Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Saturday, February 10, 2024

लग्न

अंजू रंगारगल्लीच्या कोपर्‍यावरून कार्यालयाकडे जायला वळली, तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. मे महिना असल्यामुळे अजून अंधार पडला नव्हता. त्याच कोपर्‍यावर बाबुरावचे हॉटेल होते. हॉटेलातल्या रेडिओवर नवीनच लोकप्रिय झालेले 'देखा ना हाय रे, सोचा ना हाय रे' हे गाणे वाजत होते. दारातच बसलेला आचारी मोठ्या कढईत बटाटवडे तळत होता. नुकत्याच तळून काढलेल्या वड्यांचा खमंग वास अंजूच्या नाकात शिरला आणि पोटातल्या भुकेची तिला जाणीव झाली. दुपारपासून कार्यालय ते घर आणि घर ते कार्यालय, अशा तिच्या आणि मंजूच्या सतराशेसाठ फेर्‍या झाल्या असतील. दुपारी घरून कार्यालयात येताना सगळ्यांनीच भरपूर सामान पिशव्यांमध्ये भरभरून आणले होते, तरीही सारखे काही ना काही राहिल्याचे लक्षात यायचे, आणि मग अंजूला किंवा मंजूला किंवा दोघींनाही घराकडे पिटाळून ते मागवले जायचे. आताही हळदीची वेळ होत आली, तेव्हा आईच्या लक्षात आले की चोळखणांच्या गठ्ठ्यांपैकी एक गठ्ठा घरीच राहिला आणि अंजूला जावे लागले. पायीच हेलपाटे मारून तिची पाऊले आणि चप्पल धुळीने माखली होती. बहिणीचे लग्न आहे म्हणून नवे कपडे घालावे, मेंदी-बिंदी लावावी, छान नटावे-सजावे या जाणिवेचा टिपूसही तिच्या किंवा तिच्या भावंडांच्या मेंदूत सापडला नसता. आई-बापांनी सांगितलेल्या कामाला नाही म्हणण्याची तेव्हा पद्धत नव्हती आणि तसे म्हटल्यास भयंकर परिणामांना सामोरे जायची वेळ येत असे. शिवाय झटकन मोपेडवर बसून भुर्रकन इकडून तिकडे जाण्याचीही सोय नव्हती. अर्थात घरातल्या कडक शिस्तीखाली चेमटलेल्या अंजू-मंजूच्या साध्या-सरळ मनांना, नाही म्हणण्याचा किंवा वाहनाची सोय करवून घ्यायचा विचार शिवलाही नव्हता. अंजू तर अकरावीत असूनही इतकी बाळबोध होती की दोन-तीन वर्षात तिचीही बोहल्यावर चढायची वेळ येणार आहे हासुद्धा विचार तिच्या डोक्यात आला नाही. गाण्याच्या तालावर चालण्याचा वेग वाढवत अंजू कार्यालयात पोचली. 
ट्रक भरून आलेल्या वर्‍हाडातल्या लोकांचा चहा वगैरे घेऊन झाला होता. कार्यालयात टाकलेल्या मळकट गाद्यांवर बसून, किंवा कार्यालयाबाहेर तीन-तीन चार-चारच्या गटांनी उभे राहून, तंबाखू मळत माणसे निवांत गप्पा छाटत होती. कार्यालयाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मोठमोठ्या चुलाण्यांवर, मोठमोठ्या कढयांमध्ये दुर्गाबाई आचारिणीची माणसे निर्विकारपणे अन्न शिजवत होती. नवरीमुलीच्या व नवरामुलाच्या घरचे मात्र तणावाखाली लगबग करत होते. लवकरात लवकर हळद लावणे वगैरे प्रकार आटोपणे गरजेचे होते. आत्ता निवांतपणे गप्पा छाटणारी वर्‍हाडी मंडळी, जेवणाला थोडा जरी उशीर झाला, तरी आयुष्यभर त्याबद्दल काव-काव करणार हे सगळ्यांनाच माहित होते. मुलीच्या आई-वडिलांच्या, म्हणजे जयंतराव-मीराबाईंच्या चेहर्‍यांवर तर खूपच ताण दिसत होता. हातघाईच्या लढाईत शत्रूपक्षाच्या शे-दोनशे भालाईतांनी खिडीत गाठलेल्या मावळ्यांसारखे दोघेही चौफेर लढत होते. आल्याबरोबर अंजूने ते खणांचे पुडके मीराबाईंच्या हातात दिले. त्यांनीही ते कोणतीही प्रतिक्रिया न देता झटकन घेतले व लगबगीने पुढच्या कामाला लागल्या. अंजू मग एका बाजूला तिचे चुलत काका-काकू वगैरे मंडळी ज्या खोलीत होती, तिथे जाऊन उभी राहिली. जयंतराव म्हणजे जमदग्नीचा अवतार हे माहित असल्याने, हास्य-विनोद किंवा चेष्टा-मस्करी अगदीच वर्ज्य होती. बाहेर मुलाकडच्या मंडळींमध्ये थोडा-फार हास्यविनोद चालू होता आणि मुलाच्या आईचे मोठ्याने बोलणे ऐकू येत होते. इकडे मात्र तणावपूर्ण शांतता होती. जयंतराव म्हणतील तसेच करायचे असा नियम असल्याने स्वतःहून काही करणे, प्रसंगाचा ताबा घेणे वगैरे त्यांच्या मुलींनाच काय, मीराबाईंनाही शक्य नव्हते. अशी सगळी लगबग चालू असताना मध्येच मीराबाई काहीतरी घ्यायला खोलीत आल्या. त्यांच्या मागोमाग जयंतराव खोलीत आले. त्यांची काही तरी बोलाचाली झाली आणि अचानक जयंतरावांनी सगळ्यांदेखत फाडकन् मीराबाईंच्या श्रीमुखात भडकावली. खोलीत क्षणभरात सुन्न शांतता पसरली. प्रचंड अपमानित झालेल्या मीराबाई अत्यंत दुखावलेल्या, उद्विग्न चेहर्‍याने दोन क्षण जयंतरावांकडे बघत नुसत्या उभ्या राहिल्या आणि मग महत्प्रयासाने आवंढ्याबरोबर अपमान गिळताना त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. हे पाहणार्‍या अंजूच्या आत खोलवर काही तरी तुटले. आपल्या आई-वडिलांची नेहमीची भांडणे पाहताना तिला आतून ठिसूळ आणि भुसभुशीत झाल्याची भावना व्हायची. सगळ्यांसमोर आईचा झालेला अपमान पाहून त्याच तीव्र भावनेने तिच्या पोटात खड्डा पडला. डबडबलेल्या डोळ्यांनीच तिने मीराबाई व जयंतरावांना खोलीबाहेर जाताना पाहिले.  "मानलं बुवा दादाला! असा वचक पाहिजे!", असं तिच्या चुलत काकांपैकी कोणीतरी म्हणाले आणि तिला जोरात ओरडावेसे वाटले; पण आवाज उमटण्यासाठी आवश्यक ती हालचालच तिच्या घशाच्या स्नायूंनी केली नाही. 
        
   * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *                                                                    

        जयंतराव एका सरकारी कचेरीत उच्च दर्जाचे कारकून होते. त्यांचे वडील फार श्रीमंत होते म्हणे; पण जयंतरावांच्या बालपणीच त्यांचे वडील वारले, आणि भावकीने सगळ्या ऐश्वर्याचे लचके तोडले. न कळत्या वयातच झालेल्या भयाण दारिद्र्याच्या हल्ल्यात जयंतरावांच्या मेंदूतील विलास, विनोद, वात्सल्य, आणि स्वधारणा ही ठाणी उध्वस्त झाली होती. वडिलोपार्जित संपत्तीचा कवडीचाही फायदा न होता केवळ उरल्या-सुरल्या अवशेषांसाठीचे कोर्टकज्जेच वाट्याला आल्याने, "काय साली कटकट आहे!" हे त्यांचे जीवनासंबंधीचे बोधवाक्य झाले होते. भयंकर कडवटपणा, भयंकर कंजूषपणा, भयंकर रागीटपणा, आणि "लोक काय म्हणतील" याची भयंकर भीती, अशा भयंकर गोष्टींनी ते भयंकर ग्रस्त असायचे. काबाडकष्ट करून जीवन जगावे लागल्याने त्यांना सतत सन्यास घेऊन हिमालयात जावेसे वाटे. तरीही, स्वतःला हवे ते करण्याचे मानसिक सामर्थ्य नसल्याने, "खास लोकाग्रहास्तव" ते लग्न वगैरेही करून मोकळे झाले. मीराबाईंना ते सतत "मी हिमालयात निघून जाईन" अशा धमक्या देत असायचे. एकवीस वर्षे धमक्या देता देता रंजू-अंजू-मंजू अशा तीन मुली आणि संजू नावाचा एक मुलगा झाला तरी त्यांच्या धमक्या थांबल्या नव्हत्या. मुलगा झाल्यावर आणखी अपत्ये जन्माला येणे मात्र चमत्कारिकरित्या थांबले. 
जयंतरावांच्या कडवटपणाचा, कंजूषपणाचा, आणि रागीटपणाचा त्रास फक्त त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या लोकांनाच सहन करावा लागे. दर महिन्याला जयंतराव देत असलेल्या तीनशे रुपयांत घर चालवताना बिचार्‍या मीराबाईंचा जीव मेटाकुटीला येई. स्वतः शिकवण्या करून त्यांना जास्तीचा पैसा उभा करावा लागे. सहा माणसांचे दोन वेळचे स्वयंपाक-पाणी, धुणी-भांडी, घराची साफसफाई व त्यानंतर शिकवण्या घेणे, यामुळे मीराबाई अत्यंतिक व्यग्र असत. अगदीच असह्य झाले की त्यांचे व जयंतरावांचे कडाक्याचे भांडण होई आणि "मी हिमालयात निघून जाईन" या धमकीनंतर मीराबाईंच्या असहाय्य अश्रुपातात सहसा ते संपे. मीराबाईंच्या परिस्थितीत गेली एकवीस वर्षे फरक पडला नव्हता आणि पुढची अठ्ठावीस युगे काही फरक पडण्याची शक्यताही नव्हती. 
जयंतरावांचे बालपण ब्राह्मणी प्रभावाखाली गेल्याने त्यांचे धार्मिक आचरण ब्राह्मणांच्या वरताण होते. गळ्यात जानवे घालणे आणि रोज सोवळ्यात पूजाअर्चा करणे हा त्यांचा नित्यनेम होता. जयंतरावांची बुद्धिमत्ता आणि वाचनही अफाट होते. रोज इंग्रजी पेपर इत्यंभूत वाचल्याने त्यांना जागतिक प्रवाहांची बरीच माहिती होती. इंग्रजीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्याशिवाय इतर अवांतर वाचनही भरपूर असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर विद्वत्तेचे तेज दिसायचे. विद्वान ब्राह्मण म्हणून ते कोणत्याही रमण्यात खपून गेले असते. व्यावहारिक आयुष्यात मात्र स्वतःच्या मुलींना डॉक्टरकीचं शिक्षण देणार्‍या ब्राह्मण परिचितांपेक्षा, "मुलींना शिकवून काय कलेक्टर करायचंय का?" असे म्हणणार्‍या बहुजन मित्राचा प्रभाव त्यांच्यावर जास्त होता. "मुलगी हे परक्याचे धन असते, मुलींची लग्ने लवकरात लवकर लावून त्यांना वाटेला लावले पाहिजे" अशी सामूहिक धारणा त्यांच्या डोक्यातून पुसून टाकू शकेल, असे पुस्तक या जगात निर्माण होऊ शकले नव्हते. उलट, एका मागोमाग एक अशा तीन मुली झाल्यावर त्यांच्या लग्नाच्या खर्चाची सोय करावी लागणार म्हणून जयंतरावांचा कंजूषपणा भौमितिक भाजणीने वाढत गेला होता. पुस्तकांत वाचलेले पुरोगामी विचार आपण व्यावहारिक आयुष्यात आचरणात आणायला हवे असा पापी विचार जयंतरावांच्या शुद्ध कर्मठ मनाला कधीही शिवला नाही. अर्थातच, मुली खपवण्याचा विचार हा तसा सार्वत्रिकच होता. तीन-चार-पाच मुली आणि मग धाकटा मुलगा हे चित्र घरोघरी होते. खुद्द मीराबाईंचे वडील शाळामास्तर होते. त्यांची तीन मुलग्यांबरोबरची ही एकुलती एक मुलगी होती. तरीही त्यांनी मुलीच्या भविष्यापेक्षा "आज कोरड्या भेळीसोबत गोडीशेव खावी की बालुशाही?" या समस्येचा विचार आयुष्यात सगळ्यात जास्त केला असेल. "जयतंरावांना सरकारी नोकरी आहे" हे एकमेव कारण मीराबाईंची धोंड जयंतरावांच्या गळ्यात बांधण्यासाठी पुरेसे होते. घरोघरी मातीच्याच चुली. ठराविक वयाच्या वर मुलगी अविवाहित आणि बापाच्या घरीच राहिली, तर नक्कीच पोटुशी राहणार आणि मग सगळा समाज मोर्चा काढून आपल्या तोंडात शेण घालायला घरी येणार या भीतीने मुलींचे बाप चळाचळा कापत. दिसेल त्या कसायाकडे गाय सोपवणे समाजमान्य होते; पण त्यामुळे कमीतकमी इतर घरांमध्ये मुलींना शिकण्याचा ताण तरी नव्हता. बर्‍याच घरांमध्ये नापासगड्ड्या मुली लग्न व्हायची वाट पाहात सुखेनैव नट्टापट्टा करून, कोणत्यातरी फिल्मी नायिकेची नक्कल करून मुलांना आकर्षित करण्याच्या उद्योगात मग्न होत्या. जयंतरावांच्या घरात मात्र, "साधे राहायचे, नट्टापट्टा करायचा नाही, अभ्यास करून पहिला नंबर आणायचा" वगैरे बराच ताप मुलींना होता. 
थोरली रंजू अंगापिंडाने थोराड होती. पहिले मूल म्हणून झालेले थोडेफार लाड तिच्या अंगोपांगी दिसत असत. रंजूचे स्वतःवर अपरंपार प्रेम होते. स्वतःला तोशीस पडू नये म्हणून ती सदासर्वकाळ जागरुक असायची. त्यामुळे अगदी आपल्या भावंडांसाठीही राबणे तिला मंजूर नसे. धाकट्या अंजू-मंजूंपैकी एकीला हाताशी धरून दुसरीशी कामावरून भांडणे करणे, यात तिचा फावला वेळ चांगला जात असे. चौदा-पंधरा वर्षांची झाली नाही तोच ती उफाड्याची दिसू लागली होती. "तिला जरा कमी खायला घालत जा" अशा सूचना जयंतरावांनी मीराबाईंना केल्या; पण एकदा वाढलेले अंग कमी कसे करणार? ती सतरा-अठराची होते न होते तोच, "मुलगी बघायला येऊ का?" असे लोक विचारू लागले.
रंजू दिसायला देखणी होती, रंगाने उजळ होती; त्यामुळे सर्वांनाच ती आवडत असे. ही एरवी जमेची बाजू असली, तरी रंजूच्या बाबतीत तो एक मोठा प्रॉब्लेमच होता. "आपल्या जातीबाहेरचा मुलगा करायचा नाही" हा नियम तोडण्याची बिशाद जयंतरावांची होणे शक्य नव्हते आणि जातीतल्या जातीत रंजूला साजेसा मुलगा मिळणे अजिबातच सोपे नव्हते. तिला पाहायला यायच्या आधीच ही मुलगी आपल्या आवाक्याबाहेरची आहे हे काही समजदार मुलांना कळत असे. ज्यांना ते कळत नसे ते तिला पाहायला येत; आणि त्यांचे काळे-सावळे, रापलेले चेहरे रंजूच्या पसंतीस येत नाहीत हे तिच्या चेहर्‍यावर उमटलेले पाहून परत जात. एकदा तर पाहायला आलेला एक टक्कल पडलेला दुर्दैवी मुलगा घराबाहेर पडताच रंजूने, "ह्याच्याशी लग्न करण्याऐवजी जीव देईन" अशी बाणेदार धमकीही जयंतराव आणि मीराबाईंना दिली. त्याच दरम्यान, "रंजूला तारुण्यसुलभ भावना आहेत, तिच्या कॉलेजमधला एक परजातीतला तरूण शिक्षक तिला कॉलेजमधून गल्लीच्या कोपर्‍यापर्यंत सोडायला येतो, आणि दोघे चोरून एकदा चित्रपट पाहायलाही गेले होते" या महाभयंकर कुवार्ता मीराबाईंच्या मनावर आदळल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर धोकादर्शक लाल काजवे चमकू लागले आणि डोक्यात धोकासूचक भोंगे ठणाणा वाजू लागले. ताबडतोब त्या दिवसापासून रंजूचे कॉलेज बंद करण्यात आले, तिच्याभोवती चौक्या बसल्या, व योग्य त्याच माणसाशी विवाह व्हावा म्हणून तिला रोज "रुक्मिणी स्वयंवर" वाचण्याचा आदेश देण्यात आला. रंजूनेही फारशी खळखळ न करता रुक्मिणी स्वयंवराची पारायणे करायला सुरुवात केली. "रुक्मिणी आपल्या प्रियकराला, म्हणजे कृष्णाला, संदेश पाठवून तिचे स्वतःचे अपहरण करायला सांगते" हे त्यात मुख्य कथासूत्र आहे. ते समजून, त्यातून काही संदेश घेण्याइतके त्या वाचनात मन न लावण्याची खबरदारी तिने स्वतःहून घेतली. तिच्या शिक्षक प्रियकरालाही फार काही कृष्ण वगैरे होण्याइतपत रस नसावा, किंवा स्वतःच्या बापाच्या भीतीने त्याने तो रस गिळला असावा. कोणत्याच बाजूने काहीच प्रयत्न, तडफड, फडफड, रडरड न होता वातावरण शांत झाले. चार-पाच महिन्यांनी, "त्या शिक्षकाच्या आईबापांनी त्याचे लग्न लावून दिले" अशी खबर कानी आल्यावर रंजूचे कॉलेजला जाणे पुन्हा एकदा सुरु झाले.
या सगळ्या प्रकारात तीन-चार वर्षे उलटली. तिकडे रंजूने विशी ओलांडली व इकडे जयंतरावांचे प्राण कंठाची मर्यादा ओलांडायला आले. न पाहिलेल्या स्वजातीय उपवर मुलांची संख्याही कमी कमी व्हायला लागली होती. कुठूनच काही मार्ग निघत नव्हता. अशा परिस्थितीतच मीराबाईंचे वडील काही कामानिमित्त पुण्याजवळच्या एका गावात गेले असता त्यांना एक स्थळ सापडले. सखुबाई आणि बगूनाना यांच्या हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या मुलाच्या, मुकुंदाच्या, बोलण्याने (आणि पेशानेही) ते फारच प्रभावित झाले आणि आपली नात त्या घरात जावी अशी इच्छा त्यांना झाली. (ज्यांच्या नात्यात तरुण अविवाहित स्त्रिया आहेत अशा वयस्कर पुरुषांना त्या काळात सतत अशी इच्छा व्हायची.) सखुबाई आणि बगूनानांसमोर त्यांनी रंजूचे यथाशक्ति मार्केटिंग केले. त्याचा परिणाम आश्चर्यकारकरित्या लगेचच अनुकूल झाला. सखुबाई, बगूनाना, त्यांचे दोन्ही मुलगे, आणि त्यांच्या भावकीतले काही लोक अशी मंडळी मुलगी बघायला आली. आली, ते लग्न ठरवायच्या तयारीनेच! इतक्या लोकांना बसण्यासाठी जयंतरावांचे खुराड्यासारखे घर पुरेसे नव्हते; म्हणून मीराबाईंच्या मोठ्या भावाच्या घरी, म्हणजे नारायणरावांकडे बैठक घेण्याचे ठरले. स्वतःच्या दरिद्री स्वभावामुळे असे छोट्या-मोठ्या कामासाठी दुसर्‍याच्या दारात जाणे, व त्याबदल्यात त्यांना आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करु देणे यात जयंतरावांना काहीच वावगे वाटत नसे. पैसे वाचवण्यासाठी त्यांना सगळे मंजूर होते. नारायणराव हे जाड-जाड भुवया असलेले, अहंमन्य आणि सुमार बुद्धीचे भांडखोर व्यक्तिमत्त्व होते. सरकारी खात्यातल्या परीक्षेत बर्‍याचवेळा गटांगळ्या खाऊन अखेर एकदाची ती पास करून ते अधिकारी बनले होते. त्यांची अर्धशिक्षित बायको सुमन गोरीपान होती आणि तिचे डोळे काळेभोर व टपोरे होते. नारायणराव सुमनच्या आकंठ प्रेमात होते. त्यांना दिनकर व सागर नावाचे दोन भाऊ होते. सुमनच्या प्रेमापोटी नारायणराव दिनकर व त्याच्या पत्नीशी सारखे भांडत असत. सागरची पत्नी मात्र सुमनची बहिणच असल्याने ती नारायणरावांच्या रोषापासून मुक्त होती. नारायणराव व सुमनचे पुत्ररत्न म्हणजे रणधीर खरोखरच रत्न होते. अंजूपेक्षा एका वर्षाने मोठा असूनही दोनदा नापास झाल्याने रणधीर आता अंजूच्या मागच्या यत्तेत होता. रणधीर आणि त्याचा समवयीन आणि समानशील मावसभाऊ विजय या दोघांचे मेतकूट होते. दोघेही सारखेच उडाणटप्पू व नापासगड्डे होते. परीक्षेत कॉपी करणे, शाळा बुडवून हॉटेलात, थिएटरमध्ये, किंवा इतरत्र जाऊन वेळ व पैसे खर्च करणे, प्रसंगी जुगार खेळणे व त्यासाठी घरात किंवा इतरत्र चोर्‍यामार्‍या करणे, यासाठी ही दुक्कल नातेवाईकांमध्ये कुप्रसिद्ध झाली होती. नारायणराव कधीमधी लहर आली की किंवा रणधीरच्या शाळेतून आलेल्या "प्रगतीपुस्तकावर" सही करायची वेळ आली की रणधीरला पट्ट्याने फोडून काढत; पण त्याने रणधीर आणखी कोडगा होण्याशिवाय काही साध्य होत नसे. 
बैठकीला येताना मुलाचे आईवडील, म्हणजे सखूबाई आणि बगूनाना, नऊवारी साडी आणि धोतर-कोट-टोपी या प्रचलित वेशातच आले होते. ठसठशीत मोठे रुपयाएवढे गोल कुंकू लावलेली सखूबाई मोठ्या आवाजात, भरपूर, आणि ठाम आत्मविश्वासाने बोलत होती. बगूनाना तिच्यापुढे तसे शांत वाटत होते. मुकुंदाने चुरगळलेला सुती शर्ट आणि सुरकुतलेला पायजमा घातला होता. त्याने देवानंदसारखा केसांचा कोंबडा केलेला होता, आणि त्याच्या चेहर्‍यावरच्या दाढीच्या खुंटांमधून स्वतःबद्दलचा प्रचंड आदर ओसंडून वाहत होता. मुकुंदा नाकीडोळी नीटस होता, रंगाने गव्हाळ आणि अंगापिंडानेही सुदृढ होता; पण मुलगी पाहण्यासाठी जाताना सर्वसाधारण मुलगे जसे ठेवणीतले कपडे घालतात, तसे त्याने घातले नव्हते. दाढी करण्याचीही तसदी घेतली नव्हती. सखूबाईंप्रमाणेच मुकुंदा मोठ्या आवाजात ठामपणे बोलणारा होता. बोलण्यातूनही त्याचा स्वतःबद्दलचा प्रगाढ आदर दिसून येत असे. बैठक तशी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. वरपक्षाने रोख रक्कम हुंड्यात मागितली नाही; त्यामुळे वराला सोन्याची साखळी, अंगठी, मुलीला दागिने, घरात लागणारी भांडीकुंडी, गादी वगैरे सामान आणि लग्नाचा सगळा खर्च या अटींवर लग्न ठरले. त्याला कोणी हुंडा म्हणत नसत. मुहूर्त पाहून सात महिन्यांनी येणार्‍या मे महिन्यात लग्न करण्याचे ठरले. साखरपुडा मात्र लगेचच दुसर्‍यादिवशीच करायचे ठरले. घराजवळच एक मारवाडी लोकांच्या मालकीचे देवीचे मंदिर होते. मीराबाई आणि मुलींनी भराभरा कामे करून साखरपुड्याची तयारी केली आणि दुसर्‍याच दिवशी त्या मंदिरात चाळीस-पन्नास लोकांच्या साक्षीने साखरपुडा संपन्नही झाला. रंजूला मुलगा पसंत आहे की नाही हे विचारले गेले असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकले नसते इतकेच.
लग्न ठरल्यानंतर लग्नाची तयारी सुरु झाली. रुखवतात भांडी-कुंडी, लोखंडी कॉट-गादी वगैरेंच्या बरोबरीने ठेवण्यासाठी वाळवणं करण्याच्या कामाला मीराबाई लागल्या. त्यात पायली-पायलीचे डाळीचे वडे, कुर्डया, उडदाचे पापड, साबुदाण्याच्या पापड्या वगैरे प्रकार तर होतेच; पण नवविवाहित दांपत्याला शेवया देणे महत्त्वाचे असते असा समज असल्याने घरीच शेवयाही करणे आले. केटरर्स नसल्याने पोते-पोतेभर डाळ-तांदूळ व गहू आणून ते धान्य घरीच निवडून ठेवणे, गहू गिरणीतून दळून आणणे, मसाल्याचे पदार्थ व मिरच्या आणून भाजून, कांडून मसाला व तिखटाची पावडर करून आणणे, अशी पिट्टा पडतील अशी कामे होतीच. गल्लीतल्या शेजारणी व ओळखीपाळखीच्या बाया या कामात मदत करायला सवड मिळतील तशा येऊ लागल्या. घरातले रोजचे काम करून वर हे सगळे काम करण्यात मीराबाई व मुली अत्यंत व्यग्र झाल्या. जयंतरावही पैसे खर्च होताना पाहून रोजरोज चीडचीड करून उठसूट घरातल्यांवर करवादू लागले. रुखवतात इतर वस्तूंबरोबर शोभेच्या वस्तू ठेवायची पद्धत असे. अशा शोभेच्या वस्तू घरीच तयार करायच्या कामाला अंजू-मंजू लागल्या. एकीकडे रंजूला चिडवण्यासाठी "सांगा मुकुंद कोणी हा पाहिला" किंवा "ऊठ मुकुंदा, ऊठ श्रीधरा" वगैरे गाणी म्हणत काजूचे काप आणि उडदडाळ कापडावर चिकटवून केलेली सप्तपदी, लाईफबॉय साबणाचा छोटासा गॅस सिलिंडर व हमाम साबणाची शेगडी, भरतकाम केलेली बेडशीट, लिमलेटच्या गोळ्यांचा छोटासा बंगला, वगैरे सुबक वस्तू त्यांनी बनवल्या. रंजूला मुकुंदाचं नाव घेऊन चिडवले जात असले तरी प्रत्यक्षात मुकुंदाने तिच्याशी संपर्कही साधला नव्हता. एकमेकांना पत्र लिहिणे, भेटणे, फिरायला जाणे, रेस्टॉरंटमध्ये बसून गप्पा मारणे वगैरे लग्नाआधीचा सुंदर रोमँटिक काळ काही रंजूसाठी उजाडत नव्हता. अर्थात असे काही असते हेच तिला माहित नसल्याने त्याबद्दल वाईट वाटणे किंवा संशय येणे असे काही झाले नाही. जयंतराव आणि मीराबाईंसाठी मुलीचे लग्न होतेय हेच एकमेव महत्त्वाचे सत्य असल्याने मुलगा मुलीला पत्र का लिहीत नाही किंवा भेटायला का उत्सुक नाही, पुढे त्या दोघांचे नीट जमेल का, आपली मुलगी सुखी होईल का वगैरे प्रश्न पडायच्या मनस्थितीत ते नव्हते. कपडे खरेदी, बस्ता बांधणे वगैरे कार्यक्रमांमध्ये सामील असलेल्या मामा-मामी व इतर मंडळींना तर त्यात काही रस असण्याचे कारण नव्हते. "माझ्याकडे हा रंग आहे. मला ही साडी नको, ती हवी" वगैरे गोष्टींवरून भांडणे करून जयंतराव आणि मीराबाईंना आणखी त्रस्त करण्यात ते मग्न होते. सोयीस्करपणे घरची आणि सोयीस्करपणे बाहेरची अशी ती मंडळी होती. लग्न ठरलेल्या नात्यातल्या मुला-मुलींना गंडगनेर करणे, त्या निमित्ताने एकत्र येऊन मेजवान्या झोडणे आणि मुला-मुलीच्या सासरच्यांबद्दल कुचाळक्या करणे हाच त्यांच्यासाठी लग्नातला महत्त्वाचा भाग होता. रंजूची मनस्थिती काय होती आणि तिची भावी आयुष्याबद्दलची अपेक्षा किंवा स्वप्ने काय होती हे कोणी तिला विचारले नाही आणि तिनेही कोणाला सांगितली नाहीत.
लग्नाला दोन-तीन महिने राहिलेले असताना एक दिवस मुलाच्या दूरच्या नात्यातला एक भाऊबंद जयंतरावांना भेटायला आला. मुकुंदाच्या चुलत चुलत्यांचा तो मुलगा होता. घरी येऊन इकडच्या-तिकडच्या गप्पा करत चहा घेऊन झाल्यावर निघताना तो जयंतरावांना बाहेर घेऊन गेला. बाहेर आल्यावर "मुकुंदाबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी असे मला वाटते.", अशी प्रस्तावना करून त्याने बोलायला सुरुवात केली. गावातल्या एका ब्राह्मण मुलीशी मुकुंदाचे प्रेम-प्रकरण होते, तो दुसर्‍या एका गावी नोकरी करत असताना ती मुलगी तिकडे जाऊन त्याच्याबरोबर काही दिवस राहात होती, त्यांना लग्न करायचे होते, आणि तिच्या घरून विरोध होईल म्हणून पळून जाऊन लग्न करणार होते; पण ऐनवेळी ती मुलगी आलीच नाही. नंतर तिचे लग्न दुसर्‍याच एका मुलाशी झाले. मुकुंदाचा प्रेमभंग झाला, तरी तो अजूनही त्या मुलीच्या प्रेमात आहे. हे लग्न केवळ त्याच्या आई-वडिलांनी दबाव आणला म्हणून तो करतोय इत्यादि स्फोटक गोष्टी तो बोलत होता. जयंतरावांनी एकही शब्द न बोलता ते ऐकून घेतले. "हे नक्की काय प्रकरण आहे? आता या मुलाबद्दल चौकशी करावी का? आणि हे खरं निघाले तर लग्न मोडायचे का? मग लोक काय म्हणतील? मग रंजूचे आणि इतर मुलींचे लग्न कसे होणार? काय साली कटकट आहे!" हे व तत्सम विचार त्यांच्या डोक्यात चालू असावेत बहुतेक. सगळं सांगून पाहुणा कर्तव्यपूर्तीच्या समाधानात निघून गेला. जयंतरावांनी मीराबाईंना लवकरच ते सगळे एकांतात सांगितले. दोघांनी गंभीर चेहर्‍याने बर्‍याच वेळ चर्चा केली. शेवटी, "अशा उपटसुंभावर कसा विश्वास ठेवायचा? दुसर्‍याचे चांगले झालेले पाहवत नसलेले अनेक भाऊबंद असतात ते अशा खोट्या-नाट्या गोष्टी सांगून मोडता घालायचा प्रयत्न करतात. अशी काही भानगड असती तर किती गवगवा झाला असता. शिवाय झाले असेल तसे तरी तो भूतकाळ झाला. आता आपण भविष्याकडे पाहून रंजूच्या भल्यासाठी हे लग्न मोडता कामा नये" अशा निष्कर्षाला ते पोचले.

   * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *                                                                    

       सकाळी वर्‍हाडी मंडळी उठायच्या आधीच जयंतराव-मीराबाई व कुटुंबीय जागे झाले. मुलीकडच्यांनी पटापट आवरून घेतले आणि सगळे कामाला लागले. वर्‍हाडी मंडळींच्या आंघोळी-पांघोळींची, चहा-नाष्ट्याची तयारी, मग लग्न समारंभाची तयारी, येणार्‍या लोकांचे आगत-स्वागत, लग्नापूर्वीचे आणि लागल्यानंतरचे धार्मिक विधी, लोकांचे मानपान, आणि मग जेवणावळी असा कामांचा डोंगर होता. वर्‍हाडी मंडळी जागी झाली तशी जयंतराव, त्यांच्या भावंडांची कुटुंबे, मीराबाई, त्यांच्या भावडांची कुटुंबे आणि अंजू-मंजू-संजू या सगळ्यांची पळापळ सुरु झाली. मुलाकडच्यांच्या आवराआवरीत येणार्‍या अडचणी, त्यांच्या मागण्या, भटजींच्या धार्मिक कर्मकांडासाठीच्या मागण्या, आचारी मंडळींच्या मागण्या हे सगळे पुरवता पुरवता मुलीकडच्यांची फे-फे उडायला लागली. व्यावसायिक कंत्राटाची पद्धत नसल्याने सगळी कामे स्वतः करायची आहेत हे माहित असूनही, त्याचे व्यवस्थित नियोजन करून कोणत्या वेळी कोणता कार्यक्रम होणार, त्यासाठी कोणत्या वस्तू लागतील, त्या आणण्याची जबाबदारी कोणा-कोणाची वगैरे विचार करण्याइतकी उसंत आणि कुवत मुलीकडच्या सगळ्या लोकांना मिळून जमा करता आली नव्हती. त्यातल्या त्यात मीराबाई व मुलींनीच बर्‍याच गोष्टींचा विचार करून त्यासाठीची तयारी करून ठेवली असल्याने सगळ्या वस्तू हजर करण्याची जबाबदारी आपोआप त्यांच्यावरच येऊन पडत होती. सारखं कोणी ना कोणी येऊन मीराबाईंकडे काहीतरी मागत होते आणि कधी मागितलेली वस्तू कार्यालयात आणलेली असे, कधी घरीच राहिलेली असे, तर कधी दुकानात जाऊन विकत आणावी लागे. स्टेजवर भटजींच्या दुकलीचे पूजा-होम वगैरे मांडायचे काम सुरु होते आणि मीराबाई त्यांच्या धार्मिक स्वभावानुसार जातीने त्यांना हवे-नको ते पाहात होत्या. अंजू-मंजू लग्नाच्या हातघाईत दिसेनाशा झाल्या होत्या. पूजेसाठी लागणरे धान्य-सुपार्‍या-फळे- वगैरेंपैकी काहीतरी भटजींना सापडले नाही म्हणून घरून आणायला मीराबाईंनी अंजू-मंजूला गर्दीत शोधायचा प्रयत्न केला; पण त्या त्यांना दिसल्या नाहीत. समोरून चाललेल्या रणधीरला त्यांनी हाक मारून अंजूला शोधून तिला घरी जाऊन ते आणायला सांग असे सांगितले. रणधीर अंजूला शोधत गेला तेव्हा ती रंजूला तयार होण्यात मदत करण्यात व्यग्र होती. रणधीरने तिच्या आईचा निरोप तिला सांगितला तेव्हा तिला कळेना की रंजूला असे मध्येच सोडून कसे जायचे, म्हणून तिने घराची किल्ली काढून रणधीरला दिली आणि त्यालाच घरी जाऊन काय हवे ते आणायला सांगितले. 
यथावकाश एकीकडे वर्‍हाडी मंडळींच्या आंघोळी-पांघोळी व चहा-न्याहारी उरकले, रंजूचे आवरून झाले, भटजींची तयारी पूर्ण झाली, नवरा-नवरी, त्यांचे आईवडील व बाकीची आवश्यक ती मंडळी पूजाविधी करायला लागली, हळू-हळू इतर पाहुणेमंडळी जमा होऊ लागली. म्हणता म्हणता पाचशे-हजार लोकांनी कार्यालय भरून गेले. स्टेजवर कोणा-कोणाचे पाय धुणे, कोणी कोणाला काहीबाही देणे वगैरे प्रकार झाले, आलेल्या लोकांना अक्षता वगैरे वाटल्या गेल्या, आणि अखेर आंतरपाट धरून भटांची दुक्कल उभी राहिली. एका बाजूला मान खाली घालून रंजू आणि तिचे कुटुंबीय उभे होते आणि दुसरीकडे स्थितप्रज्ञ चेहर्‍याचा मुकुंदा आणि त्याचे कुटुंबीय उभे होते. भटजींनी भरपूर आळवून आळवून मंगलाष्टके म्हटली आणि लोकांनी बरोबर समेवर हातातले तांदूळ वधू-वराच्या दिशेने फेकण्याचे कर्तव्य पार पाडले. शेवटी एकदाचे "वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम्।" झाले, बाहेर सनई-नगारावाले दोनजण बोलवले होते, त्यांनी वाजवायला सुरुवात केली, लोकांनी टाळ्या वाजवल्या. वधू-वराला आहेर द्यायला स्टेजच्या बाजूने रांग लागली. तेवढ्या वेळात मुलीकडच्या तरूण मंडळींनी जमिनीवर सतरंजीच्या पट्ट्या टाकून जेवणाच्या पंगती बसवण्याची तयारी सुरु केली. काका-मामा व इतर मंडळींनी वाढपी म्हणून काम करायला बाह्या सरसावल्या. आहेर देऊन लोक स्टेजवर उतरून जेवायला येऊन बसू लागली. बसलेल्या लोकांसमोर क्रमाक्रमाने पत्रावळी, द्रोण, मीठ, भात, वरण, पुरी, बटाट्याची भाजी, आणि बुंदी येऊ लागली. बरेचसे लोक जेऊन निघून गेल्यावर मग कार्यालयात किंचितसा निवांतपणा आला. मीराबाई-जयंतरावांचे ताणलेले चेहरे किंचितसे सैलावले. मीराबाई चक्क अधूनमधून हसू लागल्या. शेवटची पंगत बसली. मुकुंदा-रंजू शेजारी-शेजारी जेवायला बसले; परंतु एकमेकांशी एकही शब्द अजूनही बोलले नव्हते. लोकाग्रहास्तव नाव घेणे वगैरे, घास भरवणे वगैरे प्र्कार झाले. रंजू स्त्रीसुलभ लज्जेमुळे अवघडून जेवत होती. मुकुंदाला बहुतेक भूक लागली असावी, तो रंजूकडे किंवा इतरत्र लक्ष न देता शांतपणे जेवत होता. पोटात अन्न गेल्याने आता सखूबाई पुन्हा एकदा खुलल्या. उखाण्यांचा त्यांच्याकडे भरपूर साठा होता. जेवणं होऊन मुलीकडची मंडळी आवरा-आवरीला लागल्यावरही त्यांनी अनेकानेक उखाणे घेऊन वर्‍हाडी मंडळींमध्ये चांगलीच खसखस पिकवली. सगळी आवरा-आवर झाल्यावर आणि रुखवतातले सगळे डाग वर्‍हाडी मंडळींच्या ट्रकमध्ये नेऊन ठेवल्यावर समारोपाची वेळ आली. मीराबाई-रंजू-अंजू-मंजूंच्या डोळ्यांमधून लगेचच धारा वाहायला लागल्या. नाही नाही म्हणाले तरी जयंतरावांचेही डोळे पाणावलेच. आज्या-माम्या-मावशा-काकवासुद्धा डोळ्याला पदर लावायला लागल्या. रंजूने एकेकीला मिठी मारून, हमसून हमसून रडत निरोप घेतला. जड पावलांनी रंजू ट्रकच्या कॅबिनमध्ये मुकुंदाशेजारी बसली. बाकी वर्‍हाडी मंडळी ट्रकच्या मागे चढली. ट्रक धुरळा उडवत निघून गेला. आत्यंतिक श्रमाने आणि रडून चेहरे मलूल झालेल्या मीराबाई व मुलींनी घरी जाण्याची तयारी सुरु केली. आजी-आजोबा व मामा मंडळी जवळच असलेल्या नारायण मामाच्या घरी गेले आणि जयंतराव-मीराबाई त्यांच्या मुलांसह घरी परतले. लग्न कसे झाले, काय घडले वगैरेबद्दल बोलण्याचेही त्राण न उरलेली सगळी मुक्याने  घरी आली. आल्यावर लगेचच अंथरुणे घातली गेली आणि सगळ्यांनी शीणलेली अंगे त्यावर टाकून दिली. मध्यरात्री कधीतरी रंजूचा ट्रक सासरी पोचला. प्रवासात मुकुंदा तिच्याशी एकही शब्द बोलला नाही. जयंतरावांची आई पाठराखीण म्हणून तिच्याबरोबर गेली होती. घर 
दीडखणाचे अगदीच छोटे होते. अनोळखी ठिकाणी अनोळखी लोकांच्या गराड्यामध्ये आजीच्या कुशीत सुरक्षितता शोधत रंजूही झोपून गेली. 
सासरच्या पहिल्याच सकाळी रंजू थोडी हालचालीची चाहूल लागताच धडपडून उठली. त्याच दिवशी सत्यनारायण ठेवला होता त्याची तयारी करावी लागणार होती. उठल्यावर तोंड धुवून आल्याआल्या सासूने तिला चहा करायला सांगितले. तिने पटकन सासूला चहा करून दिला. भिंतीला टेकून, अंथरुणावर बसून चहा पिणार्‍या सासूची प्रतिक्रिया निरखत ती शिवणमशीनीला टेकून उभी राहिली. सखुबाई काहीही प्रतिक्रिया न देता शांतपणे चहा पीत राहिल्या. काय करावे ते न कळून रंजू उगाच इकडे-तिकडे पाहू लागली. भिंतीत ठोकलेल्या फळकुटावरच्या पुस्तकावर तिला तिचाच फोटो दिसला. बहुतेक तिच्या वडिलांनी तो पाठवला असणार. असा उघड्यावर नको म्हणून तो तिने उचलला आणि तिच्या पिशवीत ठेवायला ती गेली. फोटो ठेवताना फोटोच्या मागे काहीतरी लिहिले आहे असे तिच्या लक्षात आले. "ओस पडलेले कोसच्या कोस तुला चालावे लागतील, कुठून आणशील हे सामर्थ्य?" असे वाक्य त्यावर कोणीतरी लिहीले होते. मुकुंदा उठला की त्याला त्याबद्दल विचारायचे तिने ठरवले.
सकाळी सवयीने मीराबाई सकाळीच पाणी भरायला उठल्या. मोरीत तोंड धुवून चहा टाकायला स्टोव्ह पेटवण्यापूर्वी शेल्फमधल्या देव्हार्‍यापुढे त्यांनी हात जोडले. मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी देवाचे मनापासून आभार मानले. डोळे भरून गणेशाच्या मूर्तीकडे बघताना देवघरात ठेवलेली दहा-दहा रुपयांची चांदीची दोन नाणी गायब आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अंजूला हाक मारून उठवले  आणि "तू दार उघडं सोडून तर नव्हती गेलीस ना? तुझ्या आणि मंजूशिवाय आणखी कोणी आलं होतं का?" वगैरे प्रश्नांची सरबत्तीच केली. झोपाळलेल्या अंजूने डोळे किलकिले करून सकाळी रंजूला मदत करत होते म्हणून रणधीरला घरी पाठवल्याचे सांगितले आणि ती परत झोपी गेली. मीराबाई पुन्हा देव्हार्‍यासमोर आल्या आणि कडवट चेहरा करून नाण्यांच्या रिकाम्या जागेकडे टक लावून पाहात उभ्या राहिल्या.   

Wednesday, June 19, 2019

कृतकृत्य

मनोऱ्याच्या आजूबाजूच्या प्रशस्त आवारात ऐन वसंतात फुललेली फुलं आणि तारुण्याचा उत्सव पाहात विनायकराव आणि सिद्धीकाकू बाकावर बसले होते. मे महिन्यात मायदेशी उन्हाने तलखी व्हायला लागते; पण इथे मात्र अगदी आल्हाददायक वाटत होतं. हवेत गारवा होताच; म्हणून दोघांनीही स्वेटर्स वगैरे घातली होती. सकाळपासून मनोरा व मनोऱ्याच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यात बरीच पायपीट झाली होती म्हणून दोघेही जरा बाकावर विसावले होते. इतकं चालायची सवय नसल्याने हवा आल्हाददायक असूनही जरा दमल्यासारखंच झालं होतं. भवताली मात्र वसंत ऋतूने बहार आणलेली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरची असंख्यरंगी फुलं, झाडाझुडपांची चमकती हिरवी पाने, रस्त्याच्या कडेला असणारी सुंदर कॅफेज, चकाकत्या काचेची दुकाने आणि त्या कॅफेंमधून, दुकानांतून पदपथावर ओसंडणारी सुंदर तरूण-तरुणींची गर्दी. इकडे-तिकडे पाहून मानेला रग लागली तरी विनायकराव पाहातच होते. उंच, सडपातळ आणि दणकट दिसणारे युवक आणि त्यांना लगटून चालणाऱ्या तशाच उंच, सडपातळ, नव्या फॅशनच्या फाटक्या-तुटक्या कपड्यांमध्येही कमालीच्या आकर्षक वाटणाऱ्या युवती. विशेषत: गौरवर्णीय युवक-युवतींकडे त्यांचं जास्त लक्ष जात होतं. वर्षानुवर्षांच्या संस्कारांमुळे गौरवर्णीय स्त्री-पुरुष त्यांना अधिक आकर्षक वाटत होते. गुडघ्यांवर आणि मांडीवर फाटलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे त्यांचे गोरेपान अंग, वर घातलेले पांढरेशुभ्र किंवा धम्मकपिवळे टॉप्स, डोळ्यांवर चढवलेले काळेभोर चष्मे आणि खांद्यावर रुळणारे सोनेरी किंवा काळेभोर केस. तारुण्याला आणि सौंदर्याला नुसतं उधाण आलं होतं चहुकडे. एकमेकांना लगटून, कमरेत हात घालून, भवतालाबद्दल बेफिकीर अशी ती जोडपी तारुण्याचा सोमरस प्यायल्यासारखी धुंदपणे चालत होती. ती धुंदी कमी की काय म्हणून मध्येच थांबून, एकमेकांच्या मानेला बाहुंचा विळखा घालून एकमेकांच्या अधरांमधील मधुरसपान करत होती. ते पाहून विनायकराव उगाचच कानकोंडले होऊन नजर पटकन वळवून भलतीकडे पाहू लागत होते. त्या जोडप्यांचा त्यांना किंचित हेवा वाटला. त्यांच्या तरूणपणी चारचौघात हात धरायची सुद्धा सोय नव्हती; चुंबनं वगैरे तर दूरची गोष्ट. आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न केल; त्यामुळे कॉलेजमध्ये असताना एकत्र फिरणे वगैरे राहिलंच खरं. एकत्र फिरणारेही चोरटे स्पर्श करण्यावरच भागवत होते म्हणा!
 मध्येच त्यांनी एकदम जाग आल्यासारखं बायकोकडे पाहिलं. सिद्धीकाकूही इकडे-तिकडे पाहात होत्या. “तिच्या डोक्यात काय विचार चालू असेल?”, असा विचार येऊन उत्सुकता वाटल्याने विनायकरावांनी त्यांना विचारलं, “काय विचार करतेयस?”
“काही नाही, पाहतेय मजा.”, सिद्धीकाकू उत्तरल्या.
“किती छान वातावरण आहे ना? आणि लोक अगदी मस्त मजा करताहेत”, ते म्हणाले, “अगदी मुक्त वातावरण आहे इथे.”
“हो ना!”, इतकंच बोलून सिद्धी काकू गप्प बसल्या. विनायकरावांचा किंचित विरस झाला आणि ते परत इकडे तिकडे पाहू लागले.
तितक्यात एक उंच, सडपातळ, गौरवर्णीय तरूण जोडपं हसत-खिदळत, एकमेकांच्या कवेत सळसळत त्यांच्या शेजारच्या बाकावर येऊन बसलं. तो मुलगा काहीतरी भराभर गमतीदार बोलत असावा; कारण ती मुलगी किणकिणत हसत होती. विनायकराव मान किंचित तिरकी करून त्यांचं निरीक्षण करू लागले. हसता-हसता त्या मुलीचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन काढला आणि बोलू लागली म्हणून तो मुलगा इकडे-तिकडे पाहू लागला आणि त्याच्या लक्षात आलं की विनायकराव त्याच्याकडेच पाहताहेत. त्या मुलाने हसून मान डोलावली आणि विचारले, “हाय, हाऊ आर यू दुईंग”.  त्याचे उच्चार जरा वेगळे होते.
“आय ॲम फाईन”, विनायकराव पटकन उत्तरले, “नाईस वेदर!”
“येस, ईत्स अ नाईस सनी दे. यू आर तुरिस्त?”
“येस येस. मी ॲन्ड माय वाईफ. वुई केम फ्रॉम इंडिया”
“ओऽऽऽइंदिया, नाईस कंत्री. आय वॉन्त तू गो देर समदे.”
“धिस इज माय वाईफ, सिद्धी”
“हलो, यू केम ऑन ए हनिमून?”
“हाऽहाऽहाऽ”, विनायकराव मोठ्याने हसले, “येस यू कॅन से सेकन्ड हनिमून.”
“नाईस! हाऊ लॉंग हॅव यू बीन मॅरिद?”
“फॉर्टी यिअर्स! वुई गॉट मॅरिड व्हेन आय वॉज ट्वेन्टी फोर!”
“ओह वॉव! फॉर्ती यिअर्स! कॉन्ग्रॅच्युलेशन्स! दॅत्स अमेझिंग! यू मस्त बी इन्सेनली इन लव वित ईच अदर!”
“हूंहूंहूं...थॅंक यू!”, विनायकराव हसून म्हणाले. ते म्हणताना त्यांनी सिद्धीकाकूंच्या दिशेने पाहिले; पण नजरेस नजर देण्याचे मात्र टाळले. त्यांना उगाचच किंचित ओशाळवाणं आणि किंचित अस्वस्थ वाटलं. “इन्सेनली इन लव्ह” वगैरे त्यांना जरा भीतिदायकच वाटलं. आयुष्यात इन्सेनली काहीही केलेलं नसताना तसा आरोप झाल्यासारखे ते कावरेबावरे झाले.
तिथल्या इतर लोकांसारखंच सिद्धीकाकूंना चारचौघात जवळ घ्यावं की काय असं त्यांना वाटून गेलं. अशावेळी वागायचा काय प्रोटोकॉल असतो? काकूंना जवळ घेऊन हलकेच चुंबन वगैरे घ्यावे का? असले काही तरी प्रश्न त्यांच्या मनाला चाटून गेले. काकू मात्र कृतकृत्य समाधानाने हसत होत्या.
“वुई हॅव टू सन्स”, काकू बोलू लागल्या, “माय एल्डर सन वर्क्स हियर. वुई आर व्हिजिटिंग हीम. यंगर सन इज इन इंडिया. पुणे!”
तितक्यात त्या मुलीचं फोनवरचं बोलणं संपलं आणि त्या मुलाने त्यांच्या भाषेत तिला सांगितलं असावं कारण तिनेही तिचे निळे डोळे मोठे करून, “वॉव कॉंग्रॅच्युलेशन्स!” वगैरे म्हटलं.
“थॅंक यू”, विनायकराव पुन्हा म्हणाले.
“दिस इज माय गर्लफ्रेंद, नीना”, तो मुलगा म्हणाला.
विनायकराव आणि सिद्धीकाकूंनी माना डोलावल्या,”आर यू टू प्लॅनिंग टू गेट मॅरिड?”, विनायकरावांनी विचारलं.
“हाहाहा”, ती दोघं हसली आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, “नॉत यत, बत मे बी इन फ्युचर.”, असं तो मुलगा म्हणाला आणि मग एक अवघडलेली शांतता पसरली.
“वेल, ओके, नाईस मीतींग यू तू!”, उठायची तयारी करत तो मुलगा जरा वेळाने म्हणाला,”हॅव ए वंदरफुल ताईम हियर ॲन्द विश यू मेनी मोर यिअर्स ऑफ हॅपी मॅरेज!”. ती दोघं मग उठून परत हातांचे विळखे घालून एकमेकांना सर्वांगस्पर्श अनुभवत चालू लागली.
त्यांच्याकडे काही क्षण पाहात राहिल्यावर विनायकरावांनी सुस्कारा सोडला. सिद्धीकाकूंकडे वळून म्हणाले,”चलायचं आपणही?”
“हो बाई! चला निघू या! अनन्या येईलच थोड्या वेळात शाळेतून.”
गुडघ्यांवर हात ठेवून काकू उठल्या व चालू लागल्या. त्यांच्यापासून फूटभर अंतर ठेवून विनायकरावही त्यांच्या बरोबरीने चालू लागले. 

Saturday, November 10, 2018

सबंधन सप्रेम

आकाशात गडद काळे ढग दाटून आलेले असताना, काळ्या मातीत, वाळलेल्या पिवळ्या गवतात काळ्या-पिवळ्या मादी आणि नर किंगकोब्रांची गाठ पडते. काळी-पिवळी वीज शेतजमिनीत आळोखेपिळोखे घेत जावी तसे ते एकमेकांभोवती आवेगाने विळखे घालून झटपटायला लागतात. काळ्या ढगांतून चंदेरी तेज सरसरत जावे तशी त्यांच्या शरीरातून सुखाची चमक सरसरत जाते. घटकाभर सोसाटल्यासारखं होऊन मग पाऊस पडून जमिनीचा वाफारा निघावा तसे ते थोड्यावेळाने क्लांत होतात. मादीने आपला वंश पुढे चालवायला जोडीदार निवडलेला असतो; आणि नराची मेहनत सुफळ झालेली असते. मग ते दोघे संगतीने राहू लागतात. काही दिवस असेच जातात आणि मग अचानक, निकड न भागलेला दुसरा नर तिथे येऊन ठाकतो.
दोन तडफदार नर किंग-कोब्रा एकमेकांना आव्हान द्यायला जमिनीवरून फूटफूटभर उंच फणा काढून समोरासमोर ठाकलेले. असं वाटतं की आता त्वेषाने एकमेकांवर फुत्कारतील, विषारी दंश करतील एकमेकांना; पण घडतं भलतंच. यत्किंचितही तोंड न उघडता अतिशय डौलदार नृत्य केल्याप्रमाणे ते डोलायला लागतात. एकमेकांच्या डोक्यावर अलगद स्पर्श करायला चढाओढ करतात. बराच वेळ असा खेळ चालतो. कोणी कितीवेळा दुसर्‍याच्या डोक्याला स्पर्श केला ह्याची गणती कशी ठेवतात कोण जाणे; पण नव्या नराची निकड पहिल्या नराच्या बचावाला भारी पडते. पहिला नर निमूट हार मानून निघून जातो. नवा नर त्याला दातही लावत नाही. किती हा उमदेपणा!
नवा नर मग मादीशी जवळीक करु लागतो. तिला ते मान्य असतं का ते कळायला मार्ग नाही; पण दोन्ही नरांनी आपसांत निकाल लावलेला असतो. नवा नर थोडंसं मादीच्या मागे-पुढे करतो, सलगी करायला बघतो आणि कसं कोण जाणे; पण तिला स्पर्श करताना त्याला कळतं की तिच्या उदरात पहिल्या नराचा अंश आहे. दुधात मिठाचा खडा पडावा तसा तो इतकावेळ राजस, उमदा वाटणारा नर क्षणार्धात हिंस्त्र होतो आणि मादीच्या नरडीचा घोट घेतो. ती तडफडते, झटपटते, जीव आणि वंश वाचवायला आकांताने प्रयत्न करते; पण नराच्या पकडीसमोर तिचं काहीही चालत नाही. तिचा जीव पूर्णपणे गेला आहे ह्याची खात्री होईपर्यंत नर तिला सोडत नाही; आणि जीव गेल्याची खात्री झाल्यावर निर्विकारपणे तिचं मृत शरीर ओलांडून सरसरत निघून जातो.

