शांतपणे चहा पीत राहिल्या. काय करावे ते न कळून रंजू उगाच इकडे-तिकडे पाहू लागली. भिंतीत ठोकलेल्या फळकुटावरच्या पुस्तकावर तिला तिचाच फोटो दिसला. बहुतेक तिच्या वडिलांनी तो पाठवला असणार. असा उघड्यावर नको म्हणून तो तिने उचलला आणि तिच्या पिशवीत ठेवायला ती गेली. फोटो ठेवताना फोटोच्या मागे काहीतरी लिहिले आहे असे तिच्या लक्षात आले. "ओस पडलेले कोसच्या कोस तुला चालावे लागतील, कुठून आणशील हे सामर्थ्य?" असे वाक्य त्यावर कोणीतरी लिहीले होते. मुकुंदा उठला की त्याला त्याबद्दल विचारायचे तिने ठरवले.
सकाळी सवयीने मीराबाई सकाळीच पाणी भरायला उठल्या. मोरीत तोंड धुवून चहा टाकायला स्टोव्ह पेटवण्यापूर्वी शेल्फमधल्या देव्हार्‍यापुढे त्यांनी हात जोडले. मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी देवाचे मनापासून आभार मानले. डोळे भरून गणेशाच्या मूर्तीकडे बघताना देवघरात ठेवलेली दहा-दहा रुपयांची चांदीची दोन नाणी गायब आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अंजूला हाक मारून उठवले  आणि "तू दार उघडं सोडून तर नव्हती गेलीस ना? तुझ्या आणि मंजूशिवाय आणखी कोणी आलं होतं का?" वगैरे प्रश्नांची सरबत्तीच केली. झोपाळलेल्या अंजूने डोळे किलकिले करून सकाळी रंजूला मदत करत होते म्हणून रणधीरला घरी पाठवल्याचे सांगितले आणि ती परत झोपी गेली. मीराबाई पुन्हा देव्हार्‍यासमोर आल्या आणि कडवट चेहरा करून नाण्यांच्या रिकाम्या जागेकडे टक लावून पाहात उभ्या राहिल्या.   

Sunday, December 3, 2023

आम्ही

दुबईत हवामान बदलाची परिषद झाली. तिकडे हजेरी लावायला बरेच लोक खाजगी जेट विमानाने गेले असतील. अपेक्षेप्रमाणे २०२३ हे ज्ञात इतिहासातील सगळ्यात उष्ण वर्ष जाहीर केले गेले.
सॅन फ्रान्सिस्कोला असताना ऑफिसमध्ये लंचटाईममध्ये मी जेवत बसलेलो असताना दुसऱ्या टेबलवर बसलेल्या दोघातिघांचं बोलणं माझ्या कानावर पडत होतं. त्यातला एकजण दुसऱ्याला सांगत होता की बऱ्याच लोकांना मिलियन आणि बिलियनमध्ये किती मोठा फरक आहे ते नीटसं माहित नसतं. तो फरक समजावण्यासाठी तो पुढं म्हणाला की एक मिलियन सेकंद मोजायचे ठरले तर त्याला साधारण १२ दिवस लागतील; पण एक बिलियन सेकंद मोजायचे ठरले तर त्याला ३१ वर्षांपेक्षा जास्त काळ लागेल.
ते ऐकताना माझ्या मनात विचार आला की समजावून सांगणारा आणि ऐकणारा दोघेही उच्चशिक्षित आहेत तर मग त्या ऐकणाऱ्याला हे माहित नसेल का? अनेक शिकलेल्या लोकांनाही हे माहित नसेल का?  आणि समजा आपण एका सेकंदाला एक बॅरल ऑईल जाळायचं  ठरवलं तर या दराने एक अब्ज बॅरल्स जाळायला ३१ वर्षे लागतील; पण प्रत्यक्षात मात्र एक अब्ज ऑईल बॅरल्स या जगात १ मिलियन सेकंदांपेक्षा कमी वेळात म्हणजे १२ दिवसांच्या आत जाळली जातात हे किती लोकांना माहित असेल? गेली कित्येक वर्षे सतत दर १०-१२ दिवसांत १ अब्ज बॅरल्स ऑईल जाळले जाते ही अद्भुत गोष्ट किती लोकांना माहित असेल?
मग लक्षात आलं की बहुतेक उच्चशिक्षितांना हे माहित असणारच. शिवाय फक्त एवढंच आपण जाळत नाही, हे ही माहित असणार. ह्याचा काहीतरी परिणाम होणार, हे ही या सगळ्या उच्चशिक्षितांना माहित असणार. त्यामुळेच दरवर्षी तापमानाचे रेकॉर्ड्स मोडले जातात तरी कोणालाच आश्चर्य वाटत नाही. 
दुसरीकडे इतर स्रोतांची टंचाई जाणवायला लागेल असे क्लब ऑफ रोमने भाकित केले होते. तशी ती जाणवायला लागली असेल तरी त्याबद्दलही कोणीच काही उघड बोलत नाही. 
का? 
मी ज्या वर्गात मोडतो (जगातले वरचे ५-१०%) त्यातल्या लोकांकडे पाहिलं, तर मला एकमेकांत rat race करणारे लोक दिसतात. दुसऱ्याकडे कार आहे की नाही, आणि कोणती आहे यावरून judge करणारे, अनावश्यक पर्यटन करून फेसबुकवर मिरवणारे, पैसा पडून आहे आहे म्हणून अनेकानेक घरं घेणारे, दर काही वर्षांनी कार अपग्रेड करणारे, जुन्या कारला मिठ्या मारून रडणारे, आपला मुलगा आपल्यापेक्षा जास्त पैसा कमवणार म्हणून सिंहगर्जना ठोकणारे लोक मला दिसतात. कामाच्या ठिकाणी ज्या लोकांचे नितंबचुंबन आम्ही लोक करतो ते लोक तर आमच्यापेक्षाही वाईट आहेत. जसजसं या उतरंडीत वर जाऊ तसतसं अहंगंडांनी ग्रस्त असलेले, आत्यंतिक यशस्वी, आणि आत्यंतिक आक्रमक लोक दिसायला लागतात.
कदाचित आम्हा सगळ्या लोकांना माहित आहे की कितीही टोकाची आपत्ती आली तरी आमचा किंवा आमच्या संततीचा नंबर सगळ्यात शेवटी लागणार आहे. आमच्याआधी पिळले, छळले, मारले जाणारे अब्जावधी लोक असणार आहेत. कदाचित आमच्यापर्यंत काही झळ पोचणारच नाही. खालच्या ५-१०% किंवा अगदी २५% लोकांचा अक्षरशः उपासमारीने बळी गेला, तरी आम्हाला काय फरक पडणार आहे? उलट मोकळ्या झालेल्या झोपडपट्ट्यांच्या जमिनी वापरायला मिळतील. कोणतेही अनुकूल narrative तयार करणारे लोक कोण आहेत? आम्हीच आहोत. रिपोर्ट्स आणि statistics तयार करणारे लोक कोण आहेत? आम्हीच आहोत. जगाच्या पाठीवरून २५% लोक नष्ट झाले तरी त्याला positive spin देणे किंवा पूर्णतः दुर्लक्षित करणे काही अवघड जाणार नाही.
बरेचसे लोक तर हवामान बदल नावाचा प्रकारच नाकारतात आणि निवांत राहतात. बाकीचे नाकारत नाहीत; पण निवांत राहतात. 
कारण, आमच्या उपभोगाचे परिणाम भलत्याच लोकांना भोगावे लागणार आहेत, आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत या उतरंडीत ते आमच्यासाठी राबत राहतील. त्यासाठी “बलवानांनी जगावे व दुर्बळांमी मरावे हे नैसर्गिकच आहे” असे तत्त्वज्ञान तयार करणारेही आम्हीच. “काय करणार सीस्टिमच अशी आहे” असे म्हणणारे आणि ती सीस्टिम तयार करून टिकवणारेही आम्हीच. त्यातही या लोकांना द्राक्षासारखं पिळून काढायला, "जन्मतःच आम्ही श्रेष्ठ" असं म्हणणारे आमच्यातले वर्चस्ववादी आधीच activate झाले आहेत आणि आम्ही त्यांना मूक साथ देत राहू. खाली दिलेल्या कवितेसारख्या कविता आमच्यावर लिहिण्याशिवाय हे खालचे लोक दुसरं काहीही करू शकणार नाहीयेत.


You're like a scorpion, my brother, 
you live in cowardly darkness 
like a scorpion. 
You're like a sparrow, my brother, 
always in a sparrow's flutter. 
You're like a clam, my brother, 
closed like a clam, content, 
And you're frightening, my brother, 
like the mouth of an extinct volcano. 

Not one, 
not five-- 
unfortunately, you number millions. 
You're like a sheep, my brother: 
when the cloaked drover raises his stick, 
you quickly join the flock 
and run, almost proudly, to the slaughterhouse. 
I mean, you're the strangest creature on earth-- 
even stranger than the fish 
that couldn't see the ocean for the water. 
And the oppression in this world 
is thanks to you. 
And if we're hungry, tired, covered with blood, 
and still being crushed like grapes for our wine, 
the fault is yours-- 
I can hardly bring myself to say it, 
but most of the fault, my dear brother, is yours.

by Nazim Hikmet

Trans. by Randy Blasing and Mutlu Konuk (1993) 





