Saturday, February 1, 2014

सोयीस्कर गांधीवाद

Premise Four: Civilization is based on a clearly defined and widely accepted yet often unarticulated hierarchy. Violence done by those higher on the hierarchy to those lower is nearly always invisible, that is, unnoticed. When it is noticed, it is fully rationalized. Violence done by those lower on the hierarchy to those higher is unthinkable, and when it does occur is regarded with shock, horror, and the fetishization of the victims.
                                                                                   -Derrick Jensen (Endgame)

The world has enough for everyone's need, but not enough for everyone's greed
                                                                                   -M.K.Gandhi

The hottest places in hell are reserved for those who, in a time of moral crisis, remain neutral.
                                                                                  -Dante Alighieri

We have met the enemy and he is us.
                                                                                  -Pogo


आम्हाला बापूजींबद्दल अतीव आदर आणि अभिमान आहे. गांधीजींचे विचार आज जगभरात मान्यताप्राप्त झाले आहेत. मोठमोठ्या महासत्तांचे नेते आज त्यांच्या भाषणात गांधीजींचे नाव आदराने घेतात. विश्वशांती आणि अहिंसा म्हटले की पहिले नाव आठवते ते गांधीजींचेच. आम्ही गांधीजींच्या विचारांचे अभ्यासक, पाईक आणि प्रचारक आहोत आणि इतरांनी ते विचार अंगिकारले पाहिजेत असा आमचा आग्रह असतो.

आम्ही - जगातल्या सांपत्तिकदृष्ट्या वरच्या वीस-पंचवीस टक्क्यांतले लोक. आम्ही - त्या वीस-पंचवीस टक्क्यांतल्या वीस-पंचवीस टक्के लोकांसाठी काम करणारे लोक. आम्ही - मालकीहक्काची व त्यातून निर्माण होणार्‍या उतरंडीची (मराठी: हायरार्कि) प्राणपणाने जपणूक करणारे लोक. आम्ही - जगातल्या ऐंशी टक्के संपत्तीची मालकी बाळगून असणारे लोक. आम्ही - जगातल्या गाड्यांपैकी, इंधनापैकी व स्रोतांपैकी मोठा भाग  स्वतःसाठी वाढत्या प्रमाणावर वापरणारे लोक. आम्ही - पर्यावरणावरच्या अनिष्ट परिणामांचा व स्रोतांच्या टंचाईचा अभ्यास करू शकणारे शिकलेले लोक. आम्ही - त्या अभ्यासाच्या अनुमानानुसार योग्य ती धोरणे ठरवू शकणारे लोक. आम्ही - आमच्या उपभोगातून उडालेल्या खरकट्यावर खालच्या लोकांनी जगावं अशी अपेक्षा करणारे लोक. आम्ही - हे सगळं आपण आहोत हेही न कळणारे लोक. आम्ही - ते कळूनही सामूहिकरित्या काहीही करु न शकणारे लोक. आम्ही - कामाच्या ठिकाणी रिसोर्स आणि त्याच्या बाहेर कन्झ्युमर असणारे लोक.

असे आम्ही गांधीजींच्या विचारांचे पाईक असलो तरी त्यातले कोणते विचार पाळायचे आणि कोणते टाळायचे ते आम्हाला आपोआप समजते. उदाहरणार्थ नुकताच लोकसत्तात आलेला हा लेख पाहा. वाढती लोकसंख्या, घटते स्रोत आणि बिघडते पर्यावरण ही संकटत्रयी ढळढळीत समोर दिसत आहे, येत्या दशकभरातच त्याची झळ लागायला सुरुवात होणार आहे हेही कळते आहे. अशा परिस्थितीत आपल्यापुढे काय पर्याय आहेत हेही माहित आहे. ते अंमलात आणण्याचे सगळे मार्ग, साधने आणि वेळ हाताशी आहे. पण काय करणार? ते पर्यायी विचार आम्हाला पटत नाहीत ना! स्वयंपूर्ण खेडे किंवा स्वयंपूर्ण माणूस अशी कल्पनाही आम्हाला अव्यवहार्य वाटते. त्या उलट सगळा बाजार आहे आणि प्रत्येकजण काही ना काही विकत असतो हे तत्त्वज्ञान आम्हाला सहज आणि नैसर्गिक वाटते. जिच्या मांडीवर आम्ही जन्मलो ती आमची इंडस्ट्रियल इकॉनॉमी आम्हाला आमच्या आईपेक्षा जास्त प्रिय आहे आणि ती टिकवण्यासाठी सर्वसमावेशक विकास वगैरे पोपटपंची करायला आमचे गांधीप्रेम आडवे येत नाही, किंबहुना त्याची मदतच होते.

