Friday, September 7, 2012

जुलूस

सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्‍यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्‍यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते.


मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय. वर्गात मागच्या बेंचवर बसून खिडकीतून बाहेर बघणार्‍या मुलांना, ठराविक पद्धतीने निबंध न लिहिणार्‍या मुलांना, ठराविक साच्यातली उत्तरे न लिहिणार्‍या मुलांना वाया गेलेली मुले समजणार्‍या शिक्षणफॅक्टरीतून कशीबशी सर्टिफिकेटं मिळवलेल्या लोकांना स्वतःच्या शंकांच्या योग्यतेबद्दलही शंकाच असतात.

एकीकडे "आराम हराम है" किंवा "Work for all (and more of it)." सारख्या वाक्यांचा येता जाता पवित्र मंत्रासारखी जप करणार्‍या, 'कार्यमग्न' लोकांना पुजणार्‍या आणि काम न करणार्‍यांना ऐतखाऊ म्हणून हिणवणार्‍या व्यवस्थेचे पाईक कामाचे तास कमी करायला का झटतील हे काही केल्या कळत नाही किंबहुना कोणीही स्वतःचा वेळ मोकळा अनुत्पादक का ठेवेल हे "माणसाच्या उपभोगाकांक्षा अमर्याद असतात आणि स्रोत अतिशय मर्यादित" असे ठासून सांगणार्‍या या व्यवस्थेला कसे कळेल हेच समजत नाही (म्हणूनच कामात बदल म्हणजेच आराम वगैरे वगैरे). समृद्धी, शिक्षण वगैरे आल्यावर लोकसंख्या स्थिर होईल असे म्ह्णताना प्रगतीच्या गेल्या साठ वर्षांमध्येच लोकसंख्या दुपटीहून अधिक का वाढली हे कळत नाही आणि आदिमानवाची लोकसंख्या मात्र कोणत्याही समृद्धीविना पन्नास लाखाच्या आसपास कशी स्थिर राहिली हे कळत नाही.

पण सुदैवाने अशा शंकांना आपल्या विचारांनी आधार देणारी माणसे जगात आहेत.