Wednesday, June 19, 2019

कृतकृत्य

मनोऱ्याच्या आजूबाजूच्या प्रशस्त आवारात ऐन वसंतात फुललेली फुलं आणि तारुण्याचा उत्सव पाहात विनायकराव आणि सिद्धीकाकू बाकावर बसले होते. मे महिन्यात मायदेशी उन्हाने तलखी व्हायला लागते; पण इथे मात्र अगदी आल्हाददायक वाटत होतं. हवेत गारवा होताच; म्हणून दोघांनीही स्वेटर्स वगैरे घातली होती. सकाळपासून मनोरा व मनोऱ्याच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यात बरीच पायपीट झाली होती म्हणून दोघेही जरा बाकावर विसावले होते. इतकं चालायची सवय नसल्याने हवा आल्हाददायक असूनही जरा दमल्यासारखंच झालं होतं. भवताली मात्र वसंत ऋतूने बहार आणलेली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरची असंख्यरंगी फुलं, झाडाझुडपांची चमकती हिरवी पाने, रस्त्याच्या कडेला असणारी सुंदर कॅफेज, चकाकत्या काचेची दुकाने आणि त्या कॅफेंमधून, दुकानांतून पदपथावर ओसंडणारी सुंदर तरूण-तरुणींची गर्दी. इकडे-तिकडे पाहून मानेला रग लागली तरी विनायकराव पाहातच होते. उंच, सडपातळ आणि दणकट दिसणारे युवक आणि त्यांना लगटून चालणाऱ्या तशाच उंच, सडपातळ, नव्या फॅशनच्या फाटक्या-तुटक्या कपड्यांमध्येही कमालीच्या आकर्षक वाटणाऱ्या युवती. विशेषत: गौरवर्णीय युवक-युवतींकडे त्यांचं जास्त लक्ष जात होतं. वर्षानुवर्षांच्या संस्कारांमुळे गौरवर्णीय स्त्री-पुरुष त्यांना अधिक आकर्षक वाटत होते. गुडघ्यांवर आणि मांडीवर फाटलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे त्यांचे गोरेपान अंग, वर घातलेले पांढरेशुभ्र किंवा धम्मकपिवळे टॉप्स, डोळ्यांवर चढवलेले काळेभोर चष्मे आणि खांद्यावर रुळणारे सोनेरी किंवा काळेभोर केस. तारुण्याला आणि सौंदर्याला नुसतं उधाण आलं होतं चहुकडे. एकमेकांना लगटून, कमरेत हात घालून, भवतालाबद्दल बेफिकीर अशी ती जोडपी तारुण्याचा सोमरस प्यायल्यासारखी धुंदपणे चालत होती. ती धुंदी कमी की काय म्हणून मध्येच थांबून, एकमेकांच्या मानेला बाहुंचा विळखा घालून एकमेकांच्या अधरांमधील मधुरसपान करत होती. ते पाहून विनायकराव उगाचच कानकोंडले होऊन नजर पटकन वळवून भलतीकडे पाहू लागत होते. त्या जोडप्यांचा त्यांना किंचित हेवा वाटला. त्यांच्या तरूणपणी चारचौघात हात धरायची सुद्धा सोय नव्हती; चुंबनं वगैरे तर दूरची गोष्ट. आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न केल; त्यामुळे कॉलेजमध्ये असताना एकत्र फिरणे वगैरे राहिलंच खरं. एकत्र फिरणारेही चोरटे स्पर्श करण्यावरच भागवत होते म्हणा!
 मध्येच त्यांनी एकदम जाग आल्यासारखं बायकोकडे पाहिलं. सिद्धीकाकूही इकडे-तिकडे पाहात होत्या. “तिच्या डोक्यात काय विचार चालू असेल?”, असा विचार येऊन उत्सुकता वाटल्याने विनायकरावांनी त्यांना विचारलं, “काय विचार करतेयस?”
“काही नाही, पाहतेय मजा.”, सिद्धीकाकू उत्तरल्या.
“किती छान वातावरण आहे ना? आणि लोक अगदी मस्त मजा करताहेत”, ते म्हणाले, “अगदी मुक्त वातावरण आहे इथे.”
“हो ना!”, इतकंच बोलून सिद्धी काकू गप्प बसल्या. विनायकरावांचा किंचित विरस झाला आणि ते परत इकडे तिकडे पाहू लागले.
तितक्यात एक उंच, सडपातळ, गौरवर्णीय तरूण जोडपं हसत-खिदळत, एकमेकांच्या कवेत सळसळत त्यांच्या शेजारच्या बाकावर येऊन बसलं. तो मुलगा काहीतरी भराभर गमतीदार बोलत असावा; कारण ती मुलगी किणकिणत हसत होती. विनायकराव मान किंचित तिरकी करून त्यांचं निरीक्षण करू लागले. हसता-हसता त्या मुलीचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन काढला आणि बोलू लागली म्हणून तो मुलगा इकडे-तिकडे पाहू लागला आणि त्याच्या लक्षात आलं की विनायकराव त्याच्याकडेच पाहताहेत. त्या मुलाने हसून मान डोलावली आणि विचारले, “हाय, हाऊ आर यू दुईंग”.  त्याचे उच्चार जरा वेगळे होते.
“आय ॲम फाईन”, विनायकराव पटकन उत्तरले, “नाईस वेदर!”
“येस, ईत्स अ नाईस सनी दे. यू आर तुरिस्त?”
“येस येस. मी ॲन्ड माय वाईफ. वुई केम फ्रॉम इंडिया”
“ओऽऽऽइंदिया, नाईस कंत्री. आय वॉन्त तू गो देर समदे.”
“धिस इज माय वाईफ, सिद्धी”
“हलो, यू केम ऑन ए हनिमून?”
“हाऽहाऽहाऽ”, विनायकराव मोठ्याने हसले, “येस यू कॅन से सेकन्ड हनिमून.”
“नाईस! हाऊ लॉंग हॅव यू बीन मॅरिद?”
“फॉर्टी यिअर्स! वुई गॉट मॅरिड व्हेन आय वॉज ट्वेन्टी फोर!”
“ओह वॉव! फॉर्ती यिअर्स! कॉन्ग्रॅच्युलेशन्स! दॅत्स अमेझिंग! यू मस्त बी इन्सेनली इन लव वित ईच अदर!”
“हूंहूंहूं...थॅंक यू!”, विनायकराव हसून म्हणाले. ते म्हणताना त्यांनी सिद्धीकाकूंच्या दिशेने पाहिले; पण नजरेस नजर देण्याचे मात्र टाळले. त्यांना उगाचच किंचित ओशाळवाणं आणि किंचित अस्वस्थ वाटलं. “इन्सेनली इन लव्ह” वगैरे त्यांना जरा भीतिदायकच वाटलं. आयुष्यात इन्सेनली काहीही केलेलं नसताना तसा आरोप झाल्यासारखे ते कावरेबावरे झाले.
तिथल्या इतर लोकांसारखंच सिद्धीकाकूंना चारचौघात जवळ घ्यावं की काय असं त्यांना वाटून गेलं. अशावेळी वागायचा काय प्रोटोकॉल असतो? काकूंना जवळ घेऊन हलकेच चुंबन वगैरे घ्यावे का? असले काही तरी प्रश्न त्यांच्या मनाला चाटून गेले. काकू मात्र कृतकृत्य समाधानाने हसत होत्या.
“वुई हॅव टू सन्स”, काकू बोलू लागल्या, “माय एल्डर सन वर्क्स हियर. वुई आर व्हिजिटिंग हीम. यंगर सन इज इन इंडिया. पुणे!”
तितक्यात त्या मुलीचं फोनवरचं बोलणं संपलं आणि त्या मुलाने त्यांच्या भाषेत तिला सांगितलं असावं कारण तिनेही तिचे निळे डोळे मोठे करून, “वॉव कॉंग्रॅच्युलेशन्स!” वगैरे म्हटलं.
“थॅंक यू”, विनायकराव पुन्हा म्हणाले.
“दिस इज माय गर्लफ्रेंद, नीना”, तो मुलगा म्हणाला.
विनायकराव आणि सिद्धीकाकूंनी माना डोलावल्या,”आर यू टू प्लॅनिंग टू गेट मॅरिड?”, विनायकरावांनी विचारलं.
“हाहाहा”, ती दोघं हसली आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, “नॉत यत, बत मे बी इन फ्युचर.”, असं तो मुलगा म्हणाला आणि मग एक अवघडलेली शांतता पसरली.
“वेल, ओके, नाईस मीतींग यू तू!”, उठायची तयारी करत तो मुलगा जरा वेळाने म्हणाला,”हॅव ए वंदरफुल ताईम हियर ॲन्द विश यू मेनी मोर यिअर्स ऑफ हॅपी मॅरेज!”. ती दोघं मग उठून परत हातांचे विळखे घालून एकमेकांना सर्वांगस्पर्श अनुभवत चालू लागली.
त्यांच्याकडे काही क्षण पाहात राहिल्यावर विनायकरावांनी सुस्कारा सोडला. सिद्धीकाकूंकडे वळून म्हणाले,”चलायचं आपणही?”
“हो बाई! चला निघू या! अनन्या येईलच थोड्या वेळात शाळेतून.”
गुडघ्यांवर हात ठेवून काकू उठल्या व चालू लागल्या. त्यांच्यापासून फूटभर अंतर ठेवून विनायकरावही त्यांच्या बरोबरीने चालू लागले. 

Sunday, January 13, 2019

परमेश्वराचा अवतार

“परमेश्वराचा अवतार आहे
आमचा महान नेता”,
असं म्हणतात ते
तेव्हा मला कौतुक वाटतं
किती अचूक ओळखतात त्याचं!
कारण,
ज्याचे निर्जीव डोळे लवत नाहीत
स्वत:च्या मंदिरात होणारे
आठ वर्षांच्या मुलीवरचे अत्याचार पाहून.
दानयाचनेसाठी पुढे केलेला हात
सरकत नाही मागे तिच्या किंकाळ्या ऐकून;
अपवित्र वाटत नाही ज्याला
तिच्या रक्ताचे शिंतोडे पाहून;
पण भंगते ब्रह्मचर्य ज्याचे
सॅनिटरी नॅपकिनमध्ये 
शोषल्या जाणाऱ्या रक्ताच्या शंकेने,
असा त्यांचा परमेश्वर आहे!

Saturday, November 10, 2018

सबंधन सप्रेम

आकाशात गडद काळे ढग दाटून आलेले असताना, काळ्या मातीत, वाळलेल्या पिवळ्या गवतात काळ्या-पिवळ्या मादी आणि नर किंगकोब्रांची गाठ पडते. काळी-पिवळी वीज शेतजमिनीत आळोखेपिळोखे घेत जावी तसे ते एकमेकांभोवती आवेगाने विळखे घालून झटपटायला लागतात. काळ्या ढगांतून चंदेरी तेज सरसरत जावे तशी त्यांच्या शरीरातून सुखाची चमक सरसरत जाते. घटकाभर सोसाटल्यासारखं होऊन मग पाऊस पडून जमिनीचा वाफारा निघावा तसे ते थोड्यावेळाने क्लांत होतात. मादीने आपला वंश पुढे चालवायला जोडीदार निवडलेला असतो; आणि नराची मेहनत सुफळ झालेली असते. मग ते दोघे संगतीने राहू लागतात. काही दिवस असेच जातात आणि मग अचानक, निकड न भागलेला दुसरा नर तिथे येऊन ठाकतो.
दोन तडफदार नर किंग-कोब्रा एकमेकांना आव्हान द्यायला जमिनीवरून फूटफूटभर उंच फणा काढून समोरासमोर ठाकलेले. असं वाटतं की आता त्वेषाने एकमेकांवर फुत्कारतील, विषारी दंश करतील एकमेकांना; पण घडतं भलतंच. यत्किंचितही तोंड न उघडता अतिशय डौलदार नृत्य केल्याप्रमाणे ते डोलायला लागतात. एकमेकांच्या डोक्यावर अलगद स्पर्श करायला चढाओढ करतात. बराच वेळ असा खेळ चालतो. कोणी कितीवेळा दुसर्‍याच्या डोक्याला स्पर्श केला ह्याची गणती कशी ठेवतात कोण जाणे; पण नव्या नराची निकड पहिल्या नराच्या बचावाला भारी पडते. पहिला नर निमूट हार मानून निघून जातो. नवा नर त्याला दातही लावत नाही. किती हा उमदेपणा!
नवा नर मग मादीशी जवळीक करु लागतो. तिला ते मान्य असतं का ते कळायला मार्ग नाही; पण दोन्ही नरांनी आपसांत निकाल लावलेला असतो. नवा नर थोडंसं मादीच्या मागे-पुढे करतो, सलगी करायला बघतो आणि कसं कोण जाणे; पण तिला स्पर्श करताना त्याला कळतं की तिच्या उदरात पहिल्या नराचा अंश आहे. दुधात मिठाचा खडा पडावा तसा तो इतकावेळ राजस, उमदा वाटणारा नर क्षणार्धात हिंस्त्र होतो आणि मादीच्या नरडीचा घोट घेतो. ती तडफडते, झटपटते, जीव आणि वंश वाचवायला आकांताने प्रयत्न करते; पण नराच्या पकडीसमोर तिचं काहीही चालत नाही. तिचा जीव पूर्णपणे गेला आहे ह्याची खात्री होईपर्यंत नर तिला सोडत नाही; आणि जीव गेल्याची खात्री झाल्यावर निर्विकारपणे तिचं मृत शरीर ओलांडून सरसरत निघून जातो.

डॉक्युमेंटरी संपली तरी सिद्धार्थ तसाच बसून राहिला त्या प्रसंगाचा विचार करत. त्यातलं क्रौर्य त्याला प्रचंड अस्वस्थ करून गेलं. "पण त्या नागाला क्रूर तरी कसं म्हणणार?", सिद्धार्थचं विचारचक्र गरागरा फिरत होतं, "एका करवंदाएवढा त्याचा मेंदू. त्याला काय विचारशक्ती असणार? त्याच्या जनुकीय प्रेरणेनुसार तो वागला. किंबहुना असं वागणारे कोब्रा टिकले उत्क्रांतीमध्ये म्हणून आज ते तसं आहे, नाही का? त्या नागाला दुसरी काही भावनाच नाही, निव्वळ एका जैविक यंत्रासारखं तो वागणार. त्यात चूक-बरोबर-क्रौर्य-क्षमा-दया-माया हे काहीही नाही. पण समजा त्याला विचारशक्ती असती माणसासारखी तर त्याने सोडलं असतं जिवंत त्याच्या असलेल्या मादीला? समजा त्याला माहित असतं माणसासारखं की, नको असेल तर तो अंश नष्ट करता येईल; तर त्याने त्या मादीला तिच्यातला आधीचा अंश नष्ट करून स्विकारलं असतं त्याच्या वंशाची वाहक म्हणून? त्याला काय, वंश वाढल्याशी कारण ना? की अशी विचारशक्ती असूनही तिला त्याने अपवित्र झाली म्हणून मारलंच असतं?". बेडरूममधून शिल्पाची हाक आल्यावर, अनुत्तरित विचार मनाच्या कोपर्‍यात ढकलून, टीव्ही बंद करून सिद्धार्थ उठला आणि बेडरुममध्ये गेला. शिल्पा शॉवर घेऊन आली होती.