डॉक्युमेंटरी संपली तरी सिद्धार्थ तसाच बसून राहिला त्या प्रसंगाचा विचार करत. त्यातलं क्रौर्य त्याला प्रचंड अस्वस्थ करून गेलं. "पण त्या नागाला क्रूर तरी कसं म्हणणार?", सिद्धार्थचं विचारचक्र गरागरा फिरत होतं, "एका करवंदाएवढा त्याचा मेंदू. त्याला काय विचारशक्ती असणार? त्याच्या जनुकीय प्रेरणेनुसार तो वागला. किंबहुना असं वागणारे कोब्रा टिकले उत्क्रांतीमध्ये म्हणून आज ते तसं आहे, नाही का? त्या नागाला दुसरी काही भावनाच नाही, निव्वळ एका जैविक यंत्रासारखं तो वागणार. त्यात चूक-बरोबर-क्रौर्य-क्षमा-दया-माया हे काहीही नाही. पण समजा त्याला विचारशक्ती असती माणसासारखी तर त्याने सोडलं असतं जिवंत त्याच्या असलेल्या मादीला? समजा त्याला माहित असतं माणसासारखं की, नको असेल तर तो अंश नष्ट करता येईल; तर त्याने त्या मादीला तिच्यातला आधीचा अंश नष्ट करून स्विकारलं असतं त्याच्या वंशाची वाहक म्हणून? त्याला काय, वंश वाढल्याशी कारण ना? की अशी विचारशक्ती असूनही तिला त्याने अपवित्र झाली म्हणून मारलंच असतं?". बेडरूममधून शिल्पाची हाक आल्यावर, अनुत्तरित विचार मनाच्या कोपर्‍यात ढकलून, टीव्ही बंद करून सिद्धार्थ उठला आणि बेडरुममध्ये गेला. शिल्पा शॉवर घेऊन आली होती.

"झोपायचं नाही का?", त्याला पाहून ती म्हणाली.

"हं", तो म्हणाला आणि बेडच्या कडेवर बसून तिच्याकडे पाहू लागला. तिचे केस, तिच्या डोक्याचा आकार, तिचा चेहरा, तिची शरीरयष्टी. एक स्वतंत्र, त्रयस्थ व्यक्ती म्हणून तिचा तो विचार करायला लागला. तिचा सावळा गोड गोल चेहरा पाहून त्याला नेहमीच हृदयात मऊ मऊ वाटायचं; पण कधी तिच्यावर मालकीहक्क असल्यासारखं त्याला वाटलं नाही. "एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती आपल्याला आवडते", त्याला वाटलं,"पण आपल्यातही जनुकीय प्रेरणा आहेतच ना? समजा तिला दुसरं कोणी आवडलं तर?" त्या विचाराने तो चमकला. मनात एकदम गोंधळ झाला त्याच्या. त्या विचाराने एकदम प्रतिक्रिया येण्यापेक्षा आपली प्रतिक्रिया काय असायला हवी ह्याच विचाराने तो गोंधळला. "माणूस कसा प्राणी आहे? किंगकोब्रासारखा?", त्याला प्रश्न पडला.

दिवे मालवल्यानंतरही बराच वेळ त्याला झोप येईना. शेवटी तो स्टडीत येऊन बसला आणि नुकतंच वाचून संपवलेलं "सेपियन्स" रँडमली उघडून वाचायला लागला.

*************************

दहा वाजता बॅडमिंटन खेळून झाल्यावर नेहमीप्रमाणे तो आणि अभिजित चहा घेत बसले होते; तेव्हा विषय निघालाच. डॉक्युमेंटरीबद्दल आणि त्या प्रसंगातल्या क्रौर्याबद्दल त्याने अभिजितला सांगितले.

"हं...", ऐकून बराच वेळ शांत बसून अभिजित शेवटी म्हणाला,"चारित्र्याच्या संशयावरून बायकोला ठार मारणारी माणसंही असतात की. माणूसही शेवटी प्राणीच. तू रिचर्ड डॉकिन्सचं 'द सेल्फिश जीन' वाच. त्यात प्राण्यांच्या वागण्यामागची गेम थिअरी उलगडून दाखवलीय."

"अरे, पण माणूस विचार करणाराही प्राणी आहे. आपलं सगळं वागणं निव्वळ जनुकीय प्रेरणेतून नसतं. तसं असतं तर कायदे-कानून आणि सामाजिक संकेत आलेच नसते ना अस्तित्वात."

"माणूस विचार करणारा प्राणी असला तरी शेवटी विचारांचं मूळ जनुकीय प्रेरणेतच आहे. आपला वंश पुढं चालवण्यासाठी आणि आपली संपत्ती आपल्याच संततीला मिळावी ह्या विचारातूनच स्त्रियांवर बंधनं आली; म्हणजे चुकून दुसर्‍याची संतती आपली समजून त्यांना वाढवण्याचे श्रम घेतले जाऊ नये म्हणून."

"पण हे सगळं शेती करून माणूस स्थिरस्थावर होऊन नागर वसाहती वसल्यानंतर बर्‍याच काळाने झालं. तू 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' वाचलंय का? त्यात माणसांचं वागणं कुठल्या काळात कसं होतं ते लिहिलंय आणि ते वाचल्यावर कळतं की ही निव्वळ जनुकीय प्रेरणा नसून त्या-त्या काळातल्या सामाजिक नीतिकल्पनांवरून माणसांचं वागणं ठरत होतं. एकेकाळी तर स्त्रियांना गाईगुरांसारखीच किंमत होती. अनेक स्त्रियांची मालकी असणे व आलेल्या पाव्हण्याला त्यातली स्त्री देणे वावगे समजत नसत. त्या स्त्रीच्या भाव-भावनांना किंमत शून्य. जसजशी संपत्ती वाढत गेली तसतशी आपल्याच रक्ताच्या वारसाला ती मिळावी म्हणून ह्या कल्पना बदलत गेल्या. सुरक्षेची साधनं व डीएनए टेस्ट्स वगैरे नसल्यामुळे एकमेव उपाय म्हणजे स्त्रीवर बंधनं आणणे. आणि मग पतिव्रता वगैरे संकल्पना आणि त्याचे अफाट उदात्तीकरण."

"हं, खरंय, पण तेव्हा दुसरा उपायच नव्हता ना. आपण कष्ट करुन संपत्ती कमवायची आणि ती दुसर्‍याच्या संततीला मिळाली म्हणजे?"

"बरोबर. तेव्हा उपाय नव्हताच, तेव्हा आजची आधुनिक साधने नव्हती ना."

"आज साधनं आहेत म्हणून फरक पडलाय असं तुला वाटतं? मध्यंतरी तो दीपिका पदुकोणचा 'इट्स माय चॉईस' व्हिडिओ आला होता त्यावर किती टीका झाली होती."

"हो ना... अमोल पालेकरचा 'अनाहत' पाहिलायस का? तो पाहायला गेलो होतो तेव्हा गंमतच झाली. पिक्चर संपल्यावर सगळे बाहेर पडत असताना, आमच्या पुढच्या रांगेत उभ्या असलेल्या काकू त्यांच्याबरोबरच्या दुसर्‍या काकूंना म्हणाल्या "अगं, हा पालेकरांचा पिक्चर आहे ना, मग असं काय?". अमोल पालेकरच्याच पहेलीवरही बर्‍याच लोकांनी नाकं मुरडली होती. स्त्रीच्या कामनांना काहीही किंमत दिली की लोकांना आवडत नाही."

"र.धो.कर्व्यांना किती हाल काढावे लागले माहिताय ना? ते पाहून त्यानंतर सगळे चिडीचूप ह्या विषयावर इतकी वर्षे झाली तरी! बाय द वे, तू ध्यासपर्व पाहिला असशीलच. तोही अमोल पालेकरचाच आहे."

"हो... एकदम डिप्रेसिंग. एकशेतीस कोटी माणसं पैदा करणारा देश आपला आणि".

**************************

शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर सिद्धार्थला निखिलचा फोन आला. तो आणि मोना नदीकाठच्या रेस्टॉरंटमधे बसले होते. मग शिल्पाला तिकडे यायला सांगून सिद्धार्थ तिकडेच गेला. जाऊन बसला नाही तोच निखिलचा प्रश्न,

"वाचलंस का?"

"काय?", सिद्धार्थ गोंधळून म्हणाला.

"स्क्रिप्ट."

"स्क्रिप्ट?"

"मित्रा, महिन्याभरापूर्वी मी तुला नाटकाचं स्क्रिप्ट दिलं होतं वाचायला. वाचलंस का?"

"ओह, ते होय? वाचलं, वाचलं."

"कोणतं स्क्रिप्ट रे?", मोनाने उत्सुकतेनं विचारलं.

"अगं ते 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर'. मी ह्याला दिलं होतं वाचायला; पण ह्याचं काही म्हणणंच नाहीय त्यावर.", निखिल म्हणाला.

"कोण म्हणतं म्हणणं नाहीय? नंतर आपलं बोलणंच झालं नाही ना!"

"बरं मग आता सांग काय म्हणणं आहे."

"तसं चांगलं आहे. थोडं शब्दबंबाळ आहे; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी जी काही तात्त्विक कसरत करुन कोलांटीउडी मारलीय ना नाटककाराने, त्याला तोड नाहीय. कातडीबचाऊ!"

"कोलांटी उडी काय मारलीय?"

"इतकी बडबड करून झाल्यावर काय शोध लावला की, आपल्याला काही करायचं नसतं; फक्त एक्साईटमेंट हवी असते. म्हणजे काही करण्याच्या कल्पनेत एक्साईटमेंट आहे; पण प्रत्यक्ष करण्यात नाही?"

"अरे ए, तसं म्हटलं नसतं शेवटी तर कोणी त्या नाटकाला हात तरी लावला असता का? तसं म्हणूनसुद्धा त्या नाटकाला विरोध होतोच ना?."

"म्हणूनच म्हटलं ना. सगळं शेवटी व्यवहाराच्या गणितापाशी येतं. साहिर लुधियानवी ज्याला ‘दौलत के भूखे रिवाज’ म्हणतो ना ते हेच. नाटक चाललं पाहिजे म्हणून शेवट कसा कोणाच्याही कशालाही धक्का देणारा नको; नाटकभर हूल देत राहिलं तरी. आपल्याला काही करायचंच नसतं कारण व्यवहाराला धक्का बसण्याची भीती असते. काळ बदलला तरी ते पूर्वापार चालत आलेले संपत्तीच्या रक्षणाचे रिवाज तोडायला नकोत; पण तोंडाने आयुष्य भरभरुन जगण्याची, नव्या अनुभवांना भिडण्याची भाषा."

"तू जरा अतिरेकी बुद्धीवादीपणा करतोय असं नाही वाटत का तुला? मलातरी ते नाटक आवडलं. दुर्दैव की ते करता येणार नाही; पण त्यात वावगं काही दिसत नाही मला."

"वावगं नाहीच आहे काही. फक्त जे वास्तवात वाटतंय त्याचं डिनायल करण्याचा, त्या डिनायलला तात्त्विक मुलामा देण्याचा प्रकार आहे नेहमीचा."


********************************

रात्री घरी आल्यावर सिद्धार्थ आणि शिल्पा लिव्हिंग रुममध्ये सोफ्यावर जरा टेकले आणि चाळा म्हणून सिद्धार्थने टीव्ही लावला. टीव्हीवर "जस्ट फॉर लाफ्स" नावाचा कॉमेडी शो चालू होता. रस्त्यांवर, मॉलमध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांवर काहीतरी प्रँक करुन छुप्या कॅमेर्‍याने त्यांच्या प्रतिक्रिया टिपून त्या दाखवत होते. बघता बघता शोमध्ये नवी गंमत सुरु झाली. रस्त्याने जाणार्‍या जोडप्यांपैकी स्त्रीला तिच्या जोडीदाराच्या नकळत विश्वासात घेऊन भलत्याच पुरुषाबरोबर नाचायला आणि तो नाच एन्जॉय करण्याचा अभिनय करायला सांगत होते. जोडप्यातली स्त्री त्या परक्या पुरुषाबरोबर अगदी घसट करून आनंदाने नाचायला लागली की तिच्या जोडीदाराच्या प्रतिक्रिया छुपा कॅमेरा टिपू लागत होता आणि त्या शोचा सूत्रसंचालक मुद्दाम तिच्या जोडीदाराला भडकावून तो काय करतो ते बघत होता.

ते बघता बघता शिल्पाने एकदम वळून विचारलं, "समजा तुझ्यासमोर मी असं कोणाबरोबर नाचत असले, तर तू काय करशील?"

सिद्धार्थने तिच्याकडे पाहिले. तिच्या सावळ्या गोड चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या हृदयात काहीतरी उचंबळून आलं. हसऱ्या चेहर्‍याने तो धीरोदात्तपणे म्हणाला,"तुला मजा येत असेल तर मला काही वाईट वाटणार नाही."

एकाएकी तिचा हसरा चेहरा बदलला आणि हसण्याची जागा रागाने घेतली,"काही वाटणार नाही? म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाहीय?”

सिद्धार्थ एकदम गडबडला. "प्रेम नसण्याचा कुठे प्रश्न येतो इथे? मी फक्त पझेसिव्ह नाही इतकंच. नुसतं नाचलं कोणाबरोबर तर त्यात काय वाटण्यासारखं आहे जोपर्यंत तुला आवडतंय तोपर्यंत?"

"ते काही नाही.. तू विचित्रच आहेस. कुठल्याही नॉर्मल पुरुषाला राग येईल असं पाहून. पण तुला नाही येणार कारण तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही.", इतकं म्हणून ती तणतणत बेडरूम्मध्ये निघून गेली.

सिद्धार्थ अवाक् होऊन तसाच ती गेली त्या दिशेने बघत बसून राहिला. टीव्हीवरचे लोक आता कॅमेर्‍याकडे बोट दाखवून खदाखदा हसत होते.

रापा नुईचे मोआई

समुद्रकिनाऱ्याजवळच्या बागेत बांधलेल्या लाकडी मंडपात बैठक सुरू झाली, तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी रांगेत उभे असलेले टोळीप्रमुखाच्या पूर्वजांचे भव्य पुतळे सोनेरी प्रकाशात चमकत होते. त्या पुतळ्यांकडे अभिमानाने पाहून वंदन करून प्रमुखाने बोलायला सुरुवात केली, “आपल्या सगळ्यांना हे विदीतच असेल की ‘त्यांनी’ बेटावरचा सगळ्यात मोठा पुतळा उभारला गेल्या महिन्यात आणि मुद्दाम आपल्या समोरून मोठी मिरवणूक काढली होती. हा आपल्या पूर्वजांचा अपमान आहे आणि तो आम्ही कदापिही सहन करणार नाही”.
बैठकीत जमलेल्या तरुण मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रमुखाने “राजगुरू” म्हणवणाऱ्या पुजाऱ्याकडे पाहिले. त्याने समाधानाने मान डोलावली.
“ह्या अपमानाचा व अन्यायाचा बदला म्हणून आमचे पूज्य पिताश्री स्वर्गवासी राजेसाहेबांचा त्यापेक्षाही उंच पुतळा बनवण्याचा निर्णय एकमताने घेण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत.”
पुन्हा एकदा टाळ्या-शिट्ट्या-चित्कारांचा कल्लोळ झाला. मंत्रीमंडळातल्या दोन वृद्ध मंत्र्यांनी एकमेकांकडे मूकपणे पाहिलं.
“आपल्या समृद्ध परंपरेप्रमाणे ह्यावर आता चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रथमत: ह्या प्रस्तावाविरोधात मत असणाऱ्यांनी बाजू मांडावी.”
मंडपात शांतात पसरली. मागं उभे असलेले लोक माना वर करून चवड्यांवर उभे राहून कोण उभं राहतंय ते पाहू लागले. म्हाताऱ्या मंत्र्यांपैकी एकजण हळूहळू उभा राहिला.
“आपल्या पूर्वजांचा आदरसत्कार करणे ही तर फारच मोठी पुण्याची गोष्ट आहे ह्यात वाद नाही”, घसा खाकरून तो म्हणाला,”परंतु परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आपल्या बेटावर आता झाडं फार कमी उरलीत. ती झाडं पुतळ्यासाठी तोडण्यापेक्षा वर्ष-दोन वर्षं ती वाढवण्यावर लक्ष देऊ या आणि मग पुतळा बांधता येईल. झाडं कमी उरल्याने आपल्या तरूण मंडळींना होड्याही बांधणे महाग पडतंय. मासेमारीत घट झालीय. त्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ पडताहेत. मुबलक असणाऱ्या गोगलगाई जवळजवळ दिसेनाशा झाल्यात. उंदरांनी उच्छाद मांडला आहे. त्याकडे तातडीने लक्ष द्यावे असे मला वाटते.”, इतकं बोलून तो खाली बसला.
श्रोत्यांमध्ये एकदोन माना अनुमोदनासाठी डोलल्या न डोलल्या, तोच टोळीप्रमुखाच्या जवळच्या काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला. “हा काय आपल्याला दुर्बळ आणि गरीब समजतो काय? अरे, आपल्या शूरवीर पूर्वजांनी ह्या अफाट सागराशी झुंज देत छोट्या होडक्यातून प्रवास करत हे बेट गाठले; आणि आपण ह्या किरकोळ संकटांना घाबरून त्यांचा अपमान होऊ द्यायचा? हा माणूस ‘त्यांच्यासमोर’ आपली मान खालीच घातलेली राहावी म्हणून प्रयत्न करतोय. हा टोळीद्रोही आहे. ह्याला हाकलून ‘त्यांच्यात’ पाठवून द्या.”
हे ऐकून श्रोत्यांमधल्या गरम रक्ताच्या तरूण लोकांनीही आरडाओरडा सुरू केला. शेवटी प्रमुखाने हात वर करून सगळ्यांना शांत केलं.
“आरडाओरडा करणे आपल्या परंपरेला शोभत नाही. शांतपणे प्रत्येकाने आपले मत मांडावे. अजून कोणाला ह्या निर्णयाच्या विरोधात बोलायचंय?”
पुनरेकवार मंडपात शांतता पसरली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. बराच वेळ झाला तरी कोणी पुढं आलं नाही. मग प्रमुखाने पुतळ्याच्या बाजूने बोलणाऱ्यांना आमंत्रण दिलं. राजगुरू तत्परतेने पुढं आले. आपल्या ओजस्वी आवाजात त्यांनी पुनरेकदा पूर्वजांची महती गायली, पुतळा उभारल्याने पूर्वजांना स्वर्गात किती आनंद होईल ते सांगितलं, पुतळा उभारण्याने किती हातांना काम मिळेल ते सांगितलं, पुतळा उभारल्याने टोळीची शान पूर्ण बेटावर सगळ्यात जास्त असेल हे सांगितलं. त्यांचं भाषण संपलं तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने व पूर्वजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला. त्यानंतरही प्रमुखाच्या पुढेमागे फिरणाऱ्यांची अंधार पडून जाईपर्यंत भाषणे झाली; पण निकाल केव्हाच लागला होता.
बैठक संपून लोक आनंदाने पांगले तेव्हा मंडपात दोन-तीन मशाली तशाच फडफडत होत्या आणि दूरवरच्या टेकडीवरची शेवटची दहा-बारा पामची झाडं वाऱ्यावर मूकपणे झुलत होती.

