Tuesday, August 1, 2023

बनचुकने का

ते काय आहे, की माणसाने पुस्तकी गोष्टी जास्त मनावर घेऊ नयेत. म्हणजे उत्तमतेचा ध्यास वगैरे. काही तरी करायचं म्हणजे ते अप्रतिम असलं पाहिजे, मनातल्या अस्वस्थतेचं, आजूबाजूच्या परिस्थितीचं, वर्तमान-भूत-भविष्याचं किंवा मानवी भावभावनांचं त्यात यथायोग्य प्रतिबिंब पडलेलं असलं पाहिजे, झडझडून टाकील असा (हिंदीत झंझोड के रखने वाला) किंवा निखळ-बिखळ असा काही तरी अनुभव प्रभावीपणे व्यक्त झाला पाहिजे वगैरे असल्या विचारांची जळमटं डोक्यात भरून आपण आपल्याच अभिव्यक्तीवर निहलानींपेक्षा अवाजवी आणि अनावश्यक सेन्सॉरशिप लावून घेतो. आजूबाजूला पैशाला पासरीभर लेखक, कवी, नट, दिग्दर्शक, चित्रपटकार असले म्हणून त्यांच्यापेक्षा वेगळं आणि हटके केलंच पाहिजे असं काही नाही. उत्तम वगैरे तर काही संबंधच नाही. उत्तम दर्जा हा पूर्णतः सापेक्षी प्रकार आहे. कोणत्या कंपूसमोर सादर करतो त्यावर त्याचं यश ठरतं. बरं आजकाल शंभर टाळक्यांनी पाहिलं आणि त्यातल्या पन्नास लोकांनी टाळ्या वाजवल्या तरी लगेच यशस्वी झालं म्हणायची सोय आहे. एका "संस्कृतीसंवर्धन" करणार्‍या संस्थेत नुकताच एक एकांकिका पाहायचा योग आला. एकांकिका म्हणजे खो-खो किंवा बास्केटबॉलची मॅच आहे असा माहोल कलाकारांच्या कुटुंबीयांनी तयार करून प्रत्येक प्रवेशाच्या शेवटी जी काही टाळ्यांची लड लावून दिली की बस. कोण्या मराठी न समजणार्‍या माणसाला आणून तिथं बसवलं असतं तर त्याला वाटलं असतं की काही तरी ऑल-टाईम क्लासिक कलाकृती पाहतोय. असं आयपीएल लेव्हलला सगळं आलं की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या, सतत मार्केट, ग्रोथ, व्हिजिबिलिटी वगैरे बोलणार्‍या लोकांना ते ओळखीचं आणि नैसर्गिकच वाटतं. नाटक किया है तो मार्केटिंग, लॉबीईंग भी तो करना पडेगाइच ना. शिवाय अशा "संस्कृतीसंवर्धक" संस्थांच्या पदाधिकार्‍यांना "करून दाखवलं" यातच आणि मिळालेल्या चतकोर पॉवरचा तुकडा चघळण्यातच रस, त्यामुळे वैचारिक सोडता बाकी सगळंच चालून जातं. संस्कृतीसंवर्धन झालं पाहिजे. कोणती संस्कृती ते विचारायचं नाही. संस्कृती ही अशी प्रवाही असते, बरं!  

त्या आधी एका नाटकाचं (अ‍ॅक्चुअली लघुनाट्याचं किंवा स्फुटनाट्याचं म्हणा. किंवा नाटुकलीचं म्हणा अगदीच "हे" असाल तर) रेकॉर्डिंग पाहायला मिळालं. म्हणजे हे स्फुटनाट्य पूर्वी चांगलं तिकीट-बिकीट लावून स्टेजवर वगैरे केलेलं एका स्फुटनाट्यमालिकेचा भाग म्हणून. नशिब माझं मी तिकीट-बिकीट काढून पाहायला गेलो नाही. दहा मिनिटाच्या या स्फुटनाट्यात नाटककाराने भारतीय (बहुतेक एनाराय) भविष्यातली विज्ञानकथा साकारलेली. ज्याच्याकडे मुलं लक्ष देत नाहीयेत असा म्हातारा बाप आणि त्याला सांभाळायला ठेवलेली यंत्रबाई. म्हातारा पोरांना बघायला आसुसलेला आणि एकटेपणाने कावलेला. सणासुदीला की वाढदिवसालाही पोरगा येत नाही वगैरे असं काही तरी होतं आणि म्हातारा भयंकर चिडतो. चिडलेल्या अवस्थेतच यंत्रबाई काय करू विचारते तर हा कावून म्हणतो, "जीव घे माझा!". झालं यंत्रबाई लगेच "आर यू शुअर" वगैरे न विचारता त्याला मारून मोकळी!! मी हतबुद्ध झालो. म्हटलं, अरे, चौथी-पाचवीतल्या वयात विज्ञानकथा वाचायचो तेव्हापासून असिमॉव्ह चे तीन नियम वगैरे आम्हाला माहित आहेत रे! पण प्रेक्षकांमधल्या एकानेही आक्षेप घेतला नाही की हुर्यो उडवली नाही. एकदम सेफ गेम. आणि हा नाटककार बंगालीबाबा त्याच्या वर्तुळात "दा" वगैरे बरं का! काय मस्त रिझर्वेशन आहे बघा! ह्या लोकांचा कंपू असतो वाहवा करायला आणि फक्त तेच महत्त्वाचं. त्यामुळे उत्तमतेचा ध्यास वगैरेपेक्षा आपला कंपू आड्यन्स शोधा आणि त्यांच्यासाठी त्यांना पाहिजे ते करा, टाळ्यांची हौस असेल तर. नसेल तर स्वान्तसुखाय वगैरे आहेच.  

