Monday, February 6, 2012

जन्मठेप

फिनाईलच्या त्या अभद्र वासातून बाहेर पडून तो त्या हॉस्पिटलच्या सदैव आ वासलेल्या पोर्चमध्ये आला तेव्हा शहराच्या चिरपरिचित दुर्गंधीने त्याला पुन्हा वेटोळे घातले. आतून काचेच्या खिडकीतून दिसणारी झळाळती कलती दुपार बाहेर आल्यावर त्याला नासलेल्या आंब्यासारखी वाटू लागली. एका झुळझुळणार्‍या संध्याकाळी गाव सोडून साचलेल्या गाळासारख्या दमट सकाळी त्याने या शहरात पाय ठेवला तेव्हाही त्याला त्या दुर्गंधीने असेच मख्खपणे वेटोळे घातले होते. ते लाजिरवाणे दिवस आठवले की त्याला अगदी कसेनुसे होई आणि मानेला झटका देऊन तो तोंडाने काहीतरी असम्बद्ध बोले.
कधीकाळी रूपवान असलेल्या जख्ख वेश्येसारखे त्याचे गाव होते. तालुक्याचे गाव. पूर्वी कोणातरी सम्राटाने वसवलेले व्यापाराचे केंद्र. पावसाळ्यात डोक्यावर ढग बांधणार्‍या हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले. पाचूच्या दागिन्यातून दिसणार्‍या फोडासारखे गाव. काप जाऊन उरलेल्या भोकांमध्ये राहणार्‍या दलालांचे गाव. त्या गावातल्या रस्त्यांवर सुखवस्तुंच्या घरातल्या सांडपाण्याच्या नद्या वाहत असत आणि त्यातून श्रीमंतांच्या गाड्या गेल्या की गाळाचे शिंतोडे पायी चालणार्‍या गरीबांवर उडत. अशा रस्त्यावर वाहणार्‍या अनेक ओघळांपैकी कोणत्यातरी एका ओघळाच्या उगमापाशी त्याची आई धुणं-भांडी करत बसलेली असायची आणि एखादा ओघळ मोठ्या गटारीला जिथे मिळतो तिथे त्याचा बाप दारू पिऊन पडलेला आढळायचा.
या सगळ्यांपासून दूर डोंगरउतारावर बोरे,चिंचा,पेरू,करवंदे खात आणि सशांच्या मागे हुंदडत सळसळणारे त्याचे बालपण एकदिवस त्याच्या आईने महात्मा विद्यालयाच्या दावणीला बांधले. डोक्याला रोज तेल लावून येणारी गोरीगोबरी मुले, सकाळीसकाळी केलेल्या पुजेत लावलेल्या अगरबत्तीचा गंध वागवणारे मास्तर, मागच्या बाकड्यांवर जमा झालेली त्याच्यासारखीच काही चुकार मेंढरे आणि इतिहास-भूगोलाची सरकारी छापील पुस्तके यांच्या संगतीत त्याचे दिवस रसहीन होऊ लागले. ज्यांच्या घरी त्याची आई काम करायची अशा मुलांच्या नजरा चुकवत, आया-मावश्यांनी लिहून दिलेल्या त्यांच्या निबंधांचे मास्तरांनी केलेले कौतुक ऐकत आणि कोपर्‍यातल्या जागेत बसून दूर दिसणारे डोंगर बघत त्याने शाळेची आणि कॉलेजची शिक्षा संपवली. डोंगरउतारावरच्या सुखाचा त्याग करून कॉलेज कँटीनमधल्या टवाळक्यांचा आनंद मिळवला. कबर्‍या रंगाचे गोबरे ससे सोडून डिग्रीचा कांचनमृग मिळवला. त्याची अडाणी आई धन्य-धन्य झाली. भिजल्या डोळ्यांनी कामाच्या ठिकाणी मूठमूठ पेढे वाटून आली. त्याला कुठंतरी चिकटवण्यासाठी साहेब लोकांना गळ घालून आली. तोही पेपरातल्या जाहिराती वाचून कामधंदा शोधायला भटकू लागला. सरकारी नोकरीच्या लोभस ढेपेला परंपरागत चिकटलेल्या आणि आरक्षणातून चिकटलेल्या मुंगळ्यांपैकी एक होण्याचाही त्याने प्रयत्न केला. सरकारी खात्यांच्या आणि बँकांच्या कसल्या कसल्या परीक्षा देऊ लागला. शिक्षा संपली तरी त्याची परीक्षा संपली नाही. वस्तीतल्या चौकात टवाळक्या करणार्‍या घोळक्यातल्या निरर्थकपणे उगवणार्‍या दिवसांच्या सिगारेटी वळून कोडगेपणाचा धूर सोडणार्‍या लोकांचा त्याला हळूहळू हेवा वाटू लागला. त्याचा बाप अधिकृतपणे मेला आणि आई आपला उद्धार होत नाही हे पाहून खचली. त्याला शिव्या-शाप देऊ लागली. शेवटी जसे सांडपाण्याचे सगळे ओघळ मोठ्या गटारीला जाऊन मिळावे तसे सगळ्या लाचार अस्तित्वांचे लोंढे जाऊन मिळणार्‍या या शहरात तो आला.
ते आठवून तोंडात जमा झालेला कडवटपणा त्याने थुंकून टाकला आणि सिगारेट काढायला खिसे चाचपू लागला. पँटच्या उजव्या रिकाम्या खिशावर हात ठेवताच त्याच्या पोटात एकदम धस्स झालं, पण पुढच्याच क्षणाला त्या खिशातली जपून आणलेल्या नोटांची गड्डी आत हॉस्पिटलच्या कॅशियरकडे देऊन आलो आहोत हे त्याला आठवले. त्याचा धसका नाहीसा झाला पण कपाळावरच्या आठ्यांमध्ये आणखी एकीची भर पडली. चार दिवसांपुर्वीच झालेला पगार जवळजवळ संपला होता आणि अजून आख्खा महिना आ वासून पुढे उभा होता. जिकडून मिळेल तिकडून उधार-उसनवारी करून, कर्जे काढून झाले होते आणि पुढची वीस वर्षे ही कर्जे फेडण्यात जाणार हे त्याला कळून चुकले होते. आणखी पैसे मिळण्याचे मार्ग संपले होते आणि पैशाअभावी आता हे उपचारांचे नाटक थांबवावेच लागणार होते.
चुपचाप त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि एक झुरका घेऊन खाली मान घालून जमिनीकडे धूर सोडू लागला.
शहरात आला तेव्हा पांडुरंग राशिनकराच्या खोलीवर उतरला होता. उतरला त्याच दिवशी पांडुने त्याला तो काम करत असलेल्या छोट्याशा कारखान्यात नेले. जाताना स्टेशनवर रूळ ओलांडताना अचानक वाजलेल्या लोकलच्या भोंग्याने तो कितीतरी दचकला आणि पांडू आपले गुटखा खाऊन लाल झालेले दात दाखवत खदखदून हसला होता.
"हे तुझं दुसरं घर", लोकलकडे बोट दाखवून पांडू म्हणाला,"दिवसातले चार-पाच तास तुला यातच काढायचेत."
तेव्हा समोरून लोकलकडे पाहताना मोठ्ठं ठसठशीत गोल कुंकु लावणार्‍या त्याच्या आईसारखीच वाटली होती ती त्याला. जिना चढून, तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर उतरला तेव्हा कुठे त्याला त्या चेहर्‍याच्यामागे लपवलेले लांबचलांब पिंजरे दिसले. तरीही त्याला ती आईसारखीच वाटली, काहीतरी करायला भाग पाडणारी.
त्या दिवशी पांडुच्या मार्गदर्शनाखाली धक्काबुक्की करत तो गर्दीत शिरला आणि मग आत जाऊन दोघे एकमेकाला जवळजवळ चिकटून उभे राहिले. त्या गर्दीतच पांडुने त्याला त्या शहराबद्दल, तिथल्या श्रीमंतीबद्दल, समुद्रकिनार्‍यांबद्दल, तिथे चालणार्‍या धंद्यांबद्दल, शहरावरची सत्ता वाटून घेणार्‍या राजकारण्यांबद्दल, गुन्हेगारांबद्दल आणि कचकड्याच्या दुनियेतल्या सिनेकलाकारांबद्दल सुरस कथा सांगितल्या तेव्हा तो थरारून गेला होता. अगणित शक्यता असलेल्या या शहरात कदाचित काहीतरी चमत्कार घडेल असे त्याला वाटले. काहीतरी घडून आपले आयुष्य बदलेल असे त्याला वाटले. काहीतरी म्हणजे काय हे मात्र त्याला ठरवता आले नव्हते.