Moai, Rapa Nui National Park, Easter Island (Photo: www.travelnation.fr)




Sunday, November 8, 2015

मंत्र

आज चार दिवस झाले ही मुलगी दुसरं काही बोलतंच नाहीय. नुसती अधून-मधून रडतेय आणि "बाबा सांगा ना; बाबा सांगा ना"चा धोशा लावला आहे. आमची मुक्ता हो! मला वाटलं होतं, होईल एक-दोन दिवसांत नीट; पण चार दिवस झाले तरी हिचं लक्षण ठीक दिसेना. झालेलं काहीही नाहीय. म्हणजे, अगदी विशेष असं काही फार झालं नाहीय. आमच्या घरात तर नाहीच. हिने मात्र ती गोष्ट फार मनावर घेतली आहे.
सांगतो. गेल्या रविवारची गोष्ट. सकाळचे नऊ-सव्वानऊ झालेले. मी असा नेहमीप्रमाणे शूचिर्भूत होऊन; माझा मलमलीचा शुभ्र झब्बा-पायजमा घालून अभ्यासिकेत लिहीत बसलो होतो. हो; रविवारी सकाळी नऊ ते अकरा ही माझी लेखनसाधनेची वेळ असते. त्या वेळात व्यत्यय आणलेला मला मुळीच खपत नाही. म्हणजे, इतरवेळीही मी लिहितो; पण ते फुटकळ. वर्तमानपत्रातले लेख म्हणा, सदरं म्हणा किंवा साप्ताहिक-मासिक राशिभविष्य म्हणा. रविवारी मात्र माझं स्वतःचं खास लेखन. आता गेल्या वर्षीच माझं "राशी आणि रत्ने" प्रकाशित झालं. वाचकांच्या नुसत्या उड्या पडल्यात त्यावर! एका वर्षात तीन हजारांची आवृत्ती संपली सुद्धा! आता पाच हजाराची नवी आवृत्ती बाजारात येतेय. प्रकाशक म्हणताहेत अजून लिहा; वाचक म्हणताहेत अजून लिहा; म्हणून आता दुसरं पुस्तक लिहायला घेतलंय "राशी आणि त्यांचे स्वभाव"! मोठा मनोरंजक विषय आहे आणि मी लिहितोयसुद्धा अगदी मन लावून! मला लिहितानाच इतकी मजा येतेय तर वाचकांना किती मजा येईल याची कल्पनाच करवत नाहीय. हे पुस्तक तर आधीच्या पुस्तकापेक्षाही जास्त लोकप्रिय होणार यात मला तरी संशय वाटत नाही. बघा, तुमची प्रत राखून ठेवायची असेल तर सांगा मला; काय?  
हां, तर असा मी माझ्या लेखनसमाधीत बुडुन लिहीत बसलो होतो. मेषेच्या दणकेबाज धडकेबद्दल लिहू, की कर्केच्या मुळुमुळु रडूबाईबद्दल लिहू; मिथुनेच्या चतुर फटाकडीबद्दल लिहू, की वृषभेच्या विलासी मदनिकेबद्दल लिहू; वृश्चिकेच्या सणसणीत डंखाबद्दल लिहू, की तुळेच्या संतुलित कलात्मकतेवर लिहू असं मला अगदी झालं होतं. मस्त खुसखुशीत नर्मविनोदी शैलीत एकेक स्वभाववैशिष्ट्य उदाहरणासहित लिहिण्यात मी मश्गुल असताना मुक्ता "बाबा, बाबा" करत अभ्यासिकेत आली. समाधी भंगल्याने साहजिकच मी वैतागलो.
"मुक्ता! तुला मी हजारवेळा सांगितलं असेल की माझ्या लेखनात व्यत्यय आलेला मला चालत नाही म्हणून!", असं मी तिच्यावर करवादलो.
ती म्हणाली,"बाबा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आजी आल्यात."
मी म्हटलं", तुला मी सांगितलंय ना, की या वेळात कोणी न सांगता-सवरता आलं तर सरळ कटवायचं म्हणून?"
"हो, पण ह्या खूप म्हातार्या आजी आहेत हो.", ती हेका न सोडता म्हणाली.
"म्हातारी असो की तान्हं बाळ, आपण भीड पडू देता कामा नये. किती वेळा सांगायचं? भीड ही भिकेची बहीण आहे. जा. नंतर यायला सांग त्यांना."
"पुढच्या वेळेसपासून मी नक्की सांगेन; पण आजच्या दिवस चला ना बाबा, प्लीज. प्लीज. खूप म्हातार्या आजी आहेत हो त्या." ती माझा हात धरुन ओढायलाच लागली.
माझा मग नाईलाजच झाला. आता नववीतल्या मुलीला बोलून-बोलून तरी किती बोलणार? त्रासिक चेहर्याने मी दिवाणखान्यात येऊन पाहतो तर दिवाणावर माई बसलेली. आमची गल्ली मुख्य पेठेला लागते त्या वळणावर दोन घरं सोडून एक मोठा वाडा आहे. तो माईचा वाडा. दहा-एक हजार चौरस फुटांचा तरी असेल. पण आता सगळा पडून गेलाय आणि पुढचा दरवाजा आणि त्याला लागून असलेल्या एक-दोन खोल्या कशाबशा तगून राहिलेल्या. त्या पडक्या वाड्यात ही एकटी राहायची नव्वद-पंच्याण्णवची म्हातारी. सगळं अंग सुरकुतलेलं, तोंडाचं पूर्ण बोळकं झालेलं, कमरेतून वाकून अंगाचं धनुष्य झालेलं, हातापायाच्या काड्या झालेल्या अन् त्यामुळे अंगावरच्या धुवट पातळाचा आणि चोळीचा बोंगा झालेला, एकेकाळचे घारे डोळे आता पिवळट झालेले आणि डाव्या डोळ्यात पांढरा अपारदर्शक मोतीबिंदू झालेला. अशा या माईला आमच्या दिवाणखान्यात पाहून मला आश्चर्यच वाटले. माझा रोजचा येण्या-जाण्याचा रस्ता तिच्या वाड्यावरून जातो; पण तिला मी कित्येक वर्षांत पाहिले नव्हते. तिला ओळखतील असे आमच्या गल्लीत फारच कमी लोक उरले असतील. इतरवेळी अजिबात बाहेर न दिसणारी ही म्हातारी एकदम घरीच उगवली म्हटल्यावर मी अचंबित होऊन माझा त्रासिकपणा विसरलो.
"काय माई? काय चाललंय? कसं काय येणं केलंत आज?", तिला कमीच ऐकू येत असणार असं गृहीत धरून मी जरा मोठ्यानेच विचारलं.
म्हातारी बोळक्यानेच रुंद हसली; म्हणाली, "माझं म्हातारीचं मेलीचं काय चालणार?", दात नसल्यामुळे बोलताना हवा सुटून तिचे उच्चार गमतीशीर वाटत होते, "आला दिवस ढकलते झालं. सकाळी उठल्यावर आपण अजून जिवंतच आहोत हे कळून आताशा वाईट वाटतं बघ.", असं म्हणून म्हातारी हॅ हॅ हॅ करून हसली. तिच्या आक्रसलेल्या पापण्या आणि थकलेल्या बुबुळांमध्ये थोडासा मिश्कीलपणा चमकून गेला.
"तुझं मात्र कौतुक आहे हो!", म्हातारी पुढे बोलायला लागली,"लोक फार नाव घेतात तुझं. फार मान आहे तुला समाजात. वाडा पाडून दुमजली इमारत बांधलीस, दारात गाडी आणलीस. आजीचे पांग फेडलेस रे बाळा.  तुझी आजी आणि मी साधारण एकाच वेळी लग्न होऊन इकडे राहायला आलो. हिच्याएवढीच असेन मी तेव्हा", मुक्ताकडे हात करून ती म्हणाली.
"अहो काय माई मागच्या गोष्टी घेऊन बसलात?", मी उतावळेपाणाने म्हणालो, "आज कशी काय वाट वाकडी केलीत ते सांगा".
"माझं एक काम होतं रे तुझ्याकडं", माई थोड्याशा अजिजीच्या सुरात म्हणाली, "माझी अवस्था तर तू बघतोच आहेस. पिकलं पान कधी गळून पडेल त्याचा भरवसा नाही. पण जीवही सहजासहजी जात नाही बघ. माझा जीव माझ्या शंकरमध्ये अडकलाय रे.", तिचे डोळे एकदम पाण्याने चमचम करु लागले आणि खालचा जबडा काहीवेळ नुसताच वरखाली हालत राहिला.
"चाळीस वर्षे झाली त्याला घर सोडून.", माई खोलवरून कापरा आवाज ओढून आणत म्हणाली. ती पुन्हा भूतकाळात शिरतेय हे पाहून मी सुस्कारा सोडला आणि मुक्ताकडे एक तिरपा कटाक्ष टाकला. मुक्ताचंही तोंड रडवेलं झालं होतं. या बायकांना रडायला काहीही कारण लागत नाही. एक रडायला लागली की लगेच दुसरी तिच्याबरोबर रडायला लागते.
"बरोबर आहे माई;", ती पुढे काय बोलतेय ते न ऐकता मी आवाजाची एक पट्टी वाढवून म्हणालो, " पण त्याचं आता आपण काय करणार?". आता हिचा मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी नाटक कंपनीच्या नादाने घर सोडून गेला. चाळीस वर्षांत त्याची ना चिठी ना चपाटी. अशा मुलाचं रडगाणं माझ्याकडे गाऊन काय होणार होतं?
"तसं नाही रे.", ती परत अजिजीने म्हणाली, "आता तू एवढा प्रसिद्ध शास्त्री-पंडित झाला आहेस; सगळी शास्त्रं-पुराणं तुला मुखोद्गत आहेत. लोकांसाठी तू काय-काय उपायही करून देतोस. माझे डोळे मिटायच्या आधी शंकरची भेट होईल असा काही उपाय तुझ्याकडे असेल तर बघावा म्हणून मी आले रे बाळा."
आता हे खरं आहे की या क्षेत्रात माझा थोडाफार अभ्यास आहे. त्यात लहानपणापासून पाठांतराची सवय असल्यामुळे माझी स्मरणशक्ती अगदी तल्लख आणि उच्चार अतिशय सुस्पष्ट आहेत. शिवाय बँकेत नोकरी करत असलो तरी आमचा परंपरागत पौरोहित्याचा व्यवसाय मी जपला आहे. ज्योतिषाविद्येचा अभ्यास असल्याने पत्रिका बनवणे, जुळवणे आणि काही दोष असल्यास शांतीहोमादि उपाय सुचवणे व ते व्यवस्थितरित्या पार पाडून देणे वगैरे वगैरे मी करत असतो. त्यामुळे मला लोक मानतात आणि अगदी दूर-दूरहून माझा सल्ला घ्यायला येतात. आता या माईसाठीही धर्मशास्त्रात सांगितलेला एखादा उपाय मी शोधून देऊ शकलो असतो; पण मला त्यात काही राम दिसेना. आधीच म्हातारीच्या सगळ्या गोवर्या स्मशानात गेलेल्या. असा एखादा उपाय शोधायचे कष्ट घ्या; तिला तो समजावून सांगा आणि एवढं करून तो उपाय करणे तिला परवडणार नसेल तर? शिवाय दक्षिणा देण्याइतके द्रव्य तिच्याकडे असणे दुरापस्तच असणार असा मी अंदाज केला. आमचे पिताश्री म्हणायचे की कोणासाठीही काहीही फुकटात करु नये, माणसाला किंमत राहात नाही; म्हणून मी तिला झटकून टाकायला हवं होतं; पण सरळ-सरळ नाही म्हटलं तर म्हातारी उगाच चिवटपणा करेल, रडारड करेल आणि आणखी वेळ खाईल म्हणून मी तिला काहीतरी थातूर-मातूर उपाय सांगायचं ठरवलं.
"माई तुम्हाला वाचता येतं का?", मी तिला विचारलं.
"हो; येतं की. चवथीपर्यंत शिकलेली आहे मी आणि उजव्या डोळ्याने दिसतं मला अजून!", माई उत्साहाने म्हणाली.
मुक्ताला मी कागद-पेन आणायला पाठवलं आणि माईला म्हणालो, "एक उपाय सांगतो तो लक्षपूर्वक ऐका. दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा आणि मी देईन तो मंत्र अकरावेळा म्हणून तो अभिमंत्रित करायचा. मग तो चमचा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोयंड्यात अडकवून द्यायचा. कितीही वर्षे दूर गेलेला माणूस हमखास घरी येतो; काय समजलं?"
"दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा; अकरावेळा मंत्र म्हणून दाराच्या बाहेरच्या कोयंड्याला अडकवून द्यायचा.", माई थोडक्यात म्हणाली.
"बरोबर", मी म्हणालो. तितक्यात मुक्ता कागद-पेन घेऊन आली. मी कागदावर मनानेच रचून एक मंत्र लिहीला.
                              यथा उत्क्षिप्तो पाषाणः पुनरायाति पृथिवीम् |
                              बाष्परुपभूतं तोयं पुनरायाति सागरम् |
                              यथा भास्वतो भास्करः पुनरायाति उदयाचलम् |
                              तथा सुदूरं गतो जीवः पुनरायाहि स्वगृहम् ||
                                        || ॐ शुभं भवतु ||
लिहून झाल्यावर कागद मी माईकडे दिला आणि तिला वाचायला सांगितलं. तिने मंत्र अडखळत-अडखळत वाचला.मी अर्थ सांगितला, "ज्याप्रमाणे वर फेकलेला दगड पुन्हा पृथ्वीकडे येतो; ज्याप्रमाणे वाफ झालेले पाणी शेवटी पुन्हा सागराला येऊन मिळते; ज्याप्रमाणे तेजस्वी असा सूर्य पश्चिमेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे येतो; त्याचप्रमाणे घरापासून खूप दूर गेलेल्या हे जीवा तू स्वगृही परत ये असा त्याचा अर्थ आहे."माईने आनंदाने डोलत मान हलवली व कागदाची घडी दोन्ही हातांच्यामध्ये धरून हात जोडून कपाळाला लावत भक्तिभावाने नमस्कार केला.
"फार उपकार झाले रे बाळा", माई पुन्हा भावनावश होत म्हणाली, "तुझे उपकार तर मी फेडू शकणार नाही; पण दक्षिणा किती द्यायची तेवढं तरी सांग."
"आता तुमच्याकडून काय घ्यायचं माई?", मी हसत म्हणालो, "स्वखुशीने जे द्यायचं ते द्या."
माईने कमरेची चंची काढली आणि त्यातून अकरा रुपये काढून मला दिले. एक खडीसाखरेचा खडा काढून मुक्ताच्या हातावर ठेवला. मुक्ताला काय वाटलं कोण जाणे? तिने वाकून माईला नमस्कार केला.
"चिरंजीव हो.", माई भरल्या गळ्याने म्हणाली आणि मुक्ताच्या दोन्ही गालांवरून हात फिरवून तिने स्वतःच्या कानशीलावर कडाकडा बोटे मोडली.
"मोठी गोड आहे पोरगी!", बोळ्क्याने हसत मान डोलावत ती म्हणाली आणि मग पदराने डोळे पुसत पुसत निघून गेली.
मी पुन्हा अभ्यासिकेकडे वळलो तर मुक्ता म्हणाली, "बाबा तुमचा मंत्र काम करेल ना हो?"
"म्हणजे काय?", मी हसत म्हणालो, "अगदी शंभर टक्के. इथून पुढे मी लिहीत असताना तू कोणाला घरात घेतलं नाहीस तर नक्कीच माझा मंत्र फळेल."
"बाबा! चेष्टा नका ना करू! खरं खरं सांगा तुमचा मंत्र काम करेल ना?", मुक्ता परत रडवेली झाली होती आणि आता कोणत्याही क्षणी गंगा-यमुना वाहायला लागतील असं वाटलं म्हणून मी म्हणालो, "हो गं. नक्की काम करेल. अगं उपनिषदातला मंत्र आहे तो!". मी ठोकून दिलं असलं तरी तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं. ती तरीही विचारात पडलेली दिसत होती पण किमान रडली तरी नाही.उरलेला रविवार विशेष काही न होता गेला. सोमवारही आला आणि गेला. मंगळवारी सकाळी मात्र तो सगळा गोंधळ झाला. नेहमीप्रमाणे बँकेत जायच्या आधी मुक्ताला शाळेत सोडवायला मी निघालो होतो. वळणावर गाडी वळवली तर माईच्या घरासमोर ही गर्दी. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, "माईच्या घरासमोर गर्दी कसली?", असं म्हणत गाडी बाजूला थांबवली आणि मुक्ताला गाडीतच बसून राहायला सांगून गर्दीत घुसलो. गर्दीतून रस्ता काढत पुढे आलो आणि पाहिले तर एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन हवालदार आणि दोन पहारी घेतलेले मजूर उभे.
"काय झालं?", मी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला विचारलं.
"दरवाजा तोडताहेत", तो म्हणाला, "काल दरवाजा उघडला नाही म्हणून दूधवाला दूधपिशव्या दारात ठेऊन गेला. आज येऊन पाहतो तर मांजराने पिशवी फोडून सगळीकडे दूध सांडलेलं. आजही दार उघडेना म्हटल्यावर सगळ्यांनाच संशय आला म्हणून बोलावलंय पोलिसांना. बहुतेक रविवारी रात्रीच गेली वाटतं म्हातारी."
पहारी घेतलेली माणसं दरवाजाकडे निघाली. तेवढ्यात पोलिस इन्स्पेक्टर पुढे झाला आणि दाराच्या कोयंड्यात अडकवलेला चमचा त्याने काढला. मी परत फिरलो आणि गाडीत येऊन बसलो. गाडीत बसून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
"काय झालं बाबा?", मुक्ताने विचारलं.
"गेली बिचारी निजधामाला.", मी म्हणालो.
"निजधामाला?", मुक्ताने विचारलं.
"हो.", मी वरती बोट दाखवून म्हणालो, "देवाच्या घरी."
मुक्ता काचेतून गर्दीकडे आणि माईच्या घराकडे पाहात राहिली. मी चटकन गाडी काढली आणि निघालो. मुक्ता खिडकीच्या काचेतून वराचवेळ बाहेर बघत राहिली. काही वेळाने एकदम वळून तिने विचारलं, "बाबा, देवाच्या घराला निजधाम का म्हणतात?"
"निज म्हणजे कायमचं आणि धाम म्हणजे घर", मी तिला सांगू लागलो. इंग्रजी माध्यमात ती शिकत असल्याने मराठी व संस्कृत शब्दांचा अर्थ मीच तिला सांगत असतो, "अगं, देवाचं घर हेच आपलं कायमचं घर असतं. इथं पृथ्वीवर आपण सगळेच तात्पुरते घरापासून दूर आलेलो असतो. प्रत्येकाला कधी ना कधी आपल्या स्वतःच्या कायमच्या घरी जावंच लागतं".
"तुमच्या मंत्रात तेच म्हटलं होतं ना बाबा?", ती एकदम म्हणाली, "त्यामुळेच माईचा जीव....", आणि अचानक ती हमसून हमसून रडायलाच लागली.  माझ्या डोक्यातच नव्हतं ते, यामुळे ती काय बोलतेय तेच मला कळेना. थोड्यावेळाने कळल्यावर मी डोक्यावर हात मारून घेतला. झाऽऽलं. तेव्हापासून ते आतापर्यंत सारखा तोच विचार ती करतीये. मधूनच रडते आणि "सांगा ना बाबा; सांगा ना बाबा"चा धोशा लावला आहे. तिला मी हजारवेळा सांगून झालंय की हे मंत्रा-बिंत्राने काहीही झालेलं नाहीय; ती माई म्हातारी झाली होती आणि कधी ना कधी मरणारच होती ते त्याच दिवशी मेली; तो निव्वळ योगायोग होता; आयुष्य म्हणजे नुसता योगायोग असतो; हे मंत्र-पूजा-पाठ केल्याने नियती बदलत नाही  वगैरे परोपरीने सांगून पाहिलं पण ही हेकट पोरगी काही ऐकायलाच तयार नाही. वर "मंत्राचा परिणाम नाही तर तुम्ही लोकांना मंत्र का देता?", असं विचारतीये. आता या मूर्ख मुलीला कसं समजावून सांगू? तुम्हीच सांगून पाहा तिला. तुमचं कदाचित ऐकेल ती.