त्याही आधी एकदा काही ओळखीच्या लोकांबरोबर दारू पीत बसलो असताना एकाने कोणातरी नटाची संघर्षपूर्ण जीवनकहाणी सांगितली. ती ऐकताना मला वाटलं की किती अनुभवसंपन्न आयुष्य असेल त्याचं. ज्याबद्दल लिहावं अशा शेकडो घटना घडल्या असतील त्याच्या आयुष्यात. आणि माझ्या सुखवस्तु, सेफ, नोकरदार आयुष्यात अशा फार काही घटना घडत नाहीत आणि अशा अनुभवांअभावी काही सॉल्लिड असं लिहिता येत नाही. आपलं भावविश्व किती संकुचित आहे असं जाणवून, "काय करतोय यार आपण" असं मी म्हणून गेलो. लगेचच एक जण म्हणाला, "स्पीक फॉर युवरसेल्फ" आणि मी चमकलोच. म्हणजे हा काय मास्टरपीस वगैरे करून मोकळा झाला आहे का काय असं वाटलं मला. आणि न्यूनगंडच आला एकदम आणि अपमानितही वाटलं. नाही, म्हणजे मी ही "संस्कृतीसंवर्धन" संस्थेत हौस म्हणून नट वगैरे व्हायचा वगैरे प्रयत्न केला होता. तिथेच एक-दोनदा सूत्रसंचालन करणे किंवा निवेदन लिहून देणे किंवा एक-दोन मराठी स्टँड-अप करणे, कथा लिहीणे वगैरे असे प्रकार केले; पण म्हणून आपण फार भारी करतोय काही असं काय वाटलं नाही कधीच. किंवा नेटवर्किंग करून इकडे तिकडे शिरकाव करून घ्यावा आणि काहीबाही करावे असं केलं असतं तरी काही तरी लै भारी करतोय असं वाटायला आयुष्य गेलं असतं बहुतेक. पण नीट विचार केल्यावर आत्ता कुठं कळालं की अ‍ॅबसोल्यूट भारी असं काय नसतंच. सगळा मार्केटिंग आणि लॉबीईंगचा खेळ आहे. कानेटकर महान नाटककार आणि चारुता सागर वगैरे नावं फार कोणाला माहितही नाहीत असंच जग असतं. शिवाय क्वालिटी वगैरे टेन्शन नाय घ्यायचं; केलं हे महत्त्वाचं, काय केलं ते नाही. त्या एकांकिकेतल्या कलाकारांनी किंवा त्या विज्ञानकथाकाराने केलं आणि ते आता दिग्दर्शक, कलाकार वगैरे झाले. बनचुके. 

मध्यंतरी एका फिल्मसाठी लिहून दिलेल्या हिंदी गाण्याला चाल लावताना त्यातले "जो, वो, ये" वगैरे शब्द संगीतकाराने काढले / हलवले आणि तसं करताना शेवटच्या कडव्यातला महत्त्वाचा शब्द मात्र चुकवून ठेवला. तरीही कोणालाही पत्ता लागला नाही किंवा असं वाटलं नाही की हा शब्द असा असता तर जास्त छान वाटलं असतं. ओळखीच्या लोकांनी कौतुक केलं. संगीतकार मात्र स्वतः ज्याची वाट लावली त्या गाण्याचा गीतकार म्हणून स्वतःचंही नाव घुसडून गाणं स्पॉटिफायवर टाकून मोकळा झाला.    

म्हणून म्हणतो उगीच स्वतःचं दर्जा नियंत्रण वगैरे करत बसायचं नाही. ज्यादा सोचने का नही. बनचुकने का!