पांडुच्या मुकादमाने त्याला लगेच कामावर ठेवायची तयारी दाखवली आणि ज्यावर चर्चा करणे शक्य नाही अशा आवाजात पगाराचा आकडा आणि सुट्टीचे दिवस वगैरे ऐकवले. पांडुच्याच हाताखाली त्याला सोपवून मुकादम निघून गेला आणि पांडुने त्याची एका यंत्राशी गाठ घालून दिली. त्यादिवसानंतर आठवड्यातले सहा दिवस आठ तास त्या यंत्राशी कसे वागायचे ते पांडुने त्याला समजावून सांगितले आणि त्याची नोकरी सुरु झाली.
काही दिवस मजेत गेले. तो आणि पांडू बरोबरच कामावर जायचे आणि काम संपल्यावर एकत्रच फिरायचे. पांडू त्याला श्रीमंत वस्त्यांमधून घेऊन जायचा आणि काहीतरी सुरस ऐकीव गोष्टी सांगत तिथल्या टोलेजंग इमारतींकडे, बंगल्यांकडे, रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांकडे आणि गाड्यांमधल्या बायांकडे आशाळभूतपणे पाहायचा. किंवा समुद्रकिनारी जाऊन ते वेळ काढायचे आणि पांडू तिथे आलेल्या जोडप्यांचे प्रणयचाळे पाहून चेकाळायचा, अचकटविचकट बोलून हसायचा, करमणूक करून घ्यायचा. किंवा दोघे चित्रपट पाहायला जायचे आणि संपल्यावर पांडू त्या नटीबद्दल, चित्रपटातल्या प्रसंगांबद्दल भरभरून काहीतरी बोलत राहायचा. किंवा मग त्याला खोलीवर पाठवून स्वत: हिडीस रंगरंगोटीखाली त्याहूनही हिडीस असे दु:ख लपवणार्‍या कुठल्याशा गल्लीत अदृष्य व्हायचा. त्याला हे सगळं नवं होतं आणि तो उत्सुकतेने सगळं पाहात होता. पगारातला काही भाग तो घरी पाठवत असल्याने आईही खूश असायची.
पण हळूहळू सगळं त्याच्या मनात साचत जाऊ लागलं. रोज सकाळी तीच वस्ती, तीच दमट साचलेली हवा. स्टेशनवरची तीच गर्दी आणि पिंजरा घेऊन येणारी आणि कधीकधी भोंगा वाजवून खिजवणारी तीच लोकल. पांडुची तीच वाह्यात बडबड आणि तेच फालतू विनोद. त्या शहराचा वखवखलेपणा आणि तुस्तपणा पाहून तो उबगून गेला.
काही दिवसांनी पांडूचं लग्न झालं आणि त्याने वेगळी खोली घेतली. त्यांचं बरोबर जाणं बंद झालं आणि तो एकटा जाऊ लागला. पांडुची उबग आणणारी बडबड बंद झाली या आनंदात काही दिवस गेले. तो आता गर्दीत धक्के खात खात पुस्तके वाचू लागला. लोकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी, कोणा महान नेत्याचे चरित्र आणि कोणा नाटककाराची कुरुपता उघडी पाडणारी नाटकं असं रस्त्याच्या कडेला मिळेल ते वाचू लागला. दोन स्टेशनांच्या मध्ये आकाश दिसेल असे आणि ताजी हवा वाहेल असे मोकळे मैदान असावे आणि त्यातून फारशी न खडखडता लोकल जावी तसे आयुष्य चालले होते. पण आईच्या त्या पत्रातून आलेले ते घातक वळण त्याला दिसले नाही. भूक लागलेल्या माणसाने जंगलातले लालजर्द फळ आधाशासारखे खावे तसे सगळे झाले. जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो मार्गाला लागला. गृहस्थ झाला. आईच्या इच्छापूर्तीची आणि स्वतःच्या वासनापूर्तीची धुंदी हळूहळू उतरली तोपर्यंत आईने डोळे मिटले. तिचे शेवटचे सगळे सोपस्कार आटपून तो आला तेव्हा त्याचे सगळे मागचे धागे तुटलेले होते. तो आता फक्त या शहराचा आणि त्याच्या बायकोचा होता.
त्याने दुसरी सिगारेट काढून पेटवली आणि अस्वस्थपणे भकाभक दोन झुरके मारले.
त्याची बायको आई होणार हे ऐकल्यावर त्याला त्याच्या मनात आहेत हेच माहित नसलेले कोणतेतरी सुखतंतू मोहरले होते. पण काही काळच. त्यानंतर लोकलच्या गर्दीत तो अवघडून उभा असताना एक दिवस अंधारात इंगळी डसावी तसा त्याला त्या वाक्याचा अर्थ कळला. त्याची बायको आई होणार होती म्हणजे त्याचे मूल तो होणार होते. त्यादिवशी त्याने डोळे उघडून दाही दिशांना पाहिले. लोकलच्या त्या घामट गर्दीत विझलेल्या डोळ्यांनी आणि बधीर झालेल्या मनांनी उभी असलेली सगळी माणसं त्यानं नीट पाहिली. खुरटलेल्या दाढीचा आणि खप्पड चेहर्‍याचा कोणी, काळाकभिन्न आणि सुरकुत्या पडलेला कोणी किंवा खिडकीशी जागा मिळाली यातच खूप खूश असलेला कोणी अशी ही सगळी माणसं कधीतरी मुठी चोखत हसणारी तान्ही बाळं असतील असे त्याला वाटले. त्या जीवांना आपल्या जाळीदार पोटात घेऊन पळणारी ती लोकल त्याला त्याक्षणी पक्ष्यांची पिले खाणार्‍या नागिणीसारखी वाटली होती. त्याचे लहान मूल या जगात येईल तेव्हा हीच नागिण त्यालाही पोटात घेणार होती. हे असे काही होऊ देणार नाही हा निश्चय त्याने तेव्हाच केला होता. रक्ताचं पाणी करून कष्ट करू पण आपल्या मुलाला चांगले आयुष्य देऊ असे त्याने तेव्हाच ठरवले. नोकरी करून साईड बिझिनेस करू, दोघेही अविश्रांत काम करू आणि या जगाच्या उतरंडीच्या वरच्या पायर्‍यांवर मुलाला घेऊन जाऊ हे त्याने ठरवून टाकले. आपल्या मुलासाठी या विक्राळ समाजव्यवस्थेने ठोठावलेली सश्रम जन्मठेप जगायला त्याने आपल्या मनाची तयारी केली.
त्याची दुसरीही सिगारेट संपली आणि त्याने ती खाली टाकून आपल्या हजारोवेळा शिवलेल्या चपलेखाली पार चप्पट होईपर्यंत चिरडली. हॉस्पिटलच्या दाराकडे त्याने वळून पाहिले. एमआरआय रूमबाहेर पोराला घेऊन बाकड्यावर वाट पाहत बसलेली बायको त्याच्या डोळ्यासमोर आली. आल्या प्रसंगाला चिवटपणे सामोरी जाणारी. आयुष्याकडून दुसरी कसली अपेक्षा करायची असते हेच माहित नसणारी. बाहेर जगात दिसणारा झगमगाट, चमचमाट आपल्यासाठी नाहीच हे सहजपणे मान्य करणारी आणि त्या जगाचे नियम पाळून दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून त्या झगमगाटासाठी आपले रक्त आटवणारी.
मूल मतिमंद आहे हे सुद्धा तिने किती शांतपणे स्वीकारले! त्याला मात्र सुंदर वेष्टन असलेले भेटवस्तुचे खोके उघडावे आणि आत काळाकभिन्न जहरिला साप असावा तसा झटका बसला होता.