Saturday, September 21, 2013

भस्म्हावर्‍यांचा दिवस

रूम नंबर ५०७ च्या खिडकीतून समोर दूरवर पसरलेला निळाशार समुद्र दिसत होता आणि खाली पाहिले तर टप्प्याटप्प्याने समुद्रकिनार्‍यापर्यंत उतरत गेलेल्या रिसॉर्टच्या इमारतींची गुलाबी कौलारू छपरे झाडांच्या हिरव्या गर्दीतून डोकावत होती. थोडे झुकून मान तिरकी करून पाहिले तर पोहण्याच्या तलावावर सकाळपासून लागलेली लोकांची झुंबडही दिसली असती; पण खिडकीत बसलेल्या त्या तरुणीचे तिकडे लक्ष नव्हते. आपल्या अक्षत गोर्‍या हाताच्या उत्तम निगा राखलेल्या लांबट नखांना रंग लावण्यात ती गुंगून गेली होती. डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाला ती रंग लावत असताना खोलीतल्या शिसवी पलंगावरच्या मऊ बिछान्यात पडलेला तिचा मोबाईल कुठलेसे इंग्रजी गाणे किंचाळू लागला. अचानक फोन वाजला तरी ज्यांची पापणीही लवत नाही अशा लोकांपैकी ती असावी; तिला आयुष्यात पहिल्यांदा ऐकू यायला लागले तेव्हापासून सतत तो फोन वाजत असावा इतकी ती निवांत बसून राहिली. फोन तसाच वाजत असतानाच तिने हातातल्या छोट्याशा ब्रशने करंगळीच्या नखाची चंद्रकोर निगुतीने उठावदार केली. डाव्या हाताच्या तर्जनीच्या आणि अंगठ्याच्या दुसर्‍या पेरांमध्ये रंगाची बाटली नाजूकपणे धरून तिने उजव्या हाताने झाकण लावले आणि मांडीवरचे बिकिनीतल्या बाईचे चित्र असलेले कुठलेसे चमकदार मासिक उजव्या हातात घेऊन ती अखेर उठली.अंगातल्या पांढर्‍याशुभ्र रेशमी तलम गाऊनला रंग लागू नये म्हणून डावा हात अंगापासून दूर धरून ती पलंगाकडे गेली; हातातले मासिक बिछान्यावर टाकले व आता तिसर्‍यांदा तेच गाणे किंचाळू लागलेला फोन उचलून ती पलंगावर बसली.
"हलो ममा", आपल्या कुरळ्या केलेल्या केसांना एक नाजूक झटका देऊन फोन कानाला लावत ती म्हणाली.
"अनाहिताऽऽ, आर यू ऑलराईट?", पलीकडून आवाज आला आणि तिने भुवया किंचित आक्रसून फोन कानापासून थोडा दूर नेला.
"येस ममा, आय अ‍ॅम ऑलराईट. तू कशी आहेस?", ती म्हणाली.
"तुझ्या काळजीने जीव जायची वेळ आली आहे. व्हाय डिडन्ट यू कॉल मी?"
"आय ट्राईड. काल आणि परवा रात्रीसुद्धा मी फोन करायचा ट्राय केला. पण इथे नेटवर्क..."
"आर यू ऑलराईट, अनाहिता?"
तिने फोनचे कानापासूनचे अंतर आणखी थोडे वाढवले, "आय अ‍ॅम फाईन. पण इथे भयंकर गरम आहे. गोव्यातला हा सगळ्यात हॉटेस्ट डे आहे गेल्या..."
"पण तू मला कॉल का नाही केलंस? मला काळजीने अगदी.."
"ओरडू नकोस ममा, मला नाईस न् क्लिअर ऐकू येतंय.", ती म्हणाली," आणि मी तुला काल रात्री दोनदा ट्राय केला. एकदा आमचं..."
"मला वाटलंच तू काल रात्री फोन करशील. आय टोल्ड युवर फादर; पण नाही! त्याला कालच...आर यू ऑलराईट, अनाहिता? मला खरं खरं सांग."
"मी ओके आहे. सारखं सारखं तेच तेच विचारू नकोस."
"कधी पोचलात तुम्ही तिथे?"
"अम्म्म..फोर थर्टीला पोचलो त्या दिवशी."
"ड्राईव्ह कोणी केलं?"
"त्यानेच केलं", ती म्हणाली आणि लगेच डाव्या हाताने थांबवल्याची खूण करत तिने पुस्ती जोडली," उगाच घाबरू नकोस. ही ड्रोव्ह नाईसली."
"त्याने ड्राईव्ह केलं? अनाहिता, तू मला प्रॉमिस केलं होतंस.."
"ममा.., मी तुला सांगितलं ना त्याने नाईसली ड्राईव्ह केलं म्हणून? ऑल द वे एकदाही एटीच्यावर नेली नाही त्याने."
"आणि लास्ट टाईम झाडांकडे बघत बघत गोंधळ करून ठेवला त्याने ते?"
"आय टोल्ड यू ना ममा, ही ड्रोव्ह नाईसली. मी त्याला व्हाईट लाईनच्या जवळ राहायला सांगितलं अ‍ॅन्ड ही न्यू व्हॉट आय मेन्ट आणि त्याने तसंच केलं. तो तर झाडांकडे बघतही नव्हता. बाय द वे, पपाने त्याची कार फिक्स करून घेतली की नाही?"
"अजून नाही. फॉर्टी केचं एस्टीमेट दिलंय फक्त तिचं..."
"ममा, शुभंकरने पपाला सांगितलंय की हीऽल पे फॉर दॅट. उगाच तू जास्त.."
"ओके, ते बघू नंतर. तो गाडीत कसा वागला?"
"नीट वागला", ती म्हणाली.
"तो तुला अजूनही त्याच भयंकर नावाने हाक मारतो का गं?"
"नाही गं", ती किंचित हसून म्हणाली,"आता नवीन नाव ठेवलंय त्याने."
"काय ते?"
"ओफ्ओ", ती सारवासरव केल्यासारखी म्हणाली,"काय फरक पडतो ममा?"
"अनाहिता, आय वॉन्ट टू नो. तुझ्या पपाला..."
"ओके ओके. तो मला मिस भावना पोकळे म्हणतो.", ती म्हणाली आणि गंमत वाटल्यासारखी खुदकन हसली.
"धिस इजन्ट फनी अनाहिता, हे अजिबात फनी नाहीय. हॉरिबल आहे. अ‍ॅक्चुअली मला कळत नाही कसं..."
"ऐक ममा," मध्येच तोडत ती म्हणाली,"त्याने मला ते पंजाबी पोएम्सचं बुक दिलं होतं आठवतंय का? मी ते कुठे ठेवलंय बरं? मला आठवतच नाहीय."
"आहे ते घरी."
"आर यू शुअर?"
"येस. डेफिनेटली. मी ते ठेवलंय तुझ्या पपाच्या बुकशेल्फमध्ये. का बरं? त्याला हवंय का?"
"नाही. ही वॉज आस्किंग अबाऊट इट. कशा वाटल्या पोएम्स वगैरे."
"अगं पण त्या पंजाबी आहेत!"
"हो, पण त्याने काही फरक पडत नाही असं तो म्हणतो. त्याच्या मते कोण्या ग्रेट आर्टिस्ट बाईच्या पोएम्स आहेत त्या.", ती नुकत्याच रंगवलेल्या नखांकडे बारकाईने पाहात म्हणाली, "मी ट्रान्सलेशन बाय करायला हवं होतं किंवा पंजाबी लर्न करायला पाहिजे असं तो म्हणाला."
"ऑफुल! असं कसं म्हणू शकतो तो? अनाहिता, आता मी काय सांगतेय ते नीट ऐक."
"मी ऐकतेय ममा."
"तुझा पपा काल डॉक्टर बर्व्यांशी बोलला आणि त्यांना हे सगळं सांगितलं; अ‍ॅट लिस्ट सगळं सांगितलं असं पपा म्हणतो. ते खिडकीपाशी उभा राहून तो बडबडत होता ते आणि तुझ्या आजीला मरणाच्या प्लॅन्सबद्दल विचारत होता ते,
आणि शर्मिलाने फेसबुकवर टाकलेल्या युरपच्या फोटोंवर काय कमेन्ट्स टाकल्या ते, सगळं सांगितलं."
"मग? काय म्हणाले ते?"
"काय म्हणणार? त्यांनाही डेफिनेटली विचित्रच वाटलं त्याचं वागणं. शिवाय त्याच्या आयपीएसच्या पोस्टिंगबद्दल, त्याच्यावरच्या इनक्वायरीबद्दल वगैरे सांगितलं तेव्हा तर ते म्हणाले की देअर इज डेफिनेटली अ चान्स दॅट हि माईट लूज हिज कन्ट्रोल. युवर पपा अ‍ॅन्ड आय वेअर सो अपसेट! पपा वॉन्टेड यू टू कम होम इमिजिएटली."
"ममा मी परत येणार नाहीय लगेच. किती दिवसांनी मी व्हेकेशनवर आलीये."
"अनु, तू पुन्हा एकदा याचा सिरियसली विचार करावा असं आम्हाला दोघांना वाटतं. इन फॅक्ट त्याचं पोस्टिंग त्या झारखंड-बिरखंडसारख्या नॅक्सलाईट भागात झालं तेव्हाच तू त्याच्यासाठी वेट करायला नको होतं. आता तर तो टेन्टेड आहे. पपा म्हणत होता तू एकटीच कुठेतरी जाऊन स्वतःच्या लाईफचा शांतपणे विचार करावा म्हणून. लाईक क्रूजवर किंवा शर्मिलाकडे स्टेट्समध्ये..."
"ममा इतकं काही सिरियस नाहीय. तू काळजी करू नको. काल इथे मला एक डॉक्टर भेटले गेम्सरूममध्ये. डॉकटर झकेरिया म्हणून आहेत. बरेच फेमस आहेत म्हणे. शुभंकर क्लबमध्ये काराओकेवर गाणं म्हणत होता ते त्यांनी ऐकलं आणि तो आजारी आहे का असं मला विचारत होते."
"हो? असं का विचारलं त्यांनी? "
"जस्ट तो जरा पेल दिसतो म्हणून विचारलं असेल.  त्यांची बायको विचारत होती की ते करमरकर ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजचा शुभंकरशी काही संबंध आहे का म्हणून...
अ‍ॅन्ड गेस व्हॉट! शी वॉज विअरिंग दॅट ड्रेस. द वन वी सॉ इन सिंगापोर अ‍ॅन्ड तू म्हणाली होतीस की तो घालायला एकदम टायनी...."
"तो ग्रीन?"
"येस्स तोच घातला होता तिने आणि एकदम थंडर थाईज अ‍ॅन्ड बंपर हिप्स!"
"हॉरिबल! काही लोकांना खरंच अजिबात सेन्स नसतो. आणखी काय म्हणाले ते? डॉक्टर."
"विशेष काही नाही. मी बोलेन त्यांच्याशी नंतर इन डिटेल्स. ही हॅज टू नो ऑल द बॅकग्राऊंड टू डायग्नोज. ना?"
"ह्म्म. ओके. तुझी रूम कशी आहे?"
"ठीक ठीक आहे. गेल्यावेळी मिळाली तशी कॉर्नरची नाही मिळाली. सगळा पूलवरचा नॉईज येतो इकडे. अ‍ॅन्ड इट्स टूऽऽ क्राऊडेड धिस टाईम. आणि क्राऊडपण डिसेन्ट नाही अजिबात. गोंधळ, गडबड, मोठ्याने बोलणे. एकदम गावठी."
"हम्म्म. आजकाल सगळीकडे असंच आहे. काही नवीन शॉपिंग केलं का गोव्यात?"
"अजून नाही. ऊन इतकं आहे की मी बाहेर जात नाही फारशी. इट्स रिअली स्कॉर्चिंग."
"मी तुझ्या बॅगमध्ये ब्रॉन्झचं सन्स्क्रीन टाकलं आहे ना! ते मिळालं ना तुला?"
"ते वापरते मी पण तरीही नाही जात बाहेर."
"अनाहिता, मी तुला शेवटचं विचारते.. आर यू ऑलराईट?"
"ममा, प्लीज. किती वेळा सांगू मी ओके आहे? आय अ‍ॅम फाईन."
"तो कुठे आहे?"
"बाहेर गेलाय. बीचवर असेल वाचत."
"बीचवर? एकटाच? तो नीट वागतो का तिथे?"
"ममा तू तर त्याच्याबद्दल अशी बोलतेस की अ‍ॅज इफ त्याला वेड लागलंय."
"मी असं म्हटलेलं नाही."
"पण त्याचा अर्थ तसाच होतो. तो काहीही करत नाही, शांतपणे बुक वाचत असतो. शिवाय गेल्या दोन रात्री तो क्लबमध्ये काराओकेवर गाणीही म्हणतोय."
"पण तरीही, तो जर काही विचित्र बोलला, वागला तर लगेच मला कॉल कर. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय अ‍ॅम सेईंग?"
"ममा, मला शुभंकरची भीती वाटत नाही."
"अनाहिता, मला प्रॉमिस कर."
"ओके ममा, आय प्रॉमिस.", तिने भुवया उंचावून छताकडे पाहात म्हटलं, "बाय ममा. मी नंतर फोन करीन. गिव्ह माय लव्ह टू पपा."
तिने फोन बंद करून एक सुस्कारा सोडला.  