Wednesday, June 19, 2019

कृतकृत्य

मनोऱ्याच्या आजूबाजूच्या प्रशस्त आवारात ऐन वसंतात फुललेली फुलं आणि तारुण्याचा उत्सव पाहात विनायकराव आणि सिद्धीकाकू बाकावर बसले होते. मे महिन्यात मायदेशी उन्हाने तलखी व्हायला लागते; पण इथे मात्र अगदी आल्हाददायक वाटत होतं. हवेत गारवा होताच; म्हणून दोघांनीही स्वेटर्स वगैरे घातली होती. सकाळपासून मनोरा व मनोऱ्याच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यात बरीच पायपीट झाली होती म्हणून दोघेही जरा बाकावर विसावले होते. इतकं चालायची सवय नसल्याने हवा आल्हाददायक असूनही जरा दमल्यासारखंच झालं होतं. भवताली मात्र वसंत ऋतूने बहार आणलेली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरची असंख्यरंगी फुलं, झाडाझुडपांची चमकती हिरवी पाने, रस्त्याच्या कडेला असणारी सुंदर कॅफेज, चकाकत्या काचेची दुकाने आणि त्या कॅफेंमधून, दुकानांतून पदपथावर ओसंडणारी सुंदर तरूण-तरुणींची गर्दी. इकडे-तिकडे पाहून मानेला रग लागली तरी विनायकराव पाहातच होते. उंच, सडपातळ आणि दणकट दिसणारे युवक आणि त्यांना लगटून चालणाऱ्या तशाच उंच, सडपातळ, नव्या फॅशनच्या फाटक्या-तुटक्या कपड्यांमध्येही कमालीच्या आकर्षक वाटणाऱ्या युवती. विशेषत: गौरवर्णीय युवक-युवतींकडे त्यांचं जास्त लक्ष जात होतं. वर्षानुवर्षांच्या संस्कारांमुळे गौरवर्णीय स्त्री-पुरुष त्यांना अधिक आकर्षक वाटत होते. गुडघ्यांवर आणि मांडीवर फाटलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे त्यांचे गोरेपान अंग, वर घातलेले पांढरेशुभ्र किंवा धम्मकपिवळे टॉप्स, डोळ्यांवर चढवलेले काळेभोर चष्मे आणि खांद्यावर रुळणारे सोनेरी किंवा काळेभोर केस. तारुण्याला आणि सौंदर्याला नुसतं उधाण आलं होतं चहुकडे. एकमेकांना लगटून, कमरेत हात घालून, भवतालाबद्दल बेफिकीर अशी ती जोडपी तारुण्याचा सोमरस प्यायल्यासारखी धुंदपणे चालत होती. ती धुंदी कमी की काय म्हणून मध्येच थांबून, एकमेकांच्या मानेला बाहुंचा विळखा घालून एकमेकांच्या अधरांमधील मधुरसपान करत होती. ते पाहून विनायकराव उगाचच कानकोंडले होऊन नजर पटकन वळवून भलतीकडे पाहू लागत होते. त्या जोडप्यांचा त्यांना किंचित हेवा वाटला. त्यांच्या तरूणपणी चारचौघात हात धरायची सुद्धा सोय नव्हती; चुंबनं वगैरे तर दूरची गोष्ट. आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न केल; त्यामुळे कॉलेजमध्ये असताना एकत्र फिरणे वगैरे राहिलंच खरं. एकत्र फिरणारेही चोरटे स्पर्श करण्यावरच भागवत होते म्हणा!
 मध्येच त्यांनी एकदम जाग आल्यासारखं बायकोकडे पाहिलं. सिद्धीकाकूही इकडे-तिकडे पाहात होत्या. “तिच्या डोक्यात काय विचार चालू असेल?”, असा विचार येऊन उत्सुकता वाटल्याने विनायकरावांनी त्यांना विचारलं, “काय विचार करतेयस?”
“काही नाही, पाहतेय मजा.”, सिद्धीकाकू उत्तरल्या.
“किती छान वातावरण आहे ना? आणि लोक अगदी मस्त मजा करताहेत”, ते म्हणाले, “अगदी मुक्त वातावरण आहे इथे.”
“हो ना!”, इतकंच बोलून सिद्धी काकू गप्प बसल्या. विनायकरावांचा किंचित विरस झाला आणि ते परत इकडे तिकडे पाहू लागले.
तितक्यात एक उंच, सडपातळ, गौरवर्णीय तरूण जोडपं हसत-खिदळत, एकमेकांच्या कवेत सळसळत त्यांच्या शेजारच्या बाकावर येऊन बसलं. तो मुलगा काहीतरी भराभर गमतीदार बोलत असावा; कारण ती मुलगी किणकिणत हसत होती. विनायकराव मान किंचित तिरकी करून त्यांचं निरीक्षण करू लागले. हसता-हसता त्या मुलीचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन काढला आणि बोलू लागली म्हणून तो मुलगा इकडे-तिकडे पाहू लागला आणि त्याच्या लक्षात आलं की विनायकराव त्याच्याकडेच पाहताहेत. त्या मुलाने हसून मान डोलावली आणि विचारले, “हाय, हाऊ आर यू दुईंग”.  त्याचे उच्चार जरा वेगळे होते.
“आय ॲम फाईन”, विनायकराव पटकन उत्तरले, “नाईस वेदर!”
“येस, ईत्स अ नाईस सनी दे. यू आर तुरिस्त?”
“येस येस. मी ॲन्ड माय वाईफ. वुई केम फ्रॉम इंडिया”
“ओऽऽऽइंदिया, नाईस कंत्री. आय वॉन्त तू गो देर समदे.”
“धिस इज माय वाईफ, सिद्धी”
“हलो, यू केम ऑन ए हनिमून?”
“हाऽहाऽहाऽ”, विनायकराव मोठ्याने हसले, “येस यू कॅन से सेकन्ड हनिमून.”
“नाईस! हाऊ लॉंग हॅव यू बीन मॅरिद?”
“फॉर्टी यिअर्स! वुई गॉट मॅरिड व्हेन आय वॉज ट्वेन्टी फोर!”
“ओह वॉव! फॉर्ती यिअर्स! कॉन्ग्रॅच्युलेशन्स! दॅत्स अमेझिंग! यू मस्त बी इन्सेनली इन लव वित ईच अदर!”
“हूंहूंहूं...थॅंक यू!”, विनायकराव हसून म्हणाले. ते म्हणताना त्यांनी सिद्धीकाकूंच्या दिशेने पाहिले; पण नजरेस नजर देण्याचे मात्र टाळले. त्यांना उगाचच किंचित ओशाळवाणं आणि किंचित अस्वस्थ वाटलं. “इन्सेनली इन लव्ह” वगैरे त्यांना जरा भीतिदायकच वाटलं. आयुष्यात इन्सेनली काहीही केलेलं नसताना तसा आरोप झाल्यासारखे ते कावरेबावरे झाले.
तिथल्या इतर लोकांसारखंच सिद्धीकाकूंना चारचौघात जवळ घ्यावं की काय असं त्यांना वाटून गेलं. अशावेळी वागायचा काय प्रोटोकॉल असतो? काकूंना जवळ घेऊन हलकेच चुंबन वगैरे घ्यावे का? असले काही तरी प्रश्न त्यांच्या मनाला चाटून गेले. काकू मात्र कृतकृत्य समाधानाने हसत होत्या.
“वुई हॅव टू सन्स”, काकू बोलू लागल्या, “माय एल्डर सन वर्क्स हियर. वुई आर व्हिजिटिंग हीम. यंगर सन इज इन इंडिया. पुणे!”
तितक्यात त्या मुलीचं फोनवरचं बोलणं संपलं आणि त्या मुलाने त्यांच्या भाषेत तिला सांगितलं असावं कारण तिनेही तिचे निळे डोळे मोठे करून, “वॉव कॉंग्रॅच्युलेशन्स!” वगैरे म्हटलं.
“थॅंक यू”, विनायकराव पुन्हा म्हणाले.
“दिस इज माय गर्लफ्रेंद, नीना”, तो मुलगा म्हणाला.
विनायकराव आणि सिद्धीकाकूंनी माना डोलावल्या,”आर यू टू प्लॅनिंग टू गेट मॅरिड?”, विनायकरावांनी विचारलं.
“हाहाहा”, ती दोघं हसली आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, “नॉत यत, बत मे बी इन फ्युचर.”, असं तो मुलगा म्हणाला आणि मग एक अवघडलेली शांतता पसरली.
“वेल, ओके, नाईस मीतींग यू तू!”, उठायची तयारी करत तो मुलगा जरा वेळाने म्हणाला,”हॅव ए वंदरफुल ताईम हियर ॲन्द विश यू मेनी मोर यिअर्स ऑफ हॅपी मॅरेज!”. ती दोघं मग उठून परत हातांचे विळखे घालून एकमेकांना सर्वांगस्पर्श अनुभवत चालू लागली.
त्यांच्याकडे काही क्षण पाहात राहिल्यावर विनायकरावांनी सुस्कारा सोडला. सिद्धीकाकूंकडे वळून म्हणाले,”चलायचं आपणही?”
“हो बाई! चला निघू या! अनन्या येईलच थोड्या वेळात शाळेतून.”
गुडघ्यांवर हात ठेवून काकू उठल्या व चालू लागल्या. त्यांच्यापासून फूटभर अंतर ठेवून विनायकरावही त्यांच्या बरोबरीने चालू लागले. 