का? का? का? त्याने हजारवेळा स्वतःला विचारले असेल. त्याला उत्तर नाही मिळाले. बायकोच्या कुपोषित शरीराकडे तो पाहायचा तेव्हा त्याचे डोळे भरून यायचे. तिचे बालपण कसे गेले होते कोण जाणे? कोणी तिच्या वाटेचे अन्न हिरावले होते? कोणी तिला आणि अशा अनेक मुलांना अर्धपोटी जगण्याची शिक्षा फर्मावली होती? कोणी?
प्रगतीचा आणि कल्याणाचा डिंडिम वाजवणार्‍या या व्यवस्थेत कोण त्याच्या मतिमंद मुलाला सुखी आयुष्य देणार होते? आणि का म्हणून? कोणी सगळी सूत्रं हातात घेतली आणि ठरवले की दुर्बळांनी मरावे हे वाईट आहे आणि त्यांनी हालाखीचे आयुष्य काढावे हे चांगले आहे? कोणी?
दोन वर्षापुर्वी टिपेस गेलेली त्याची तगमग सुप्त ज्वालामुखीच्या तप्त लाव्हासारखी त्याच्या मनाच्या तळातून पुन्हा वर उसळली. कपाळावरच्या आठ्या घट्ट करत तो आत गेला तेव्हा बायको एमआरआय रूममधून बाहेर येत होती. रिपोर्ट घेऊन दोघे डॉक्टरच्या खोलीत गेले. पडद्यावर फोटो लावून डॉक्टरने पाहिले. मग वळून औषधे लिहून देऊ लागला.
"मी औषधे बदलून देतो. ही औषधे घेऊन पाहू या काही फरक पडतोय का ते.", डॉक्टर म्हणाला.
त्याने मान हलवली. दोन वर्षे दर महिन्याला अर्धा पगार आणून हॉस्पिटलच्या घशात ओतूनही हाती काहीच लागलं नव्हतं आणि डॉक्टर अजून पोकळ आशावादाच्या गोळ्या खिलवत होता. त्याच्या डोक्यातून सणक गेली. खूप ताडताड बोलावं वाटलं पण वर्षानुवर्षांच्या सवयीने शब्द गळ्यातच विरले. डॉक्टरच्या हातावरचे मोठ्ठे चकाकते घड्याळ, खिशातला लांब-रुंद मोबाईल, खिडकीच्या बाहेर उभी असलेली त्याची चकचकीत गाडी फक्त पाहात राहिला.
औषधांची यादी घेऊन निमूटपणे ते निघाले. स्टेशनवर जाताना बायकोकडून त्याने पोराला घेतले नाही. तो पुढे आणि बायको मागे चालू लागले. गर्दीतून चालताना पावला-पावलाला त्याच्या डोक्यात सणक जात होती. कचरा, धूळ आणि लोकांनी भरलेलं ते शहर त्याच्याभोवती फेर धरून नाचतंय असं त्याला वाटू लागलं.
स्टेशनावर जाऊन उभे राहतात न राहतात तोच कुठूनतरी वास लागल्या सारखी लोकल त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. रोजच्या आठतासांची समिधा घालून आलेल्या लोकांना गिळून ती ओसंडत होती. एखाद्या टपोर्‍या मांसल अळीने मुंगी गिळावी तसा तो त्या लोकलमध्ये ओढला गेला. त्याच्यासारख्या कित्येक लोकांनी तो क्षणार्धात वेढला गेला. आठही बाजूंनी माणसं येऊन त्याला चिकटली आणि लोकल नवीन शिकार शोधायला निघाल्यासारखी दबा धरून हळूहळू निघाली.
तो एका पायावरून दुसर्‍या पायावर वजन टाकत उभा राहिला. तोंडाच्या अगदी जवळ तोंड आणून उभे असलेल्यांच्या निर्जीव नजरा टाळून दाराच्या दिसणार्‍या कोपर्‍यातून बाहेर पाहू लागला. फोडासारख्या तरारलेल्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर केसांसारखा दिसणारा विजेच्या तारांचा गुंता, त्यात अडकलेले निर्जीव झालेले निरागस दुर्दैवी समाधानाचे पतंग, वखवखलेल्या या शहराने ज्याची दृष्टी आपल्या अखंड आणि प्रचंड गोंगाटाखाली चिरडली असं एखादं जळालेलं वाघूळ, असंख्य माणसांच्या अमर्याद गरजांसाठीचे भोगसामान वाहण्यासाठी निर्माण झालेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या, आपल्या खुराड्याच्या जाळीच्या छिद्राला खिडकी समजून तिच्यात वाळत घातलेल्या आणि पिऊन ओकणार्‍या गाड्यांच्या धुराने वर ढकललेल्या केविलवाण्या हवेने उडून पडलेल्या शर्टांपासून ब्रा पर्यंत काहीही दिसेल ते.
दोन स्टेशनांच्या मध्ये त्याला वास आला घाण, कारखान्यांच्या किंवा माणसांच्या विष्ठेचा. चकाकणार्‍या मेटॅलिक कलरच्या टंच गाड्यांची किंवा स्लीवलेस ब्लाऊजवर चार बोटं रुंदीचा पदर घेऊन मिक्सरपासून दागिन्यांपर्यंत काहीही मिरवणार्‍या टंच मॉडेल गृहिणींची किंवा माजाने सुजलेल्या चेहर्‍यामुळे बारीक झालेल्या डोळ्यांतून टंच सत्तासुंदरीचा हव्यास गळणार्‍या राजकारण्यांची होर्डिंग्ज मध्येच दिसून त्याच्या डोळ्यांवर आघात करू लागली. अजस्त्र कारखान्यांच्या अनावर प्रसवशक्तीतून पैदा झालेल्या वस्तूंची तुम्हाला किती गरज आहे ते सांगणारी होर्डिंग्ज, राक्षसी भोगातच सुख आहे याची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, आपल्या अमानवी प्रचारशक्तीनं माणसाचा हवा तसा चौकोनी ठोकळा बनवणारी होर्डिंग्ज, गिळगिळीत आणि गुळगुळीत जगण्याशिवाय गत्यंतर नाही हे सांगणारी होर्डिंग्ज, जगण्यापेक्षा जिवंत राहण्यालाच आयुष्य म्हणणारी होर्डिंग्ज.
प्रत्येक वळणावर विरुद्ध दिशेला घेऊन जाणार्‍या, फुटेस्तवर खाल्लेल्यांना हाताने भरवणार्‍या, जिवंतपणाचं अवास्तव स्तोम माजवून कोट्यवधी लोकांचं जगणं हराम करणार्‍या सगळ्या या नरभक्षक व्यवस्थेचा त्याला भयंकर तिटकारा आला. घशात बोटं घालून सगळे नियम, सगळे संकेत, सगळी जगरहाटी मळमळणार्‍या पोटातून तिथेच ओकून टाकावी किंवा पुलावरून लोकल जाताना कचर्‍याची भरलेली पिशवी फेकतात तसं स्वतःला खालच्या गाळात फेकून द्यावं असं त्याला वाटलं. पण आठही बाजूंनी गर्दीत दाबला गेलेला असताना बोट हलवण्याचंही स्वातंत्र्य आत्ता नाही या विचाराने, पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागच्या पायांवरून गाडी जावी तशी त्याची क्षुब्धता लुळीपांगळी झाली. डोळ्यात तरळलेलं पाणी पापण्यांनीच टिपायला त्याने डोळे मिटले आणि...
डोक्यावर घणाचा घाव घातल्यासारखा आवाज करत तो स्फोट झाला. त्याचे डोळे आणि तोंड खाडकन उघडले. कानाच्या पडद्यावर आदळून सर्वभक्षक त्सुनामीसारख्या त्या आवाजाच्या लाटा त्याच्या यूस्टेशियन नळ्यांतून रोरावत तोंडात आल्या आणि जीभ, घसा, टाळू, मेंदू सगळं सुन्न होऊन गेले. लोकांनी गच्च भरलेली ती लोकल झिडपिडत रुळांवरून घसरून थांबली. अंगाचा अवयवही हलवायला जागा नसलेल्या त्या एकसंध चरबीच्या गोळ्यासारख्या गर्दीत माणसं धडपडली नाहीत, फक्त एकमेकांवर रेलून दाबली गेली. डब्ब्याच्या भिंतीपाशी उभ्या काही किरकोळ जीवांनी गुदमरून जगण्याचे नाटक संपवले. बाकीचे लवकरात लवकर पायांवर सरळ उभं राहून बाहेर पडण्यासाठी वळवळू लागले. उघड्या दारातून धडाधड उड्या मारायला लागले. "बाँब बॉम्ब," असा जप केल्यासारखा आवाज चारीबाजूनी घुमला. जखमेतून रक्त वाहावं तशा बाहेर वाहणार्‍या गर्दीबरोबर तोही बाहेर वाहत आला. स्फोटाच्या आवाजाने त्याच्या कानात अजूनही चुंई वाजत होतं. बाहेर पडल्यावर त्याला दिसले माणसांचे अवयव, फाटलेली शरीरं, रक्ताची डबकी, जखमी लोकांचे चित्कार आणि बघ्यांचा कोलाहल. रक्ताच्या दर्शनाने काही भोवळ येऊन पडलेले, काही लोक त्या प्रेतांमध्ये आपणही आहोत की काय अशी शंका असल्यासारखी उभी असलेले तर काही स्वतःच्या जिवंतपणावर मनोमन खूश होत तुटक्या फाटक्या शरीरांना मरणापेक्षाही भयंकर असे जीवन द्यायच्या खटपटीला लागलेले.