"झोपायचं नाही का?", त्याला पाहून ती म्हणाली.

"हं", तो म्हणाला आणि बेडच्या कडेवर बसून तिच्याकडे पाहू लागला. तिचे केस, तिच्या डोक्याचा आकार, तिचा चेहरा, तिची शरीरयष्टी. एक स्वतंत्र, त्रयस्थ व्यक्ती म्हणून तिचा तो विचार करायला लागला. तिचा सावळा गोड गोल चेहरा पाहून त्याला नेहमीच हृदयात मऊ मऊ वाटायचं; पण कधी तिच्यावर मालकीहक्क असल्यासारखं त्याला वाटलं नाही. "एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती आपल्याला आवडते", त्याला वाटलं,"पण आपल्यातही जनुकीय प्रेरणा आहेतच ना? समजा तिला दुसरं कोणी आवडलं तर?" त्या विचाराने तो चमकला. मनात एकदम गोंधळ झाला त्याच्या. त्या विचाराने एकदम प्रतिक्रिया येण्यापेक्षा आपली प्रतिक्रिया काय असायला हवी ह्याच विचाराने तो गोंधळला. "माणूस कसा प्राणी आहे? किंगकोब्रासारखा?", त्याला प्रश्न पडला.

दिवे मालवल्यानंतरही बराच वेळ त्याला झोप येईना. शेवटी तो स्टडीत येऊन बसला आणि नुकतंच वाचून संपवलेलं "सेपियन्स" रँडमली उघडून वाचायला लागला.

*************************

दहा वाजता बॅडमिंटन खेळून झाल्यावर नेहमीप्रमाणे तो आणि अभिजित चहा घेत बसले होते; तेव्हा विषय निघालाच. डॉक्युमेंटरीबद्दल आणि त्या प्रसंगातल्या क्रौर्याबद्दल त्याने अभिजितला सांगितले.

"हं...", ऐकून बराच वेळ शांत बसून अभिजित शेवटी म्हणाला,"चारित्र्याच्या संशयावरून बायकोला ठार मारणारी माणसंही असतात की. माणूसही शेवटी प्राणीच. तू रिचर्ड डॉकिन्सचं 'द सेल्फिश जीन' वाच. त्यात प्राण्यांच्या वागण्यामागची गेम थिअरी उलगडून दाखवलीय."

"अरे, पण माणूस विचार करणाराही प्राणी आहे. आपलं सगळं वागणं निव्वळ जनुकीय प्रेरणेतून नसतं. तसं असतं तर कायदे-कानून आणि सामाजिक संकेत आलेच नसते ना अस्तित्वात."

"माणूस विचार करणारा प्राणी असला तरी शेवटी विचारांचं मूळ जनुकीय प्रेरणेतच आहे. आपला वंश पुढं चालवण्यासाठी आणि आपली संपत्ती आपल्याच संततीला मिळावी ह्या विचारातूनच स्त्रियांवर बंधनं आली; म्हणजे चुकून दुसर्‍याची संतती आपली समजून त्यांना वाढवण्याचे श्रम घेतले जाऊ नये म्हणून."

"पण हे सगळं शेती करून माणूस स्थिरस्थावर होऊन नागर वसाहती वसल्यानंतर बर्‍याच काळाने झालं. तू 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' वाचलंय का? त्यात माणसांचं वागणं कुठल्या काळात कसं होतं ते लिहिलंय आणि ते वाचल्यावर कळतं की ही निव्वळ जनुकीय प्रेरणा नसून त्या-त्या काळातल्या सामाजिक नीतिकल्पनांवरून माणसांचं वागणं ठरत होतं. एकेकाळी तर स्त्रियांना गाईगुरांसारखीच किंमत होती. अनेक स्त्रियांची मालकी असणे व आलेल्या पाव्हण्याला त्यातली स्त्री देणे वावगे समजत नसत. त्या स्त्रीच्या भाव-भावनांना किंमत शून्य. जसजशी संपत्ती वाढत गेली तसतशी आपल्याच रक्ताच्या वारसाला ती मिळावी म्हणून ह्या कल्पना बदलत गेल्या. सुरक्षेची साधनं व डीएनए टेस्ट्स वगैरे नसल्यामुळे एकमेव उपाय म्हणजे स्त्रीवर बंधनं आणणे. आणि मग पतिव्रता वगैरे संकल्पना आणि त्याचे अफाट उदात्तीकरण."

"हं, खरंय, पण तेव्हा दुसरा उपायच नव्हता ना. आपण कष्ट करुन संपत्ती कमवायची आणि ती दुसर्‍याच्या संततीला मिळाली म्हणजे?"

"बरोबर. तेव्हा उपाय नव्हताच, तेव्हा आजची आधुनिक साधने नव्हती ना."

"आज साधनं आहेत म्हणून फरक पडलाय असं तुला वाटतं? मध्यंतरी तो दीपिका पदुकोणचा 'इट्स माय चॉईस' व्हिडिओ आला होता त्यावर किती टीका झाली होती."

"हो ना... अमोल पालेकरचा 'अनाहत' पाहिलायस का? तो पाहायला गेलो होतो तेव्हा गंमतच झाली. पिक्चर संपल्यावर सगळे बाहेर पडत असताना, आमच्या पुढच्या रांगेत उभ्या असलेल्या काकू त्यांच्याबरोबरच्या दुसर्‍या काकूंना म्हणाल्या "अगं, हा पालेकरांचा पिक्चर आहे ना, मग असं काय?". अमोल पालेकरच्याच पहेलीवरही बर्‍याच लोकांनी नाकं मुरडली होती. स्त्रीच्या कामनांना काहीही किंमत दिली की लोकांना आवडत नाही."

"र.धो.कर्व्यांना किती हाल काढावे लागले माहिताय ना? ते पाहून त्यानंतर सगळे चिडीचूप ह्या विषयावर इतकी वर्षे झाली तरी! बाय द वे, तू ध्यासपर्व पाहिला असशीलच. तोही अमोल पालेकरचाच आहे."

"हो... एकदम डिप्रेसिंग. एकशेतीस कोटी माणसं पैदा करणारा देश आपला आणि".

**************************

शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर सिद्धार्थला निखिलचा फोन आला. तो आणि मोना नदीकाठच्या रेस्टॉरंटमधे बसले होते. मग शिल्पाला तिकडे यायला सांगून सिद्धार्थ तिकडेच गेला. जाऊन बसला नाही तोच निखिलचा प्रश्न,

"वाचलंस का?"

"काय?", सिद्धार्थ गोंधळून म्हणाला.

"स्क्रिप्ट."

"स्क्रिप्ट?"

"मित्रा, महिन्याभरापूर्वी मी तुला नाटकाचं स्क्रिप्ट दिलं होतं वाचायला. वाचलंस का?"

"ओह, ते होय? वाचलं, वाचलं."

"कोणतं स्क्रिप्ट रे?", मोनाने उत्सुकतेनं विचारलं.

"अगं ते 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर'. मी ह्याला दिलं होतं वाचायला; पण ह्याचं काही म्हणणंच नाहीय त्यावर.", निखिल म्हणाला.

"कोण म्हणतं म्हणणं नाहीय? नंतर आपलं बोलणंच झालं नाही ना!"

"बरं मग आता सांग काय म्हणणं आहे."

"तसं चांगलं आहे. थोडं शब्दबंबाळ आहे; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी जी काही तात्त्विक कसरत करुन कोलांटीउडी मारलीय ना नाटककाराने, त्याला तोड नाहीय. कातडीबचाऊ!"

"कोलांटी उडी काय मारलीय?"

"इतकी बडबड करून झाल्यावर काय शोध लावला की, आपल्याला काही करायचं नसतं; फक्त एक्साईटमेंट हवी असते. म्हणजे काही करण्याच्या कल्पनेत एक्साईटमेंट आहे; पण प्रत्यक्ष करण्यात नाही?"

"अरे ए, तसं म्हटलं नसतं शेवटी तर कोणी त्या नाटकाला हात तरी लावला असता का? तसं म्हणूनसुद्धा त्या नाटकाला विरोध होतोच ना?."

"म्हणूनच म्हटलं ना. सगळं शेवटी व्यवहाराच्या गणितापाशी येतं. साहिर लुधियानवी ज्याला ‘दौलत के भूखे रिवाज’ म्हणतो ना ते हेच. नाटक चाललं पाहिजे म्हणून शेवट कसा कोणाच्याही कशालाही धक्का देणारा नको; नाटकभर हूल देत राहिलं तरी. आपल्याला काही करायचंच नसतं कारण व्यवहाराला धक्का बसण्याची भीती असते. काळ बदलला तरी ते पूर्वापार चालत आलेले संपत्तीच्या रक्षणाचे रिवाज तोडायला नकोत; पण तोंडाने आयुष्य भरभरुन जगण्याची, नव्या अनुभवांना भिडण्याची भाषा."

"तू जरा अतिरेकी बुद्धीवादीपणा करतोय असं नाही वाटत का तुला? मलातरी ते नाटक आवडलं. दुर्दैव की ते करता येणार नाही; पण त्यात वावगं काही दिसत नाही मला."

"वावगं नाहीच आहे काही. फक्त जे वास्तवात वाटतंय त्याचं डिनायल करण्याचा, त्या डिनायलला तात्त्विक मुलामा देण्याचा प्रकार आहे नेहमीचा."


********************************

रात्री घरी आल्यावर सिद्धार्थ आणि शिल्पा लिव्हिंग रुममध्ये सोफ्यावर जरा टेकले आणि चाळा म्हणून सिद्धार्थने टीव्ही लावला. टीव्हीवर "जस्ट फॉर लाफ्स" नावाचा कॉमेडी शो चालू होता. रस्त्यांवर, मॉलमध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांवर काहीतरी प्रँक करुन छुप्या कॅमेर्‍याने त्यांच्या प्रतिक्रिया टिपून त्या दाखवत होते. बघता बघता शोमध्ये नवी गंमत सुरु झाली. रस्त्याने जाणार्‍या जोडप्यांपैकी स्त्रीला तिच्या जोडीदाराच्या नकळत विश्वासात घेऊन भलत्याच पुरुषाबरोबर नाचायला आणि तो नाच एन्जॉय करण्याचा अभिनय करायला सांगत होते. जोडप्यातली स्त्री त्या परक्या पुरुषाबरोबर अगदी घसट करून आनंदाने नाचायला लागली की तिच्या जोडीदाराच्या प्रतिक्रिया छुपा कॅमेरा टिपू लागत होता आणि त्या शोचा सूत्रसंचालक मुद्दाम तिच्या जोडीदाराला भडकावून तो काय करतो ते बघत होता.

ते बघता बघता शिल्पाने एकदम वळून विचारलं, "समजा तुझ्यासमोर मी असं कोणाबरोबर नाचत असले, तर तू काय करशील?"

सिद्धार्थने तिच्याकडे पाहिले. तिच्या सावळ्या गोड चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या हृदयात काहीतरी उचंबळून आलं. हसऱ्या चेहर्‍याने तो धीरोदात्तपणे म्हणाला,"तुला मजा येत असेल तर मला काही वाईट वाटणार नाही."

एकाएकी तिचा हसरा चेहरा बदलला आणि हसण्याची जागा रागाने घेतली,"काही वाटणार नाही? म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाहीय?”

सिद्धार्थ एकदम गडबडला. "प्रेम नसण्याचा कुठे प्रश्न येतो इथे? मी फक्त पझेसिव्ह नाही इतकंच. नुसतं नाचलं कोणाबरोबर तर त्यात काय वाटण्यासारखं आहे जोपर्यंत तुला आवडतंय तोपर्यंत?"