Sunday, January 13, 2019

परमेश्वराचा अवतार

“परमेश्वराचा अवतार आहे
आमचा महान नेता”,
असं म्हणतात ते
तेव्हा मला कौतुक वाटतं
किती अचूक ओळखतात त्याचं!
कारण,
ज्याचे निर्जीव डोळे लवत नाहीत
स्वत:च्या मंदिरात होणारे
आठ वर्षांच्या मुलीवरचे अत्याचार पाहून.
दानयाचनेसाठी पुढे केलेला हात
सरकत नाही मागे तिच्या किंकाळ्या ऐकून;
अपवित्र वाटत नाही ज्याला
तिच्या रक्ताचे शिंतोडे पाहून;
पण भंगते ब्रह्मचर्य ज्याचे
सॅनिटरी नॅपकिनमध्ये 
शोषल्या जाणाऱ्या रक्ताच्या शंकेने,
असा त्यांचा परमेश्वर आहे!

Saturday, November 10, 2018

सबंधन सप्रेम

आकाशात गडद काळे ढग दाटून आलेले असताना, काळ्या मातीत, वाळलेल्या पिवळ्या गवतात काळ्या-पिवळ्या मादी आणि नर किंगकोब्रांची गाठ पडते. काळी-पिवळी वीज शेतजमिनीत आळोखेपिळोखे घेत जावी तसे ते एकमेकांभोवती आवेगाने विळखे घालून झटपटायला लागतात. काळ्या ढगांतून चंदेरी तेज सरसरत जावे तशी त्यांच्या शरीरातून सुखाची चमक सरसरत जाते. घटकाभर सोसाटल्यासारखं होऊन मग पाऊस पडून जमिनीचा वाफारा निघावा तसे ते थोड्यावेळाने क्लांत होतात. मादीने आपला वंश पुढे चालवायला जोडीदार निवडलेला असतो; आणि नराची मेहनत सुफळ झालेली असते. मग ते दोघे संगतीने राहू लागतात. काही दिवस असेच जातात आणि मग अचानक, निकड न भागलेला दुसरा नर तिथे येऊन ठाकतो.
दोन तडफदार नर किंग-कोब्रा एकमेकांना आव्हान द्यायला जमिनीवरून फूटफूटभर उंच फणा काढून समोरासमोर ठाकलेले. असं वाटतं की आता त्वेषाने एकमेकांवर फुत्कारतील, विषारी दंश करतील एकमेकांना; पण घडतं भलतंच. यत्किंचितही तोंड न उघडता अतिशय डौलदार नृत्य केल्याप्रमाणे ते डोलायला लागतात. एकमेकांच्या डोक्यावर अलगद स्पर्श करायला चढाओढ करतात. बराच वेळ असा खेळ चालतो. कोणी कितीवेळा दुसर्‍याच्या डोक्याला स्पर्श केला ह्याची गणती कशी ठेवतात कोण जाणे; पण नव्या नराची निकड पहिल्या नराच्या बचावाला भारी पडते. पहिला नर निमूट हार मानून निघून जातो. नवा नर त्याला दातही लावत नाही. किती हा उमदेपणा!
नवा नर मग मादीशी जवळीक करु लागतो. तिला ते मान्य असतं का ते कळायला मार्ग नाही; पण दोन्ही नरांनी आपसांत निकाल लावलेला असतो. नवा नर थोडंसं मादीच्या मागे-पुढे करतो, सलगी करायला बघतो आणि कसं कोण जाणे; पण तिला स्पर्श करताना त्याला कळतं की तिच्या उदरात पहिल्या नराचा अंश आहे. दुधात मिठाचा खडा पडावा तसा तो इतकावेळ राजस, उमदा वाटणारा नर क्षणार्धात हिंस्त्र होतो आणि मादीच्या नरडीचा घोट घेतो. ती तडफडते, झटपटते, जीव आणि वंश वाचवायला आकांताने प्रयत्न करते; पण नराच्या पकडीसमोर तिचं काहीही चालत नाही. तिचा जीव पूर्णपणे गेला आहे ह्याची खात्री होईपर्यंत नर तिला सोडत नाही; आणि जीव गेल्याची खात्री झाल्यावर निर्विकारपणे तिचं मृत शरीर ओलांडून सरसरत निघून जातो.