गांधींच्या आम्हाला आवडणार्‍या विचारांपैकी सगळ्यात प्रमुख विचार म्हणजे अहिंसा! गांधीजींच्या अहिंसेला घाबरून इंग्रज हा देश सोडून पळून गेले असे आम्ही लहान मुलांना व भोळ्या-भाबड्यांना सांगतो. गांधींचे हे विचार दूरदूरच्या कानाकोपर्‍यांपर्यंत, तिथे राहणार्‍या आदिवासींपर्यंत पोचतील याची काळजी घेतो. एका गालावर मारली तर दुसरा पुढे करावा हे त्यांनी शिकणे गरजेचे आहे कारण नंतर आम्ही त्यांच्या जमिनींवर धरणे आणि खाणी बांधायला जाणार तेव्हा त्यांनी विरोध न करता उलट दिलेली नुकसानभरपाई घेऊन आनंदाने अत्यंत कमी पगारावर तिथेच नोकरी करण्यात उपकार मानणे आमच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाचे आहे. कोणी त्याला हिंसक विरोध करु लागला की आमचा सात्त्विक संताप होतो आणि आपले अहिंसक सैन्य आपल्या अहिंसक बंदुका घेऊन तिथे पाठवून त्या लोकांना चांगला प्रेमाने धडा शिकवावा असे आम्ही पोटतिडीकीने बोलतो. त्यांची हजारो वर्षे टिकलेली जीवनव्यवस्था बदलून पुढची दोनशे वर्षेतरी टिकेल की नाही याची शाश्वती नसलेली जीवनव्यवस्था त्यांच्यावर लादण्याचे पुण्यकर्म केल्याची त्यांना योग्य ती जाणीव नसल्याच्या भावनेने खंतावतो.

गांधीजींचा दुसरा आवडणारा विचार म्हणजे प्रतिकात्मक कृती. आमच्या इंडस्ट्रियल यंत्रातला आम्ही एक नगण्य भाग असल्याने ठराविक परिघातच फिरण्याचे आमच्यावर बंधन असते त्यामुळे प्रत्यक्षात फरक पडेल असे काही करण्याएवढा आमच्याकडे वेळही नसतो आणि तेवढी शक्तीही नसते. त्यामुळे गांधीजींच्या चरख्यासारखी प्रतिकात्मक कृती आम्हाला अत्यंत सोयीस्कर वाटते. एखाद्या वीकेंडला जाऊन पीडितांच्याबरोबर एखादा दिवस काढणे, त्यांच्या बरोबर गाणी म्हणणे, मेणबत्त्या लावणे, घोषणा देणे इत्यादी प्रकार करून ज्या व्यवस्थेला आम्हीच आधार दिला आहे तिचाच प्रतिकात्मक निषेध करणे त्यामुळे किती सहज जमते.

गांधीजींचा तिसरा आवडणारा विचार म्हणजे अध्यात्मिक बैठक. ही बैठक एकदा जमली की आजूबाजूच्या कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना माणसाच्या मनाची शांती ढळवू शकत नाहीत. गाडीच्या काचेतून फक्त सुरम्य गोष्टीच दिसण्याची व्यवस्था होते आणि ज्ञानसाधनेतही आपल्याला हवे तेच आणि व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचेच ज्ञान डोक्यात जायचीही व्यवस्था होते. काही लोक याला ज्ञानियांची तटस्थता म्हणतात काही लोक याला स्वतःची सोबत म्हणतात. काही खवचट लोक याला भावनाशून्यताही म्हणतात. या बैठकीसाठी मग आपल्या परिघातल्या परिघात दुसर्‍यांना त्रास होतील असे बदल करून आपले माहात्म्य सिद्ध करता येते. म्हणजे उदाहरणार्थ, मी वेगन आहे किंवा मी कांदा-लसूण खात नाही असे जाहीर करून जिकडे जाऊ तिकडच्या लोकांची पंचाईत करून त्यांना न्यूनगंड देता येतो. मी रात्री फक्त फलाहारच घेतो असे म्हणून लाखो लिटर इंधन जाळून, लाखो जीवांच्या जिवावर उठलेल्या रस्त्यावरून आणलेली फळे आनंदाने  स्वतःच्या अध्यात्मिक तेजात निथळत मिटक्या मारत खाता येतात.

गांधीजींच्या ब्रह्मचर्य आणि अल्पसंतुष्टता या विचारांना पूर्णपणे दुर्लक्षित करुनही आम्ही पूर्ण गांधीवादी असू शकतो. गांधीवाद सगळा अंमलात आणणे आवश्यक नाही. किंबहुना अंशत:ही अंमलात आणणे आवश्यक नाही. तो अंमलात आणतो असा आव आणला तरी पुरे आहे. खरेतर त्याचीही गरज नाही. गांधी महान होते आणि त्यांचे महान विचार मला पूर्णपणे मान्य आहेत असे फक्त म्हणणे पुरेसे आहे. असा हा सोपा, सैलसर आणि सोयीस्कर असा गांधीवाद आम्हाला अत्यंत प्रिय असणार यात काय संशय?  

1 comment:

  1. हा सोयिस्करपणा फक्त गांधी या विषयाबाबत नाही, तर इतरही अनेक विषयांबाबत आहे. आध्यात्म वगैरे तर सोडाच, पण ‘भ्रष्टाचार विरोधी’ एखाद्या वाक्याला फेसबुकवर लाईक ठोकायचे आणि थोड्या वेळात पोलिसाला पैसे देऊन ‘नो पार्किंग’ मधली गाडी सोडवून घ्यायची – हे नेहमी दिसणारे दृश्य. उथळपणा हा अविभाज्य भाग असतो आपल्याकडे.

    ReplyDelete