"ते काही नाही.. तू विचित्रच आहेस. कुठल्याही नॉर्मल पुरुषाला राग येईल असं पाहून. पण तुला नाही येणार कारण तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही.", इतकं म्हणून ती तणतणत बेडरूम्मध्ये निघून गेली.

सिद्धार्थ अवाक् होऊन तसाच ती गेली त्या दिशेने बघत बसून राहिला. टीव्हीवरचे लोक आता कॅमेर्‍याकडे बोट दाखवून खदाखदा हसत होते.

रापा नुईचे मोआई

समुद्रकिनाऱ्याजवळच्या बागेत बांधलेल्या लाकडी मंडपात बैठक सुरू झाली, तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी रांगेत उभे असलेले टोळीप्रमुखाच्या पूर्वजांचे भव्य पुतळे सोनेरी प्रकाशात चमकत होते. त्या पुतळ्यांकडे अभिमानाने पाहून वंदन करून प्रमुखाने बोलायला सुरुवात केली, “आपल्या सगळ्यांना हे विदीतच असेल की ‘त्यांनी’ बेटावरचा सगळ्यात मोठा पुतळा उभारला गेल्या महिन्यात आणि मुद्दाम आपल्या समोरून मोठी मिरवणूक काढली होती. हा आपल्या पूर्वजांचा अपमान आहे आणि तो आम्ही कदापिही सहन करणार नाही”.
बैठकीत जमलेल्या तरुण मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रमुखाने “राजगुरू” म्हणवणाऱ्या पुजाऱ्याकडे पाहिले. त्याने समाधानाने मान डोलावली.
“ह्या अपमानाचा व अन्यायाचा बदला म्हणून आमचे पूज्य पिताश्री स्वर्गवासी राजेसाहेबांचा त्यापेक्षाही उंच पुतळा बनवण्याचा निर्णय एकमताने घेण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत.”
पुन्हा एकदा टाळ्या-शिट्ट्या-चित्कारांचा कल्लोळ झाला. मंत्रीमंडळातल्या दोन वृद्ध मंत्र्यांनी एकमेकांकडे मूकपणे पाहिलं.
“आपल्या समृद्ध परंपरेप्रमाणे ह्यावर आता चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रथमत: ह्या प्रस्तावाविरोधात मत असणाऱ्यांनी बाजू मांडावी.”
मंडपात शांतात पसरली. मागं उभे असलेले लोक माना वर करून चवड्यांवर उभे राहून कोण उभं राहतंय ते पाहू लागले. म्हाताऱ्या मंत्र्यांपैकी एकजण हळूहळू उभा राहिला.
“आपल्या पूर्वजांचा आदरसत्कार करणे ही तर फारच मोठी पुण्याची गोष्ट आहे ह्यात वाद नाही”, घसा खाकरून तो म्हणाला,”परंतु परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आपल्या बेटावर आता झाडं फार कमी उरलीत. ती झाडं पुतळ्यासाठी तोडण्यापेक्षा वर्ष-दोन वर्षं ती वाढवण्यावर लक्ष देऊ या आणि मग पुतळा बांधता येईल. झाडं कमी उरल्याने आपल्या तरूण मंडळींना होड्याही बांधणे महाग पडतंय. मासेमारीत घट झालीय. त्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ पडताहेत. मुबलक असणाऱ्या गोगलगाई जवळजवळ दिसेनाशा झाल्यात. उंदरांनी उच्छाद मांडला आहे. त्याकडे तातडीने लक्ष द्यावे असे मला वाटते.”, इतकं बोलून तो खाली बसला.
श्रोत्यांमध्ये एकदोन माना अनुमोदनासाठी डोलल्या न डोलल्या, तोच टोळीप्रमुखाच्या जवळच्या काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला. “हा काय आपल्याला दुर्बळ आणि गरीब समजतो काय? अरे, आपल्या शूरवीर पूर्वजांनी ह्या अफाट सागराशी झुंज देत छोट्या होडक्यातून प्रवास करत हे बेट गाठले; आणि आपण ह्या किरकोळ संकटांना घाबरून त्यांचा अपमान होऊ द्यायचा? हा माणूस ‘त्यांच्यासमोर’ आपली मान खालीच घातलेली राहावी म्हणून प्रयत्न करतोय. हा टोळीद्रोही आहे. ह्याला हाकलून ‘त्यांच्यात’ पाठवून द्या.”
हे ऐकून श्रोत्यांमधल्या गरम रक्ताच्या तरूण लोकांनीही आरडाओरडा सुरू केला. शेवटी प्रमुखाने हात वर करून सगळ्यांना शांत केलं.
“आरडाओरडा करणे आपल्या परंपरेला शोभत नाही. शांतपणे प्रत्येकाने आपले मत मांडावे. अजून कोणाला ह्या निर्णयाच्या विरोधात बोलायचंय?”
पुनरेकवार मंडपात शांतता पसरली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. बराच वेळ झाला तरी कोणी पुढं आलं नाही. मग प्रमुखाने पुतळ्याच्या बाजूने बोलणाऱ्यांना आमंत्रण दिलं. राजगुरू तत्परतेने पुढं आले. आपल्या ओजस्वी आवाजात त्यांनी पुनरेकदा पूर्वजांची महती गायली, पुतळा उभारल्याने पूर्वजांना स्वर्गात किती आनंद होईल ते सांगितलं, पुतळा उभारण्याने किती हातांना काम मिळेल ते सांगितलं, पुतळा उभारल्याने टोळीची शान पूर्ण बेटावर सगळ्यात जास्त असेल हे सांगितलं. त्यांचं भाषण संपलं तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने व पूर्वजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला. त्यानंतरही प्रमुखाच्या पुढेमागे फिरणाऱ्यांची अंधार पडून जाईपर्यंत भाषणे झाली; पण निकाल केव्हाच लागला होता.
बैठक संपून लोक आनंदाने पांगले तेव्हा मंडपात दोन-तीन मशाली तशाच फडफडत होत्या आणि दूरवरच्या टेकडीवरची शेवटची दहा-बारा पामची झाडं वाऱ्यावर मूकपणे झुलत होती.

Moai, Rapa Nui National Park, Easter Island (Photo: www.travelnation.fr)




Tuesday, September 27, 2016

सुरळीत

"अबे तुमचं चारचौघांसारखं काही होणार नाही
आन् तुमच्याच्यानं क्रांतीवांतीपण होणार नाही."
ज्योतिषी बोलला खाजवत उघडी केसाळ मांडी,
"तुमच्या बुधावर आलीय शनिची वाकडी दांडी.
कुबेराच्या खजिन्यातले तुम्ही एक छदाम.
अमेरिकेच्या ताब्यातले तुम्ही साले सद्दाम.
गव्हाच्या गोदामातले तुम्ही एक गहू.
तुमच्या रविचा चखणा करतो तुमचाच राहू.
टनभराचा पाय छातीवर घेऊन मुंडी हलवता कशाले?
स्वताची बेंबी सोडून भलतीकडं तुम्ही बघता कशाले?
सगळे ज्या सुरळीतून जातात तिच्यातूनच जावा.
आपलं झालं चांगलं म्हणून गप निवांत ऱ्हावा.
देतो गुरुमंत्र तो म्हणा म्हणजे काय काळजी नाही
म्हणा 'परिस्थिती इतकीही काही वाईट नाही'.
विचार लई करु नै इतकं ध्यानात असू द्या एक
हं निघा आता पण आधी काढा रुपय एकशेएक."

Wednesday, July 13, 2016

सूर्यावरचे वारे

बातमी:http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-2716417/Could-moon-fuel-Earth-10-000-years-China-says-mining-helium-satellite-help-solve-worlds-energy-crisis.html

This is awesome! They are going to mine the moon for Helium-3!
लहानपणी सूर्यावरचे वारे नावाचं भाषांतरित रशियन  पुस्तक वाचलं होतं. बाकी काही नाही तरी नाव लक्षात राहिलं होतं. सूर्यावरचे वारे चंद्रावर येऊन पुढे इतकी मदत करतील असं वाटलं नव्हतं.
दुसऱ्या एका जपानी कंपनीचा, चंद्र Solar planes ने झाकून Microwaves च्या रुपात वीज पृथ्वीवर पाठवायचा संकल्प वाचून असंच भाऽरी वाटलं होतं.
But wait....what? We have an energy crisis? म्हणजे ते peak oil वगैरे खरं आहे की काय? पृथ्वीवरचं ऑईल खूप खोल गेल्याने काढणं परवडत नाही म्हणून चंद्रावरचा हेलियम आणायचा. Makes perfect sense!
पृथ्वीवर सूर्यप्रकाशातून टेरावॅटच्या टेरावॅट ऊर्जा येते असं ऐकलं होतं आणि सोलर टेक्नॉलॉजी लवकरच अतिशय स्वस्त आणि फार एफिशियंट होऊन भरपूर ऊर्जा मिळेल असं ऐकलं होतं. 
थोडक्यात काय येनकेन प्रकारेण कुठूनतरी भरपूर ऊर्जा येणार आहे. त्यामुळे "समजा ऊर्जा मिळाली नाही तर आहे त्या ऊर्जेत कसं भागवायचं? तरीही सगळ्यांना किमान गरजा भागवता येतील अशी अर्थव्यवस्था असणे शक्य आहे का?, लो-एनर्जी भविष्यात स्थानिक कम्युनिटीजमध्ये कोणते social evils टाळायला हवेत? एनर्जी क्रायसिस आणि वाढता प्रोटेक्शनिझम/ वाढता उजव्या विचारसरणीचा प्रभाव ह्यांचा काही संबंध आहे का?" यावर विचार करण्याची काहीच गरज नाही. The party is never going to end!

