भूत भविष्य भासच नुसते विश्व नवे क्षणोक्षणी
जमती उठती मैफिली इथे विरती वाऱ्यावरती गाणी
आरंभातच बीज अंताचे गूढ अटळ ही दैववाणी
दुःख क्षणाचे हर्ष क्षणाचा मी तर अळवावरचे पाणी
Thursday, December 30, 2010
कागद
पोतं भिंतीला टेकवून ठेवलं आणि भिंतीकडेच तोंड करून तिने गुपचूप पदराआड पाकीट उघडलं. आत दहाच्या चार पाच आणि पन्नासची एक नोट होती. एवढे पैसे पाहून तर ती घबाड मिळाल्यासारखी हरखून गेली. पटकन ते पैसे तिने कनवटीला लावले आणि पाकीट दिलं पोराला खेळायला. तिने समाधानाने एक खोलवर श्वास घेतला. रोज तिला त्रास देणारा गरम बटाटेवड्याचा आणि मिसळीचा वास आज तिने आनंदाने छाती भरून घेतला. कित्येक दिवसांनी तिला आज नुस्त्या वासावर समाधान न मानता प्रत्यक्ष चव चाखायला मिळणार होती आणि तीही पोटभर खाऊन.
ती टपरीजवळ गेली आणि पाच-सहा रुपये खर्चून तिने गरमागरम वडे, पाव आणि मिसळीचा झणझणीत रस्सा घेतला. तिथेच पडलेला कालचा शिळा पेपर तिने उचलला आणि पुनः पोत्याजवळ येऊन बसली. थोडी भिंतीला आणि थोडी कागदाच्या पोत्याला असं थाटात रेलून बसून तिने पेपर खाली अंथरला आणि त्यावर खाद्यपदार्थ ठेवले. तिने मिसळ पावाचा एक घास घेतला आणि डोळे मिटून त्या चवीचा तवंग सर्वांगावर पसरताना पाहत राहिली. तिने डोळे उघडून पाहिलं तेव्हा पोरगं पाकीटात सापडलेल्या लॉटरीच्या तिकीटाशी खेळत होतं. शंभर रुपयांच्या नोटेपेक्षाही मोठं आणि रंगीबेरंगी तिकीट निरखून पाहण्यात ते गुंगून गेलं होतं. तिने त्याला हाक मारली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि आई काहीतरी खायला बोलावतेय हे पाहून हातातलं तिकीट टाकून ते आईकडे पळालं. त्याला तिने एक घास भरवला आणि दोघं एकमेकांकडे पाहून समाधानाने हसली. अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं.
Sunday, December 26, 2010
अ ख्रिसमस मिरॅकल
Thursday, December 23, 2010
माझे छळवादी.
ऑफिसमधली ऐन कामाची वेळ. मी अगदी कॉम्पुटरच्या स्क्रीनमध्ये घुसून कामात एकाग्र झालेलो. बाकीचेही लोक कामात गर्क. अगदी पिनड्रॉप नाही तरी ऑफिसमध्ये बऱ्यापैकी शांतता. अशा या कर्मसमाधीत एकतान झालेलो असताना अचानक कानावर समाधीतून ओढून काढणारा आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगा आवाज येतो "फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..". मी डोळे बंद करतो, दात आवळतो आणि सर्वांगातून जाणारी संतापाची सणक कमी व्हायची वाट पाहतो. खोल श्वास घेउन डोकं थोडं शांत झाल्यावर मी वळून पाहतो. अपेक्षेप्रमाणे माझा एखादा कॉफी पिणारा किंवा सॅन्डविच खाणारा किंवा डब्यातला भात खाणारा देशबांधवच त्या आवाजाचा स्त्रोत असतो. मी वळून पहिले म्हणजे काहीतरी गडबड आहे ही शंका त्याला यावी ही माझी अपेक्षा फोल ठरवत तो मला एका गोग्गोड स्माईल देतो. मी मलूलपणे हसून त्याने तोंड आणखी उघडून विश्वरूप दर्शन द्यायच्या आत पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागतो. त्यानंतर त्याचं खाणं-पिणं होईपर्यंत माझं लक्ष कामात लागत नाही आणि बहुतेकवेळा मी पाणी प्यायला म्हणून उठून जातो.