डॉक्युमेंटरी संपली तरी सिद्धार्थ तसाच बसून राहिला त्या प्रसंगाचा विचार करत. त्यातलं क्रौर्य त्याला प्रचंड अस्वस्थ करून गेलं. "पण त्या नागाला क्रूर तरी कसं म्हणणार?", सिद्धार्थचं विचारचक्र गरागरा फिरत होतं, "एका करवंदाएवढा त्याचा मेंदू. त्याला काय विचारशक्ती असणार? त्याच्या जनुकीय प्रेरणेनुसार तो वागला. किंबहुना असं वागणारे कोब्रा टिकले उत्क्रांतीमध्ये म्हणून आज ते तसं आहे, नाही का? त्या नागाला दुसरी काही भावनाच नाही, निव्वळ एका जैविक यंत्रासारखं तो वागणार. त्यात चूक-बरोबर-क्रौर्य-क्षमा-दया-माया हे काहीही नाही. पण समजा त्याला विचारशक्ती असती माणसासारखी तर त्याने सोडलं असतं जिवंत त्याच्या असलेल्या मादीला? समजा त्याला माहित असतं माणसासारखं की, नको असेल तर तो अंश नष्ट करता येईल; तर त्याने त्या मादीला तिच्यातला आधीचा अंश नष्ट करून स्विकारलं असतं त्याच्या वंशाची वाहक म्हणून? त्याला काय, वंश वाढल्याशी कारण ना? की अशी विचारशक्ती असूनही तिला त्याने अपवित्र झाली म्हणून मारलंच असतं?". बेडरूममधून शिल्पाची हाक आल्यावर, अनुत्तरित विचार मनाच्या कोपर्‍यात ढकलून, टीव्ही बंद करून सिद्धार्थ उठला आणि बेडरुममध्ये गेला. शिल्पा शॉवर घेऊन आली होती.

"झोपायचं नाही का?", त्याला पाहून ती म्हणाली.

"हं", तो म्हणाला आणि बेडच्या कडेवर बसून तिच्याकडे पाहू लागला. तिचे केस, तिच्या डोक्याचा आकार, तिचा चेहरा, तिची शरीरयष्टी. एक स्वतंत्र, त्रयस्थ व्यक्ती म्हणून तिचा तो विचार करायला लागला. तिचा सावळा गोड गोल चेहरा पाहून त्याला नेहमीच हृदयात मऊ मऊ वाटायचं; पण कधी तिच्यावर मालकीहक्क असल्यासारखं त्याला वाटलं नाही. "एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती आपल्याला आवडते", त्याला वाटलं,"पण आपल्यातही जनुकीय प्रेरणा आहेतच ना? समजा तिला दुसरं कोणी आवडलं तर?" त्या विचाराने तो चमकला. मनात एकदम गोंधळ झाला त्याच्या. त्या विचाराने एकदम प्रतिक्रिया येण्यापेक्षा आपली प्रतिक्रिया काय असायला हवी ह्याच विचाराने तो गोंधळला. "माणूस कसा प्राणी आहे? किंगकोब्रासारखा?", त्याला प्रश्न पडला.

दिवे मालवल्यानंतरही बराच वेळ त्याला झोप येईना. शेवटी तो स्टडीत येऊन बसला आणि नुकतंच वाचून संपवलेलं "सेपियन्स" रँडमली उघडून वाचायला लागला.

*************************

दहा वाजता बॅडमिंटन खेळून झाल्यावर नेहमीप्रमाणे तो आणि अभिजित चहा घेत बसले होते; तेव्हा विषय निघालाच. डॉक्युमेंटरीबद्दल आणि त्या प्रसंगातल्या क्रौर्याबद्दल त्याने अभिजितला सांगितले.

"हं...", ऐकून बराच वेळ शांत बसून अभिजित शेवटी म्हणाला,"चारित्र्याच्या संशयावरून बायकोला ठार मारणारी माणसंही असतात की. माणूसही शेवटी प्राणीच. तू रिचर्ड डॉकिन्सचं 'द सेल्फिश जीन' वाच. त्यात प्राण्यांच्या वागण्यामागची गेम थिअरी उलगडून दाखवलीय."

"अरे, पण माणूस विचार करणाराही प्राणी आहे. आपलं सगळं वागणं निव्वळ जनुकीय प्रेरणेतून नसतं. तसं असतं तर कायदे-कानून आणि सामाजिक संकेत आलेच नसते ना अस्तित्वात."

"माणूस विचार करणारा प्राणी असला तरी शेवटी विचारांचं मूळ जनुकीय प्रेरणेतच आहे. आपला वंश पुढं चालवण्यासाठी आणि आपली संपत्ती आपल्याच संततीला मिळावी ह्या विचारातूनच स्त्रियांवर बंधनं आली; म्हणजे चुकून दुसर्‍याची संतती आपली समजून त्यांना वाढवण्याचे श्रम घेतले जाऊ नये म्हणून."

"पण हे सगळं शेती करून माणूस स्थिरस्थावर होऊन नागर वसाहती वसल्यानंतर बर्‍याच काळाने झालं. तू 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' वाचलंय का? त्यात माणसांचं वागणं कुठल्या काळात कसं होतं ते लिहिलंय आणि ते वाचल्यावर कळतं की ही निव्वळ जनुकीय प्रेरणा नसून त्या-त्या काळातल्या सामाजिक नीतिकल्पनांवरून माणसांचं वागणं ठरत होतं. एकेकाळी तर स्त्रियांना गाईगुरांसारखीच किंमत होती. अनेक स्त्रियांची मालकी असणे व आलेल्या पाव्हण्याला त्यातली स्त्री देणे वावगे समजत नसत. त्या स्त्रीच्या भाव-भावनांना किंमत शून्य. जसजशी संपत्ती वाढत गेली तसतशी आपल्याच रक्ताच्या वारसाला ती मिळावी म्हणून ह्या कल्पना बदलत गेल्या. सुरक्षेची साधनं व डीएनए टेस्ट्स वगैरे नसल्यामुळे एकमेव उपाय म्हणजे स्त्रीवर बंधनं आणणे. आणि मग पतिव्रता वगैरे संकल्पना आणि त्याचे अफाट उदात्तीकरण."