Monday, July 11, 2016

Freedom For Sale

काल माजी न्यायमूर्ती श्री. मार्कण्डेय काट्जूंनी त्यांच्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये असा सवाल केला की काश्मीरला स्वातंत्र्य मिळाल्याने काश्मिरींचे राहणीमान उंचावणार आहे का? "स्वातंत्र्य हे साध्य नसून साधन आहे आणि भौतिक प्रगती होणार नसेल तर स्वातंत्र्याला काहीही किंमत नाही" असे ते म्हणाले. त्यावरून मला जॉन काम्प्फनरांच्या "Freedom For Sale" या पुस्तकाची आठवण झाली. काम्प्फनर यांनी त्यांच्या मते सिंगापूरसारखी नियंत्रित किंवा भूल दिलेली लोकशाही जगभरात पसरत चालली असल्याच्या ट्रेंडचा मागोवा घेतला आहे. मुळात काम्प्फनरांना आपण काहीतरी सनसनाटी गोष्ट दाखवून देतोय आणि कितीही सुबत्तेचा स्वातंत्र्यासाठी लोक पूर्वी त्याग करत असा भ्रम झाला आहे. मजबूत चलन, भरपूर पैसा, लॅव्हिश घरं, मोठाल्या गाड्या आणि जगभर प्रवासाची मोकळीक एवढं असल्यावर कोण उगीच हौस म्हणून सरकारला नावं ठेवेल किंवा हवं ते बोलायचं स्वातंत्र्य नसेल तरी काय फरक पडतो?
मुळात माणसाला हवं काय असतं? चांगलंचुंगलं खायला, ल्यायला असलं, घरादाराची सोय असली, पोराबाळांच्या भविष्याची खात्री असली आणि हे सगळं स्वकर्तृत्वाने झालंय याचं समाधान असलं की झालं. बाकीच्या गोष्टींची उठाठेव कशाला? आपण आपलं स्वत:वर लक्ष केंद्रित करावं. आज काय खाल्लं, काय पाहिलं, काय वाचलं, कोणत्या गाडीत बसलो, कोणत्या रिसॉर्टला गेलो वगैरे सुखोपभोगाच्या अगणित गोष्टी असतात बोलायला. झालंच तर मुलाबाळांचं कौतुक, त्यांचे पराक्रम इत्यादी गोष्टी असतातच सांगायला. फालतू स्वातंत्र्याच्या कुचकामी कल्पना धरून फुकट वैचारिकतेचा आव आणण्यात काय हशील?
आपल्यापेक्षा जास्त महत्त्वाकांक्षी व बुद्धिमान लोक सरकार आणि मोठमोठ्या कंपन्या चालवतात. तेही त्यांच्या सुखासाठीच ना? त्यांना का संसार नाहीत? त्यांना का मुलंबाळं नाहीत? शिवाय ते आपलीही काळजी घेत असतील तर फुकट झंझट कशाला? दुसऱ्या कोणावर अन्याय होत असेल तर त्यांचं ते बघून घेतील. तसंही हे जग म्हणजे फ्री-मार्केट आहे. जे हुशार ते जिंकणार. त्यामुळे आपण बरे आणि आपले आयुष्य बरे. शिवाय थोडीफार चॅरिटी करायची सोयही आहेच ना!
हे बहुतेक सगळ्या स्मार्ट लोकांना चांगलं कळतं. त्यामुळे ते वादग्रस्त विषयांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. धर्म, राजकारण, सेक्स व आजकाल अर्थकारण हे विषय सार्वजनिकच काय, खाजगी जीवनातूनही शक्यतो हद्दपार केलेले बरे हे बहुतेकांना उमगतं. काम्प्फनरसारख्या लोकांना मात्र याचं उगाचच आश्चर्य वाटतं. 
आता भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचंच घ्या. उगीच मूठभर क्रांतीकारक सोडले तर बहुसंख्य लोकांनी घरंदारं सोडण्याचा प्रकार केला नाही. अगदी सावरकर, भगतसिंगांच्या विचारांनी प्रभावित झालेले लोकही आपल्या प्रेरणास्रोतांना दुहेरी जन्मठेप वा फाशी झाली म्हणून पेटून उठले नाहीत की आपल्या नेत्यासाठी प्राणांचा त्याग केला नाही. उलट त्यांचेच वंशज आज स्वखुशीने परदेशात जाऊन उगाच तोंडदेखलं "ने मजसी ने" वगैरे बळंच कारुण्य आणून म्हणतात. ह्याउलट गांधीजींनी लोकांना बरोबर ओळखलं; म्हणून त्यांना प्रचंड जनाधार मिळाला. फारसं काही न करताही "स्वातंत्र्यसंग्रामात" भाग घ्यायचं समाधान व पुढे आजीवन पेन्शन लोकांना त्यांनी मिळवून दिलं. गांधी सावरकर, भगतसिंगांना "वाट चुकलेले देशभक्त" का म्हणाले आणि ते किती बरोबर आहे ते सूज्ञांना माहितच असते. 
आजकाल कंपन्या म्हणे नोकरी देण्याआधी तुमच्या लिंक्डइन किंवा फेसबुक प्रोफाईलचा धांडोळा घेतात म्हणे; त्यामुळे कॉर्पोरेट कल्चर किंवा कॉर्पोरेशन्स बद्दल काहीही वावगं फार कोणी लिहीत नाही. एवढंच काय साधं निराशावादी किंवा किंचितसंही निगेटिव्ह वाटेल असंसुद्धा फार कोणी लिहित नाही. दुसऱ्याने लिहीलं तर दुर्लक्ष करतात. प्रतिवाद करण्यापुरताही संबंध येऊ देत नाहीत. शेवटी कर्तृत्व आपले असले तरी आपली सगळी मौजमजा, शोशाईन, गाडीबंगला वगैरे सगळं कॉर्पोरेट व सरकारी ओव्हरलॉर्ड लोकांच्या हातात आहे हे आपल्याला माहित असतं. 

Monday, June 27, 2016

फुकटे आणि विंचू

एलन डिजेनेरेस नामक अमेरिकन बाईंच्या टॉक-शोचा एक एपिसोड रविवारी थोडासा पाहण्याचे नशिबात लिहिले होते. मांजरासारखे डोळे असलेल्या या बाई त्यांच्या प्रेक्षकांमध्ये भलत्याच लोकप्रिय असाव्यात याचा अंदाज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आला. लाईव्ह ऑडियन्समध्ये ९९% महिला होत्या आणि त्याही सगळ्या पाच-सहा महिन्याच्या पोटुशा. एलनबाईंनी प्रवेश केल्याक्षणी ह्या सगळ्या महिलांनी जो काय कल्ला चालू केला की ज्याचं नाव ते. एक मिनिट झालं; दोन मिनिटं झाली; पण त्यांच्या किंकाळ्या काही कमी व्हायलाच तयार नाहीत. बहुतेक सगळ्या महिला उठून उभ्या राहून तारस्वरात चित्कारत होत्या आणि काही तर जागीच उड्याही मारत होत्या. एक तर प्रेक्षकांमध्ये सगळ्या गरोदर महिला कशा हे मला कळेना आणि वर त्या एलनबाईंवर त्यांचा इतका जीव का हाही प्रश्न निर्माण झाला.

बऱ्याच वेळाने प्रेक्षागार गार झाल्यावर एलनबाईंना तोंड उघडायची संधी मिळाली आणि मग पहिल्या प्रश्नाचा उलगडा झाला. आजचा एपिसोड मदर्स-डे-स्पेशल एपिसोड होता म्हणून भावी फादर लोकांनी केलेले उद्योग उरी बाळगणाऱ्या भावी मदर महिलांना आमंत्रित केलं होतं. काय ती कल्पकता! पण यावरून एलनबाईंचे सगळे एपिसोड बायकांसाठीच व बायकांपुढेच असतात हे लक्षात आलं. तरीही उत्सुकतेपोटी मी काही चॅनल बदलला नाही. "Curiosity killed the cat" अशी म्हण का पडली आहे तेही यथावकाश कळलेच.

खरं म्हणजे एपिसोड मदर-डे साठी आहे की फादर-डे साठी आहे ते मला तितकंसं नीट कळलं नव्हतं; कारण पाहुणा म्हणून एका गुळगुळीत दिसणाऱ्या मस्तकेतरकेशहीन अमेरिकन मेट्रोसेक्शुअल माणसाला बोलवलं होतं. हा माणूसही सेलिब्रिटी असावा; कारण तो येताच किंकाळ्या-चित्कारांचा एक माफक रिप्ले झाला. पोटात दुसऱ्या कोणाचातरी पराक्रम मिरवत महिला त्या चिकण्याकडे बघून चेकाळत होत्या. 

पाहुण्याने बसून घेतल्यावर त्याच्या बायकोचं व कुटुंबाचं कौतुक सुरू केलं. पार्श्वभूमीवर त्याच्या बायकोचे व त्याच्या मुलीचे एकत्र फोटो दाखवत सेलिब्रिटी ममतेचे हृद्य प्रदर्शन चालू होते. फुल्टू बायकांचा आड्यन्स म्हटल्यावर पाहुण्याने आया-बायांच्या स्तुतीचे मजल्यावर मजले बांधायला सुरूवात केली. आधी स्वत:च्या बायकोला कसं नेहमीच गिफ्ट आवडतं आणि मदर्स-डेचं गिफ्ट मात्र तो कसं स्पेशल आणतो वगैरे फेकाफेक केल्यावर आणि त्याला प्रेक्षक महिलांचा माफक टाळ्या-चित्कारांचा प्रतिसाद मिळाल्यावर त्याची मुळातच क्षुल्लक असलेली भीड चेपली. मग पुढ्यात बसलेल्या शेकडाभर गर्भधारी भामांना खूश करण्यासाठी गड्याची गाडी गरोदरपणाकडे वळली. पोटात नऊ महिने गर्भ बाळगणे हा अतिशय अचाट असा पराक्रम असून फक्त स्त्रियांनाच ते शक्य आहे आणि कोणताही पुरूष नऊ महिने असा गर्भ पोटात बाळगू शकणार नाही असे माहितीपूर्ण व सखोल अभ्यासाअंती तयार केलेले मत त्याने गुलजारपणे त्या बायांच्यापुढे टाकले आणि प्रचंड टाळ्या-चित्कारांच्या गजरात बायांनी ते उचलून उड्या मारायला सुरूवात केली. "पुरुष असे पोटात गर्भ धारण करत असते तर त्यांना स्त्री नसते का म्हटले? आणि जे करायला ज्या अवयवांची निर्मिती झाली आहे, ते त्या अवयवांनी केले तरी त्याला अचाट पराक्रम म्हणायचा येडचॅपपणा करायचा असेल तर करा; पण ज्यांना तो अवयवच नाही त्या पुरुषांना कशाला कमी समजले पाहिजे? की अमेरिकेत सेक्स करताना पुरुषाचं वीर्य बाईच्या गर्भात जाणार की बाईचं अंडं पुरुषाच्या गर्भात जाणार असे पर्याय उपलब्ध आहेत; आणि तरी पुरूष घाबरून स्त्रीलाच गरोदर व्हायला भाग पाडतात असं काही आहे?" अशा अर्थाचे विचार त्याचं मत ऐकून कोणाच्या मनात येण्याची किंचितशी शक्यता आहे असे मला वाटून गेले; पण पटकन मी माझ्या मनाला आवर घालून असंवेदनशील पुरुष होण्यापासून स्वत:ला वाचवले. पुरुष असंवेदनशील, स्त्रियांपेक्षा कमी भावनाशील व प्रसंगी भावनाशून्य, गबाळे, बालिश वगैरे असतात व स्त्रियांपेक्षा बहुतेक सर्व बाबतीत कमी असतात हे मान्य असणे ही आता सभ्य पुरूष म्हणून गणले जाण्याची प्रमुख अट बनत चालली असल्याने व मलाही सभ्य पुरुष म्हणवून घ्यायची हौस असल्याने मीसुद्धा सराव म्हणून टाळ्या वाजवून त्या नरकेशारिचे कौतुक केले व चित्कारण्याचाही प्रयत्न केला; पण कुत्र्याच्या रडण्यासारखा आवाज घशातून येऊ लागल्याने तो प्रकार आवरता घेतला आणि पुढचा कार्यक्रम पाहू लागलो. 

स्वत:च्या बायकोचे व जनरल सगळ्या स्त्रियांचे आमुखछिन्दन कौतुक करून झाल्यावर तो नरनोत्कच व एलनबाई अखेर उठले व तिथेच ठेवलेल्या तीन मोठाल्या खोक्यांकडे गेले. त्या खोक्यात असलेली उत्पादने प्रेक्षकवर्गाला फुकट मिळणार आहेत असे सांगून दोघांनी मिळून एकेका खोक्यातून एकेक वस्तू काढून दाखवायला सुरुवात केली. पहिल्या खोक्यातून आपल्या बाळाला जाऊ तिथे सुरक्षित व स्वत:च्या ताब्यात बंदिस्त ठेवण्यासाठी पोर्टेबल, फायबर प्लॅस्टिकचा व नायलॉनची जाळी असलेला हौदा कम पिंजरा निघाला. त्याच्या मध्यबिंदूला असलेल्या कडीला धरून उचलला की तो आपोआप फोल्ड होतो हे त्या चिकण्याने प्रात्यक्षिकासह दाखवले. बायकांनी चित्कारायला सुरुवात केली होती. दुसऱ्या खोक्यातून मामारू नावाची एक आपोआप झोळीसारखी हलणारी, आईस्क्रीमच्या कपासारखी दिसणारी लहान बाळांसाठीची एक खुर्ची निघाली. आपल्या स्मार्टफोनवरून हवा तितका झोका कमी-जास्त करता येतो हे सांगून मुलं सांभाळताना फोन हातातून खाली ठेवायची गरज नाही हे त्या गुलछबू पाहुण्याने दाखवून देताच चित्कारांचा आवाज दुपटीने वाढला. तिसऱ्या खोक्यातून कोणत्यातरी रिसॉर्टने प्रायोजित केलेले अमुक दिवस तमुक रात्रींचे प्याकेज निघाल्यावर, कार्यक्रमाच्या सुरुवातीचा कल्ला म्हणजे कुजबुज वाटावी इतका कल्लोळ झाला. मला टीव्हीचा आवाज कमी करावा लागला. काही महिला आता हाताने पटापट-पटापट टाळ्या वाजवताना दिसत होत्या, काही जागीच थयथयाट केल्यासारख्या नाचू लागल्या होत्या, काही आपल्या शेजारणींना मिठ्या मारत होत्या, काही पोटच्या गोळ्यासकट उड्या मारत होत्या, काही आफ्टरशेव्ह लोशन लावल्यासारखं दोन्ही गाल हातांच्या तळव्यांमध्ये धरून किंचाळत होत्या आणि काहींना भावना अनावर होऊन त्या आपले आनंदाश्रू पापण्यांचा मस्कारा खराब होऊ न देता टिपत होत्या.