कामाच्या दिवशी सकाळी साडेसातला मी ट्रेन पकडतो तेव्हा बरीच गर्दी असते पण त्यात माझे देशबांधव फारसे दिसत नाहीत. पण जर कधी उशीर झाला तर ट्रेनमध्ये देशबांधवांची संख्या बरीच दिसते. देशबांधव चेहरेपट्टीवरून तर ओळखू येतातच पण आणखी एक व्यवच्छेदक लक्षण आहे. ते म्हणजे पाठीवर अडकवलेली सॅक. व्यवस्थित फॉर्मल किंवा सेमीफॉर्मल कपडे घातल्यावरही सॅक पाठीला कशाला हवी हे मला कळत नाही. इतर लोक छानपैकी स्टायलिश ऑफिसबॅग्ज वापरत असताना आपण अगदी लुई व्हीटन नाही तरी एखादी साधी पण चांगली दिसणारी बॅग वापरावी असं का वाटत नाही कोण जाणे. असो ज्याची त्याची आवड. त्याचा त्रास नाही. त्रास संध्याकाळी होतो. संध्याकाळी घरी जाताना गर्दीच्या वेळी हे सॅकधारी बरेच दिसतात आणि सॅक पाठीवरून न काढता गर्दीत घुसतात आणि मग गर्दीत जसे जसे लोक चढतील उतरतील तसे तसे त्यांना जागा करून देताना इकडे तिकडे हलतात आणि आपल्या सॅकने मागे उभ्या असलेल्या माणसाच्या छातीला, पोटाला किंवा जमलंच तर तोंडालाही छानपैकी मसाज करतात. जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बऱ्याच डब्यांचा वास अंगात जीरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही.
हे झालं कामाच्या दिवशीचं. सुट्टीच्या दिवशी देशबांधव सहकुटुंब बाहेर पडतात आणि या कुटुंबांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यांच्याबरोबर असलेली बाबागाडी आणि त्यात एक बाबा किंवा बाबी.
परदेशात नोकरी करायला शक्यतो तरुण जोडपीच येतात पण तरुण असूनही मूलबाळ अजून न झालेल्यांचं प्रमाण दहात एक असावं. पंचवीस-सव्वीस वयाच्या जोडप्याला एक-दोन वर्षांचं एक आणि तीस-बत्तीस वयाच्या जोडप्याकडे ४-५ चं एक आणि १-२ चं एक असं साधारण चित्र असते. छान सुखी कुटुंबे. असं एखादं कुटुंब ट्रेनमध्ये शिरतं, त्यांच्याकडे असलेल्या बाळाकडे पाहून जागा करून दिली जाते. बाळाची आई आणि बाळ बसते तो पर्यंत ठीक पण ५०-६० वर्षांच्या व्यक्तींनी दिलेली जागा घेउन बाळाचा तिशी-पस्तीशीतला बापसुद्धा बसून घेतो. लांब उभं राहून मी आपला बघतो.
चित्रपटाच्या तिकीटाची रांग असो की बसच्या तिकीटाची माझ्या मागे जर एखादा देशबांधव येउन उभा राहिला तर माझा थरकाप होतो. बऱ्याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसऱ्या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या.
तसा मी माणूसघाणा नाही आणि लोकांचं निरीक्षण करून त्यांना नावं ठेवणे मला आवडत नाही. पण कधीकधी काहीकाही गोष्टी अगदीच सहन होता नाहीत. विशेषत: आपले देशबांधव असं वागताना पाहून वाईट वाटते. आपण आपल्या संस्कृतीचे इतके गोडवे गातो मग हे साधे संस्कार का नसावेत लोकांवर? दुसऱ्यांबद्दल जराही संवेदना नसावी?
या असल्या वागण्याने एक समाज म्हणून, एक देश म्हणून आणि एक संस्कृती म्हणून आपण काय चित्र उभे करतो जगासमोर? हे आणि असलेच निष्फळ, निरर्थक आणि फालतू विचार मनात येउन मी आपला उगीच माझाच छळ करत बसतो.