एका कडेला उभा राहून तो बायकोच्या साडीचा रंग आठवायला लागला, पोराच्या झबल्याचा रंग आठवायला लागला. त्याला नक्की आठवले नाही पण दोघांचेही कपडे लालच असावेत असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. फुटलेल्या त्या दोन डब्यांच्या समोरून काही अंतरावरून त्याने सावकाश चालत फेरी मारली. दुरूनच काही दिसतंय का पाहिलं, चादरीत उचलून नेल्या जाणार्‍या जखमींकडे डोकावून पाहिलं. त्याला बायको सापडली नाही. दोन्ही डब्यांभोवती दोन-तीन फेर्‍या मारल्यावर तो कंटाळला. मावळलेल्या सूर्याच्या पश्चात साचणारा अंधार आता समोरचं उध्वस्त दृष्य गिळू पाहू लागला, पण शहरातले दिवे पेटून त्याला रोखू लागले. त्या काळवंडणार्‍या दृष्यावर आपल्या तुटपुंज्या प्रकाशाचे डाग पाडून आणखी भयाण छटा आणायचा कसोशीने प्रयत्न करू लागले.
तो रूळांच्या बाजूला असलेल्या टेकाडावर झुडपाशेजारी बसला. तिथं दिव्यांचा प्रकाश पोचत नव्हता. खिशातून सिगारेट काढून शिलगावली. त्या शहराच्या अविनाशी दुर्गंधीपुढे त्या धुराचा वास त्याला हवाहवासा वाटला. रिकाम्यापोटी दोन कडक झुरके मारल्यावर त्याला गरगरलं आणि चहूबाजूंनी दाटलेल्या अंधारात गजबजलेल्या जगात आता आपण अगदी एकटे आहोत अशी भावना त्याच्या आवळलेल्या पोटातून कारंज्यासारखी थुईथुई उडू लागली. एकटा. स्वतंत्र. आतापर्यंत खुरडत खुरडत इथवर ओढत आणलेलं हे आयुष्याचं ओझं फेकून द्यायला किंवा दूर डोंगराच्या कुशीत किंवा समुद्राच्या कडेवर निरीच्छ जगायला किंवा ज्या व्यवस्थेने जगणे अवघड करून ठेवले तिच्यातल्या पळवाटा शोधायला, उन्मुक्तपणे शरीराचे चोचले पुरवायला, मनाच्या इच्छा ओरबाडून का होईना पूर्ण करायला. तो स्वतंत्र झालेला होता. त्याला आनंद वाटला नाही पण मोकळं वाटलं. कॉलेजच्या दिवसात असायचा तसा बिनधास्तपणा त्याच्या झुरक्यात आला. वर बघून आकाशाच्या तोंडावर धूर सोडताना त्याला शांत शांत वाटलं. तो आता कोणालाही काहीही देणं लागत नव्हता. ज्यांनी हा निरर्थक जन्म दिला ते, ज्यांच्याशी इच्छा नसताना आणि प्रयत्न करूनही तुटत नाहीत असे मनाचे नाजूक तंतू जोडले गेले ते सगळे नाहीसे झालेले होते. आता फक्त तो आहे आणि ही समोरची गर्दी. त्या गर्दीतल्या जंतूंशी मनसोक्त खेळ करायला, वापरून घ्यायला, सूड घ्यायला आणि नंतर मन भरलं की त्या बजबजपुरीतून निघून जायला तो मोकळा होता.
त्याने सिगारेट विझवली आणि उभा राहून खिशात हात घालून चालू लागला. गर्दी अजून वाढत चाललेली. आता पोलीस आणि फायरब्रिगेडच्या गाड्या आलेल्या त्याला दिसल्या. जखमींना आणि मेलेल्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातंय ते ओरडून सांगितलं जात होतं. बायकोला आणि पोराला हॉस्पिटलात नेलं असेल असं त्याला वाटलं. त्याने खिशातून हात काढले. शांत वाटणारा त्याचा चेहरा सुकलेल्या चिकूसारखा आक्रसला, सैलावलेल्या खांद्यांनी हळूहळू नकळत गोलाई धारण केली आणि त्याचं शरीर पुन्हा खांद्याला पट्टा लावून मागे काहीतरी जड ओढत चालल्यासारखं दिसू लागलं.
तो हॉस्पिटलमध्ये आला. बाहेर पोर्चमध्ये अ‍ॅम्बुलन्स ठणाणा करत येजा करत होत्या, माणसं आकांत करत किंवा मेल्या डोळ्यांनी बघत उभी राहिलेली. तो आत गेला. रांगेने ठेवलेल्या मृतदेहांसमोरून चालत गेला. करपलेले, तुटलेले ते मृतदेह पाहून त्याला किळस आली नाही. वाईटही वाटले नाही. तिथेही त्याला बायकोपोरासदृष काही दिसलं नाही. आजूबाजूला रडणार्‍या, भांबावलेल्या लोकांमधून वाट काढत त्याने आणखी आत जाऊ पाहिले. पण एका पोलीस हवालदाराने त्याला अडवले, पण तितक्यात दुसर्‍या घुसणार्‍या माणसाला अडवायला हवालदाराला दुसरीकडे पाहावे लागले. तो अलगद आत गेला. जिवंतपणाचे रक्षक डॉक्टर आणि नर्स पांढर्‍या कपड्यांमध्ये धावपळ करताना त्याला दिसले. जखमी लोकांना तातडीने मलमपट्टी केली जात होती. इथेही जखमी लोकांना रांगेत ठेवलेलं होतं. सगळे एकजात सारखे दिसत होते, बाहेरच्या रांगेतल्या सारखेच. नाकातून आत-बाहेर करणारी हवा एवढाच काय तो फरक. त्याने वॉर्डभर संथपणे नजर फिरवली. एका कोपर्‍यातून पुढे जाऊन त्याची नजर थांबली आणि पुन्हा वळली. एका स्ट्रेचरवर एक बाई पडलेली त्याला दिसली. उजवा पाय तुटलेली. तिच्या पलीकडे तिच्या पोटातून वर आल्यासारखं दिसणारं एक छोटंसं डोकं. त्याच्या हृदयाने एक ठोका आवळून धरला. घसा कोरडा होऊन आत ओढला गेला. नकळत त्याने स्वतःला तिकडे ढकलले. पाय घासत जवळ पोचतानाच त्याला पोराचे मंगोल डोळे दिसले. फतकल मारून ते मंदपणे स्वतःच्याच हाताशी खेळत होतं. त्याला काहीही जखम झालेली त्याला दिसली नाही. जणू त्याचा मतिमंदपणा त्याचं आयुष्य मरणप्राय करण्यासाठी नियतीला पुरेसा वाटला होता. त्याची नजर बायकोच्या भाजलेल्या हातांवरून फिरली. जखमांनी आणखी विद्रूप झालेल्या चेहर्‍यावरून गेली आणि छातीवर स्थिरावली. तिची छाती वरखाली होतेय की नाही ते त्याला ठरवता आलं नाही. एकटक निरखून पाहताना मात्र त्याला काहीतरी कळत गेलं आणि त्याची नजर पाण्यात विरघळू लागली. त्याच्या पायातली शक्ती निघून गेल्यासारखा तो मटकन खाली बसला आणि स्वतःचे केस मुठीत गच्च धरून ओठ आवळत गदगदून रडू लागला.