माणसाला आपण स्वत:साठी निर्माण केली आहे असे वाटणार्‍या पण प्रत्यक्षात माणसांपासून बनलेल्या असूनही स्वतंत्रपणे उत्क्रांत झालेल्या आणि कोणत्याही एका माणसाच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या धर्म, सरकारादि यंत्रणांसारखीच "मार्केट" ही एक यंत्रणा उत्क्रांत झालेली आहे आणि माणूस म्हणजे तिच्या प्रभावाखाली तिच्यासाठीच फुकटात काम (Shadow Work) करणारा Homo Economicus झालेला आहे. मोठमोठ्या कंपन्यांची जगातल्या अगदी थोड्या लोकांच्या फायद्यासाठी काम करणारी ही बाजारू यंत्रणा प्रगतीचे ढोल इतक्या मोठ्या आवाजात वाजवत आहे की काय खरं आणि काय खोटं हे न बघताच माणसं त्या तालावर नाचू लागतात. माणसाच्या कोणत्याही गरजेचे संस्थानीकरण हे या यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. इवान इलिच या विचारवंताने माणसाच्या गरजांच्या संस्थानिकरणातून झालेला विपर्यास आपल्या Needs या लेखात मांडला आहे. उदाहरणार्थ शिक्षण या शब्दाचा अर्थ शिकणे असा न राहता पदवी मिळवणे, मार्क्स मिळवणे असा झाला आहे. शिकण्याच्या क्रियेपेक्षा बाजारातून मिळणार्‍या सेवेवर माणसाचे अवलंबित्व निर्माण झाले आहे. शाळेबाहेरच्या खर्‍याखुर्‍या शिकण्याला शिक्षण म्हणायची मान्यताच नाही. माणसाच्या शिकण्याच्या गरजेचे संस्थानिकरण करून बाजाराने बहुसंख्य लोकांची ती गरज भागणे दुरापास्त केले आहे. रुसो म्हणतो,"The noblest work in education is to make a reasoning man, and we expect to train a young child by making him reason! This is beginning at the end; this is making an instrument of a result. If children understood how to reason they would not need to be educated.". पण इथे खरेच शिकायचे कोणाला आहे? आम्हाला तर शिक्षण घेतल्याचा कागद हवा आहे म्हणजे बाजारात आमची किंमत वाढेल आणि मग बाजार उदार मनाने आम्हाला घर, गाडी, टीव्ही वगैरे देऊन आमच्या "गरजा" पूर्ण करेल. ज्यांनी असे शिक्षण घेतले आहे अशा आम्हा लोकांना हे सगळं मिळतं, सुबत्ता मिळते, जगात काय चाललंय याची माहिती मिळते पण आपण खातो ते नक्की कुठून येतं त्याचं ज्ञान मिळत नाही. आपण खातो त्यात नक्की किती पेस्टिसाईड्स आहेत ते कळत नाही. उत्पादकाने लावलेल्या "Organic" लेबलवर विश्वास ठेवण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. समजा नाहीच ते घ्यायचं म्हटलं तर दुसरं काय खायचं त्याचं ज्ञान नाही. आम्ही फक्त बाजाराच्या जगङ्व्याळ यंत्रात एखाद्या स्क्रूप्रमाणे एखादे अतिविशिष्ट काम करत बसतो ज्याचा संबंध आम्हाला आमच्या रोजच्या जगण्याशी लावता येत नाही. आमच्या अतिप्रचंड लोकशाही यंत्रणेतले आम्ही एक नगण्य भाग आहोत ज्यांना आशेशिवाय काहीही करता येत नाही. हळूहळू ही काही न करण्याची आम्हाला सवय लागलेली आहे आणि आमची हवा, आमचं पाणी आणि आमच्या अन्नाचं बाजारीकरण होतानाही आम्ही पाहात राहतो. आम्ही मानसिकरित्या षंढ केले गेलो आहोत. इतके की बाजाराने पवित्र ठरवलेल्या वस्तुंना आम्ही नाही म्हणू शकत नाही, त्यांच्यापुढे आम्ही आनंदाने मान झुकवतो. "Holy Cow" म्हणणार्‍या आमच्या पूर्वजांना आम्ही वेड्यात काढून "Holy Car!" म्हणतो. "गाय हमारी माता है
" म्हणणार्‍यांच्या वंशातले आम्ही आता कारसेवा करतो. कारसाठी आम्ही जमिनीवर डांबर ओतून आखीव-रेखीव रस्ते बनवतो. कोणत्याही दिशेने चालू लागण्याचे आमचे स्वातंत्र्य घालवून ठराविक मार्गाने जायचे नियम पैसे देऊन विकत घेतो आणि त्या पैशांसाठी जास्तीचे कामही करतो. सर्वसाधारण अमेरिकन माणूस कार असूनही त्याच्या आदिम पूर्वजाइतका चालतोच फक्त लॉबी, पार्किंग आणि कॉरिडॉर्समध्ये. इलिच म्हणतो "The model American puts in 1600 hours to get 7500 miles: less than five miles per hour. In countries deprived of a transportation industry, people manage to do the same, walking wherever they want to go, and they allocate only 3 to 8 percent of their society's time budget to traffic instead of 28 percent".

"हेल्थ" या आणखी एका संस्थानिकृत अतिप्रिय गरजेचाही आम्ही या अतिपूज्य कारसाठी त्याग करतो. कॅन्सरच्या नावाने गळे काढणारे आम्ही कारच्या नळीतून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन सायनाईडसारखे घातक कर्कजनक वायू मुकाट आमच्या फुप्फुसात भरून घेतो.

रस्त्यावर भारतात एक लाखाच्यावर बळी घेणार्‍या या कारसाठी सरकारने लाल गालिचा अंथरला आहे. किरकोळविक्री क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात काचकूच करणार्‍या सरकारने कारनिर्मिती क्षेत्रात आपले दरवाजे सताड उघडे ठेवले आहेत आणि वीस वर्षांत जगातले ऑटोमोबाईल हब व्हायचे स्वप्न बाळगले आहे. त्यासाठी मोठमोठे रस्ते बांधणे, त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी हडपणे जोमात चालू आहे.

त्याचवेळी या कारसाठी इंधन कमी पडणार हे पाहून नवनव्या इंधनाच्या शोधात मार्केट आहे आणि मार्केटच्या सुपीक डोक्यातून "जैवइंधनाचे" एक नरभक्षक पिल्लू बाहेर पडले आहे. २०५० पर्यंत जगाच्या ऊर्जेच्या २५% ऊर्जा जैवइंधनातून मिळेल असा अंदाज आहे. अर्थातच त्यासाठी आधीच कमी असलेली जमीन द्यावी लागणार. लाखो वर्षे जुनी जंगले तोडून तिथे पामची किंवा जट्रोफाची लागवड करावी लागणार (मलेशिया आणि इंडोनेशियाने यात भारतापेक्षा जास्त प्रगती केली आहे).माणसांना खायला नसेल मिळत पण इंधनासाठी ऊस आणि मका उपलब्ध करून द्यावा लागणार. मग अन्नधान्याच्या किंमती वाढताहेत तर वाढू द्या.