Sunday, December 19, 2010
पूल लाईफ
थोड्या वेळाने म्हणजे साधारण चाळीशीच्या आसपास पाण्याचा अंदाज येतो, कुठे कसा प्रवाह आहे ते कळायला लागतं, पाण्याची आणि आपली ओळख झाल्यासारखी वाटते आणि मग कमीत कमी प्रयत्नात आपण सहज पोहू लागतो, पोहण्याची एक मस्त मजा यायला लागते आणि अनंतकाळ असंच पोहत राहावं असं वाटू लागतं. आता पोहोण्याकडे लक्ष न देताही आपण वेगात जात असतो आणि तरीही आजूबाजूला पाहून कोवळे उन, आजूबाजूची झाडं, माणसं यांचं निरीक्षण करू शकतो. पण मग हळू हळू संध्याछाया दाटू लागतात. अंधार पडू लागतो आणि शरीरही दमायला लागतं. पुन्हा पोहण्याची लय चुकू लागते आणि इकडे तिकडे पाहताना मध्येच नाका-तोंडात पाणी जाते. आपल्या आधी आणि बरोबर पूलमध्ये उतरलेले हळू हळू निघून जातात. तरीही हट्टाने आपण काही काळ पोहतच राहतो. पण थोड्यावेळाने अगदीच कंटाळा येतो. मगाशी सुखकारक वाटणारी तंद्री आता कंटाळवाणी वाटू लागते. उन्हं जाउन आता अंधार पडल्याने बाकीचं काही दिसतही नसतं. मग एका क्षणी आपण निर्णय घेतो आणि पूलच्या बाहेर येतो, पूलच्या जगातून निघून जातो.
सो फार सो गुड. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्याचं प्रतिबिंब पूलमध्ये सहज मावतं. पण मग विचार येतो की पूल मध्ये पोहणं आयुष्यासारखं आहे हे म्हणणे जेवढे बरोबर आहे तेवढेच आयुष्यच पूल मध्ये पोहोण्यासारखं आहे हे म्हणणे बरोबर नाही का? पद्धतशीरपणे आखलेल्या चाकोऱ्यामधून, ठरलेल्या मार्गांनी, हवे ते आधार घेउन माझं पोहणं चालू असतं. त्यातच काही ठरलेल्या स्पर्धा आणि ठरलेले पाडाव गाठल्याचा ठरलेला आनंद आणि सुखाच्या ठराविक कल्पना. पोहण्याचे सगळे आधार आणि जमा केलेल्या वस्तू प्राणपणाने जपत पोहणं संपेपर्यंत जास्त खोल नसलेल्या पाण्यात येरझाऱ्या घालणे. खुल्या समुद्रात पोहणारे वेगळेच. कधी त्यांना मोती मिळतात तर कधी अकाली जलसमाधी पण जितके पोहतात, धुंदीत पोहतात.
Saturday, December 18, 2010
संचित
पुढे पुढे सरकत जाणारा काळ हेच त्यावर काय ते औषध. एक रीवाईंड न होउ शकणाऱ्या टेप प्रमाणे आयुष्य पुढे सरकत जाते, नवीन अनुभवांची नवीन गाणी वाजतात, नवे चरे, नव्या डागण्या पडतात. जुन्या जखमांवर काळ खपली टाकत जातो. त्या खपल्या प्रयत्नपूर्वक विसरत, पुन्हा निघू न देण्याची काळजी घेत नव्या अनुभवांना सामोरे जाणे ज्याला जमले तो सुखी.
हे शहाणपण ज्या क्षणी येतं त्या क्षणी कर्मयोग सुरु होतो. मग सुख-दु:खाचं काही नवल वाटत नाही आणि जे आहे जसं आहे तसं स्वीकार करायला आपण शिकतो.
दुसऱ्या व्यक्तीकडून प्रेमभावनेची किंवा ठराविक वागणुकीची अपेक्षा हे दु:खाचं दुसरं मूळ. आधी अपेक्षा करायची आणि ती पूर्ण नाही झाली की होणारं अपेक्षाभंगाचं दु:ख मोठंच, पण मनुष्यस्वभाव इतका विचित्र असतो की एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा काहीच नसल्या तरी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोचवायची धडपड चालूच असते. भले त्या व्यक्तीला त्या भावना आवडो न आवडो. पण भावना व्यक्त न करताच दाबून टाकणे हा त्यावर उपाय आहे का? नाही. आहेत त्या भावना व्यक्त करणे हे तर सजीवांचे मुख्य लक्षण आहे. भावना व्यक्त केल्याच पाहिजेत पण त्या भावनांना अनुकूल प्रतिक्रिया आली नाही तर ते सहन करण्याचे सामर्थ्य पाहिजे. किंबहुना अनुकूल प्रतिक्रिया येणार नाही हे गृहीत धरूनच आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे ही कुठल्या योगापेक्षा कमी नाही. आपण आपल्या भावनांचा सन्मान राखावा. दुसरे आपल्या भावनांची किंमत त्यांच्या आकलनाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे करतच असतात.