Friday, July 30, 2010

निसर्गदूत

सिंगापुरात पहिल्यांदा पाय ठेवला तेव्हा फार प्रभावित झालो होतो. म्हणजे एअरपोर्ट वगैरे पाहून सगळे होतात तसा तर झालोच होतो, पण बाहेर पडल्यावर टॅक्सीतून बाहेर दिसणारी हिरवाई पाहून जास्त प्रभावित झालो होतो. एअरपोर्टच्या समोर आणि एअरपोर्टला शहराशी जोडणार्‍या रस्त्यावर भरपूर झाडं दिसत होती. विशेष म्हणजे ती मुद्दाम तिथे लावलेली आहेत हे उघड असलं तरी त्या झाडांतलं वैविध्य लक्षणीय होतं, उगीच सरकारी काम म्हणून इथून तिथून सुबाभळीची झाडं नव्हती लावून दिलेली. त्या पहिल्या १०-१५ मिनिटांत या देशाबद्दल माझं मत एकदम चांगलं झालं. विकासाबरोबरच या लोकांनी निसर्गही छान जपलेला दिसतोय असं मला वाटलं. टॅक्सी जशी जशी पुढे शहरात जाऊ लागली तसा तसा मला या शहराचा आखीव-रेखीवपणा दिसू लागला आणि मग लक्षात आलं की जागोजागी दिसणारी हिरवाई, झाडं वगैरे सगळा या आखीव-रेखीवपणाचाच भाग आहे. एअरपोर्टवर जशी मुद्दाम तयार केलेली वृक्षराजी आहे जवळजवळ तशीच सगळीकडेच आहे. नैसर्गिकपणे वाढलेली झाडं-जंगलं आता शिल्लकच नसावीत. सगळीकडे HDB च्या आणि खाजगी टोलेजंग इमारती आणि त्याच्या बाजूने लावलेली झाडं. मोकळ्या जागांमध्येसुद्धा खास निगा राखलेली हिरवळ दिसत होती.पुढे इथं राहायला लागल्यावर किती मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं आहे आणि जवळजवळ सगळंच कसं कृत्रिम आहे ते कळत गेलं. मी ही हळूहळू त्याला सरावलो. कृत्रिमपणे का ठेवलेलं असेना, सिंगापूर नक्कीच पुण्यापेक्षा जास्त हिरवं आहे एवढं मात्र नक्की होतं. या आखीव-रेखीव जगात जगताना एक एक करत ३ वर्षं उलटून गेली. नाही म्हटलं तरी रोजचा तो बंदिस्त ट्रेनचा प्रवास, तेच थंड काचेरी ऑफिस, तेच ते झगमगणारे मॉल्स आणि तीच ती शहरी आयुष्याची यातायात याचा थोडाफार परिणाम होतोच. अधून मधून सुट्टीला भारत, फुकेत, बाली वगैरे ठिकाणी गेल्यावरच काय तो खुला निसर्ग अनुभवायला मिळणार. इतरवेळी एका कृत्रिम बेटावर राहिल्यासारखं राहायचं. असंच यंत्रवत वर्षानुवर्षे चालंलं होतं पण त्या दिवशी मला तो दिसला आणि मला अतिशय आनंद झाला. त्या दिवशी म्हणजे एका शनिवारी संध्याकाळी घरामागच्या नदीकाठच्या रस्त्याच्या कडेने जॉगिंग करायला गेलो होतो. नदीत आता वॉटरपार्क करणारेत म्हणून रस्त्याच्या कडेने सगळं पत्रे लावून झाकून टाकलेलं. पण थोडं पुढे गेल्यावर पत्रे संपतात आणि गच्च झाडांची गर्दी लागते. मी नेहमीप्रमाणे तो तुकडा डोळ्यांत साठवून घेत हळूहळू पुढे चाललो होतो तेव्हाच रस्त्याच्या कडेला मला तो दिसला. तांबूस तपकिरी रंगाचे केस असलेला एक ससा तिथे लुटुलुटु ओठ हलवत गवत खात होता. मी थबकलो आणि त्याच्याकडे पाहत राहिलो. एका बाजूला थोड्या अंतरावर असणारं ते चौकोनी शहर आणि दुसर्‍या बाजूला तो इवलासा ससा. जणू निसर्गाने त्याचा प्रतिनिधी पाठवला होता, हेच सांगायला की मी आहे... इथेच आहे.