"हं, खरंय, पण तेव्हा दुसरा उपायच नव्हता ना. आपण कष्ट करुन संपत्ती कमवायची आणि ती दुसर्‍याच्या संततीला मिळाली म्हणजे?"

"बरोबर. तेव्हा उपाय नव्हताच, तेव्हा आजची आधुनिक साधने नव्हती ना."

"आज साधनं आहेत म्हणून फरक पडलाय असं तुला वाटतं? मध्यंतरी तो दीपिका पदुकोणचा 'इट्स माय चॉईस' व्हिडिओ आला होता त्यावर किती टीका झाली होती."

"हो ना... अमोल पालेकरचा 'अनाहत' पाहिलायस का? तो पाहायला गेलो होतो तेव्हा गंमतच झाली. पिक्चर संपल्यावर सगळे बाहेर पडत असताना, आमच्या पुढच्या रांगेत उभ्या असलेल्या काकू त्यांच्याबरोबरच्या दुसर्‍या काकूंना म्हणाल्या "अगं, हा पालेकरांचा पिक्चर आहे ना, मग असं काय?". अमोल पालेकरच्याच पहेलीवरही बर्‍याच लोकांनी नाकं मुरडली होती. स्त्रीच्या कामनांना काहीही किंमत दिली की लोकांना आवडत नाही."

"र.धो.कर्व्यांना किती हाल काढावे लागले माहिताय ना? ते पाहून त्यानंतर सगळे चिडीचूप ह्या विषयावर इतकी वर्षे झाली तरी! बाय द वे, तू ध्यासपर्व पाहिला असशीलच. तोही अमोल पालेकरचाच आहे."

"हो... एकदम डिप्रेसिंग. एकशेतीस कोटी माणसं पैदा करणारा देश आपला आणि".

**************************

शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर सिद्धार्थला निखिलचा फोन आला. तो आणि मोना नदीकाठच्या रेस्टॉरंटमधे बसले होते. मग शिल्पाला तिकडे यायला सांगून सिद्धार्थ तिकडेच गेला. जाऊन बसला नाही तोच निखिलचा प्रश्न,

"वाचलंस का?"

"काय?", सिद्धार्थ गोंधळून म्हणाला.

"स्क्रिप्ट."

"स्क्रिप्ट?"

"मित्रा, महिन्याभरापूर्वी मी तुला नाटकाचं स्क्रिप्ट दिलं होतं वाचायला. वाचलंस का?"

"ओह, ते होय? वाचलं, वाचलं."

"कोणतं स्क्रिप्ट रे?", मोनाने उत्सुकतेनं विचारलं.

"अगं ते 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर'. मी ह्याला दिलं होतं वाचायला; पण ह्याचं काही म्हणणंच नाहीय त्यावर.", निखिल म्हणाला.

"कोण म्हणतं म्हणणं नाहीय? नंतर आपलं बोलणंच झालं नाही ना!"

"बरं मग आता सांग काय म्हणणं आहे."

"तसं चांगलं आहे. थोडं शब्दबंबाळ आहे; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी जी काही तात्त्विक कसरत करुन कोलांटीउडी मारलीय ना नाटककाराने, त्याला तोड नाहीय. कातडीबचाऊ!"

"कोलांटी उडी काय मारलीय?"

"इतकी बडबड करून झाल्यावर काय शोध लावला की, आपल्याला काही करायचं नसतं; फक्त एक्साईटमेंट हवी असते. म्हणजे काही करण्याच्या कल्पनेत एक्साईटमेंट आहे; पण प्रत्यक्ष करण्यात नाही?"

"अरे ए, तसं म्हटलं नसतं शेवटी तर कोणी त्या नाटकाला हात तरी लावला असता का? तसं म्हणूनसुद्धा त्या नाटकाला विरोध होतोच ना?."

"म्हणूनच म्हटलं ना. सगळं शेवटी व्यवहाराच्या गणितापाशी येतं. साहिर लुधियानवी ज्याला ‘दौलत के भूखे रिवाज’ म्हणतो ना ते हेच. नाटक चाललं पाहिजे म्हणून शेवट कसा कोणाच्याही कशालाही धक्का देणारा नको; नाटकभर हूल देत राहिलं तरी. आपल्याला काही करायचंच नसतं कारण व्यवहाराला धक्का बसण्याची भीती असते. काळ बदलला तरी ते पूर्वापार चालत आलेले संपत्तीच्या रक्षणाचे रिवाज तोडायला नकोत; पण तोंडाने आयुष्य भरभरुन जगण्याची, नव्या अनुभवांना भिडण्याची भाषा."

"तू जरा अतिरेकी बुद्धीवादीपणा करतोय असं नाही वाटत का तुला? मलातरी ते नाटक आवडलं. दुर्दैव की ते करता येणार नाही; पण त्यात वावगं काही दिसत नाही मला."

"वावगं नाहीच आहे काही. फक्त जे वास्तवात वाटतंय त्याचं डिनायल करण्याचा, त्या डिनायलला तात्त्विक मुलामा देण्याचा प्रकार आहे नेहमीचा."