UN च्या फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (FAO) भूक कमी करण्याची काही ध्येये ठरवली होती. अगदी आकडेवारीनिशी. पण २००६ नंतर अन्न-धान्याच्या किंमती इतक्या वाढल्या की जगातल्या दीर्घकालीन उपाशी लोकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढायला लागली आणि २००९ मध्ये एक अब्जापेक्षा जास्त होईल असा अंदाज निघाला. मग FAO ने एक युक्ती केली. ध्येय ठरवण्यासाठी आकडेवारी वापरायचेच सोडून दिले. म्हणजे उपाशी लोकांची संख्या अमुक इतकी कमी करू असे न म्हणता फक्त "आम्ही उपाशी लोकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करू" असेच ध्येय ठरवले गेले.

जगातल्या वरच्या १० टक्क्यातल्या लोकांना पोषणमूल्यांनी भरपूर असा बहुढंगी आहार मिळतो, पण हे भाग्य सगळ्यांच्या नशिबी नाही. FAO च्या त्याच अहवालातला हा परिच्छेद पाहा:

"Biodiversity, another essential resource for agriculture and food production, is threatened by urbanization, deforestation, pollution and the conversion of wetlands. As a result of agricultural modernization, changes in diets and population density, humankind increasingly depends on a reduced amount of agricultural biological diversity for its food supplies. The gene pool in plant and animal genetic resources and in the natural ecosystems which breeders need as options for future selection is diminishing rapidly. A dozen species of animals provide 90 percent of the animal protein consumed globally and just four crop species provide half of plant-based calories in the human diet."

प्रदूषणाने वातावरणावर परिणाम होतो म्हणून मार्केटने एक युक्ती काढली आहे. वातावरणाचं खाजगीकरण! म्हणजे वातावरणाचे हक्क आजवर ज्यांनी प्रदूषण केले आहे त्याच लोकांना वाटून द्यायचे. मग त्यातले काही लोक थोडंसं प्रदूषण कमी करतील आणि वाचलेला आपला "कोटा" इतरांना विकतील म्हणजे ते प्रदूषण करायला मोकळे. "कार्बन ट्रेडींग" या आपल्या पुस्तकात लॅरी लोहमानने पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांच्या मालकीचं आणि हक्काचं वातावरण या मार्केट इकॉनॉमिने प्रदूषणकर्त्यांना कसं परस्पर आंदण दिलं आहे याचा खुलासा केला आहे.

२०५० पर्यंत ९ अब्ज होणारी लोकसंख्या, तिला पोसण्यासाठी ७०% जास्तीच्या अन्नाची गरज असताना इतर कामांसाठी वापरली जाणारी जमीन, अन्न-धान्यांच्या बियाणांची कमी कमी होत जाणारी उत्पादनक्षमता, जेनेटिक्सच्या माध्यमातून कंपन्यांचा त्यावर नियंत्रण आणण्याचा कावा, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य, मरू घातलेले समुद्र, वाढती विषमता असं सगळं असूनही जणू काहीच प्रश्न नाही असा आव आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही मार्केट इकॉनॉमी करते.

त्या बाजाराच्या चमचमाटापुढे हतबल होऊन माणूस पुढ्यात आलेल्या गोष्टींचा उपभोग घेत राहतो, नवे नवे तंत्रज्ञान, नवे फोन, नवे संगणक, नवे टीव्ही येतच राहतात आणि अखेर मार्केटच माणसाचा उपभोग घेऊ लागते.

असा आपल्या प्रत्येक गरजेचा गुलाम झालेला माणूस त्या गरजा पूर्ण होत नसतानाही त्याच्या आभासासाठी रात्रंदिवस खपत राहतो. आयुष्यातला एक तृतीयांश भाग काम करण्यात आणि एक तृतीयांश भाग झोपेत काढल्यावर उरलेल्या वेळात माणूस आपण सुखी आहोत असे स्वतःला ओरडून ओरडून सांगत राहतो पण मार्केटच्या प्रगतीच्या जुलूसात त्याचा आवाज त्याला स्वत:लाही ऐकू येत नाही.

१. Fekri Hassan, Demographic Archaeology (New York: Academic Press, 1981). Cited in "My Name Is Chellis And I Am In Recovery From Western Civilization"
२. Vandana Shiva, "Soil Not Oil" (Southpress)