Monday, July 12, 2010

रितेपणावर जगताना...

मध्यंतरी जॉन झरझन या अमेरिकेतील एका विचारवंताचे "Running on Emptiness" नावाचे एक पुस्तक वाचायला मिळाले आणि एक कोंडी फुटल्यासारखे वाटले. वाढते शहरीकरण, अफाट वेगाने वाढणारी लोकसंख्या, तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराचा आवळत चाललेला फास आणि एकंदरच पर्यावरण, जीवसृष्टी, समाज आणि नातेसंबंध इत्यादींचा होत चाललेला ऱ्हास याबद्दलच्या माझ्या अस्वस्थतेला आणि विचारांना एक आधार मिळाल्यासारखे झाले. मानवी नागरीकरणाबद्दल (civilization) मूलभूत असे विचार या पुस्तकात मांडले गेले आहेत. माणसाला निसर्गापासून तोडणारी आणि त्याचे शोषण करणारी ही श्रमविभाजनावर आधारित समाजव्यवस्था हेच मानवाच्या नागरीकरणाचे आणि तथाकथित उन्नतीचे फलित आहे. दिवसेंदिवस माणसांच्या अंतरंगातला रितेपणा वाढत चालला असून निसर्गापासून दूर गेल्याने एक प्रकारच्या पोरकेपणाची आणि एकटेपणाची भावना वाढीस लागली आहे. औद्योगिक प्रगती साधलेल्या आणि सर्व भौतिक सुखे हात जोडून उभ्या असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशांमध्येच याचे प्रमाण जास्त आहे हेच पुरेसे बोलके आहे. शेती करायला लागण्यापुर्वी लाखो वर्षे मानव निसर्गाशी एकरुप होऊन राहत होता. छोट्याछोट्या टोळ्यांमध्ये राहून भटकत, शिकार करत आणि अन्न गोळा करत मनुष्यप्राणी इतर प्राण्यांसारखा निसर्गाच्या कुशीत सुखाने जगला. या लाखो वर्षांमध्ये युद्धे नव्हती, सामूहिक हिंसाचार नव्हता, साथीचे रोग नव्हते, जातिव्यवस्था नव्हती की वर्गवारीची उतरंड नव्हती. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आणि समान. प्रत्येक अनुभव जिवंत आणि थेट. नैसर्गिक निवडीच्या तत्त्वामुळे लोकसंख्याही आपोआप आटोक्यात असे. लाखो वर्षे ही जीवन पद्धती टिकली. पण दहा हजार वर्षांपुर्वी माणूस शेती करू लागला आणि त्यातून निर्माण झाल्या गरजा. कालमापनाची गरज, भाषेची गरज, श्रमशक्तीची गरज, तंत्रज्ञानाची गरज. एकेकाळी चक्रीय असणारा काळ हळूहळू एका रेषेत मोजला जाऊ लागला. शेतीच्या सोयीसाठी ऋतुंनुसार काळ मोजला जाऊ लागला आणि हळू हळू वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिटे, सेकंद असं करत करत काळाची सूक्ष्मातिसूक्ष्म मापे अस्तित्वात आली. श्रमविभाजनातून इतराना नियंत्रित करण्यासाठी, इतरांचे श्रम मोजून त्या प्रमाणे मोबदला देण्यासाठी या कालमापनाचा फार उपयोग झाला आणि होतो. त्याचबरोबर भाषेचा विकास झाला. निसर्गात मिळणाऱ्या अनुभवाला एक शब्दरुपी ध्वनिचिन्ह बहाल करण्यात आले आणि हळूहळू या चिन्हानी मूळ अनुभवालाच विस्थापित केले. प्रत्येक गोष्ट शब्दबद्ध करण्याच्या धडपडीत