फुकट काही मिळाल्याचा आनंद होणे आजकाल स्वाभाविकच आहे. एलनबाईंच्या लोकप्रियतेचे कारण अगदी नीट कळले. कोणाला काहीतरी फुकटात देऊन स्वत:ची लोकप्रियता वाढवणे हा साधा सरळ उद्योग त्या करतात. त्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना धंदा वाढवायचा असतो म्हणून जाहिरातीसाठी ते अशा शेकड्याने वस्तू फुकट देतात. कंपनीच्या श्रीमंत मालकांना अशा वस्तू वाटल्याने पुढे फायदा होईलच ह्याची खात्री नसते; त्यांना फायदा झाला तरी तो कंपन्यांच्या कष्टाळू कर्मचाऱ्यांपर्यंत झिरपेल ह्याची खात्री नसते; तरीही अशा वस्तू फुकट वाटण्याबद्दल कंपनीचे कर्मचारी ब्रसुद्धा काढत नाहीत. "आमच्या कष्टातून निर्माण झालेल्या वस्तू फुकटात का देता?" असे विचारत नाहीत. सुखवस्तु लोकांच्या क्रयशक्तीतून होऊ शकणाऱ्या आपल्या श्रीमंत मालकाच्या संभाव्य फायद्याचा ते विचार करतात. त्याच  मालकाच्या वर्गातल्या दुसऱ्या एखाद्या श्रीमंताने सत्ता मिळवायला, ती चिरकाल टिकवण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य राखायला, गरीबांच्या मतदानशक्तीचा वापर करून घ्यायला बेकार व बेघरांना निव्वळ जिवंत राहण्याइतकी मदत फुकट केली तरी हेच लोक रेबीड कुत्र्यांसारखे तोंडाला फेस येईपर्यंत भुंकायला लागतात. अशा लोकांकडे पाहिलं की कळतं की नझीम हिकमत "बंधो, तू विंचवासारखा आहेस" हे कोणाला उद्देशून म्हणतो ते. 

साला हे असले विचार येतात विनोदी तमाशे पाहताना आणि मग सगळी मजा विद्रट होऊन जाते. विषण्ण मनाने मी टिव्ही बंद करतो. 


Sunday, November 8, 2015

मुमुक्षु

निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात
सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या
सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या
सगळ्यात शेवटच्या मजल्यावर
मुमुक्षु राहतो.

रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत
न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत
तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर.

ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन
हल्ला करतात अचानक दिसेल तिथे
अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

डमरू डीएनेश्वर वाजवतो कधी गगनभेदी
दैवी प्रयोजनाची रासायनिक कारंजी उसळतात
डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात
नव्या त्रैलोक्याची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो मुमुक्षु पोटात गुडघे घेऊन

बलवान नव्या मुमुक्षुच्या जन्माची प्रार्थना करतो.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

कविता

मी करतो शब्दांच्या कसरती
आणि रचतो ते एक-एकावरती
शब्द नव्हेत जणू दगड-गोटेच
रत्न पडलेले कोंदण खोटेच.
हा नको, तो चांगला बसतोय
कमी वापरलेला, धारदार दिसतोय.
शब्दांचे तोलून मापून वजन
चिकाटीने करतो ओळींचे "सृजन".
कवितेचे देतो मग त्यांना नाव
आळवून वाचतो आणून आव.
पण....

तिच्या प्रथमदर्शनाची काळजातली कळ
माझ्या कवितेत काही उमटत नाही
पहिल्या पावसातला मातीचा वास
शब्दांच्या चिमटीत सिमटत नाही.
मला पाहून झुकलेल्या पापणीआडची
शब्दांत रंगत खुणवत नाही
निरोपाच्या क्षणातली कालवाकालव
शब्दांमधून जाणवत नाही.
ऐकणारे वाजवतात माफक टाळ्या
आणि होऊन बसतो मी एकटा उदास
निघालोय मी घेऊन पांगुळगाडा
अन् कविता म्हणजे फार दूरचा प्रवास.