Tuesday, December 20, 2011

भविष्याला आपली गरज आहे का?

'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्‍याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील. या 'पृथ्वी वाचवा' वरून एक व्हिडिओ पाहिल्याचे आठवले, तो इथे डकवण्याचा मोह आवरत नाही.






पृथ्वी वाचवायची गरज असो वा नसो, मानवाने स्वतःला वाचवण्याची गरज आहे यावर बर्‍याच लोकांचे आजकाल एकमत झालेले दिसते. मानवजात नष्ट व्हायचा धोका आहे वगैरे बरेच शास्त्रज्ञही मासिकांमध्ये खळबळजनक विधाने करत असतात (खळबळ होत नाही ही गोष्ट वेगळी). पर्यावरणवाद्यांचा आणि तंत्रभीतांचा (Luddites) तर हा एक आवडीचा विषय आहे. गेल्या दोन-अडीचशे वर्षांत औद्योगिकीकरणामुळे झालेला पर्यावरणाचा र्‍हास, तपमानवाढ, लोकसंख्येचा विस्फोट, अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य, आण्विक युद्धे आणि अगदी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल, सौर वादळे इत्यादीपर्यंत अनेक कारणे दिली जातात. यातली सौर वादळे, उल्कापात वगैरे नैसर्गिक कारणे सोडली तर बाकीची सगळी मानवनिर्मित आहेत असे म्हटले जाते आणि हा तंत्रज्ञानाने साधलेल्या प्रगतीवर मोठा आरोप आहे. एकीकडे तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे मानवी आयुष्य खूपच सुखकर झाले आहे, प्रदीर्घ झाले आहे असे विविध आकडेवारीने सांगितले जात असताना दुसरीकडे अमुक एक टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, अमुक इतके लोक उपाशी आहेत, अमुक अब्ज लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही अशीही आकडेवारी कानावर येत असते. एकीकडे सगळ्यांना शिक्षण, कामधंदा वगैरे देऊन सगळ्या जगातल्या लोकांचे जीवनमान सारखे करण्याची धडपड आणि दुसरीकडे मानवाच्या स्वच्छंद नैसर्गिक जीवनावर घाला येत असल्याची बोंब. एकीकडे लोकसंख्या भयानक वाढतेय आणि लोकांना उपाशी मरावं लागेल असा आकांत तर दुसरीकडे लोकसंख्येच्या वाढीचे आलेख काढून ती कशी स्थिर होईल हे सिद्ध करण्याची धडपड. हे सगळं पाहून नक्की काय चाललंय हे कळेनासं होतं.

माझा स्वतःचा स्वभाव अत्यंत आळशी असल्याने तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुकर झाले आणि प्रचंड प्रमाणावर श्रमबचत झाली वगैरे गप्पांवर विश्वास नाही. उलट जितकी तंत्रज्ञानात प्रगती होईल तितकी भोगस्पर्धा आणि त्यामुळे कामाचे तास वाढलेलेच दिसतात. तरीही होताहोईतो तटस्थ राहून मी उत्तरे शोधण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला.

वर्तमानात खरोखर आपण म्हणतो तसा नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरमसाठ वापर होतोय की नाही आणि खरंच नैसर्गिक स्त्रोत संपत आले आहेत का हे शोधताना मला Global Footprint Network बद्दल माहिती मिळाली. ही संघटना पर्यावरणाचं अकाऊंटिंग करून मानवी उपभोगाचा नैसर्गिक स्त्रोतांवर कितपत परिणाम होतो याची आकडेवारी काढते. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी "Earth Overshoot Day" 'साजरा' केला. म्हणजे २०११ या एका वर्षात जितकी साधनसंपत्ती तयार झाली असती ती सप्टेंबर महिन्यातच वापरली गेली हे जाहीर केलं. त्यांच्या ब्लॉगवर तो लेख वाचता येईल.आता हे पाहून कोणालाही अशी शंका येईल की माणसाच्या उद्योगांचा निसर्गावर परिणाम होतोय हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले की काय? तशी ती मलाही आली आहे, पण अजून तसे म्हणण्यासाठी कोणाकडून मान्यता मिळायला पाहिजे ते मला महित नाही. त्यांच्या संस्थळावर त्यांनी लोकसंख्येचे अंदाज दिले आहेत. विशेष काहीही घडले नाही आणि जसे चालले आहे तसेच चालत राहिले तर २०५० साली लोकसंख्या ९ अब्ज असेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे.

त्याचदरम्यान UNO च्या Food and Agriculture Organization (FAO) चा एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यातही २०५० साली ९ अब्ज लोकसंख्या असेल असा अंदाज केला गेला आहे. या ९ अब्ज लोकसंख्येसाठी सध्याच्या अन्नधान्य उत्पादनात ७०% वाढ झाली पाहिजे, त्यातच उपलब्ध शेतजमिनीपैकी २५% जमीन निकामी झाली आहे, ८% अर्धवट निकामी आणि १०% सुधारत आहे असे आव्हानात्मक प्रश्न उभे केले आहेत. अर्थातच नव्या तंत्रज्ञानामुळे आणि सुधारित पद्धतींमुळे आपण हे आव्हान पेलू शकू असा विश्वासही व्यक्त केलाच आहे.