********************************

रात्री घरी आल्यावर सिद्धार्थ आणि शिल्पा लिव्हिंग रुममध्ये सोफ्यावर जरा टेकले आणि चाळा म्हणून सिद्धार्थने टीव्ही लावला. टीव्हीवर "जस्ट फॉर लाफ्स" नावाचा कॉमेडी शो चालू होता. रस्त्यांवर, मॉलमध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांवर काहीतरी प्रँक करुन छुप्या कॅमेर्‍याने त्यांच्या प्रतिक्रिया टिपून त्या दाखवत होते. बघता बघता शोमध्ये नवी गंमत सुरु झाली. रस्त्याने जाणार्‍या जोडप्यांपैकी स्त्रीला तिच्या जोडीदाराच्या नकळत विश्वासात घेऊन भलत्याच पुरुषाबरोबर नाचायला आणि तो नाच एन्जॉय करण्याचा अभिनय करायला सांगत होते. जोडप्यातली स्त्री त्या परक्या पुरुषाबरोबर अगदी घसट करून आनंदाने नाचायला लागली की तिच्या जोडीदाराच्या प्रतिक्रिया छुपा कॅमेरा टिपू लागत होता आणि त्या शोचा सूत्रसंचालक मुद्दाम तिच्या जोडीदाराला भडकावून तो काय करतो ते बघत होता.

ते बघता बघता शिल्पाने एकदम वळून विचारलं, "समजा तुझ्यासमोर मी असं कोणाबरोबर नाचत असले, तर तू काय करशील?"

सिद्धार्थने तिच्याकडे पाहिले. तिच्या सावळ्या गोड चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या हृदयात काहीतरी उचंबळून आलं. हसऱ्या चेहर्‍याने तो धीरोदात्तपणे म्हणाला,"तुला मजा येत असेल तर मला काही वाईट वाटणार नाही."

एकाएकी तिचा हसरा चेहरा बदलला आणि हसण्याची जागा रागाने घेतली,"काही वाटणार नाही? म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाहीय?”

सिद्धार्थ एकदम गडबडला. "प्रेम नसण्याचा कुठे प्रश्न येतो इथे? मी फक्त पझेसिव्ह नाही इतकंच. नुसतं नाचलं कोणाबरोबर तर त्यात काय वाटण्यासारखं आहे जोपर्यंत तुला आवडतंय तोपर्यंत?"

"ते काही नाही.. तू विचित्रच आहेस. कुठल्याही नॉर्मल पुरुषाला राग येईल असं पाहून. पण तुला नाही येणार कारण तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही.", इतकं म्हणून ती तणतणत बेडरूम्मध्ये निघून गेली.

सिद्धार्थ अवाक् होऊन तसाच ती गेली त्या दिशेने बघत बसून राहिला. टीव्हीवरचे लोक आता कॅमेर्‍याकडे बोट दाखवून खदाखदा हसत होते.

रापा नुईचे मोआई

समुद्रकिनाऱ्याजवळच्या बागेत बांधलेल्या लाकडी मंडपात बैठक सुरू झाली, तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी रांगेत उभे असलेले टोळीप्रमुखाच्या पूर्वजांचे भव्य पुतळे सोनेरी प्रकाशात चमकत होते. त्या पुतळ्यांकडे अभिमानाने पाहून वंदन करून प्रमुखाने बोलायला सुरुवात केली, “आपल्या सगळ्यांना हे विदीतच असेल की ‘त्यांनी’ बेटावरचा सगळ्यात मोठा पुतळा उभारला गेल्या महिन्यात आणि मुद्दाम आपल्या समोरून मोठी मिरवणूक काढली होती. हा आपल्या पूर्वजांचा अपमान आहे आणि तो आम्ही कदापिही सहन करणार नाही”.
बैठकीत जमलेल्या तरुण मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रमुखाने “राजगुरू” म्हणवणाऱ्या पुजाऱ्याकडे पाहिले. त्याने समाधानाने मान डोलावली.
“ह्या अपमानाचा व अन्यायाचा बदला म्हणून आमचे पूज्य पिताश्री स्वर्गवासी राजेसाहेबांचा त्यापेक्षाही उंच पुतळा बनवण्याचा निर्णय एकमताने घेण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत.”
पुन्हा एकदा टाळ्या-शिट्ट्या-चित्कारांचा कल्लोळ झाला. मंत्रीमंडळातल्या दोन वृद्ध मंत्र्यांनी एकमेकांकडे मूकपणे पाहिलं.
“आपल्या समृद्ध परंपरेप्रमाणे ह्यावर आता चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रथमत: ह्या प्रस्तावाविरोधात मत असणाऱ्यांनी बाजू मांडावी.”
मंडपात शांतात पसरली. मागं उभे असलेले लोक माना वर करून चवड्यांवर उभे राहून कोण उभं राहतंय ते पाहू लागले. म्हाताऱ्या मंत्र्यांपैकी एकजण हळूहळू उभा राहिला.
“आपल्या पूर्वजांचा आदरसत्कार करणे ही तर फारच मोठी पुण्याची गोष्ट आहे ह्यात वाद नाही”, घसा खाकरून तो म्हणाला,”परंतु परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आपल्या बेटावर आता झाडं फार कमी उरलीत. ती झाडं पुतळ्यासाठी तोडण्यापेक्षा वर्ष-दोन वर्षं ती वाढवण्यावर लक्ष देऊ या आणि मग पुतळा बांधता येईल. झाडं कमी उरल्याने आपल्या तरूण मंडळींना होड्याही बांधणे महाग पडतंय. मासेमारीत घट झालीय. त्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ पडताहेत. मुबलक असणाऱ्या गोगलगाई जवळजवळ दिसेनाशा झाल्यात. उंदरांनी उच्छाद मांडला आहे. त्याकडे तातडीने लक्ष द्यावे असे मला वाटते.”, इतकं बोलून तो खाली बसला.
श्रोत्यांमध्ये एकदोन माना अनुमोदनासाठी डोलल्या न डोलल्या, तोच टोळीप्रमुखाच्या जवळच्या काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला. “हा काय आपल्याला दुर्बळ आणि गरीब समजतो काय? अरे, आपल्या शूरवीर पूर्वजांनी ह्या अफाट सागराशी झुंज देत छोट्या होडक्यातून प्रवास करत हे बेट गाठले; आणि आपण ह्या किरकोळ संकटांना घाबरून त्यांचा अपमान होऊ द्यायचा? हा माणूस ‘त्यांच्यासमोर’ आपली मान खालीच घातलेली राहावी म्हणून प्रयत्न करतोय. हा टोळीद्रोही आहे. ह्याला हाकलून ‘त्यांच्यात’ पाठवून द्या.”
हे ऐकून श्रोत्यांमधल्या गरम रक्ताच्या तरूण लोकांनीही आरडाओरडा सुरू केला. शेवटी प्रमुखाने हात वर करून सगळ्यांना शांत केलं.
“आरडाओरडा करणे आपल्या परंपरेला शोभत नाही. शांतपणे प्रत्येकाने आपले मत मांडावे. अजून कोणाला ह्या निर्णयाच्या विरोधात बोलायचंय?”
पुनरेकवार मंडपात शांतता पसरली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. बराच वेळ झाला तरी कोणी पुढं आलं नाही. मग प्रमुखाने पुतळ्याच्या बाजूने बोलणाऱ्यांना आमंत्रण दिलं. राजगुरू तत्परतेने पुढं आले. आपल्या ओजस्वी आवाजात त्यांनी पुनरेकदा पूर्वजांची महती गायली, पुतळा उभारल्याने पूर्वजांना स्वर्गात किती आनंद होईल ते सांगितलं, पुतळा उभारण्याने किती हातांना काम मिळेल ते सांगितलं, पुतळा उभारल्याने टोळीची शान पूर्ण बेटावर सगळ्यात जास्त असेल हे सांगितलं. त्यांचं भाषण संपलं तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने व पूर्वजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला. त्यानंतरही प्रमुखाच्या पुढेमागे फिरणाऱ्यांची अंधार पडून जाईपर्यंत भाषणे झाली; पण निकाल केव्हाच लागला होता.
बैठक संपून लोक आनंदाने पांगले तेव्हा मंडपात दोन-तीन मशाली तशाच फडफडत होत्या आणि दूरवरच्या टेकडीवरची शेवटची दहा-बारा पामची झाडं वाऱ्यावर मूकपणे झुलत होती.