मंत्र

आज चार दिवस झाले ही मुलगी दुसरं काही बोलतंच नाहीय. नुसती अधून-मधून रडतेय आणि "बाबा सांगा ना; बाबा सांगा ना"चा धोशा लावला आहे. आमची मुक्ता हो! मला वाटलं होतं, होईल एक-दोन दिवसांत नीट; पण चार दिवस झाले तरी हिचं लक्षण ठीक दिसेना. झालेलं काहीही नाहीय. म्हणजे, अगदी विशेष असं काही फार झालं नाहीय. आमच्या घरात तर नाहीच. हिने मात्र ती गोष्ट फार मनावर घेतली आहे.
सांगतो. गेल्या रविवारची गोष्ट. सकाळचे नऊ-सव्वानऊ झालेले. मी असा नेहमीप्रमाणे शूचिर्भूत होऊन; माझा मलमलीचा शुभ्र झब्बा-पायजमा घालून अभ्यासिकेत लिहीत बसलो होतो. हो; रविवारी सकाळी नऊ ते अकरा ही माझी लेखनसाधनेची वेळ असते. त्या वेळात व्यत्यय आणलेला मला मुळीच खपत नाही. म्हणजे, इतरवेळीही मी लिहितो; पण ते फुटकळ. वर्तमानपत्रातले लेख म्हणा, सदरं म्हणा किंवा साप्ताहिक-मासिक राशिभविष्य म्हणा. रविवारी मात्र माझं स्वतःचं खास लेखन. आता गेल्या वर्षीच माझं "राशी आणि रत्ने" प्रकाशित झालं. वाचकांच्या नुसत्या उड्या पडल्यात त्यावर! एका वर्षात तीन हजारांची आवृत्ती संपली सुद्धा! आता पाच हजाराची नवी आवृत्ती बाजारात येतेय. प्रकाशक म्हणताहेत अजून लिहा; वाचक म्हणताहेत अजून लिहा; म्हणून आता दुसरं पुस्तक लिहायला घेतलंय "राशी आणि त्यांचे स्वभाव"! मोठा मनोरंजक विषय आहे आणि मी लिहितोयसुद्धा अगदी मन लावून! मला लिहितानाच इतकी मजा येतेय तर वाचकांना किती मजा येईल याची कल्पनाच करवत नाहीय. हे पुस्तक तर आधीच्या पुस्तकापेक्षाही जास्त लोकप्रिय होणार यात मला तरी संशय वाटत नाही. बघा, तुमची प्रत राखून ठेवायची असेल तर सांगा मला; काय?  
हां, तर असा मी माझ्या लेखनसमाधीत बुडुन लिहीत बसलो होतो. मेषेच्या दणकेबाज धडकेबद्दल लिहू, की कर्केच्या मुळुमुळु रडूबाईबद्दल लिहू; मिथुनेच्या चतुर फटाकडीबद्दल लिहू, की वृषभेच्या विलासी मदनिकेबद्दल लिहू; वृश्चिकेच्या सणसणीत डंखाबद्दल लिहू, की तुळेच्या संतुलित कलात्मकतेवर लिहू असं मला अगदी झालं होतं. मस्त खुसखुशीत नर्मविनोदी शैलीत एकेक स्वभाववैशिष्ट्य उदाहरणासहित लिहिण्यात मी मश्गुल असताना मुक्ता "बाबा, बाबा" करत अभ्यासिकेत आली. समाधी भंगल्याने साहजिकच मी वैतागलो.
"मुक्ता! तुला मी हजारवेळा सांगितलं असेल की माझ्या लेखनात व्यत्यय आलेला मला चालत नाही म्हणून!", असं मी तिच्यावर करवादलो.
ती म्हणाली,"बाबा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आजी आल्यात."
मी म्हटलं", तुला मी सांगितलंय ना, की या वेळात कोणी न सांगता-सवरता आलं तर सरळ कटवायचं म्हणून?"
"हो, पण ह्या खूप म्हातार्या आजी आहेत हो.", ती हेका न सोडता म्हणाली.
"म्हातारी असो की तान्हं बाळ, आपण भीड पडू देता कामा नये. किती वेळा सांगायचं? भीड ही भिकेची बहीण आहे. जा. नंतर यायला सांग त्यांना."
"पुढच्या वेळेसपासून मी नक्की सांगेन; पण आजच्या दिवस चला ना बाबा, प्लीज. प्लीज. खूप म्हातार्या आजी आहेत हो त्या." ती माझा हात धरुन ओढायलाच लागली.
माझा मग नाईलाजच झाला. आता नववीतल्या मुलीला बोलून-बोलून तरी किती बोलणार? त्रासिक चेहर्याने मी दिवाणखान्यात येऊन पाहतो तर दिवाणावर माई बसलेली. आमची गल्ली मुख्य पेठेला लागते त्या वळणावर दोन घरं सोडून एक मोठा वाडा आहे. तो माईचा वाडा. दहा-एक हजार चौरस फुटांचा तरी असेल. पण आता सगळा पडून गेलाय आणि पुढचा दरवाजा आणि त्याला लागून असलेल्या एक-दोन खोल्या कशाबशा तगून राहिलेल्या. त्या पडक्या वाड्यात ही एकटी राहायची नव्वद-पंच्याण्णवची म्हातारी. सगळं अंग सुरकुतलेलं, तोंडाचं पूर्ण बोळकं झालेलं, कमरेतून वाकून अंगाचं धनुष्य झालेलं, हातापायाच्या काड्या झालेल्या अन् त्यामुळे अंगावरच्या धुवट पातळाचा आणि चोळीचा बोंगा झालेला, एकेकाळचे घारे डोळे आता पिवळट झालेले आणि डाव्या डोळ्यात पांढरा अपारदर्शक मोतीबिंदू झालेला. अशा या माईला आमच्या दिवाणखान्यात पाहून मला आश्चर्यच वाटले. माझा रोजचा येण्या-जाण्याचा रस्ता तिच्या वाड्यावरून जातो; पण तिला मी कित्येक वर्षांत पाहिले नव्हते. तिला ओळखतील असे आमच्या गल्लीत फारच कमी लोक उरले असतील. इतरवेळी अजिबात बाहेर न दिसणारी ही म्हातारी एकदम घरीच उगवली म्हटल्यावर मी अचंबित होऊन माझा त्रासिकपणा विसरलो.
"काय माई? काय चाललंय? कसं काय येणं केलंत आज?", तिला कमीच ऐकू येत असणार असं गृहीत धरून मी जरा मोठ्यानेच विचारलं.
म्हातारी बोळक्यानेच रुंद हसली; म्हणाली, "माझं म्हातारीचं मेलीचं काय चालणार?", दात नसल्यामुळे बोलताना हवा सुटून तिचे उच्चार गमतीशीर वाटत होते, "आला दिवस ढकलते झालं. सकाळी उठल्यावर आपण अजून जिवंतच आहोत हे कळून आताशा वाईट वाटतं बघ.", असं म्हणून म्हातारी हॅ हॅ हॅ करून हसली. तिच्या आक्रसलेल्या पापण्या आणि थकलेल्या बुबुळांमध्ये थोडासा मिश्कीलपणा चमकून गेला.
"तुझं मात्र कौतुक आहे हो!", म्हातारी पुढे बोलायला लागली,"लोक फार नाव घेतात तुझं. फार मान आहे तुला समाजात. वाडा पाडून दुमजली इमारत बांधलीस, दारात गाडी आणलीस. आजीचे पांग फेडलेस रे बाळा.  तुझी आजी आणि मी साधारण एकाच वेळी लग्न होऊन इकडे राहायला आलो. हिच्याएवढीच असेन मी तेव्हा", मुक्ताकडे हात करून ती म्हणाली.
"अहो काय माई मागच्या गोष्टी घेऊन बसलात?", मी उतावळेपाणाने म्हणालो, "आज कशी काय वाट वाकडी केलीत ते सांगा".
"माझं एक काम होतं रे तुझ्याकडं", माई थोड्याशा अजिजीच्या सुरात म्हणाली, "माझी अवस्था तर तू बघतोच आहेस. पिकलं पान कधी गळून पडेल त्याचा भरवसा नाही. पण जीवही सहजासहजी जात नाही बघ. माझा जीव माझ्या शंकरमध्ये अडकलाय रे.", तिचे डोळे एकदम पाण्याने चमचम करु लागले आणि खालचा जबडा काहीवेळ नुसताच वरखाली हालत राहिला.
"चाळीस वर्षे झाली त्याला घर सोडून.", माई खोलवरून कापरा आवाज ओढून आणत म्हणाली. ती पुन्हा भूतकाळात शिरतेय हे पाहून मी सुस्कारा सोडला आणि मुक्ताकडे एक तिरपा कटाक्ष टाकला. मुक्ताचंही तोंड रडवेलं झालं होतं. या बायकांना रडायला काहीही कारण लागत नाही. एक रडायला लागली की लगेच दुसरी तिच्याबरोबर रडायला लागते.
"बरोबर आहे माई;", ती पुढे काय बोलतेय ते न ऐकता मी आवाजाची एक पट्टी वाढवून म्हणालो, " पण त्याचं आता आपण काय करणार?". आता हिचा मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी नाटक कंपनीच्या नादाने घर सोडून गेला. चाळीस वर्षांत त्याची ना चिठी ना चपाटी. अशा मुलाचं रडगाणं माझ्याकडे गाऊन काय होणार होतं?
"तसं नाही रे.", ती परत अजिजीने म्हणाली, "आता तू एवढा प्रसिद्ध शास्त्री-पंडित झाला आहेस; सगळी शास्त्रं-पुराणं तुला मुखोद्गत आहेत. लोकांसाठी तू काय-काय उपायही करून देतोस. माझे डोळे मिटायच्या आधी शंकरची भेट होईल असा काही उपाय तुझ्याकडे असेल तर बघावा म्हणून मी आले रे बाळा."
आता हे खरं आहे की या क्षेत्रात माझा थोडाफार अभ्यास आहे. त्यात लहानपणापासून पाठांतराची सवय असल्यामुळे माझी स्मरणशक्ती अगदी तल्लख आणि उच्चार अतिशय सुस्पष्ट आहेत. शिवाय बँकेत नोकरी करत असलो तरी आमचा परंपरागत पौरोहित्याचा व्यवसाय मी जपला आहे. ज्योतिषाविद्येचा अभ्यास असल्याने पत्रिका बनवणे, जुळवणे आणि काही दोष असल्यास शांतीहोमादि उपाय सुचवणे व ते व्यवस्थितरित्या पार पाडून देणे वगैरे वगैरे मी करत असतो. त्यामुळे मला लोक मानतात आणि अगदी दूर-दूरहून माझा सल्ला घ्यायला येतात. आता या माईसाठीही धर्मशास्त्रात सांगितलेला एखादा उपाय मी शोधून देऊ शकलो असतो; पण मला त्यात काही राम दिसेना. आधीच म्हातारीच्या सगळ्या गोवर्या स्मशानात गेलेल्या. असा एखादा उपाय शोधायचे कष्ट घ्या; तिला तो समजावून सांगा आणि एवढं करून तो उपाय करणे तिला परवडणार नसेल तर? शिवाय दक्षिणा देण्याइतके द्रव्य तिच्याकडे असणे दुरापस्तच असणार असा मी अंदाज केला. आमचे पिताश्री म्हणायचे की कोणासाठीही काहीही फुकटात करु नये, माणसाला किंमत राहात नाही; म्हणून मी तिला झटकून टाकायला हवं होतं; पण सरळ-सरळ नाही म्हटलं तर म्हातारी उगाच चिवटपणा करेल, रडारड करेल आणि आणखी वेळ खाईल म्हणून मी तिला काहीतरी थातूर-मातूर उपाय सांगायचं ठरवलं.
"माई तुम्हाला वाचता येतं का?", मी तिला विचारलं.
"हो; येतं की. चवथीपर्यंत शिकलेली आहे मी आणि उजव्या डोळ्याने दिसतं मला अजून!", माई उत्साहाने म्हणाली.
मुक्ताला मी कागद-पेन आणायला पाठवलं आणि माईला म्हणालो, "एक उपाय सांगतो तो लक्षपूर्वक ऐका. दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा आणि मी देईन तो मंत्र अकरावेळा म्हणून तो अभिमंत्रित करायचा. मग तो चमचा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोयंड्यात अडकवून द्यायचा. कितीही वर्षे दूर गेलेला माणूस हमखास घरी येतो; काय समजलं?"
"दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा; अकरावेळा मंत्र म्हणून दाराच्या बाहेरच्या कोयंड्याला अडकवून द्यायचा.", माई थोडक्यात म्हणाली.
"बरोबर", मी म्हणालो. तितक्यात मुक्ता कागद-पेन घेऊन आली. मी कागदावर मनानेच रचून एक मंत्र लिहीला.
                              यथा उत्क्षिप्तो पाषाणः पुनरायाति पृथिवीम् |
                              बाष्परुपभूतं तोयं पुनरायाति सागरम् |
                              यथा भास्वतो भास्करः पुनरायाति उदयाचलम् |
                              तथा सुदूरं गतो जीवः पुनरायाहि स्वगृहम् ||
                                        || ॐ शुभं भवतु ||
लिहून झाल्यावर कागद मी माईकडे दिला आणि तिला वाचायला सांगितलं. तिने मंत्र अडखळत-अडखळत वाचला.मी अर्थ सांगितला, "ज्याप्रमाणे वर फेकलेला दगड पुन्हा पृथ्वीकडे येतो; ज्याप्रमाणे वाफ झालेले पाणी शेवटी पुन्हा सागराला येऊन मिळते; ज्याप्रमाणे तेजस्वी असा सूर्य पश्चिमेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे येतो; त्याचप्रमाणे घरापासून खूप दूर गेलेल्या हे जीवा तू स्वगृही परत ये असा त्याचा अर्थ आहे."माईने आनंदाने डोलत मान हलवली व कागदाची घडी दोन्ही हातांच्यामध्ये धरून हात जोडून कपाळाला लावत भक्तिभावाने नमस्कार केला.
"फार उपकार झाले रे बाळा", माई पुन्हा भावनावश होत म्हणाली, "तुझे उपकार तर मी फेडू शकणार नाही; पण दक्षिणा किती द्यायची तेवढं तरी सांग."
"आता तुमच्याकडून काय घ्यायचं माई?", मी हसत म्हणालो, "स्वखुशीने जे द्यायचं ते द्या."
माईने कमरेची चंची काढली आणि त्यातून अकरा रुपये काढून मला दिले. एक खडीसाखरेचा खडा काढून मुक्ताच्या हातावर ठेवला. मुक्ताला काय वाटलं कोण जाणे? तिने वाकून माईला नमस्कार केला.
"चिरंजीव हो.", माई भरल्या गळ्याने म्हणाली आणि मुक्ताच्या दोन्ही गालांवरून हात फिरवून तिने स्वतःच्या कानशीलावर कडाकडा बोटे मोडली.
"मोठी गोड आहे पोरगी!", बोळ्क्याने हसत मान डोलावत ती म्हणाली आणि मग पदराने डोळे पुसत पुसत निघून गेली.
मी पुन्हा अभ्यासिकेकडे वळलो तर मुक्ता म्हणाली, "बाबा तुमचा मंत्र काम करेल ना हो?"
"म्हणजे काय?", मी हसत म्हणालो, "अगदी शंभर टक्के. इथून पुढे मी लिहीत असताना तू कोणाला घरात घेतलं नाहीस तर नक्कीच माझा मंत्र फळेल."
"बाबा! चेष्टा नका ना करू! खरं खरं सांगा तुमचा मंत्र काम करेल ना?", मुक्ता परत रडवेली झाली होती आणि आता कोणत्याही क्षणी गंगा-यमुना वाहायला लागतील असं वाटलं म्हणून मी म्हणालो, "हो गं. नक्की काम करेल. अगं उपनिषदातला मंत्र आहे तो!". मी ठोकून दिलं असलं तरी तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं. ती तरीही विचारात पडलेली दिसत होती पण किमान रडली तरी नाही.उरलेला रविवार विशेष काही न होता गेला. सोमवारही आला आणि गेला. मंगळवारी सकाळी मात्र तो सगळा गोंधळ झाला. नेहमीप्रमाणे बँकेत जायच्या आधी मुक्ताला शाळेत सोडवायला मी निघालो होतो. वळणावर गाडी वळवली तर माईच्या घरासमोर ही गर्दी. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, "माईच्या घरासमोर गर्दी कसली?", असं म्हणत गाडी बाजूला थांबवली आणि मुक्ताला गाडीतच बसून राहायला सांगून गर्दीत घुसलो. गर्दीतून रस्ता काढत पुढे आलो आणि पाहिले तर एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन हवालदार आणि दोन पहारी घेतलेले मजूर उभे.
"काय झालं?", मी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला विचारलं.
"दरवाजा तोडताहेत", तो म्हणाला, "काल दरवाजा उघडला नाही म्हणून दूधवाला दूधपिशव्या दारात ठेऊन गेला. आज येऊन पाहतो तर मांजराने पिशवी फोडून सगळीकडे दूध सांडलेलं. आजही दार उघडेना म्हटल्यावर सगळ्यांनाच संशय आला म्हणून बोलावलंय पोलिसांना. बहुतेक रविवारी रात्रीच गेली वाटतं म्हातारी."
पहारी घेतलेली माणसं दरवाजाकडे निघाली. तेवढ्यात पोलिस इन्स्पेक्टर पुढे झाला आणि दाराच्या कोयंड्यात अडकवलेला चमचा त्याने काढला. मी परत फिरलो आणि गाडीत येऊन बसलो. गाडीत बसून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
"काय झालं बाबा?", मुक्ताने विचारलं.
"गेली बिचारी निजधामाला.", मी म्हणालो.
"निजधामाला?", मुक्ताने विचारलं.
"हो.", मी वरती बोट दाखवून म्हणालो, "देवाच्या घरी."
मुक्ता काचेतून गर्दीकडे आणि माईच्या घराकडे पाहात राहिली. मी चटकन गाडी काढली आणि निघालो. मुक्ता खिडकीच्या काचेतून वराचवेळ बाहेर बघत राहिली. काही वेळाने एकदम वळून तिने विचारलं, "बाबा, देवाच्या घराला निजधाम का म्हणतात?"
"निज म्हणजे कायमचं आणि धाम म्हणजे घर", मी तिला सांगू लागलो. इंग्रजी माध्यमात ती शिकत असल्याने मराठी व संस्कृत शब्दांचा अर्थ मीच तिला सांगत असतो, "अगं, देवाचं घर हेच आपलं कायमचं घर असतं. इथं पृथ्वीवर आपण सगळेच तात्पुरते घरापासून दूर आलेलो असतो. प्रत्येकाला कधी ना कधी आपल्या स्वतःच्या कायमच्या घरी जावंच लागतं".
"तुमच्या मंत्रात तेच म्हटलं होतं ना बाबा?", ती एकदम म्हणाली, "त्यामुळेच माईचा जीव....", आणि अचानक ती हमसून हमसून रडायलाच लागली.  माझ्या डोक्यातच नव्हतं ते, यामुळे ती काय बोलतेय तेच मला कळेना. थोड्यावेळाने कळल्यावर मी डोक्यावर हात मारून घेतला. झाऽऽलं. तेव्हापासून ते आतापर्यंत सारखा तोच विचार ती करतीये. मधूनच रडते आणि "सांगा ना बाबा; सांगा ना बाबा"चा धोशा लावला आहे. तिला मी हजारवेळा सांगून झालंय की हे मंत्रा-बिंत्राने काहीही झालेलं नाहीय; ती माई म्हातारी झाली होती आणि कधी ना कधी मरणारच होती ते त्याच दिवशी मेली; तो निव्वळ योगायोग होता; आयुष्य म्हणजे नुसता योगायोग असतो; हे मंत्र-पूजा-पाठ केल्याने नियती बदलत नाही  वगैरे परोपरीने सांगून पाहिलं पण ही हेकट पोरगी काही ऐकायलाच तयार नाही. वर "मंत्राचा परिणाम नाही तर तुम्ही लोकांना मंत्र का देता?", असं विचारतीये. आता या मूर्ख मुलीला कसं समजावून सांगू? तुम्हीच सांगून पाहा तिला. तुमचं कदाचित ऐकेल ती.