                           *************************************

"शुभं करकर मरकर!", सायली पोहण्याच्या तलावापाशी एका हवा भरलेल्या मोठ्या रबरी चेंडूवर बसून खिदळत म्हणत होती,"शुभं करकर मरकर!"
"सायली, स्टॉप सेईंग दॅट. इट्स सो इरिटेटिंग. आणि नीट स्थिर बसून राहा बरं.", तिची आई सायलीच्या छोट्याशा खांद्यांना व हातांना सनस्क्रीन लोशन लावत म्हणाली. सायलीने पिवळा दोन भागांचा पोहण्याचा पोशाख घातला होता पण त्यातल्या एका भागाची तिला अजून नऊ-दहावर्षेतरी गरज नव्हती.
"तशी ती अगदी साधी कॉटनची साडी होती", शेजारच्या आरामखुर्चीवर बसलेली स्त्री सायलीकडे कधी एकदा ही जातेय अशा अधीरपणे पाहात सायलीच्या आईला म्हणाली,"पण द वे शी हॅड टाईड इट...आय विश आय न्यू. खूप क्यूट दिसत होती."
"हो, खूपच नाईस होती", सायलीची आई म्हणाली,"ओके सायली, नाऊ गो अ‍ॅन्ड प्ले इन चिल्ड्रन्स पूल. आम्हाला बोलू दे जरा."
सुटका होताच सायली लहान मुलांच्या तलावाच्या दिशेने पळाली. तलावाकडे जाणार्‍या पायर्‍या ती पळतच उतरली आणि तशीच पळत तलावापाशी न थांबता तलावाला एक वळसा घालून खाली समुद्रकिनार्‍याकडे जाणार्‍या पायर्‍या धडधडा उतरू लागली. पायर्‍या संपून किनार्‍यावरच्या भुसभुशीत वाळूत पाय पडताच तिने थांबून एकदा डावी-उजवीकडे पाहिले आणि मग डावीकडे वळून वाळूत पाय रुतवत सावकाश चालू लागली. थोडे अंतर गेल्यावर अचानक ती पुन्हा पळत सुटली आणि झाडांच्या रांगेतल्या एका झाडाच्या सावलीत आरामखुर्ची टाकून बसलेल्या तरुणाच्या खुर्चीजवळ जाऊन थांबली. समोर उघडे पुस्तक धरून बसलेल्या त्या तरुणाची नजर मात्र पुस्तकाच्या वरून समुद्रात खोलवर कुठेतरी विरघळली होती.
"आर यू गोईंग इन द सी, शुभं करकर मरकर?"
तो तरूण दचकून भानावर आला आणि आपसूकच त्याने अंगावर घातलेला रोब उजव्या हाताने छातीवर हलकेच आवळून धरला.  
"ओह, हॅलो सायली!", पुस्तक ठेवून उजव्या कुशीवर वळत आणि इतकावेळ उन्हाकडे पाहात असलेले डोळे सावलीला जुळवून घेत तिच्या चेहर्‍याकडे अंदाजाने रोखून पाहात तो म्हणाला. 
"आर यू गोईंग इन द सी?" 
"मी तुझीच वाट पाहात होतो.", तो म्हणाला, " काय चाललंय?"
"व्हॉट?"
"काय चाललंय? व्हॉट्स द प्लॅन?"
"माझा बाबा येणारे आज एरोप्लेनने", सायली पायाने वाळू उडवत म्हणाली.
"अंगावर वाळू नको उडवूस", त्याने झटकन पण अलगदपणे तिच्या पायावर घोट्यापाशी हात ठेवला, "हो यायलाच पाहिजे तुझा बाबा आता. बघ ना मला आता त्याची तासातासाला आठवण येतेय."
"अनाहिता आंटी कुठे आहे?"
"अनाहिता आंटी?", तो वाळू झटकत म्हणाला, "सांगणं अवघड आहे. हजारो ठिकाणं आहेत आणि ती कुठंही असू शकते. खाली ब्युटीपार्लरमध्ये असेल किंवा स्पामध्ये मसाज घेत असेल किंवा रूममध्ये नखं रंगवत बसली असेल."
त्याने उजव्या कुशीवर वळत उजव्या हाताची उशी करून त्यावर डोके टेकवले आणि डाव्या हाताने तिला आपल्या जवळ ओढले.
"दुसरं काही तरी विचार ना.", तो म्हणाला, "किती छान स्वीमसूट आहे तुझा गं? मला या जगात सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर ते म्हणजे ब्लू स्वीमसूट."
सायलीने ओठ घट्ट एकमेकांवर आवळत भुवया आक्रसून त्याच्याकडे रोखून पाहिले आणि मग खाली आपले आधीच पुढे आलेले पोट आणखी पुढे काढून त्याकडे पाहिले.
"हा ब्ल्यू आहे का?", दोन्ही हात सगळी बोटे जुळवून स्वीमसूटकडे रोखत ती म्हणाली, "हा यलो आहे यलोऽऽ"
"हो का? जरा जवळ ये बरं"
ती एक पाऊल आणखी जवळ आली.
"अरे खरंच की! तू म्हणतेस तेच बरोबर आहे! काय यडाय राव मी!"
"तू सीमधे जाणार आहेस का?", त्याच्या शेजारी बसत सायलीने पुन्हा विचारले.
"माझं अजून ठरलं नाहीय; मी त्याच्यावर गहन विचार करतोय. पण तू किती छान दिसतेयस, मला तुझ्याबद्द्ल आणखी काहीतरी सांग ना.", त्याने तिचा छोटासा हात आपल्या हातात घेतला.
"आलिशा सेड की काल सिंगिंग करताना तू तिला तुझ्या शेजारी बसू दिलं म्हणून", सायली कपाळावर आठ्या पाडून नाक आक्रसत म्हणाली.
"आलिशा असं म्हणाली?"
सायलीने जोरजोरात मान हलवली.
"हं", तिचा हात सोडून पुन्हा पाठीवर वळत तो म्हणाला,"तुला तर माहितीच आहे की हे सगळं कसं असतं, सायली! काल मी तिथं बसून गाणी म्हणत होतो आणि तू तिथे नव्हतीस. तेवढ्यात आलिशा आली आणि बसली माझ्या शेजारी. आता तिला काय ढकलून द्यायचं?"
"हो"
"हा हा हा, नाही बाईसाहेब. मी नाही ढकलू शकत तिला. पण मी एक युक्ती केली. माहितीये का काय?"
"काय?"
"मी असा विचार केला की तूच माझ्या शेजारी बसली आहेस."
रेलून बसलेली सायली ताबडतोब उठून ताठ बसली, "लेट्स गो इन द सी.", ती उत्साहाने म्हणाली.
"ओके. ", तो तरूण म्हणाला, "मला वाटतं आता जायला काही हरकत नाही."
"पण नेक्स्ट टाईम ढकलून दे."
"कोणाला?"
"आलिशाला."
"ओह, आलिशा!", तो म्हणाला, "कैसे उनका नाम बारबार जुबान पे आता है, दिल में क्या यादे क्या क्या आरजू खिलाता है."
अचानक तो झटक्यात उठून उभा राहिला आणि त्याने समुद्राकडे गंभीरपणे काही क्षण पाहिलं.
"सायली", तो वळून एकदम म्हणाला, "मला एक गंमत सुचलीये. चल. आपण पाहू एखादा भस्म्हावरा मिळतोय का ते."
"व्हॉट?"
"भस्म्हावरा", तो म्हणाला आणि त्याने अंगावरचा रोब काढून टाकला आणि जवळच पडलेला फ्लोट घेतला. चेहर्‍याच्या मानाने त्याचे अंग काहीच रापलेले नव्हते. 
त्याने उजवा हात लांबवून सायलीचा डावा हात हातात घेतला आणि ती दोघं समुद्राकडे चालू लागली.
"तू आजपर्यंत खूप भस्म्हावरे पाहिले असतील ना सायली?", त्याने तिला विचारले.
तिने मान हलवली.
"नाही? कमाल आहे! कुठे राहतेस तू?" 
"आय डोन्ट नो."
"काय सांगतेस? तुला माहिती असलं पाहिजे. आलिशाला माहितीय ती कुठं राहते ते आणि ती तर फक्त साडेतीन वर्षांची आहे."
सायलीने त्याच्या हातातून हात ओढून काढून घेतला आणि खाली वाकून वाळूतून एक तुटका शिंपला उचलून बारकाईने निरखत बसली. मग एकदम तो खाली टाकून दिला आणि उभं राहात म्हणाली, "बँड्रा वेस्ट, बॉम्बे".
"बॅन्ड्रा वेस्ट बॉम्बे..", तो म्हणाला, "ते मुंबईत वान्द्रे पश्चिमच्या जवळ आहे ते का?"
"मी बॅन्ड्रा वेस्टला राहते", सायली त्रासिकपणे प्रत्येक शब्दावर जोर देऊन म्हणाली आणि पुढे काही पावले वाळूत पळत गेली. पुढे जाऊन तिने आपला डावा पाय मागे उचलला आणि डाव्या हातात धरून उभी राहिली.
"ओहो, असंय होय, आता एकदम नीट कळलं मला."
"तू मोगलीचं कार्टून पाहिलं?", तो जवळ आल्यावर आपला पाय सोडून ती म्हणाली.
"कालच!", तो उत्साहाने म्हणाला,"बघ कशी गंमत आहे, मी ते काल रात्रीच पाहिलं आणि तू मला आज विचारतीयेस! तुला कसं वाटलं ते?"
"ते मोगली वर अ‍ॅटॅक करतात ते हायनाज असतात ना?"
"हो गं. मला वाटलं ते मोगलीला मारतीलच! मी इतकी तरसं कधीच पाहिली नव्हती!"
"हॅ. फक्त सिक्सच तर होते ते!"
"फक्त सहा? तुला सिक्स फक्त वाटतात?"
"तुला पेन्सिल आवडते?", सायलीने विचारले.
"काय? मला काय आवडते?", त्याने गोंधळून विचारले.
"पेन्सिल"
"होऽऽऽ. खूप आवडते. तुला नाही आवडत?"
सायलीने मान डोलावली, "आणि ग्रेप्स?"
"ग्रेप्स..हो. द्राक्षंसुद्धा. द्राक्षं आणि पेन्सिली घेतल्याशिवाय मी कुठेही जात नाही."
"तुला आलिशा आवडते?"
"होऽऽऽऽऽऽ. खूऽऽऽऽप आवडते.", तो हसत म्हणाला," तुला माहितीये मला ती का आवडते? कारण ती रिसॉर्टमध्ये जे कुत्र्याचं पिलू आहे ना, त्याला फुग्याच्या तलवारीने धबाधबा मारत नाही. खूप चांगली आहे ती."
सायली गप्प होऊन चालत राहिली .
"मला पेन्सिल खायला खूप आवडते", बर्‍याचवेळाने शेवटी ती म्हणाली.
"वा! पेन्सिल खायला कोणाला आवडत नाही?", पायावर पाण्याची लाट येताना तो म्हणाला,"ओह, पाणी चक्क गार आहे!"
खांद्यावरचा फ्लोट त्याने पाण्यात टाकला.
"थांब सायली! लगेच चढू नको त्यावर. आपण आणखी थोडं पुढं जाऊ."
दोघे पाण्यात वाळूतून सावकाश चालत आणखी थोडे खोल पाण्यात गेले. मग त्याने तिला अलगद उचलले आणि फ्लोटवर पालथे ठेवले.
"तुमच्याकडे टोपी वगैरे घालायची पद्धत नाही का?", त्याने विचारले.
सायलीने त्याचा हात घट्ट धरला होता,"मला धरून ठेव. सोडू नको!", ती किंचित थरथरत म्हणाली.
"बाईसाहेब, मी माझं काम व्यवस्थित करतो! तुम्ही फक्त एखादा भस्म्हावरा दिसतोय का तिकडे लक्ष द्या!", तो दूरवर पाहात म्हणाला, "आज भस्म्हावर्‍यांचा दिवस आहे."
"मला एकसुद्धा दिसत नाहीये."
"ते असे सहजासहजी दिसत नाहीत. फार विचित्र असतात ते. तुला माहितीये का ते काय करतात ते?"
सायलीने मान हलवली.
"समुद्राच्या तळाशी ना, काही बीळं असतात आणि त्या बीळांमध्ये लाडू असतात. त्या बीळांमधे हे भस्म्हावरे जातात. जाताना ते अगदी साध्या माशासारखे असतात, पण एकदा का आत गेले की अगदी डुकरासारखे बकाबका लाडू खातात.  
एका भस्म्हावर्‍याने तर अठ्ठ्यात्तर लाडू खाल्लेले मी पाहिलंय.", फ्लोट पाण्यात आनखी खोलवर ढकलत तो म्हणाला,"आणि त्यानंतर ते इतके जाडजूड होतात की बीळातच अडकून बसतात. बाहेरच येता येत नाही."
"मग काय होतं त्यांचं?", फ्लोट खोल पाण्यात चाललेला पाहून त्याच्या हातावरची पकड आणखी घट्ट करत सायली म्हणाली.
"काय सांगू सायली तुला, ते मरतात गं!"
"का?", तिने मान वळवून आश्चर्याने विचारले.
"त्यांना भस्म्या रोग होतो. फार भयंकर रोग आहे तो."
"वेव्ह आली, वेव्ह आली", तितक्यात सायली घाबरून म्हणाली.
"नो प्रॉब्लेम. आपण लाटेवरून उडी मारू.", तो म्हणाला.
त्याने एका हाताने तिचे दोन्ही पाय घोट्यापाशी धरून पाण्यात दाबले आणि फ्लोटने लाटेवर अलगद हेलकावा घेतला. सायलीचे डोके एकदा पाण्यात डुबकी मारून आले आणि ती आनंदातिशयाने किंचाळू लागली. 
"मला एक दिसला! मला एक दिसला!", स्थिर झाल्यावर कपाळावरचे ओले केस एका हाताने बाजूला करत ती म्हणाली.
"काय दिसला?"
"भस्म्हावरा!"
"अरे बापरे! मग? होते का त्याच्या तोंडात लाडू?", त्याने डोळे मोठे करून विचारलं.
"हो! सिक्स होते!", तिनेही त्याच्यासारखेच डोळे मोठे करून उत्तर दिले.
त्याच्या डोळ्यात एकदम मृदु हसू जमा झाले. अचानक तो वाकला आणि पाण्यात तरंगणार्‍या तिच्या गुलाबी तळपायाचा त्याने मुका घेतला.
"एयऽऽ", त्या सुकुमार तळपायाची मालकीण मागे वळून ओरडली.
"एयऽऽ तूऽऽ. चला आता. झालं का तुझं खेळून?"
"नाही! अजून खेळायचं."
"सॉरी!", एवढंच म्हणून त्याने फ्लोट किनार्‍याकडे ढकलायला सुरुवात केली. किनार्‍यावर पोचल्या पोचल्या त्याला "बाय!" म्हणून सायली रिसॉर्टच्या दिशेने पळत सुटली. त्याने फ्लोट खांद्यावर अडकवला. आणि वाळूतून सावकाश खुर्चीपर्यंत चालत जाऊन रोब आणि पुस्तक घेतले आणि रिसॉर्टच्या पायर्‍या चढून लॉबीत आला.
खास पोहणार्‍यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये तो शिरला तेव्हा त्याच्या मागोमाग तोंडावर सनस्क्रीन लोशन चोपडलेली आणि अंगाभोवती चादरीसारखे कापड गुंडाळलेली एक बाई शिरली आणि खाली बघत उभी राहिली.
"तुम्ही माझ्या पायांकडे बघताय का?", त्याने लिफ्ट सुरु झाल्या झाल्या विचारले.
"अं? एक्सक्यूज मी?", ती भांबावली.
"आय सेड आय सी यू आर लुकिंग अ‍ॅट माय फीट."
"आय बेग यॉर पार्डन! आय हॅपन्ड टू बी लुकिंग अ‍ॅट द फ्लोअर", ती फणकार्‍याने म्हणाली आणि त्याच्या कडे पाठ करून तिने पुढच्या मजल्याचे बटन दाबले.
लिफ्टचे दार उघडताच त्याच्याकडे वळून न बघता ती घाईघाईने बाहेर पडली.
"माझे पाय अगदी सर्वसाधारण आहेत आणि कोणी त्यांच्याकडे टकामका पाहायचे काही एक कारण नाहीय.", दार बंद होता होता तो अर्धवट स्वतःशी म्हणाला.
पाचव्या मजल्यावर पोचल्यावर तो लिफ्ट लॉबीतून चालत ५०७ कडे गेला. दार उघडून आत येताच नेलपेन्टचा आणि चामड्याच्या बॅगांचा मिश्र वास त्याच्या नाकात शिरला. 
बेडवर पहुडलेल्या आणि झोप लागलेल्या त्या तरुणीकडे त्याने क्षणभर थांबून पाहिले आणि हळुवार चालत जाऊन तिथल्या अनेक चामड्याच्या बॅगांपैकी एक बॅग उघडली. बॅगेतले कपडे भसाभसा ओढून काढून सगळ्यात खाली ठेवलेले नऊ एम एम ब्राऊनिंग काढले. त्यातले मॅग्झिन एकदा बाहेर काढून तपासले आणि पुन्हा आत घातले.
अलगद चालत तो बेडवर त्या तरुणीच्या शेजारच्या मोकळ्या जागेत जाऊन बसला. मान वळवून तिच्याकडे पाहिले; पिस्तुल उचलून नेम धरला आणि मग स्वतःच्या उजव्या कानशीलात गोळी झाडली.

(जे. डी. सॅलिंगर यांच्या "A Perfect Day for Banana Fish" या कथेचे स्वैर रुपांतर)

Thursday, August 8, 2013

फॉरबिडन

मानवी देहाला मांस मिळाले त्याच वेळी त्याला वासनेचे बीज मिळाले; पण हा माणूस स्वतःचा इतिहास स्वत: लिहितो आणि सार्‍या पतनाचा दोष इतरांवर ढकलत राहतो; आणि त्यातही त्याचे कपट असे, की या वासनेचा आनंद तर त्याला भोगायचा असतोच, पण तिचा निर्व्याजपणे उपभोग घेण्यात त्याला पराकोटीची शरम वाटते. ज्यांना तो आपल्यापेक्षा फार हीन समजतो, त्या जनावरांत हा स्वच्छ मोकळेपणा असतो. बागेतला पाचोळा आणि रानपाचोळा, जनावराला दोन्ही सारखेच व आक्रमण किंवा अपराध झाला असे ठरलेच, तर शिक्षा भोगायलादेखील त्याची तशीच सहज तयारी असते; पण खाताना मात्र ते मळकट मनाने खात नाही. माणूस मात्र आधाश्याप्रमाणे खातो, पण दर घासाबरोबर एक किडा खाल्ला असे समजत चेहरा नासका करून बसतो. म्हणजे एकीकडे, न खाल्ल्याचे खुळचट पुण्य नाही, तर दुसरीकडे, खाऊन तृप्त झालो असा मांसल आनंद नाही. तो वासना भोगतो तेच ओशाळलेल्या मळकट मनाने, कारण त्याच्या दृष्टीतच हा मलिन ठिपका कायमचा राहून गेला आहे.
- सर्प (जी.ए. कुलकर्णी)