मग हे नवे तंत्रज्ञान म्हणजे काय ते शोधणे आले. उत्तर थोडेसे माहितीतलेच होते. पाण्याचा अतिकिफायतशीर वापर आणि जेनेटिक्स. जेनेटिक्समधील वाईड क्रॉसिंग, सेल/टिश्यू/प्रोटोप्लास्ट कल्चर आणि सोमॅटिक सेल हायब्रिडायझेशन अशा तंत्रांची भारदस्त नावं वाचता वाचता जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स या तीन क्षेत्रात प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रगतीबद्दल कुणकुण लागली. (http://www.blogger.com/=http://www.foresight.org/). Molecular Manufacturing आणि cell computing वगैरे भन्नाट विषय पाहून हतबुद्ध झालो आणि तशाच अवस्थेत Singularity या नवीनच संकल्पनेशी ओळख झाली. सिंग्युलॅरिटी समिटच्या संस्थळावर महिती तंत्रज्ञानातल्या चढत्या भाजणीत होणार्‍या वाढीबद्दल माहिती देणारी रे कर्झ्विल यांची एक चित्रफीत पाहण्यात आली. रे कर्झ्विल यांच्या मते या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सिंग्युलॅरिटी २०२९ सालापर्यंत गाठता येईल. त्यानंतर काय होईल हे सांगणे अवघड असले तरी माणसाने आपल्यापेक्षा कित्येकपटींनी बुद्धिमान असे यंत्र तयार केले असेल एवढे नक्की. असे हे यंत्र स्वतःपेक्षाही जास्त बुद्धिमान यंत्रं तयार करू शकेल आणि 'बुद्धिमत्तेचा स्फोट' होईल. या बुद्धिमत्तेच्या स्फोटापुढे माणसाचे सध्याचे प्रश्न अगदीच किरकोळ असतीलच शिवाय खुद्द माणसाची बुद्धिमत्ताही खूपच किरकोळ असेल. आता यावरही दुसर्‍याच दिशेने विचार करणारे महाभाग आहेतच. सन मायक्रोसिस्टीम्सचे संस्थापक आणि प्रमुख संशोधक, जावा या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या रचनेचे तपशील लिहीणारे श्री. बिल जॉय यांनी लिहीलेला एक लेख (Why The Future Does Not Need Us) या बाबतीत अतिशय उद्बोधक ठरावा.

हे सगळं पाहून डोकं गरगरायला लागलं आणि "Man moves in mysterious ways his problems to resolve." यातल्या पहिल्या भागाबद्दल खात्री पटली.

पण दुसर्‍या भागाचं काय? तुम्हाला काय वाटतं? माणसाचे प्रश्न सुटतील? की आणखी वाढतील? वाढणार असतील तर उपाय काय?

Monday, December 19, 2011

सरासरी अंधश्रद्धा

सरासरी अंधश्रद्धेबद्दल लिहीण्याआधी एक गोष्ट सुचली ती सांगतो. फार पुर्वीची नाही, नेहमीचीच गोष्ट आहे. एकदा एक राजा होता. प्रजेच्या कल्याणासाठी दक्ष वगैरे. वर्षाअखेरीस त्याची प्रधान मंत्र्याशी खास चर्चा असायची. वर्षभराच्या कामगिरीच्या मूल्यमापनाची. तशी ती यावर्षीही ठरली. एकेका खात्याच्या कामगिरीचा सारांश महामंत्री सांगणार आणि राजा त्यावर विचार, टिप्पणी करून त्या खात्याच्या मंत्र्याला बक्षिस किंवा सूचना काय द्यायच्या ते सांगणार अशी पद्धत. समोरासमोर ठेवलेल्या मंचकांवर राजा आणि महामंत्री बसलेले आणि मध्ये ठेवलेल्या मेजावर गेल्या आणि यावर्षीच्या माहितीपत्रांची भेंडोळी. राजाच्या दरबारात नवीनच लागलेला विदूषक एका कोपर्‍यातल्या आसनावर उत्सुकतेपोटी बसलेला . तसं इथे त्याचं काही काम नाही. इथे सगळं कसं गंभीर. कृषीमंत्र्यांच्या माहितीने कामकाजाची सुरुवात झाली. कृषी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं खातं ना! बाकी कोणी कितीही टिमक्या वाजवल्यातरी शेवटी पोटाची खळगी भरण्याच्या या उद्योगातूनच बाकी सगळा डोलारा उभा राहिला आहे हे सगळ्यांनाच माहित असतं. तर, महामंत्री सांगू लागले आणि राजा ऐकू लागला.

"महाराज, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.", महाराजांच्या चेहर्‍यावर काळजीच्या रेषा. "तरीही गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्के जास्त धान्योत्पादन झाले. आकडेवारीनुसार सडून वाया गेलेलं धान्य सोडूनही दरडोई सरासरी शंभर शेर धान्य निर्माण झाले. म्हणजे दरडोई दरमहा आठ शेर."

राजा प्रसन्न. कृषीमंत्र्यांना आठ गावं बक्षिस. पुढे अर्थमंत्री. "महाराज, यावर्षी आपल्या राज्याचं एकूण उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढलं आणि वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊनही दरडोई उत्पन्न पन्नासहजारांवरून साठहजारांवर गेलं."

राजा खूश. अर्थमंत्र्यांना दहा गावं बक्षिस. अशी एकेक माहिती प्रधानमंत्री सांगत गेले. बैठक संपली तेव्हा राजा प्रसन्न होता. राज्यातल्या लोकांना जास्तीचं अन्नधान्य मिळतंय, जास्तीचं उत्पन्न मिळतंय, लोक जास्ती जगताहेत वगैरे गोष्टी ऐकून कोणता राजा प्रसन्न होणार नाही?

महामंत्र्यांना निरोप देऊन त्याने पेंगणार्‍या विदूषकाकडे मोर्चा वळवला.

"उठ झोपाळा, गोष्ट सांगिशी मला", राजा हसून म्हणाला.

"क्षमा महाराज, तुमच्या राज्यात हे जास्तीचं अन्न खाऊन अशी जास्तीची झोप येते बघा", विदूषक म्हणाला," आणि गोष्ट तुम्हाला तुमचीच सांगतो. फार जुनी नाही, पुढच्या महिन्यातल्या पंधरा तारखेला घडलेली. सांगून झाल्यावर तुम्हाला नक्की आठवेल अशी.

तर, झालं काय महाराज, की जास्तीच्या उत्पन्नाचे आभार म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलावलं. मी स्वतः पाटावर बसलो आणि चौरंगावर तुम्हाला बसवलं. तितक्यात दारी एक गरीब ब्राह्मण अतिथी आला. त्यालाही आत घेतलं आपल्या बाजूला जमिनीवर बसवलं. तुमच्या आवडीच्या जिलब्यांचा बेत केला होता. एकावन्न जिलब्या केल्या होत्या, पण तुम्ही पहिला भात संपवता संपवता त्या बुभुक्षित ब्राह्मणाने पन्नास जिलब्या खाल्ल्या आणि मी एक जिलबी खाल्ली. नाईलाजाने तुम्ही बाकीचं जेवण जेवलात आणि हात धुतलेत. मुखशुद्धी करून थोडा आराम करून तुम्ही जायला निघालात तेव्हा मी नम्रपणे विचारलं 'महाराज, जिलब्या छान झाल्या होत्या नाही?' ते ऐकून तुम्ही रागाने लालबुंद झालात आणि काहीही न बोलता ताडताड निघून गेलात. मला दु:ख तर खूपच वाटले महाराज पण आश्चर्य या गोष्टीचे अधिक वाटले की आपण प्रत्येकी सरासरी सतरा जिलब्या खाऊनही तुम्ही असं का वागलात?"



आता ही गोष्ट ऐकून संख्याशास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रांध असे दोन्ही लोक त्यात चुका काढतील किंवा संख्याशास्त्र हे फक्त एक निदर्शक म्हणून वापरले पाहिजे आणि सरासरी शिवाय इतरही मोजमापे (median, mode) आहेत वगैरे सांगतीलच आणि त्यांचं बरोबर आहे यात शंका नाही. पण तरीही याच सरासरीचा आधार घेऊन बरेच मुद्दे सिद्ध केले जातात आणि तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात नाही. वरच्या गोष्टीत घेतलेले मुद्देच पाहा ना! गेल्या पन्नास-साठ वर्षात आपण प्रचंड प्रगती केली असे म्हणतो. या प्रगतीचे मापन करणारे निर्देशक बहुतांश संख्यात्मक आहेत आणि त्यातले बरेचसे सरासरीवर आधारित आहेत. शिवाय या निर्देशकांना आधारभूत अशी काही गृहीतके आहेत आणि ती गृहीतके बरोबर धरली तरच त्या निर्देशकांना हवा तो अर्थ प्राप्त होतो.