Sunday, May 17, 2015

संघर्ष

गर्द वनराईतला तो वड खुरटलेला कुढतो मनात,
"रात्रीपासून सकाळपर्यंतच्या प्रवासात
कधीकधी गर्तेत प्रशांत सागराच्या 
सूर्य अडकून बसतो माझ्या वाटेचा.
न सरणाऱ्या रात्रीत मुळा-पारंब्यातला जोरच जातो
आणि मुळांखालचा खडक अभेद्य वाटू लागतो."
आठवतो तो मग ते पांथस्थ वनराईत आलेले
खुरटेपणावर त्याच्या आणि कुत्सित हसलेले.
फांद्या एकमेकींवर घासतो आणि वाट पाहतो,
कधी एक ठिणगी पडेल आणि ईर्ष्या त्याची धडधडून पेटेल.
जाळेल त्यालाही ती आतून त्याची त्यालाही कल्पना आहे
पण रात्र सरेपर्यंत जाळण्यासारखी तेवढीच एक गोष्ट उरली आहे.

Saturday, February 1, 2014

सोयीस्कर गांधीवाद

Premise Four: Civilization is based on a clearly defined and widely accepted yet often unarticulated hierarchy. Violence done by those higher on the hierarchy to those lower is nearly always invisible, that is, unnoticed. When it is noticed, it is fully rationalized. Violence done by those lower on the hierarchy to those higher is unthinkable, and when it does occur is regarded with shock, horror, and the fetishization of the victims.
                                                                                   -Derrick Jensen (Endgame)

The world has enough for everyone's need, but not enough for everyone's greed
                                                                                   -M.K.Gandhi

The hottest places in hell are reserved for those who, in a time of moral crisis, remain neutral.
                                                                                  -Dante Alighieri

We have met the enemy and he is us.
                                                                                  -Pogo


आम्हाला बापूजींबद्दल अतीव आदर आणि अभिमान आहे. गांधीजींचे विचार आज जगभरात मान्यताप्राप्त झाले आहेत. मोठमोठ्या महासत्तांचे नेते आज त्यांच्या भाषणात गांधीजींचे नाव आदराने घेतात. विश्वशांती आणि अहिंसा म्हटले की पहिले नाव आठवते ते गांधीजींचेच. आम्ही गांधीजींच्या विचारांचे अभ्यासक, पाईक आणि प्रचारक आहोत आणि इतरांनी ते विचार अंगिकारले पाहिजेत असा आमचा आग्रह असतो.

आम्ही - जगातल्या सांपत्तिकदृष्ट्या वरच्या वीस-पंचवीस टक्क्यांतले लोक. आम्ही - त्या वीस-पंचवीस टक्क्यांतल्या वीस-पंचवीस टक्के लोकांसाठी काम करणारे लोक. आम्ही - मालकीहक्काची व त्यातून निर्माण होणार्‍या उतरंडीची (मराठी: हायरार्कि) प्राणपणाने जपणूक करणारे लोक. आम्ही - जगातल्या ऐंशी टक्के संपत्तीची मालकी बाळगून असणारे लोक. आम्ही - जगातल्या गाड्यांपैकी, इंधनापैकी व स्रोतांपैकी मोठा भाग  स्वतःसाठी वाढत्या प्रमाणावर वापरणारे लोक. आम्ही - पर्यावरणावरच्या अनिष्ट परिणामांचा व स्रोतांच्या टंचाईचा अभ्यास करू शकणारे शिकलेले लोक. आम्ही - त्या अभ्यासाच्या अनुमानानुसार योग्य ती धोरणे ठरवू शकणारे लोक. आम्ही - आमच्या उपभोगातून उडालेल्या खरकट्यावर खालच्या लोकांनी जगावं अशी अपेक्षा करणारे लोक. आम्ही - हे सगळं आपण आहोत हेही न कळणारे लोक. आम्ही - ते कळूनही सामूहिकरित्या काहीही करु न शकणारे लोक. आम्ही - कामाच्या ठिकाणी रिसोर्स आणि त्याच्या बाहेर कन्झ्युमर असणारे लोक.

असे आम्ही गांधीजींच्या विचारांचे पाईक असलो तरी त्यातले कोणते विचार पाळायचे आणि कोणते टाळायचे ते आम्हाला आपोआप समजते. उदाहरणार्थ नुकताच लोकसत्तात आलेला हा लेख पाहा. वाढती लोकसंख्या, घटते स्रोत आणि बिघडते पर्यावरण ही संकटत्रयी ढळढळीत समोर दिसत आहे, येत्या दशकभरातच त्याची झळ लागायला सुरुवात होणार आहे हेही कळते आहे. अशा परिस्थितीत आपल्यापुढे काय पर्याय आहेत हेही माहित आहे. ते अंमलात आणण्याचे सगळे मार्ग, साधने आणि वेळ हाताशी आहे. पण काय करणार? ते पर्यायी विचार आम्हाला पटत नाहीत ना! स्वयंपूर्ण खेडे किंवा स्वयंपूर्ण माणूस अशी कल्पनाही आम्हाला अव्यवहार्य वाटते. त्या उलट सगळा बाजार आहे आणि प्रत्येकजण काही ना काही विकत असतो हे तत्त्वज्ञान आम्हाला सहज आणि नैसर्गिक वाटते. जिच्या मांडीवर आम्ही जन्मलो ती आमची इंडस्ट्रियल इकॉनॉमी आम्हाला आमच्या आईपेक्षा जास्त प्रिय आहे आणि ती टिकवण्यासाठी सर्वसमावेशक विकास वगैरे पोपटपंची करायला आमचे गांधीप्रेम आडवे येत नाही, किंबहुना त्याची मदतच होते.

गांधींच्या आम्हाला आवडणार्‍या विचारांपैकी सगळ्यात प्रमुख विचार म्हणजे अहिंसा! गांधीजींच्या अहिंसेला घाबरून इंग्रज हा देश सोडून पळून गेले असे आम्ही लहान मुलांना व भोळ्या-भाबड्यांना सांगतो. गांधींचे हे विचार दूरदूरच्या कानाकोपर्‍यांपर्यंत, तिथे राहणार्‍या आदिवासींपर्यंत पोचतील याची काळजी घेतो. एका गालावर मारली तर दुसरा पुढे करावा हे त्यांनी शिकणे गरजेचे आहे कारण नंतर आम्ही त्यांच्या जमिनींवर धरणे आणि खाणी बांधायला जाणार तेव्हा त्यांनी विरोध न करता उलट दिलेली नुकसानभरपाई घेऊन आनंदाने अत्यंत कमी पगारावर तिथेच नोकरी करण्यात उपकार मानणे आमच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाचे आहे. कोणी त्याला हिंसक विरोध करु लागला की आमचा सात्त्विक संताप होतो आणि आपले अहिंसक सैन्य आपल्या अहिंसक बंदुका घेऊन तिथे पाठवून त्या लोकांना चांगला प्रेमाने धडा शिकवावा असे आम्ही पोटतिडीकीने बोलतो. त्यांची हजारो वर्षे टिकलेली जीवनव्यवस्था बदलून पुढची दोनशे वर्षेतरी टिकेल की नाही याची शाश्वती नसलेली जीवनव्यवस्था त्यांच्यावर लादण्याचे पुण्यकर्म केल्याची त्यांना योग्य ती जाणीव नसल्याच्या भावनेने खंतावतो.

गांधीजींचा दुसरा आवडणारा विचार म्हणजे प्रतिकात्मक कृती. आमच्या इंडस्ट्रियल यंत्रातला आम्ही एक नगण्य भाग असल्याने ठराविक परिघातच फिरण्याचे आमच्यावर बंधन असते त्यामुळे प्रत्यक्षात फरक पडेल असे काही करण्याएवढा आमच्याकडे वेळही नसतो आणि तेवढी शक्तीही नसते. त्यामुळे गांधीजींच्या चरख्यासारखी प्रतिकात्मक कृती आम्हाला अत्यंत सोयीस्कर वाटते. एखाद्या वीकेंडला जाऊन पीडितांच्याबरोबर एखादा दिवस काढणे, त्यांच्या बरोबर गाणी म्हणणे, मेणबत्त्या लावणे, घोषणा देणे इत्यादी प्रकार करून ज्या व्यवस्थेला आम्हीच आधार दिला आहे तिचाच प्रतिकात्मक निषेध करणे त्यामुळे किती सहज जमते.

गांधीजींचा तिसरा आवडणारा विचार म्हणजे अध्यात्मिक बैठक. ही बैठक एकदा जमली की आजूबाजूच्या कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना माणसाच्या मनाची शांती ढळवू शकत नाहीत. गाडीच्या काचेतून फक्त सुरम्य गोष्टीच दिसण्याची व्यवस्था होते आणि ज्ञानसाधनेतही आपल्याला हवे तेच आणि व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचेच ज्ञान डोक्यात जायचीही व्यवस्था होते. काही लोक याला ज्ञानियांची तटस्थता म्हणतात काही लोक याला स्वतःची सोबत म्हणतात. काही खवचट लोक याला भावनाशून्यताही म्हणतात. या बैठकीसाठी मग आपल्या परिघातल्या परिघात दुसर्‍यांना त्रास होतील असे बदल करून आपले माहात्म्य सिद्ध करता येते. म्हणजे उदाहरणार्थ, मी वेगन आहे किंवा मी कांदा-लसूण खात नाही असे जाहीर करून जिकडे जाऊ तिकडच्या लोकांची पंचाईत करून त्यांना न्यूनगंड देता येतो. मी रात्री फक्त फलाहारच घेतो असे म्हणून लाखो लिटर इंधन जाळून, लाखो जीवांच्या जिवावर उठलेल्या रस्त्यावरून आणलेली फळे आनंदाने  स्वतःच्या अध्यात्मिक तेजात निथळत मिटक्या मारत खाता येतात.

गांधीजींच्या ब्रह्मचर्य आणि अल्पसंतुष्टता या विचारांना पूर्णपणे दुर्लक्षित करुनही आम्ही पूर्ण गांधीवादी असू शकतो. गांधीवाद सगळा अंमलात आणणे आवश्यक नाही. किंबहुना अंशत:ही अंमलात आणणे आवश्यक नाही. तो अंमलात आणतो असा आव आणला तरी पुरे आहे. खरेतर त्याचीही गरज नाही. गांधी महान होते आणि त्यांचे महान विचार मला पूर्णपणे मान्य आहेत असे फक्त म्हणणे पुरेसे आहे. असा हा सोपा, सैलसर आणि सोयीस्कर असा गांधीवाद आम्हाला अत्यंत प्रिय असणार यात काय संशय?  

Saturday, December 14, 2013

फुकुशिमानो तोत्तोचान

वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं
तसं  उमटतं तिच्या गोबर्‍या गालावर हसू
फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु

तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात
रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात
फुलांवरच्या माश्यामात्र दिसत नाहीत आता
आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता

ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही
रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही
कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता
पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता

ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही
काय होणार पुढे तिला विचार करवत नाही
गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही
एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही

ओजिइसान रोजचा वेळ शांतपणे घालवतात
ऐंशी वय झालं तरी मजेत सायकल चालवतात
तोत्तोचानला आवडतात ते मनापासून जरी
न सांगताच थोडं आयुष्य तिचं घेतलंय तरी




tottochan

sunflower


शब्दार्थः
फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु: फुकुशिमाची तोत्तो गोंडस व सुंदर आहे.
ओतोओसान: वडील
ओकाआसान: आई
ओजिइसान: आजोबा
जिसात्सु शिता: आत्महत्या केली.