तो पूर्वीचा थेट भिडणारा अनुभव नष्ट झाला आणि त्याचबरोबर नष्ट झाली ज्ञानेंद्रियांचा संवेदनशीलता. हळूहळू मग विनिमयाची गरज निर्माण झाली आणि व्यापार अस्तित्वात आला. केवळ पोट भरण्यापुरते अन्न मिळवणे संपून इतर वस्तू मिळवण्यासाठी आणखी आणखी उत्पादन करण्याची गरज निर्माण झाली. आणखी उत्पादनासाठी आणखी श्रमशक्ती, म्हणून आणखी शोषण. मानवी आणि इतर पाळीव प्राण्यांची श्रमशक्ती पुरेना म्हणून मग यंत्रं आणि ती यंत्र चालवण्यासाठी माणसांचं यांत्रिकीकरण आणि एकजिनसी आयुष्याची गरज.आता तर अशी अवस्था आहे की प्रत्येक नैसर्गिक गोष्टीला एका मानवनिर्मित चिन्हाने विस्थापित केलं आहे आणि आपण सगळे एका मानवनिर्मित चिन्हांच्या दुनियेत राहत आहोत, निसर्गापासून फटकून. सगळं काही पैशात मोजलं जातं पण आपण हे विसरून जातो की पैसा हे एक चिन्ह आहे, खऱ्या जगात त्याचं अस्तित्व नाही. तसंच तंत्रज्ञानाचंही मानवाचे कित्येक प्रश्न सोडवण्यासाठी रोज नवनवीन तंत्रज्ञान शोधले जात आहे, पण मुळात ते प्रश्न निर्माण कोणी केले हे कोणी तपासून पाहत आहे काय? आजचं तंत्रज्ञान जे प्रश्न सोडवतं त्यातले बहुसंख्य प्रश्न हे कालच्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले आहेत. तरीही आज आपण अधिकाधिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहत आहोत. यंत्रांच्या गर्दीत आपण इतके हरवून गेलोय की माणसामाणसातला संवादच आज हरवतोय. आज शास्त्रज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करत आहेत आणि आपण ही सहज बोलताना असं म्हणतो की 'संगणक विचार करतोय' वगैरे. यात आपल्याला काहीच गैर अथवा विचित्र वाटत नाही. कित्येकाना तर माणसासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवांची गोड स्वप्ने ही पडू लागलीत. पण त्याचवेळी आपणच यंत्रांसारखेच होत चाललोय हे आपल्या लक्षात येत नाही. एका चाकोरीतले आयुष्य, रोज उठणे कामावर जाणे, पैसा कमावणे आणि थोडाफार आपापल्या मगदुराप्रमाणे नियंत्रित कलंदरपणा करणे हेच सगळ्यांचं साचेबद्ध आयुष्य झालं आहे. आज जी जीवनपद्धती आहे तिला काहीच पर्याय नाही असं आपलं एक गृहीतक आहे. पण तसं नाहीये...याला पर्याय आहे. आपण आपल्याच निर्माण केलेल्या फुग्यात राहात असताना बाहेर एक नैसर्गिक जग अजूनही आहे. आपण ठरवलं तर सगळं कृत्रिम जग नष्ट करून पुन्हा निसर्गाच्या कुशीत जाऊन एक शांत, परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतो.निर्णय आपल्या हाती आहे. पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा असा टाहो फोडत वरवरची मलमपट्टी करत एक दिवस भीषण आयुष्याला सामोरं जायचं की वेळीच शहाणं होऊन मार्ग बदलायचा आणि स्वतःला वाचवायचं?