उदा. दोनशे वर्षांपूर्वी असलेली सरासरी जन्मतः जीवनशक्यता ३१ वर्षां वरून आता ६७ वर्षांवर गेली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या देशांमध्ये ती ७५-८० वर्षांच्या पुढे असते, विकसनशील देशांमध्ये ६०च्या आसपास असते आणि मागासलेल्या देशांमध्ये ४०च्या खाली असते (संदर्भ) शिवाय या निर्देशकासाठी गृहीतक असे आहे की जन्माला आलेला जीव दुबळा असो वा सशक्त, तो जगला पाहिजे आणि अनेक अपत्यांपैकी सशक्त ती जगतील आणि दुबळी मरतील हा निसर्गातल्या सामान्य नियम चुकीचा आहे. वस्तुतः अगदी ७५-८० जीवनशक्यता असलेल्या भागातही प्रत्येक माणूस ७५-८० वर्ष जगतो असे नाही. याचाच अर्थ आपण फक्त दुबळेपणा आणि सशक्तपणा यांच्या नैसर्गिक व्याख्या बदलून त्या कमी तीव्र केल्या आहेत आणि याचा परिणाम म्हणजे गेल्या पन्नास-साठ वर्षांत तिप्पट झालेली लोकसंख्या.

तर, ही सरासरी अंधश्रद्धा म्हणजे संख्याशास्त्रीय निर्देशक वापरून, एखाद्या गोष्टीचे फक्त संख्यात्मक मूल्यमापन करून आणि गुणात्मक बाबींकडे पूर्णत: दुर्लक्ष करून त्या गोष्टीबद्दल छातीठोकपणे बोलणे.

बहुधा तंत्रज्ञानातली प्रगती, त्याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावरचा परिणाम यावर चर्चा होत असताना तंत्रज्ञानाची बाजू घेणार्‍यांना हे निर्देशक फार उपयोगी पडतात. धडाधड प्रतिपक्षावर संख्या आणि आलेख यांचा मारा केला जातो आणि तंत्रज्ञानामुळे गेल्या पन्नास वर्षांत माणसाचे आयुष्य किती सोपे-सुकर झाले आहे हे पटवून दिले जाते. तेव्हा या निर्देशकांचा वापर करताना असा अविर्भाव आणला जातो की बहुसंख्यांचे कल्याण झालेच आहे आणि थोडेफार उरले आहेत त्यांचे लवकरच होईल. वस्तुस्थिती मात्र त्याच्या उलट आहे.

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काही लोकांचे आयुष्य सोपे झाले असले तरी बहुसंख्यांचे आयुष्य कठीणच आहे. बहुतेकांवर आयुष्य लादले गेले आहे आणि बहुतेकांवर ते कसे जगायचे याची पद्धतही लादली गेली आहे. एक हरितक्रांती होऊनही अजूनही एक तृतीयांश लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. गमतीचा भाग म्हणजे अश्मयुगात माणसाला पुरेसे अन्न मिळत नसे असे (चुकीने) समजले जाते पण सध्याच्या उपाशी लोकांची संख्या अश्मयुगातल्या एकूण लोकसंख्येपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे (म्हणजे जन्मतःच किंवा बालपणी लवकर मरणारे जास्त दु:खी की उपाशी अवस्थेत खुरडत खुरडत जगून मरणारे जास्त दु:खी हा गुणात्मक वाद आला).

आणखी एक गोष्ट अशी की हे निर्देशक वापरून त्यात होणारी सुधारणा म्हणजे मानवी जीवनाच्या दर्जातल्या सुधारणेची निदर्शक आहे असे सध्या आपण म्हणू शकतो. परंतु जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसे या निर्देशकांमधली सुधारणा खरोखर मानवी आयुष्याच्या दर्जातली सुधारणा असेलच असे नाही. (वर दिलेल्या दुव्यात विवेचन केलेला आत्महत्यांचा प्रश्न बहुतेकांना रोचक वाटेल. )

ज्याप्रमाणे बहुतेकवेळा शेअरमार्केटच्या निर्देशांकाचा अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी संबंध असेलच असे नाही त्याचप्रमाणे हे संख्याशास्त्रीय निर्देशांक वस्तुस्थितीचे यथार्थ प्रकटन करतीलच असे नाही. म्हणूनच तंत्रज्ञानातली घोडदौड आणि तिचा पर्यावरण व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा उहापोह करण्याआधी या निर्देशकांचा समाचार घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.

Sunday, December 18, 2011

आवंढा

मेच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार. भडभुंज्यांच्या कढईत तापवल्यासारख्या गरम मातीतून सायकल मारत घरी आलो. माणसं सगळी घरांच्या सावलीत गुमान पडलेली. गल्लीतली कुत्रीसुद्धा हातपंपाच्या आजूबाजूला गारवा शोधत वीतभर जिभा काढून धपापत बसलेली. अधूनमधून छोट्याशा झुळकींचे भोवरे धुळीची चादर विस्कटत असले तरी त्यात हवेपेक्षा उन्हाच्या झळाच जाणवत होत्या. पाठीला घामाने शर्ट चिकटलेला असला आणि उन्हाने चेहरा रापला असला तरी मला आतून गार गार वाटत होतं. इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा संपली होती आणि चांगली गेली होती.