* * * *

सगळं घर नीटनेटकं आवरून ते नुकतेच टेकले होते, तेव्हा डोअरबेल वाजली. माधवने जाऊन दार उघडलं. काळ्या-पिवळ्या चेक्सचा कोपरापर्यंत बाह्या मुडपलेला कॉटनचा शर्ट, निळसर रंगाची जीन्स आणि थोडीशी दाढी वाढलेल्या चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं मोकळं बालिश हसू घेऊन किरण उभा होता. हातात पिवळ्या गुलाबांचा एक गुच्छ आणि वाईनची बाटली.
"आय वॉज शुअर!", तो रुंद मिश्कील हसत उजवा डोळा मारून म्हणाला, "की आय वुड बी द फर्स्ट टू अराईव्ह. खूपच वेळेवर आलो नसेन अशी आशा आहे."
माधवने हसून त्याला आत यायला सांगितलं आणि त्याच्या मागे दार बंद केलं.
"हाय!" मानसीला तिथे उभी असलेली पाहून तो म्हणाला.
"हाय!" मानसी म्हणाली आणि तिने हात पुढे केला.
फुलांचा गुच्छ त्याने तिच्या हातात दिला, " हे तुझ्यासाठी".
"थँक्स! सुंदर आहेत!"
माधवने बसायला सांगायच्या आधीच तो सोफ्यावर बसला. पाय एकमेकांवर टाकून आणि आपला एक हात सोफ्याच्या पाठीवर लांबवून दुसर्‍या हाताच्या कोपरावर रेलून तो आरामात बसला. अगदी रोजचं येणंजाणं असल्यासारखा. ऑफिसच्या कपड्यांमध्ये थोडा सडपातळ वाटणारा तो या कपड्यांमध्ये चांगला बळकट वाटत होता.
आल्यावर त्याने मानसीच्या हातात दिलेली फुलं ती कॉर्नर टेबलवरच्या व्हेसमध्ये सजवू लागली आणि माधवच्या हातात त्याने दिलेली वाईनची बाटली टीपॉयवर ठेवून माधव त्याच्या समोरच्या सोफ्यात बसला. माधवला वाटलं, पंधरा वर्षांपूर्वी जर त्याला कोणी सांगितलं असतं की हा किरण भोगले तुझ्या घरी फुलं आणि वाईन घेऊन येईल, तर तो वेड लागल्यासारखं हसला असता. पण आज तो ते सगळं घेऊन आला होता आणि समोर बसला होता. माधव वॉज अॅम्युज्ड.
किरणने सावकाशपणे सगळीकडे नजर फिरवली.
"घर छान आहे तुमचं!" दोघांकडे आळीपाळीने पाहात तो त्याच्या घुमल्यासारख्या घोगरट आवाजात म्हणाला.
"थँक्स! गेल्या वर्षीच शिफ्ट झालो इथे." माधव प्रसन्न हसून म्हणाला, "ये ना. दाखवतो तुला घर."
किरण किंचितसा हसला आणि त्याचे सतत हसल्यासारखे दिसणारे पिंगट डोळे मिश्कीलपणे आणखी बारीक झाले. त्याने न सांगताच त्याच्या हसण्याचं कारण माधवला कळलं आणि त्यालाही थोडं हसू आलं, पण आता तो बोलून बसला होता. क्षणभर त्यांनी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग त्या टिपिकल रिच्युअलसाठी मनाचा हिय्या केल्यासारखा तो उठला.
रूढीप्रमाणे माधवने त्याला सगळं घर फिरून दाखवलं आणि त्यानेही रूढीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी "वा वा, छान छान" असे उद्गार काढले. पण त्यात त्या पहिल्या वाक्याइतका सच्चेपणा उरला नव्हता.
"बरेच दिवस झाले तुला घरी बोलवायचं होतं, पण शेवटी आज मुहूर्त लागला." परत जागेवर येऊन बसल्यावर माधवने त्याला म्हटलं.
"बरेच कसले? मलाच इथे येऊन फक्त दीड महिना झालाय."
"हो, पण आपण गेल्या दोन्ही वेळा बाहेरच भेटलो आणि प्रत्येक वेळी ये घरी म्हणायचं आणि बोलवायचंच नाही, हे बरोबर नाही." मानसी पाण्याचा ग्लास घेऊन येता येता म्हणाली.
"यू हॅव अ पॉईंट देअर" पाण्याचा ग्लास घेत तो म्हणाला, "आय अॅम ग्लॅड यू इन्व्हाईटेड मी."
"शिवाय एनी वे आमच्या तीन-चार मित्रपरिवारांचा भेटण्याचा बेत होताच आज, म्हटलं तुलाही ग्रूपमध्ये इनिशिएट करावं." माधव म्हणाला.
"हां, हे एकदम बेस्ट थिंकिंग झालं."
मग माधवने त्याला त्याच्या मित्रांची थोडी माहिती दिली. ते बर्‍याच वेळा करत असणार्‍या अॅक्टिव्हिटीजची माहिती दिली. तो बराच उत्सुक दिसला नवे मित्र जोडायला.
"बाकी तू खूपच बदलला आहेस हं!" बाकीचं सटरफटर बोलून थोडी शांतता झाल्यावर माधव शेवटी बोलून गेलाच.
"म्हणजे?"
"म्हणजे...यू हॅव प्रोग्रेस्ड अ लॉट. एस्पेशियली... यू नो, गिव्हन युवर.." हम्बल म्हणायला माधव जरा अडखळला, "...बॅकग्राऊंड..."
"हम्म्म" डोकं किंचित वरखाली हलवत त्याने विचार केला, " आयल टेक दॅट अॅज अ कॉम्प्लिमेंट, पण हॅलो! आय डोन्ट नो तुम्हाला तेव्हा काय वाटायचं, पण मी काही गरीब नव्हतो!"
यावर काय रिअॅक्शन द्यावी, याचा माधव विचार करू लागला, पण तोच पुढे बोलायला लागला,
"म्हणजे माझे आईवडील त्यांच्या लहानपणी नक्कीच गरीब होते आणि म्हणूनच नंतर पैसे मिळूनही ते गरीबच राहिले आणि त्यांनी कधीही मनासारखा पैसा खर्च केला नाही. बट नॉट मी! मी गरीब नव्हतो. आय हॅड अ ग्रेट चाईल्डहूड! खूप श्रीमंती नव्हती, पण खायला प्यायला भरपूर होतं, कपडेलत्ते पुरेसे होते. भरपूर हुंदडायला मिळायचं. माझी आई बरीच प्रेमळ आणि अं.. जरा निष्काळजीसुद्धा होती, त्यामुळे सकाळ-संध्याकाळ मी खेळत असायचो. अभ्यासाचा फार कधी दबाव नव्हताच. पण त्यामुळेच आय थिंक मी एकदम हेल्दी आणि हॅपी गो लकी झालो. सतत मातीत खेळल्यामुळे माझा अगदी अवतार व्हायचा, म्हणून तुम्हा लोकांना तेव्हा वाटलं असेल कदाचित."
माधवला एकदम काहीतरी आठवलं.
"तुला शर्वरी आठवते का रे?"
"ऑफकोर्स आय डू!" क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, "ओह, शर्वरी, शर्वरी, शर्वरी! तिला मी कसा विसरेन? शी वॉज अ फाईन गर्ल."
माधवच्या चेहर्‍यावर आश्चर्य लख्खपणे पसरले आणि मानसीच्या चेहर्‍यावर उत्सुकता उमटून गेली. माधव आश्चर्याने पुढे काहीतरी विचारणार, इतक्यात डोअरबेल वाजली आणि तो विषय तिथेच राहिला.

माधव-मानसीच्या एकेक मित्रवर्याचं सहपरिवार आगमन व्हायला लागलं आणि मग घरात एकच गोंधळ झाला. माधवने प्रत्येकाशी किरणची ओळख करून दिली आणि तोही प्रत्येक वेळी उभा राहून प्रत्येकाशी हात मिळवत होता, बोलत होता.
जवळजवळ सगळे जमल्यावर माधवने घरातली ग्लेन फिडिचची आणि किरणने आणलेली वाईनची बाटली उघडली आणि मैफलीने सूर पकडला. घुटक्या-घुटक्यांनी गप्पा सुरू झाल्या. ग्लास संपता संपता, हसण्याचे फुस्स फवारे किंवा गडगडाटी धबधबे, खेचाखेची, टोप्या उडवणे असे प्रकार फॉर्मात आले. जागतिक राजकारणापासून आपापल्या ऑफिसातल्या आणि सोसायटीतल्या भानगडींपर्यंत सगळे विषय चघळले जात होते, मध्येच हौशी गायकांनी आपले गळे साफ करून घेतले, मानसीला झालेल्या आग्रहावरून तिने तिच्या एक-दोन कविता ऐकवल्या. किरणनेही त्याच्या नेपाळमधल्या आणि युरोपमधल्या ट्रेकींगमधले काही किस्से सांगितले. थोड्या वेळाने सगळ्यांना भुका लागल्यात हे पाहून मानसीने टेबलवर जेवण मांडल्याचे जाहीर केले आणि मग हळूहळू सगळे दोन-तीनच्या गटांमध्ये विभागले जाऊन बोलत बोलत प्लेट्स भरून घेऊ लागले, मुलं-बाळंवाले मुलांना भरवू लागले.
जेवणं झाल्यावर यथावकाश एकेक परिवार निरोप घेऊ लागला आणि माधव प्रत्येकाला लिफ्ट लॉबीपर्यंत सोडायला जाऊन येऊ लागला. किरण आणि मानसी सोफ्यावर बसून गप्पा मारत बसले. शेवटच्या जोडप्याला बाय करून माधव आत आला, तेव्हा मानसीचे शब्द त्याच्या कानावर पडले,
"ओह, दॅट वॉज रिअली ब्यूटिफुल!"
"काय ते?" त्याने उत्सुकतेने विचारलं.
"काही नाही रे, कवितांबद्दल बोलत होतो आम्ही." किरण म्हणाला आणि मग लगेच उठत म्हणाला, "चला, मीसुद्धा निघतो आता."
"थँक यू!" मानसीकडे वळून त्याने आपला उजवा हात हॅन्डशेकसाठी पुढे केला आणि तिने हात दिल्यावर तो हातात घेऊन म्हणाला, " खूप मजा आली आज! थँक्स अगेन फॉर इन्व्हायटिंग मी."
"यू आर मोस्ट वेलकम!" मानसी म्हणाली. बहुधा तिने वाईनचा एक ग्लास जास्त घेतला असावा. तिचे गाल आणि कान लालबुंद झाले होते आणि डोळे काचेरी झाले होते.
तिला बाय म्हणून तो माधवकडे वळला आणि म्हणाला, " चल खाली मला गाडीपर्यंत सोडायला."
खाली जाताना तो लिफ्टमध्ये काही क्षण मान खाली घालून उभा राहिला आणि मग खाली बघतच एकदम म्हणाला, "आय थिंक शी लाईक्ड मी!"
"कोण?", बुचकळ्यात पडून माधवने विचारलं.
"शर्वरी."
"काय?" प्रयत्न करूनही माधवला हसू लपवता येईना.
"हसू नकोस. आय अॅम सिरियस."
"ड्यूड, हसू नको तर काय करू? जिच्याशी तू कधीही बोलला नाहीस आणि जिने पहिल्याच वेळी तुला पाहून 'हा असेल तर मी खेळणार नाही' असं सांगून तुला कटवला होता, तिला तू आवडला होतास असं तू म्हणतोस?"
"होय. तिला मी आवडलो होतो." एकेका शब्दावर जोर देत तो म्हणाला, "बट शी हेटेड इट. शी हेटेड दॅट शी लाईक्ड मी."
"काय बोलतोयस तू? जर तिला तू आवडला असता तर व्हाय वुड शी हेट इट?" लिफ्ट थांबल्यावर दरवाजा उघडून बाहेर येत माधव खोचकपणे म्हणाला, "अॅन्ड व्हाय वुड शी लाईक यू इन द फर्स्ट प्लेस?" त्याला हे भयंकर मनोरंजक वाटू लागलं होतं.
"का म्हणजे?" खिशातून सिगारेटचं पाकीट काढत किरण गंभीरपणे म्हणाला, "मे बी शी फाऊंड मी फिजिकली अॅट्रॅक्टिव्ह."
"फिजिकली?"
"हो. का नाही? आय वॉज अ व्हेरी अॅक्टिव्ह यंग मॅन अॅट दॅट टाईम. आणि कॉलनीतल्या त्या वयाच्या सगळ्या पोरांमध्ये आय वॉज द वन विथ द मोस्ट स्ट्रेट लिम्ब्ज, हे तुला आठवतच असेल."
त्याने पाकीटातून सिगारेट काढून शिलगावली आणि माधवला दुसरी ऑफर केली.
"हं.." त्याची तेव्हाची आकृती आठवायचा प्रयत्न करत माधव म्हणाला, "ते मला मान्य आहे. पण तेव्हा ती फक्त दहावीत होती बाबा आणि तू नववीत."
"म्हणजे सोळा वर्षांची! क्वाईट द राईट टाईम टू फाईंड समवन अॅट्रॅक्टिव्ह. नो? त्याआधी किंवा कधीही आम्ही बोललेलो नसलो तरी एकमेकांना अनेक वेळा पाहिलं नक्कीच होतं."
त्याने दिलेली सिगारेट पेटवता पेटवता माधव विचारात पडला.
"ओके. वादासाठी असं समजलो की तिला तू आवडला होतास, तर त्या सिच्युएशनमध्ये, 'हा असेल तर मी खेळणार नाही' असं ती का म्हणेल? उलट तिने खूश व्हायला पाहिजे होतं की नाही?"
"येस. तिने खूश व्हायला पाहिजे होतं" वरती बघत धूर सोडत तो हसून म्हणाला, " संस्कार, समाज आणि संस्कृती नसती तर ती नक्कीच खूश झाली असती. बट यू नो हाऊ मेनी टॅबूज वुई हॅव अराऊंड दीज थिंग्ज! त्या वयात कोणाला असं काही वाटण्याची परवानगीच नसते. त्यात तिचं दहावीचं वर्ष होतं आणि मी? मी तर वे आऊट ऑफ हर लीग होतो! आय हॅड नो स्टेटस. ना आर्थिक बाबतीत, ना सामाजिक दर्जाच्या बाबतीत. दॅट्स व्हाय आय थिंक शी हेटेड दॅट शी लाईक्ड मी. आणि तिला त्या दोन्ही भावनांचं विश्लेषण करणं जमलं नाही. मलाही तेव्हा ते कळलं नाही. मला त्या दिवशी खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं अॅन्ड आय डिड नॉट फरगेट दॅट फॉर लाँग टाईम."
थांबून त्याने एक दीर्घ झुरका मारला. माधवनेही काही न बोलता त्याचं अनुकरण केलं.
"जेव्हा आपण असे नियम सिरियसली घेतो आणि त्या नियमांबाहेरचं आपल्याला काही आवडतं ना, तेव्हा आपल्याला स्वत:ची लाज वाटते, घृणा वाटते. त्यामुळे वुई अॅक्च्युअली स्टार्ट हेटिंग द व्हेरी थिंग वुई लाईक्ड!" डोळे बारीक करून कुठेतरी शून्यात पाहात तो बोलू लागला, " खूप काळाने हे मला कळलं आणि मग माझी अपमानाची भावना कमी झाली. माझा अपमान तिने केलाच नाही, अपमान केला असेल तर या नियमांनीच."
माधवला हे खूपच बादरायण वाटायला लागलं होतं आणि आता ते आवरायला पाहिजे होतं. पण तरीही उत्सुकतेपोटी त्याने किरणला डिवचलंच.
"तुला खात्री आहे ते असंच होतं म्हणून?"
"अं?" त्याने माधवकडे एकदा रोखून पाहिलं आणि सिगारेटचा आणखी एक खोल झुरका घेऊन हळूहळू धूर सोडत बराच वेळ गप्प राहिला.
"शंभर टक्के खात्री नाही," थोड्या वेळाने तो हळूच म्हणाला, " कदाचित ती नुसतीच दुष्ट असेल, पण त्याची शक्यता किती आहे?"
"हं.." एवढंच बोलून माधव गप्प राहिला आणि त्याच्या त्या मनोरंजक सेल्फ प्रोटेक्टिव्ह थिअरीचा विचार करत बसला. किरणही कसलातरी विचार करत झुरके घेत राहिला. सिगारेट संपल्यावरही पाचेक मिनिटे ते तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने एक मोठा सुस्कारा सोडून किरण भानावर आला.
"एनी वे, चल मी निघतो. खूपच मजा आली आज." माधवकडे आपला उजवा हात पंजा लढवल्यासारखा धरून तो म्हणाला.
माधवने त्याच्या हाताला हात भिडवल्यावर त्याने तो बळकटपणे दाबला आणि माधवला किंचित त्याच्याकडे ओढून डाव्या हाताने त्याचा उजवा खांदा दाबला,
"नॉर्मली माझ्यासारख्या सड्याफटिंगाला कोणी असं फॅमिली गॅदरिंगमध्ये बोलवत नाही. बट यू डिड. थँक्स फॉर दॅट!"

त्याला बाय करून माधव वरती घरात आला तेव्हा सगळं आवरून मानसी शॉवर घेत होती. तो बेडवर तक्क्याला टेकून रेलला आणि डोक्यामागे हात धरून विचार करत पडून राहिला. मानसी बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली आणि येऊन त्याच्या छातीवर डोकं टेकवून पहुडली.
"तू सिगारेट ओढलीयेस?" थोड्या वेळाने तिने वर न बघताच त्याला विचारलं.
"हो, किरणने ऑफर केली खाली." तो म्हणाला, "इंटरेस्टिंग फेलो ही इज. नाही?"
"हं.." एवढंच म्हणून ती त्याच्या टीशर्ट वरून त्याच्या छातीवर बोट फिरवत राहिली. थोड्या वेळाने तिने डोकं उचलून त्याच्याकडे पाहिलं.
"लाईट्स ऑफ करतोस?"
त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे पुन्हा काचेरी दिसत होते आणि खालचा ओठ उमलायला लागला होता. त्याच्या चेहर्‍यावर स्मित उमटलं आणि एक हात तिच्या खांद्यांभोवती टाकत एक हात लांबवून त्याने दिवे बंद केले.
थोड्या वेळाने त्याच्या धपापणार्‍या कुशीत ती क्लांत शरीराने पडून राहिली तेव्हा तो आश्चर्यानंदित झाला होता. "शी वॉज अ डिफरंट वूमन टुडे," त्याला वाटलं. वाईनचा असा परिणाम असेल तर घरात वाईनची एक बाटली नेहमी ठेवायला हरकत नाही, अशी नोंद त्याच्या मेंदूने घेतल्यावर जडावलेले त्याचे डोळे अलगद मिटले.

त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी एका शुक्रवारी सकाळी ऑफिसला जायच्या आधी चहा घेत तो पेपर वाचत होता. दुसर्‍या दिवशी काही मित्रांबरोबर सहपरिवार एका डे-ट्रीपला जायचा प्लॅन ठरत होता. पेपर वाचता वाचता त्याला काहीतरी सुचलं.
"अरे हो, किरणलाही सांगतो उद्याचं. त्यालाही आवडेल कदाचित जॉईन व्हायला." पेपर बाजूला न करताच तो म्हणाला.
मानसी डायनिंग टेबलवर काहीतरी आवरत होती.
"नको. त्याला नको सांगू." ती तुटकपणे म्हणाली.
"का?" आश्चर्याने पेपरचा कोपरा थोडा दुमडून त्यावरून तिच्याकडे पाहून त्याने विचारलं, " का बरं?"
"काही कारण असं नाही, पण नको." त्याच्याकडे न बघताच मानसी म्हणाली.
"तो एकटा बॅचलर आहे म्हणून?"
"नाही... तसंच काही नाही.. पण नको वाटतं मला." अजूनही ती त्याच्याकडे बघत नव्हती.
"पण का? कारण काय आहे? काही झालं का?"
आता मात्र तिने त्याच्याकडे तीव्र कटाक्ष टाकला. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.
"काही व्हायला कशाला हवं? मला तो आवडत नाही. बस्स. आणखी कारण कशाला पाहिजे?" ती ताडकन म्हणाली आणि वळून बेडरूमकडे चालू लागली. "उशीर होतोय मला. तुझा डबा भरून ठेवला आहे."
पेपर धरलेले माधवचे दोन्ही हात आपसूक खाली आले आणि पेपर त्याच्या मांडीवर चुरगळला गेला. तिच्या पाठमोर्‍याच आकृतीकडे पाहताना त्याच्या भुवया प्रश्नार्थकपणे आक्रसल्या होत्या आणि चेहर्‍यावर बावचळल्यासारखे भाव आले होते. हिला असं एकाएकी काय झालं, याचा त्याने अर्धाएक मिनिट तीव्रतेने विचार केला आणि नंतर खांदे उडवून, चुरगळलेला पेपर झटकून पुन्हा त्याने त्यात डोके घातले.