Moai, Rapa Nui National Park, Easter Island (Photo: www.travelnation.fr)




Tuesday, September 27, 2016

सुरळीत

"अबे तुमचं चारचौघांसारखं काही होणार नाही
आन् तुमच्याच्यानं क्रांतीवांतीपण होणार नाही."
ज्योतिषी बोलला खाजवत उघडी केसाळ मांडी,
"तुमच्या बुधावर आलीय शनिची वाकडी दांडी.
कुबेराच्या खजिन्यातले तुम्ही एक छदाम.
अमेरिकेच्या ताब्यातले तुम्ही साले सद्दाम.
गव्हाच्या गोदामातले तुम्ही एक गहू.
तुमच्या रविचा चखणा करतो तुमचाच राहू.
टनभराचा पाय छातीवर घेऊन मुंडी हलवता कशाले?
स्वताची बेंबी सोडून भलतीकडं तुम्ही बघता कशाले?
सगळे ज्या सुरळीतून जातात तिच्यातूनच जावा.
आपलं झालं चांगलं म्हणून गप निवांत ऱ्हावा.
देतो गुरुमंत्र तो म्हणा म्हणजे काय काळजी नाही
म्हणा 'परिस्थिती इतकीही काही वाईट नाही'.
विचार लई करु नै इतकं ध्यानात असू द्या एक
हं निघा आता पण आधी काढा रुपय एकशेएक."

Wednesday, July 13, 2016

सूर्यावरचे वारे

बातमी:http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-2716417/Could-moon-fuel-Earth-10-000-years-China-says-mining-helium-satellite-help-solve-worlds-energy-crisis.html

This is awesome! They are going to mine the moon for Helium-3!
लहानपणी सूर्यावरचे वारे नावाचं भाषांतरित रशियन  पुस्तक वाचलं होतं. बाकी काही नाही तरी नाव लक्षात राहिलं होतं. सूर्यावरचे वारे चंद्रावर येऊन पुढे इतकी मदत करतील असं वाटलं नव्हतं.
दुसऱ्या एका जपानी कंपनीचा, चंद्र Solar planes ने झाकून Microwaves च्या रुपात वीज पृथ्वीवर पाठवायचा संकल्प वाचून असंच भाऽरी वाटलं होतं.
But wait....what? We have an energy crisis? म्हणजे ते peak oil वगैरे खरं आहे की काय? पृथ्वीवरचं ऑईल खूप खोल गेल्याने काढणं परवडत नाही म्हणून चंद्रावरचा हेलियम आणायचा. Makes perfect sense!
पृथ्वीवर सूर्यप्रकाशातून टेरावॅटच्या टेरावॅट ऊर्जा येते असं ऐकलं होतं आणि सोलर टेक्नॉलॉजी लवकरच अतिशय स्वस्त आणि फार एफिशियंट होऊन भरपूर ऊर्जा मिळेल असं ऐकलं होतं. 
थोडक्यात काय येनकेन प्रकारेण कुठूनतरी भरपूर ऊर्जा येणार आहे. त्यामुळे "समजा ऊर्जा मिळाली नाही तर आहे त्या ऊर्जेत कसं भागवायचं? तरीही सगळ्यांना किमान गरजा भागवता येतील अशी अर्थव्यवस्था असणे शक्य आहे का?, लो-एनर्जी भविष्यात स्थानिक कम्युनिटीजमध्ये कोणते social evils टाळायला हवेत? एनर्जी क्रायसिस आणि वाढता प्रोटेक्शनिझम/ वाढता उजव्या विचारसरणीचा प्रभाव ह्यांचा काही संबंध आहे का?" यावर विचार करण्याची काहीच गरज नाही. The party is never going to end!