सराईतपणे सर्रकन उघड्या फाटकातून सायकल आत नेली आणि तसाच मागच्या मागे उतरून अलगद भिंतीला जाऊन टेकू दिली. धडधडत व्हरांड्यात जाऊन आईला हाक मारणार तोच भानावर आलो आणि मग आवाज न करता हलक्या पायांनी घरात शिरलो. घरात शांतता होती आणि आतल्या अंधाराला डोळे सरावायला थोडा वेळ लागला. हळू हळू दबक्या पावलांनी पुढच्या खोलीतून मधल्या खोलीत गेलो. आई अपेक्षेप्रमाणे जराशी पडली होती आणि तिचा डोळा लागला होता. तिची झोपमोड न होऊ देता तिथून स्वयंपाकघरात आणि तिथून मागच्या दारात आलो. माझ्या चाहुलीने दाराशेजारच्या नळावर बसलेल्या दोन चिमण्या भुर्रकन उडाल्या आणि पारिजातकावर जाऊन बसल्या. धुण्याच्या दगडावर पोट टेकवून पहुडलेल्या मांजरीने एक डोळा उघडून पाहिलं आणि कुंपणाच्या भिंतीवर बसलेला कावळा उडून गेला. कडुनिंबाखाली टाकलेल्या झोपाळ्यावर बसलेल्या चिमी-ठमीला मात्र काहीच पत्ता लागला नाही. वेण्यांचे लांब-जाड शेपटे पाठीवरून मागे टाकून दोघी हळुवारपणे झोके घेत पुस्तकांच्या आडून खुसपुसत होत्या. काय एवढ्या गप्पा रंगल्या होत्या कोण जाणे?
पाय न वाजवता थोडासा झुकुन पुढे गेलो आणि बैलांच्या वेसणी धराव्या तशा त्यांच्या वेण्या दोन हातात दोन धरून खेचल्या.
"आऊच..आईगं",नाजूकपणे दोघी कळवळल्या आणि मी वेण्या सोडून हसत उभा राहिलो.
"दादिटल्या खादिटल्या," चिमी ओरडली आणि पुस्तक घेऊन मारायला मागं आली. झोपाळ्याभोवती दोन-तीनदा तिला हुलकावण्या दिल्यावर रागाने फुसफुसत पुन्हा झोपाळ्यावर धपकन बसली.
"जा चिमे, मला जेवायला वाढ", मी म्हणालो.
"अडलंय माझं खेटर. स्वतःच्या हाताने वाढून घेता येत नाही का?", चिमी नाक उडवत म्हणाली.
"जा नाहीतर मी आईला उठवीन हां."
दोन सेकंद माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघून चिमी उठली. "चल गं ठमे", असं म्हणून दाणदाण पाय आपटत आत गेली. ठमी गेली नाही. खाली बघत मंद हसत हातातल्या मिटलेल्या पुस्तकावर बोट फिरवत बसली.
मी कडुनिंबाला टेकून उभा राहिलो. तिच्या सावळ्या गोल चेहर्‍याकडे, खाली झुकलेल्या लांब लांब पापण्यांकडे आणि आता खांद्यावरून पुढे घेतलेल्या वेणीकडे पाहात राहिलो.
"बन्या म्हणाला तुला बघायला येताहेत उद्या?", मी विचारलं.
तिने पापण्या उचलून वर पाहिलं. मी नजर चुकवून जांभळीच्या पानांमध्ये मोहोर शोधू लागलो.
"हो येताहेत ना. श्रीरामपूरचे लोक आहेत."
मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती पुन्हा खाली बघून मंद हसत पुस्तकावर बोट फिरवत होती.
"मोठी तालेवार पार्टी आहे म्हणे?", मी मिश्कीलपणे म्हणालो.
"हो, आहेच्च मुळी," तिने तिरप्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. तिचं हसू आता रुंदावलं होतं, " ट्रान्सपोर्टचा बिझीनेस आहे. पंचवीस ट्रक आहेत म्हणे."
का कोण जाणे, पण मला कशाचातरी खूप राग आला. मी नजर पुन्हा जांभळीच्या पानांमध्ये खुपसली.
"असेना का. आम्हाला काय फरक पडतो?", तिच्याकडे न पाहताच मी म्हणालो, " आम्ही काय, तुझ्या लग्नात जेवणावर उभा-आडवा हात मारणार आणि तुझा नवरा तुला ट्रकमध्ये घालून न्यायला लागला की खाली उभं राहून तुला टाटा करणार. अर्थात तू आम्हाला लग्नाला बोलावलं तर... बोलावणार ना?"
काही उत्तर आलं नाही म्हणून मी मान वळवून तिच्याकडे पाहिलं. तिची नजर खालीच झुकलेली राहिली. चेहर्‍यावरचं हसू मात्र मावळलं होतं. मला बरं वाटलं.
पुस्तक सोडून आता ओढणीशी वेगाने चाळा करणार्‍या तिच्या नाजूक, लांब बोटांकडे पाहून मी आणखी चेव आल्यागत म्हणालो,"ठमेऽऽ, काय म्हणतोय मी? बोलावणार ना लग्नाला?"
तिने झटकन वर पाहिलं. इतकावेळ हसणार्‍या तिच्या टपोर्‍या काळ्या डोळ्यांमध्ये पाणी डबडबलं होतं आणि डोळ्यांच्या गुलाबी कडा लालसर होऊन पापण्या भिजल्या होत्या.
"ठमे...", मी चरकलो.
ती तटकन् उठून उभी राहिली आणि माझ्याकडे न पाहता, काहीही न बोलता तरातरा चालू लागली.
"ठमे....मेहरुन्निसा..", माझ्या घशातून अस्पष्ट शब्द उमटले.
मला मोठ्याने हाक मारून तिला थांबवायचं होतं, पण घशात इतका मोठा आवंढा आला की डोळ्यातून पाणीच आलं.

Friday, May 6, 2011

जर तू असता तर

जर तू असता तर
तुला दिसले असते
सुरे घेतलेले हात
कल्ले कापलेलं शरीर
निळ्याशार पाण्यातला लाल ढग
तुला दिसले असते
अजस्त्र शरीरावरचे
निर्जीव भासणारे डोळे
दिसलीही असती त्यात वेदना
पण नसती दिसली दया याचना


जर तू असता तर
तुला दिसले असते
काळे पिवळे पट्टे
आणि त्यावर लाल जखमा
भेदरलेले गोड बछडे
आणि जमिनीवर आपटलेली शेपटी
दिसले असते तुला
थंड भासणारे हिरवे-पिंगट डोळे
क्रोधाचा पेटलेला त्यात वणवा
पण तुझ्या प्रार्थनेची वानवा


जर तू असता तर
तुला दिसले असते
कुर्‍हाडीचे घाव सोसणारे
महाकाय मूक वृ़क्ष
चूड घेतलेल्या हातांनी
पेटवलेले भीषण वणवे
उघडे बोडके डोंगर
त्यावरचे तुझे मंदिर
आणि हातापाया न पडता
समोर कोसळणारी झाडे


जर तू असता तर
तुला दिसले असते
क्षुद्र मुके जीव
मानाने जगणारे
मरण येईपर्यंत
आयुष्याशी झगडणारे
जर तू असता तर
उचलले असतेस तुझे
चक्र, वज्र, त्रिशूळ, तलवार
आणि छाटली असतीस समोरची
झुकलेली मुंडकी लाचार

Tuesday, April 19, 2011

भिऊ नकोस ...

फुलपाखरांमागे धावताना, कधी झोक्यावर हिंदोळताना

पावसात भिजून आणि ओल्या मातीत खोपे करताना
दगडधोंडे उचकताना अन् काट्याफुफाट्यात हिंडताना
कळलंच नाही की तो आहे आणि हळूच कानी म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

नवी नव्हाळी फुटताना, सगळं जग फुलताना
नवी शिखरे चढताना, सागर पालथे घालताना
छातीने पर्वत फोडताना अन् लाथेने पाणी काढताना
दुर्लक्ष केलं उद्दामपणे जरी कळलं तो म्हणतोच आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

नात्यांचे दोर काचताना अन् मैत्रीच्या काचा तडकताना
जन्माचा हिशेब ठेवताना अन् जमलेल्या कवड्या मोजताना
विषारी डंख झेलताना आणि हिरीरीने दात रोवताना
चुकवली नजर अन् ऐकलं गुमान काय तो म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

मोतीबिंदू आता साचताना अन् लख्ख सगळं दिसताना
आयुष्याचे तांडव पाहताना अन् सयींचा छळ सोसताना
एकटाच ओझे वाहताना अन् पैलतीराकडे पाहताना
वाट पाहतोय, कधी तो जवळ येऊन म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... मी तुझ्या पाठीशी आहे."

किल्ली

प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते
कधी बरोबर तर कधी दुरावलेली असते

कुलूप कधी सुबक ठेंगणं असतं
तर कधी कुरूप बेंगणं असतं
कधी कधी अवघड नाठाळ असतं
तर कधी प्रेमळ ओढाळ असतं
कसंही असलं तरी किल्ली बनलेली असते
त्यांची गाठ म्हणे वरतीच मारलेली असते

कुलपावर सगळ्या घराचा राखणभार असतो
पण घरात राहायला किल्लीचाच आधार असतो
कुलूप घरीच राहून घर राखत बसतं
तेव्हा किल्लीला बाहेर उंडारायचं असतं
कितीही भटकली किल्ली तरी शेवटी फिरून घरीच येते
दुसर्‍या दारांवरून गेली तरी आपल्याच कुलपाला लागते

कुलूप किल्लीच्या नात्याची हीच एक गंमत असते
दाराला कुलूप लावले तरच किल्लीला किंमत असते
प्रेमानं दोघं राहिली तर वंगणाची निश्चिंती असते
भांडलीतंडली तर मात्र गंजण्याची निश्चिती असते
म्हणूनच म्हणतो प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते
तिने कुलपाला आणि कुलपाने तिला जपलेली असते